आपल्या हिंदी चित्रपटातून जे काही सण प्रामुख्याने येऊन गेले आहेत त्यामध्ये होली, रक्षाबंधन, दिवाळी आणि गोकुळ अष्टमी या सणांचा अतिशय खुबीने वापर केलेला आहे. यातील जन्माष्ठमी किंवा गोकुळाष्टमीच्या निमित्ताने गोविंदा, दहीहंडी दाखवून हिट चित्रपट गीते देण्याचा प्रयत्न अनेक निर्मात्यांनी केलेला आहे. दहिहंडीवर नाचण्याचा आनंद अमिताभ बच्चन, शम्मी कपूर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यापासून सलमानखान, संजयदत्तपर्यंत अनेकांनी घेतला आहे।दहिहंडीचा दिवस असला की हमखास सतत कानावर पडणारे गीत म्हणजे ‘मच गया शोर सारी नगरी रे बाबा नगरी रे, आया बिरज का माखा समाल तेरी गगरी रे’ हे गीत. १९८२ साली अमिताभ बच्चन, संजिवकुमार, विनोद मेहरा या तीघांनी घेऊन प्रदर्शित झालेल्या खुद्दार या चित्रपटातील हे गीत. रवि टंडन या ख्यातनाम दिग्दर्शकाच्या चित्रपटातील या हिट गीताने अमिताभ बच्चन परवीन बाबी बरोबर प्रेक्षकांनाही ठेका धरुन नाचायला लावले आहे. किशोरकुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील या गीताला संगीत दिले होते राजेश रोशन यांनी.तोपर्यंत बॉलीवूडच्या आणखी एका गोविंदा गीताने धूमाकूळ घातला होता ते गाणे म्हणजे,‘शोर मचगया शोर देखो, आया माखनचोर’ हे शॉटगन शत्रुघ्न सिन्हा याच्यावर चित्रित झालेले गीतही गायले होते ते किशोरकुमार यांनी. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या धमाकेबाज संगीताचा हा नमुना आजही दरवर्षी आपल्याला जन्माष्टमीला सगळीकडे पहायला मिळतो. बदला हा दे मार चित्रपट शत्रुघ्न सिन्हा आणि मौसमी चटर्जी यांच्या प्रमुख भूमिका असलेला होता. त्या काळात अशा चित्रपटांची चांगलीच चलती होती.१९६३ साली मनमोहन देसाई सुभाष देसाई यांचा आलेला चित्रपट म्हणजे ‘ब्लफ मास्टर’. यात शम्मी कपूर सायरा बानू यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात शम्मी कपूर यांचेवर चित्रित झालेले गोविंदा गीत म्हण्जे ‘गोविंदा आला रे आला’ हे गीत. कल्याणजी आनंदजींच्या संगीतावर मोहंमद रफी यांनी शम्मी कपूरला चांगलीच नाचायची संधी दिली आहे. मुंबई आणि दहिहंडी किंवा गोविंदा याचे नाते अतूट आहे. मुंबई आणि चित्रपटसृष्टीचे नाते अतूट आहे. त्यामुळे मुंबईतील जीवनाचा चित्रपटात खुबीने वापर करून इथली जीवनशैली दाखवून चित्रपट वास्तवाच्या जवळ नेण्याचा मोह निर्मात्यांना नेहमीच होत राहिला आहे. त्यामुळे ही गाजलेली तीनही गीते मुंबईतील गोविंदा संस्कृतीचे वैशिष्ठ्य आणि आनंद दाखवणारी आहेत.१९९९ साली सोहिल खानने आपल्या दोन भावांना सलमान आणि अरबाजखान यांना घेऊन आणलेला धमाल विनोदी रहस्यमय चित्रपट म्हणजे ‘हॅलो ब्रदर्स.’ हिमेश रेशमीया यांनी संगीत दिलेले यातील गोविंदा गीतही बरेच गाजले होते. त्यानंतर २००३ मध्ये ओह माय गॉड चित्रपटातील गो गो गोविंदा हे गीत. ही सगळी दहीहंडी संदर्भाने येणारी गोविंदा गीते आहेत.याशिवाय कृष्ण राधा यांच्यासंदर्भातील अनेक गीते हिंदी चित्रपटसृष्टीने दिलेली आहेत. त्यामध्ये राजकपूरच्या १९७६ साली प्रदर्शीत झालेल्या सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटाचा विचार करावा लागेल. यातील ‘यशोमती मैयासे बोले नंदनलाला , राधा क्यू गोरी, मैं क्यू काला.’ हे गीत अजरामर असे हिट गीत आहे. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीतात लता मंगेशकर यांचे हे गीत अतिशय सुंदर गीत आहे. या गाण्यावर छोट्या पद्मीनी कोल्हापुरेने केलेला नाचही खूप छान वाटतो. यातील पहिले कडवे मुकेशच्या आवाजातील आहे. त्यांना गाणे म्हणताना ठसका लागतो म्हणून छोटी मुलगी ते गाणे पूर्ण करते. तो छोट्या पद्मीनीला दिलेला लता मंगेशकर यांचा आवाज छान वाटतो. हे गीत अतीशय गाजलेले गीत आहे.१९९९ लाच आलेल्या राजश्रीच्या संगीतप्रधान चित्रपट हम साथ साथ है, यातील मैया यशोदा तेरा कन्हैया हे गीतही तुफान गाजलेले कृष्ण गीत आहे. रामलक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल आणि अलका याग्निक या तीघींनी म्हटले आहे. बॉलीवूडच्या अजरामर कृष्णगीतात त्याचा समावेश झालेला आहे.याशिवाय बडा नटखट है, कृष्ण कन्हैया हे अमर प्रेममधील, राधा कैसे जाने हे लगानमधील अशी अनेक गीते लोकप्रिय आहेत. पण जन्माष्टमीने बॉलीवूडला गाण्यासाठी एक संधी मात्र नेहमीच निर्माण केलेली आहे.
शनिवार, १ सप्टेंबर, २०१८
बॉलीवूडची जन्माष्ठमी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा