शनिवार, २२ सप्टेंबर, २०१८

महागाईकडे सगळय़ांचेच दुर्लक्ष

गेल्या काही दिवसांपासून दररोज पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. यावरून १० सप्टेंबरला विरोधी पक्षांनी बंदही केला. पण पेट्रोलपेक्षाही अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही दैनंदिन महाग होत आहेत. त्याबाबत कोणीच काही बोलत नाही. सध्या वाढलेल्या महागाईबद्दल कोणीच का तक्रार करत नाही, असा प्रश्न पडतो आहे. भाजीपाला, कांदा-बटाटा आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव इतके वाढले आहेत की, त्याबाबत कोणीही बोलायला तयार नाही, हे पंधरावे आश्चर्य म्हणावे लागेल. सणासुदीमुळे भाज्यांची मागणी वाढते. पण कोणतीही भाजी ८० ते १०० रुपयांच्या घरातच विकली जात आहे. त्यामुळे सामान्य माणसांचे जीवन प्रचंड महाग झाले आहे. परंतु या महागाईबाबत प्रसारमाध्यमे, राजकीय पक्ष अजिबात आवाज उठवण्यास तयार नाहीत.

भारतीय जनता पक्ष सत्तेत नसताना कधीतरी महागाई विरोधात बोलायचा. २०१० मध्ये सर्वात प्रथम दरवाढ, महागाई, इंधन दरवाढ याविरोधात भाजप आणि सर्व डावे, उजवे पक्ष काँग्रेस सरकार विरोधात एकत्र येऊन बंद केला होता. मात्र आता भाजपच सत्तेत आल्यानंतर या महागाईकडे सर्वाचे दुर्लक्ष झाले. काँग्रेस निष्क्रिय आणि निष्प्रभ झाल्यामुळे महागाईपेक्षा त्यांची नजर भाजप नेते कुठल्या प्रकरणात अडकत आहेत काय, याकडे वेध लावून बसले आहेत. पेट्रोलव्यतिरिक्त अन्य वस्तूंच्या महागाईबाबत कोणालाच काही पडलेले नाही. त्यामुळे विरोधकांची प्रखर भूमिका घेऊन विरोधकांचे काम नेमके काय असले पाहिजे याचा विसर काँग्रेस आणि विरोधी पक्षांना पडला आहे. भडकलेल्या महागाईविरुद्ध कोणताही राजकीय पक्ष आवाज उठवायला तयार नाही.
एक काळ असा होता, महागाई विरोधात मोर्चे निघायचे. घंटानाद व्हायचे. थाळीमोर्चे निघायचे. प्रसारमाध्यमे तुटून पडायची. आज कामगार संघटनाही बोलत नाहीत. गृहिणींचे मोर्चे निघत नाहीत. महागाई विरोधात हातात लाटणं घेऊन रस्त्यावर उतरणा-या रणरागिणी मृणालताई गोरे, अहिल्या रांगणेकर आज नाहीत. त्यांचे वारसदार निर्माण व्हावेत असे कोणत्याही महिला संघटनांना, महिला नेतृत्वाला वाटले नाही. मृणालताई गोरे आणि अहिल्या रांगणेकर यांच्या महागाईविरोधी महिला संघटना ४५ वर्षापूर्वी रुपया, दोन रुपयांनी महागाई वाढली तर थाळ्या वाजवत होत्या. आता या थाळ्या बंद झाल्या आहेत. १९७० च्या दशकात तेलाचे घाऊक व्यापारी शेठ किलाचंद यांना तेलाचे भाव पाच रुपये वरून सात रुपये किलो केल्यावर त्यांना सहा तास घेराव घालून मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर आदी महिलांनी कोंडून ठेवले होते. आज असे रस्त्यावर उतरणारे नेतृत्व नसल्यामुळे आहे ती परिस्थिती सामान्यांना स्वीकारावी लागते आहे. सगळेजण जणू आपलेच दात, आपलेच ओठ म्हणून गप्प बसत आहेत. कारण अच्छे दिन येतील या भ्रमात आपण चार वर्षापूर्वी राहिलो पण ते दिवस अजून दिसत नाहीत.
समाजात जेव्हा नेतृत्व बधिर होते, तेव्हा सामान्य माणसाने कुणाकडे बघायचे, असा प्रश्न निर्माण होतो. आज गरज आहे ती सामान्य माणसाची खदखद बाहेर पडण्याची. पण ही खदखद बाहेर पडणार कशी? आज सामान्य माणसे सगळय़ा बाजूने हैराण आहेत. काँग्रेसच्या राजवटीत महागाईने जीवन अशक्य झाल्याचा प्रचार जोरात झाला. त्यामुळे सामान्य माणसांना असे वाटत होते की, एक प्रयोग करून पाहू या, एक संधी देऊन पाहू या. अच्छे दिनची घोषणा मोदींनी केली होती. काँग्रेसचे दिवस चांगले नाहीत, आम्ही अच्छे दिन घेऊन येऊ असा विश्वास मोदींनी दिला होता. त्यामुळे लोकांच्या मनातील महागाईबद्दलच्या अस्वस्थतेचा विषय नेमका हेरून भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या काळात महागाई विषयावर रान पेटवले आणि काँग्रेस विरोधातील फलक झळकले. मोठय़ा आशेने आणि अपेक्षेने लोकांनी मोदींना मतदान केले. त्यामुळे सामान्य माणूस आज महागाई झाली तरी मूग गिळून गप्प बसला आहे.
या सरकारकडून सामान्य माणसांची किमान एवढीच अपेक्षा होती की, मोदी सत्तेवर आल्यानंतर निश्चित दिवस बदलतील. ही सामान्य माणसाच्या मनातील भावना ओळखून अच्छे दिनचा नारा दिला गेला. त्यामुळे जनता अधिक हुरळून गेली. पण सत्ता आली आणि शिखरावर गेलेल्या अपेक्षांचा चक्काचूर व्हायला सुरुवात झाली. आता या महागाईविरुद्धचा संताप व्यक्त करायला सामान्य माणसानेच सुरुवात केलेली आहे. आपली कुजबुज आता सामान्य माणूस सुरू करतो आहे. कारण जीवन जगणे अशक्य झालेली ही माणसे आहेत. या कुजबुजीतून भविष्यात आणि लवकरात लवकर आंदोलन उभे राहण्याची प्रतीक्षा आहे. आज ज्या शेतक-याने या देशाला समृद्ध केले, त्या शेतक-याला आत्महत्या करावी लागत आहे. शेतक-यांच्या आत्महत्यांबाबत, महागाईबाबत हे सरकार काहीच बोलत नाही. सामान्य माणूस आज महागाईत भरडला जातो आहे. तो ज्या दिवशी संतप्त होऊन रस्त्यावर उतरेल, त्या दिवशी या सरकारचे दिवस भरलेले असतील. दुधाचे भाव, डाळींचे भाव, कांद्याचे भाव आणि महागाईने या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे.
वीस वर्षापूर्वी दिल्लीत भाजपची सत्ता होती. तेव्हा सुषमा स्वराज यांना कांदे महागले या कारणाने सत्ता गमवावी लागली होती. त्यानंतर दिल्लीकरांनी ३ निवडणुकीत भाजपला जवळ केले नाही. पंधरा वर्षाच्या वनवासानंतर आम आदमीला सत्तेवर पोहोचवले. त्यामुळे पहिली चार र्वष कौतुकात गेल्यावर आता अच्छे दिनसाठी या सरकारने प्रयत्न केले नाहीत तर पुन्हा या भाजपला वनवास सोसावा लागेल हे भाजप नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे विरोधक असलेल्या काँग्रेसने रस्त्यावर उतरून हा संताप कॅच केला नाही तर तिसरी शक्ती निर्माण होयास वेळ लागणार नाही. महागाई पेट्रोल-डिझेलशिवाय अन्य वस्तूंबाबत असू शकते यावर विरोधकांचा विश्वास नाही का, असा प्रश्न पडतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: