- अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी येथे घडलेला अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार व हत्येचा अश्लाघ्य प्रकार जेवढा संतापजनक आहे तेवढ्याच या दुर्दैवी घटनेनंतर उमटत असलेल्या प्रतिक्रिया अत्यंत वाईट अशा आहेत. सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाला आणखी ऊत आला आहे. अशा अतिसंवेदनशील घटना राजकारणविरहित ठेवून त्यावर तोडगा शोधण्याकडे लक्ष देण्याची संस्कृती दुर्दैवाने आपण जोपासलेली नाही. केवळ तावातावाने बोलून अथवा भावनातिरेकात टोकाची भूमिका घेऊन फार तर अशा घटनांवर तात्कालिक उपाय सापडू शकतात. पण त्यामुळे विकृत सामाजिक प्रवृत्तींना अटकाव होत नाही. त्यासाठी अशा घटनांचा विचार सामाजिक आणि मानसिक अंगाने होणे अधिक गरजेचे आहे.
- सध्या तरी त्याला विविध रंग देत राजकारणच अधिक सुरू आहे. त्यातसुद्धा या राजकारणाचा पोत जबाबदारपणाऐवजी परस्परांचे हिशेब चुकवण्याचाच दिसतो. म्हणजे भाजप, आपने निर्भया प्रकरणावरून कॉंग्रेस सरकारची कोंडी केली म्हणून आता आम्ही भाजपची कोंडी करतो असला सूडाचा हिशोब कॉंग्रेस राष्ट्रवादी करत असतील तर त्यांच्यादृष्टीने अशा घटना आपल्या फायद्याच्या आहेत असे दिसते. म्हणजे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचाच प्रकार नाही तर कॉंग्रेस राष्ट्रवादीकडून सरणावर भाकर्या भाजण्याचे काम होत आहे.
- राज्याचे गृहमंत्रिपद स्वत:कडे राखणार्या मुख्यमंत्र्यांना गुन्हेगारी रोखण्यात अथवा अपप्रवृत्तींवर जरब बसवण्यात यश आलेले नाही अशी भावना अशा घटनांतून होणारच. साहजिकच सरकार पक्षाकडे बोट दाखवले जाणार. पण हे करताना विरोधकांनी योग्य ते गांभीर्य न दाखविल्यामुळे सरकारला पेचात पकडण्याऐवजी विरोधकांना बचावात्मक पवित्रा घेण्याची वेळ आली. मुळात पोलिसांनी सुरुवातीला ही घटना म्हणावी तेवढ्या गांभीर्याने घेतली नाही. पण त्यानंतर तातडीने हालचाली सुरू झाल्या. किंबहुना माध्यमांमध्ये चर्चा सुरू होण्याच्याही अगोदर सरकारने संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारून जलदगती न्यायालयात सुनावणीची घोषणाही करून टाकली. तीनपैकी एक आरोपी फरार होता हे मान्य केले तरी सरकार अथवा पोलिस यंत्रणा याबाबत अगदी ढिम्म बसून होते असेही नाही. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर दोषारोप करताना संवेदनशीलता, वाढती गुन्हेगारी, लोकांमधील धास्ती यावर भर द्यायला हवा होता. पण या सामाजिक समस्येपेक्षा आपला सत्तेचा सोपान कसा सोपा होईल याकडे कॉंग्रेस राष्ट्रवादीचे लक्ष दिसून येते.
- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नगरचे पालकमंत्री असलेल्या राम शिंदे यांचे या प्रकरणातील एक आरोपी संतोष भवाळ याच्यासोबत फेसबुकवर फोटो असल्याचे पत्रकार परिषदेत सांगून सनसनाटी निर्माण केली. वास्तवात केवळ नामसाधर्म्यामुळे हा घोळ झाल्याचे लगेचच उघड झाले अन् या गफलतीमुळे उलट मुंडे यांच्यावरच दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. किती फालतूगिरी आहे ही? निर्भयाच्या दु:खावर मीठ चोळण्याचाच हा प्रकार नाही का?
- दुसरीकडे विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद भूषविणार्या व नगरचेच भूमिपुत्र असलेल्या राधाकृष्ण विखे यांनीसुद्धा सरकारच्या कारभारावर टीका केली. काय तर म्हणजे ‘सैराट अन् झिंगाट’ची उपमा दिल्याने त्याला फिल्मी रंग येऊन घटनेतील गांभीर्य कमी झाले. त्यामुळे काही विशिष्ट संघटनांकडून या प्रकाराला जातीय रंग देण्याचाही प्रयत्न झाला. त्यामुळे पुन्हा वेगवेगळे मतप्रवाह व्यक्त होऊन चर्चा भरकटू लागली.
- खरे तर अशा घटनांना जातीय रंग देण्याचे काहीच कारण नाही. आरोपींबरोबरच पोलिसांना अथवा यंत्रणेतील कुठल्याही घटकाला जात, पात, पंथ याचे लेबल लावले जाऊ नये. कारण तसे करणे हे संपूर्ण यंत्रणेवरच अविश्वास व्यक्त करण्यासारखे असते. पण काही समाजघटकांना तेच हवे असल्याने त्यांच्याकडून पद्धतशीरपणे तसा अपप्रचार केला जातो.
- या सगळ्या राजकीय कोलाहलात मूळ ज्वलंत विषय आणि त्याच्याशी निगडित मूलभूत प्रश्न अनुत्तरितच राहतात. कोपर्डीच्या प्रकरणात याची पुनरावृत्ती टाळायची असेल तर काही बाबींवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. सध्या तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत चालला आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून ‘पोर्नोग्राफी’ हातोहात आली आहे. कितीही नाकारले तरी माणसाच्या आचार-विचारांवर त्याचा प्रभाव पडतच असतो. पोलिस यंत्रणा अद्ययावत व कार्यक्षम करणे तसेच दक्षता सर्वत्र वाढवणे या कामाला मुख्यमंत्र्यांनी प्राधान्य दिले पाहिजे. या घटनेचे दोषारोपपत्र अचूक कसे बनेल हे पाहायला हवे. तसेच न्यायालयात सुनावणीप्रसंगी सनसनाटीपेक्षाही दोषींना कठोर शिक्षा कशी होईल ते मुद्दे केंद्रस्थानी असायला हवेत. या गुन्हेगारांना शिक्षा देण्याबरोबरच पुन्हा अशा घटना होणार नाहीत याची काळजी घेतली गेली पाहिजे. त्याबाबत उपाययोजना आखली गेली जावी.
गुरुवार, २१ जुलै, २०१६
सरणावर भाकरी भाजण्याचा प्रकार थांबवा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा