शुक्रवार, १५ जुलै, २०१६

चायना गेट बंद करण्यासाठी


  •  पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर हिंडले पण अफ्रिकेला गेले नाहीत अशी चर्चा काही दिवसांपासून सोशल मिडीयात होती. पण टिकाकारांना यावर फार बोलता येण्यापूर्वीच मोदींचा हा दौरा सुरू झाला. या दौर्‍यामुळे नरेंद्र मोदी यांनी या टिकाकारांची तोंडच बंद करून टाकली आहेत. केवळ मोदी द्वेषाने या देशाचे भले होईल असे समजणार्‍यांना हा दौरा म्हणजे चपराक राहील. मोझाम्बिक, दक्षिण आफ्रिका, टांझानिया आणि केनया या चार देशांचा हा दौरा आहे. प्रत्येक ठिकाणच्या मोदींच्या भेटीचे निमित्त आणि कारणही वेगवेगळे आहे.
  • काही ठिकाणी सांस्कृतिक संबंध, काही ठिकाणी व्यापारी संबंध, दक्षिण आफ्रिकेत गांधीजींच्या स्मृती जागवणारे कार्यक्रम अशा बाबींबरोबरच खनीजसंपत्तीने समृध्द असलेल्या या खंडाशी चीन जे व्यापारी संबंध जोडू पाहत आहे त्याला शह देणे हादेखील मोदींच्या दौर्‍याचा एक महत्त्वपूर्ण उद्देश आहे.
  •    ज्या दिवशी भारतात आणीबाणी लादण्यात आली त्याच दिवशी म्हणजे २५ जून १९७५ रोजी मोझाम्बिक पोर्तुगीजांच्या तावडीतून स्वतंत्र झाला. त्याआधी सन १४९८ पासून म्हणजे सुमारे पाचशे वर्षे ते पारतंत्र्यात होते. १९७५ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तेथे १९९२ पर्यंत यादवीच सुरु होती. त्यानंतर हा देश आता थोडी प्रगती करताना दिसतो आहे.
  •   भारतातील उत्पादने आणि मोझाम्बिकच्या गरजा सारख्याच असल्याने या देशाशी आमचे व्यापारी संबंध तर दृढ होतीलच. पण सामाजिक, सांस्कृतिक आदान-प्रदान करण्यासही येथे खूप संधी आहे, हे तेथील भारतीयांपुढे मोदींनी केलेले विधान महत्वाचे आणि अत्यंत खरे आहे. मोझाम्बिकचे अध्यक्ष फिलिप न्यूसी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात मोझाम्बिककडून कंत्राटी शेतीने डाळी घेण्याचा करार झाला आहे. तो या आदान-प्रदानाचे नेमके स्वरुप व्यक्त करणारा आहे. भारतातील डाळींचा तुटवडा दूर करण्यासाठी मोझाम्बिकमध्ये कंत्राटी पध्दतीने शेतीत कडधान्ये पिकवून त्याच्या डाळी भारतात आयात करण्याचा हा करार आहे. त्या देशातील मोकळ्या जमिनीवर तेथील शेतकरी शेती करतील. भारतातून त्यांना बियाणे पुरविण्यासह अन्य मदत केली जाईल. सध्या जो डाळी महाग होण्याचा प्रश्‍न आहे, समस्या आहे त्यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याचा हा फार मोठा प्रयत्न आहे. ती कडधान्ये भारतात येतील.
  •   एका कार्यक्रमात दहशतवादाचाही मुद्दा मोदींनी उपस्थित केला आहे. बांगलादेशपासून बगदादपर्यंत अलीकडेच झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोट आणि गोळीबाराच्या घटनांचा त्याला संदर्भ होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सध्याची १५ अब्ज डॉलर्सची आयात निर्यात येत्या दोन वर्षात २० अब्ज डॉलर्सवर नेण्यासाठीचे काही करार या दौर्‍यात होणार आहेत. व्यापार हा या दौर्‍याचा जाहीर झालेला मुख्य भाग असला तरी आतंरराष्ट्रीय कूटनीतीतील अनेक गोष्टी जाहीर करुन होत नसतात. त्यामुळेच मोदींची दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांची भेट केवळ व्यापारी चर्चेपुरती मर्यादित राहील असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. भारताला अणुपुरवठादारांच्या संघटनेत (एनएसजी) स्थान देण्यास विरोध करणार्‍या देशांमध्ये दक्षिण आफ्रिकेचाही समावेश होता.
  • विशेष म्हणजे ब्रिक्स या गटात हे दोन्ही देश एकत्र काम करतात असे असताना हा विरोध मावळावा यासाठी मोदी चर्चा करतील हे उघड आहे. 
  •    स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून आले होते. तेथील त्यांच्याशी संबंधित पीटरमेरिटझबर्ग या रेल्वे स्थानकाला भेट देण्याबरोबरच मादिबा म्हणजेच प्रसिध्द स्वातंत्र्यसैनिक नेल्सन मंडेला यांच्याही स्मृतींना ते उजाळा दिला गेला आहे. 
  •   टांझानियात भारतातर्फे आंतरराष्ट्रीय सौर सहकार्यातून महिलांच्या गटास सौर उपकरणांचे प्रशिक्षण देण्यात येते. या गटाला भेट देण्याबरोबरच तेथील भारतीयांपुढे आज मोदी भाषण करणार आहेत. नंतर केनयामार्गे मोदी भारतात परततील. या व्यापार किंवा सांस्कृतिक दौर्‍याच्या आड जो खरा अजेंडा आहे तो अधिक महत्वाचा आहे. किंबहुना बाकीचा सारा दाखविण्यासाठीचा मुलामा आहे.
  •   आफ्रिका हा अगदी दारिद्र्याने गांजलेला, गरीबीने पिचलेला, आजारांनी ग्रासलेला मात्र त्याचवेळी नैसर्गिक साधनसंपत्तीने समृध्द असलेला खंड आहे. विपूल खनीजसंपत्तीचा साठा असलेल्या या खंडाच्या या नैसर्गिक समृध्दीवर चीनचा कधीपासूनच डोळा आहे. भारतास याची जाणीव नव्हती असे नाही. पण भारतास पाकिस्तान आणि चीन यांच्या बेचकीत अडकवून त्याचे हात पायच बांधून ठेवण्यात आले. आता मोदींनी सगळ्या भारतीय टीकाटिप्पणी खुंटीवर टांगून ठेवत मध्यंतरी मंगोलियाचा दौरा केला. त्यानंतर इराण-अफगाण यांच्यातील चाबहार बंदराच्या विकासाचा करार करुन चीनला शह देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक ठिकाणी चीन मजबूत पैसा ओततो. आफ्रिकेतही त्याने फार मोठी गुंतवणूक महत्वाच्या शहरांमधून केली असून इतरही ठिकाणी गुंतवणुकीबरोबरच इतरही मदत तो करतो. झांबिया आणि टांझानिया यांना जोडणारा रेल्वेमार्ग चीनने बांधला आहे. झिम्बाब्वेला लढावू विमाने देण्यापासून हिंदी महासागरात आफ्रिकेच्या बंदरांनजीक नौदलाची गस्त वाढविण्यापर्यंत या ड्रगनने आपला विस्तार वाढवला आहे. हे पाहता मोदींच्या दौर्‍याच्या निमित्ताने भारतात या विषयाचा निदान विचार सुरु झाला तरी पुष्कळ होईल. भारताविरोधात जे चायना गेट ओपन केले गेले आहे ते चायना गेट बंद करण्याचा प्रयत्न या दौर्‍यामुळे होईल हे विरोधकांनी समजून घेतले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: