नितीन संदेसरा नावाच्या आणखी एका गुजराती उद्योजकाने पाच हजार कोटींचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. संदेसरा याने भारतात आणि परदेशात जवळपास ३०० बोगस कंपन्या उभारल्या होत्या. बँकांकडून घेतलेले कर्ज या बोगस कंपन्यांमध्ये वळवण्यात येत होते. पैशांची अफरातफर करण्यासाठी खोटय़ा आणि बेनामी कंपन्या सुरू करणे, बॅलन्स शीटसोबत छेडछाड, खोटा टर्नओव्हर दाखवणे असले प्रकार केले जात होते. या कंपन्या स्टर्लिग ग्रुपच्या कंपन्यांमधील सदस्य नियंत्रित करत होते. या सदस्यांना बनावट संचालक म्हणून उभे केले होते. बेनामी कंपन्या आणि स्टर्लिग ग्रुपमध्ये व्यवहार केल्याचे दाखवत कर्जाची रक्कम वळवली जात होती. अजून कर्ज मिळावे यासाठी टर्नओव्हरची रक्कम फुगवून सांगितली जात होती. अशाप्रकारे भारतीय बँकांना ५ हजार कोटींचा चुना लावल्याचा आरोप नितीन संदेसरा याच्यावर आहे. हे प्रकार राष्ट्रीयीकृत बँकांच्या बाबतीत वारंवार का घडतात? इथे नेहमीच गुजराती लोकांकडून बँकांचा दुरुपयोग का केला जातो? असे असतानाही बँका त्यातून बोध का घेत नाहीत? गुजराती ढोकळ्याला आणि फाफडय़ाला बँक अधिकारी सोकावतात का? यामुळे सर्वसामान्यांचे फार मोठे नुकसान होत असते. अलीकडच्या काळात देशाला घोटाळ्याची मोठी परंपरा लाभली आहे.गेल्या २५ वर्षाचाच विचार करायचा झाला तर २६ मे १९९२ ला हषर्द मेहताचा घोटाळा बाहेर आला. शेअरबाजाराला जुगार ठरवत काही कंपन्यांचे शेअर फुगवून केलेला हा हजारो कोटींचा घोटाळा अनेक बँकांना दणका देणारा ठरला होता. यामध्ये बँक ऑफ कराडसारखी एक मोठी बँक दिवाळखोरीत गेली. मेट्रोपोलिटीअन बँकेलाही दणका बसला. त्यानंतर काही बँकिंग सुधारणा करण्यात आल्या. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजनेही काही सुधारणा केल्या. परंतु गुजराती माणसांकडून असे घोटाळे काही केल्या थांबले नाहीत. त्यानंतर थोडय़ाच कालावधीत केतन पारेखने केलेला घोटाळा समोर आला. झी टेलिफिल्मला मोठे करणारा हा पारेख माधवपुरा को-ऑपरेटिव्ह बँकेला बुडवून गेला. त्याचप्रमाणे त्याच्या घोटाळ्यात ग्लोबल ट्रस्ट बँक आणि कॅनरा बँकेलाही मोठा फटका बसला. यात काही राजकीय नेतेही अडकले होते. पण हर्षद मेहताच्या घोटाळ्याचा धक्का शांत होण्याच्या आतच हा घोटाळा समोर आला होता. इथेही गुजराती उद्योजक व्यापारी होते हे विशेष. त्यामुळे बँकांचा पैसा हा जुगारात लावण्यासाठी हे व्यापारी वापरतात असाच संदेश बाहेर जात होता. तरीही आमचे अधिकारी शहाणे होत नाहीत हे किती मोठे दुर्दैव! या लोकांकडून अधिका-यांची ठेवली जाणारी बडदास्त हेच याला कारणीभूत ठरते. त्यामुळे यावर कुठेतरी अंकुश बसणे आवश्यक आहे.आज फक्त चर्चा होते ती विजय मल्ल्या आणि नीरव मोदी या दोघांची. पण ही परंपरा सातत्याने आपल्या देशात आहे आणि त्यामध्ये बँकांचे अधिकारी आणि संचालक अडकलेले आहेत. प्रत्येकजण हजारो कोटींची लूट करून परदेशात पळून जात आहे. या व्यवहारांवर नियंत्रण येणार कसे? २००८ ला जेव्हा मोठी जागतिक मंदी आली आणि जगभरातील शेअरबाजार कोसळले तेव्हा भारतालाही फार मोठा फटका बसला होता. २१००० चा टप्पा गाठलेला शेअर बाजार १० हजारांनी कोसळला. जे व्यापारी, गुंतवणूकदार हवेत होते, आभाळाला ज्यांचे हात टेकलेले होते ते एका रात्रीत जमिनीवर आले होते. भारतीय अर्थव्यवस्था लवकर सावरली, कारण आपल्याकडे राष्ट्रीयीकृत बँका होत्या. त्यावेळी अमेरिकेने कबुली दिली होती की भारताप्रमाणे आमच्याकडेही बँकांवर काही नियंत्रण असते तर सगळा पैसा शेअरबाजारात लागला नसता. हे इतके बोलके उदाहरण समोर असताना आमच्या राष्ट्रीयीकृत बँका मात्र आता भांडवलदारांच्या बटिक होऊ पाहत आहेत. त्यामुळेच हे घोटाळे सातत्याने पुढे येत आहेत. हर्षद मेहता, केतन पारेखपासून बँकांना गंडा घालणा-यात नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या यांनी आपले साधून घेतले. त्यांचीच परंपरा या नितीन संदेसराने चालवली. असे कितीजण अजून आहेत आणि कितीजणांचे घोटाळे समोर येतील हे समजणेच अवघड आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांवरील नियंत्रण हा फार मोठा प्रश्न देशापुढे आहे.देशाच्या अर्थव्यवस्थेला कमजोर करणारा हा प्रकार आहे. विशेष म्हणजे हे सगळे लोक देशाबाहेर पळून जातात. त्यांना परत आणणे जिकिरीचे बनते. आता हा स्टर्लिग बायोटेकचा मालक नितीन संदेसरा याचे नाव पुढे आले आहे. ते सुद्धा मजेशीर प्रकरण म्हणावे लागेल. त्याला दुबईतून ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे समोर आले आणि नेमका काय प्रकार आहे हे उघडकीस होऊ लागले. म्हणजे हे प्रकरण दडपून ठेवण्याचा किंवा गुप्त ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते. पाच हजार कोटींचा घोटाळा केल्यामुळे सीबीआय आणि सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) रडारवर असणारा नितीन संदेसरा दुबईत नसून नायजेरियात लपला आहे, अशी माहिती आता समोर आली. नितीन संदेसरा आपला भाऊ चेतन, वहिनी दीप्तीबेन आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत नायजेरियाला पळून गेल्याचे सीबीआय आणि ईडीच्या सूत्रांकडून समोर आले आणि आणखी एकाने चुना लावल्याचे समजले. तपास यंत्रणा दुबई प्रशासनाला विनंती पाठवणार असून तिथे नितीन संदेसराची उपस्थिती आढळल्यास अटक करण्यास सांगणार आहे.याशिवाय संदेसरा कुटुंबाविरोधात इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याचाही प्रयत्न आहे. संदेसरा कुटुंबाने नायजेरियाला जाण्यासाठी भारतीय पासपोर्टचा वापर केला का, यासंबंधी अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण हा एकूणच गलथान कारभार आहे असेच म्हणावे लागेल. सीबीआय आणि ईडीने वडोदरा येथील स्टर्लिग बायोटेकचे संचालक नितीन, चेतन आणि दीप्ती संदेसरा, राजभूषण ओमप्रकाश दीक्षित, विलास जोशी, चार्टर्ड अकाऊंटंट हेमंत हठी, आंध्र बँकेचे माजी संचालक अनुप गर्ग आणि काही अज्ञातांविरोधात बँकांची पाच हजार कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पण असे प्रकार घडतात तेव्हा सहकारी, खासगी बँका बुडतात आणि सरकारी आश्रयामुळे राष्ट्रीयीकृत बँका मात्र सुरक्षित राहतात. परंतु त्यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. सहकारी बँका, खासगी बँकांनीही आर्थिक विकासात मोठे कार्य केले आहे. अशा घटनांचा फटका बसून त्या रातोरात नष्ट होतात, मात्र राष्ट्रीयीकृत बँका शाबूत राहतात. त्यामुळे आता या कर्जबुडव्यांचा रोख राष्ट्रीयीकृत बँकांकडे वळताना दिसतो.
गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१८
घोटाळेबाजांना बँकांची साथ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा