शनिवार, २२ सप्टेंबर, २०१८

बंदीचे स्वागत करा

गणेशोत्सवातील गोंगाटाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी डीजे आणि डॉल्बी वाजवण्यास परवानगी नाकारली होती. त्याला राज्य सरकारचा पाठिंबा होता. याच निर्णयाचे समर्थन उच्च न्यायालयाने करून ही बंदी कायम राखली आहे. हा निर्णय योग्य असून त्याचे कोणीही भावनिक, धार्मिक स्वरूप देऊन भांडवल करता कामा नये. अशा निर्णयांचे मोठय़ा मनाने स्वागत करून त्यातून केल्या जाणा-या राजकारणाला हद्दपार केले पाहिजे. काही राजकीय नेत्यांनी प्रसिद्धीसाठी हा विषय प्रतिष्ठेचा केला आणि कायदा मोडून, बंदी झुगारून डीजे वाजवा असा सल्ला दिला. असे फुकटचे सल्ले देणे सोपे असते. कारण असे नेते स्वत: गर्दीत उतरत नाहीत, वातानुकूलित गाडीतून थंडपणे हिंडणा-यांना याचा त्रास होत नसतो, परंतु वृद्ध, आजारी व्यक्ती, हृदयरुग्णांना किती त्रास होतो याचे काहीही भान अशा नेत्यांना नसते. परंतु पोलिसांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली हे फार महत्त्वाचे आहे.पोलिसांच्या या निर्णयाविरोधात प्रोफेशनल ऑडिओ अ‍ॅण्ड लाइटनिंग असोसिएशनने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. अर्थात ही याचिका काही राजकीय व्यक्तींच्या प्रोत्साहनातून होती. यामध्ये सातारचे राजे छ. उदयनराजे, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता. पण या दोन मोठय़ा आणि युवकांचा घोळका आजूबाजूला असणा-या नेत्यांनी समंजसपणाची भूमिका घेणे अपेक्षित होते. या याचिकेवर शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी झाली. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत गणेशोत्सवादरम्यान डीजे व डॉल्बीला परवानगी देण्यास हायकोर्टाने नकार दिला. हे योग्यच झाले. आता चार आठवडय़ांनी या प्रकरणावर हायकोर्टात अंतिम सुनावणी होणार आहे. हायकोर्टातून दिलासा न मिळाल्याने याचिकाकर्ते आता सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. परंतु तोपर्यंत गणेशोत्सव संपन्न झालेला असेल. याबाबत दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत डीजे व त्यासारखी कर्णकर्कश आवाज करणारी वाद्ये वाजवणे सुरू करताच त्यांची किमान आवाज मर्यादा ही १०० डेसिबलपर्यंत असते. त्यामुळेच कमालीचे ध्वनिप्रदूषण करणा-या या वाद्यांना गणपती विसर्जनाच्या मिरवणुका व अन्य उत्सवांत परवागी दिली जाऊ शकत नाही, अशी ठाम भूमिका राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात मांडण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने शुक्रवारी डीजे व डॉल्बी मालकांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत एकापाठोपाठ एक असे गणपती जात असतात.अनेक मंडळांचे गणपती आणि गर्दीच्या रांगा असतात. यात एकाचवेळी प्रत्येक मंडळाचा स्वतंत्र डीजे आणि डॉल्बीचा संच वाजत राहतो. याचा परिणाम तिथे गर्दीत असलेल्या उपस्थितांच्या कानाचे पडदे अगदी फाटून जातात. गर्दीत नाचणारे, बेभान झालेले कार्यकर्ते हे ब-याचवेळा तारेत आणि धुंदीतच असतात. त्यामुळे त्यांना काहीच ऐकायला येत नसते. ते वेगळय़ा विश्वात पोहोचलेले असल्यामुळे त्यांच्यावर या गोंगाटाचा काहीच परिणाम होत नसतो. परंतु मिरवणूक पाहण्यासाठी येणारे नागरिक, पादचारी, आसपासचे लोक यांना मात्र हा आवाज चांगलाच प्रभावीत करत असतो. या आवाजामुळे निर्माण झालेल्या ध्वनी लहरींचा वेग इतका मोठा असतो की तो कानावर, छातीवर धडकत असतो. रस्त्याने असलेली दुकाने, शोरूमच्या काचाही या आवाजाच्या दणक्याने थरथरत असतात. हा हॅमर होणारा आवाज एकप्रकारची भीतीच मनात निर्माण करतो. या आवाजाने अक्षरश: संचारल्यासारखे होते. कित्येकांच्या डोळय़ांतून पाणी येते. छातीवर दडपण येते, ब्लडप्रेशरही वाढते. तीन वर्षापूर्वी सातारच्या मुख्य राजपथावर मिरवणुकीदरम्यान डीजेच्या व्हायब्रेशनमुळे कन्याशाळेजवळची एक भिंत कोसळली होती. या भिंतीखाली सापडून एका वडापाव विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे असे गोंगाट हे घातकच असतात. त्या आवाजाची मर्यादा राखलीच गेली पाहिजे. हा प्रकार वृद्ध आणि हृदयरुग्णांना अतिशय घातक असतो. घराघरात ज्येष्ठ नागरिक असतात. अनेकजण आजारी असतात. आसपास हॉस्पिटल्स असतात. अशा परिस्थितीत हा डीजे आणि डॉल्बीचा आवाज हा त्रासदायकच असतो. त्याची येणारी स्पंदने ही जीवघेणी असतात.त्यामुळे त्याच्यावर घातल्या गेलेल्या बंदीचे मोठय़ा मनाने स्वागत केले पाहिजे. डीजे आणि डॉल्बी लावली नाही तर धर्म बुडेल, देव कोपेल असे समजण्याचे कारण नाही. डीजे आणि डॉल्बीवर लावली जाणारी गाणी काही धार्मिकच असतात असे नाही तर फक्त ठेकेबाज नाचता येतील अशीच लावली जातात. त्यातून कसलेही आध्यात्मिक, धार्मिक रक्षण होत नसते. मिरवणुकीसाठी डीजे, डॉल्बीशिवाय अनेक पर्याय आहेत. त्या पर्यायांचा वापर करूनही आमचा गणेशोत्सव चांगला होऊ शकतो. लेझिम हे तालवाद्य आमच्या मर्दानी संस्कृतीचे प्रतीक आहे. चांगली लेझिम पथके निर्माण करून त्यांच्या नादमय आणि नादमधुर कवायतींनीही मिरवणूक शोभायमान होऊ शकते. मिरवणुकीचे पावित्र्य राखले जाऊ शकेल. त्यामुळे डीजेवर किंवा डॉल्बी सिस्टीमवर न्यायालयाने बंदी घातली तर आभाळ कोसळले असे समजण्याचे कारण नाही. त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जातील असे समजण्याचे कारण नाही. ज्या त्रासदायक आणि कालबाह्य गोष्टी आहेत त्या टाकल्याच पाहिजेत. त्यामध्ये राजकारण आणून तरुणाईला भडकवण्याचे काम होत असेल तर ते चुकीचे आहे. आम्ही स्वच्छता अभियानाचे स्वागत केले.सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद दिला तसाच सरकारच्या या डीजे बंदी, डॉल्बी बंदीच्या आवाहनालाही प्रतिसाद देणे काळाची गरज आहे. ज्याप्रमाणे आम्ही प्लास्टिक बंदी स्वीकारली, हातात कॅरीबॅग न घेता कापडी पिशवी घेऊ लागलो तसाच हा बदलही स्वीकारला पाहिजे. सनई चौघडा, मंगलवाद्य, लेझिम, झांजा या पारंपरिक सांस्कृतिक पवित्र वाद्यांचा योग्य वापर करूनही आपण गणेशोत्सव मिरवणुका रंगवू शकतो. हे जे बदल, निर्णय सरकार घेत असते ते विचार करून घेतलेले असतात हे लक्षात घेतले पाहिजे. डीजेवर, डॉल्बीवर बंदी घातली म्हणून आमचा अहंकार दुखावला गेला असे न समजता नवा पर्याय शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. हा पर्याय सर्वाना आनंद देणारा असेल याची दक्षता घेतली पाहिजे. सण हे आनंदासाठी असतात. या आनंदाचा उत्सव होत असतो. त्या उत्सवात कोणत्याही कारणाने वाद निर्माण झाले की राजकारण सुरू होते. सणा उत्सवात शिरणारे राजकारण हद्दपार केले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: