बुधवार, १९ सप्टेंबर, २०१८

भविष्यातील भारत अन् भाजपचे भविष्य

‘भविष्यातील भारत’ या विषयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नवी दिल्लीत व्याख्यानमाला आयोजित केली आहे. सलग तीन दिवस या व्याख्यानमालेतून सरसंघचालक मोहन भागवत भाषण करणार आहेत. त्याचा एक भाग म्हणून त्यांनी सोमवारी केलेली प्रस्तावना फार बोलकी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वात लोकशाहीप्रधान संघटना आहे. संघात कोणा एकाची मनमानी चालत नाही, असे सांगून मोहन भागवत यांनी संघ आणि भाजप यांच्यात पडत चाललेली दरी दाखवून दिली. भारतीय जनता पक्ष हा संघ परिवारातील, मूळच्या जनसंघाचे नवे रूप आहे असे सर्वजण मानत असले तरी सध्याच्या भाजपमध्ये अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचेच वर्चस्व हे जगजाहीर आहे. त्यामुळे भागवतांचे हे वक्तव्य मोदी-शाह यांना चिमटे काढणारे असेच होते. सरसंघचालकांनी आपल्या भाषणातून जे मुद्दे मांडले त्यात अनेक विषय धक्का देणारे आहेत. संघ विचारांवर अंकुश ठेवत नाही. संघाच्या शाखांपासून प्रतिनिधी सभेपर्यंत विविध स्तरांवर विचारांचे आदानप्रदान, चर्चा केली जाते. त्यातूनच एखाद्या मुद्दय़ावर अखेर सहमती होते. हीच संघाची अत्यंत खुली कार्यपद्धती असल्याचे विवेचन सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रारंभीच केले. सोमवारी झालेल्या भाषणात (बौद्धिकात, कारण संघात भाषण नसते, बौद्धिक असते.) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना नेमकी काय आहे आणि ती कोणते काम करते यावर भागवत यांनी विस्तृत मांडणी केली. विशेष म्हणजे या व्याख्यानमालेसाठी विविध देशांचे राजदूत, राजकीय पक्षांचे नेते, विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले होते. डावे पक्ष आणि काँग्रेस नेत्यांनाही निमंत्रण दिल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यांच्यापैकी कोणीही भागवतांच्या विवेचनाला उपस्थित नव्हते. त्यामुळे या सर्वाना अस्पृश्य असलेल्या संघाने मात्र आम्हाला कोणताही पक्ष अस्पृश्य नाही हे बिंबवण्याचा चांगलाच प्रयत्न केला.यावेळी संघाच्या खुल्या कार्यपद्धतीबद्दल भागवत म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नामकरणदेखील संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी केलेले नाही. तीन पर्याय उपलब्ध होते. बैठकीत जमलेल्या लोकांनी बहुमताने संघाचे नाव ठरवले. कोणत्या क्षेत्रात आणि कुठे जाऊन कार्य करायचे हे स्वयंसेवकच ठरवतात. संघ त्यांना आदेश देत नाही. जिथे जाल तिथला समाज आपला मानून, राष्ट्रभक्तीने आणि कठोर शिस्तीने काम करावे एवढीच अपेक्षा संघ करतो. संघ परिवारातील संघटना आणि स्वयंसेवक स्वतंत्र, स्वायत्त आणि स्वावलंबी आहेत. त्यामुळेच सर्व क्षेत्रांत संघाचे स्वयंसेवक काम करताना दिसतील. हे सांगताना संघाला फक्त भाजपच जवळचा पक्ष आहे असे नाही, तर अन्य पर्यायही खुले असल्याचे अप्रत्यक्षरीत्या भागवतांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. भागवत म्हणतात, संघ हा सर्व लोकयुक्त विचारांचा आहे. आम्ही मुक्तवाल्या विचारांचे नाही, असे सांगत भागवत यांनी काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा देणा-या मोदी-शाह यांच्या विचारांवर मोठाच बॉम्ब टाकला. हे सांगताना त्यांनी म्हटले की, भारतातील कोणीही संघाला परका नाही. जे संघाला, हिंदू संस्कृतीला परके मानतात तेही आमचेच आहेत. म्हणूनच आम्ही सगळ्यांना बोलावतो. संघाला विरोध करा पण, तो वस्तुस्थितीच्या आधारावर करा एवढेच संघाचे म्हणणे आहे.काही महिन्यांपूर्वी प्रणव मुखर्जीना आपल्या व्यासपीठावर बोलावण्यामागचे रहस्य भागवतांनी अशाप्रकारे उलगडले. त्याचप्रमाणे आमंत्रण देऊनही पाठ फिरवणा-या मान्यवरांना त्यांनी अशी साद घातलेली दिसून येते. भागवत म्हणतात, देशावर मुस्लिमांनी, इंग्रजांनी आक्रमणे करून हा देश जिंकून कसा घेतला? त्यासाठी हिंदू समाजालाच दोष द्यायला हवेत. या समाजातच कमतरता होती म्हणून देशाचे, समाजाचे पतन झाले. हिंदू समाजामध्ये मूल्यांचा ऱ्हास झाला. हा ऱ्हास थांबवणे म्हणजेच हिंदू विचार. मूल्याधारित संस्कृती म्हणजेच हिंदुत्व. या हिंदुत्वातून समाजाला उभे करण्याचा विचार म्हणजे संघाची कार्यपद्धती. समाज निर्माणासाठी व्यक्ती निर्माण करायला हवे. हे काम संघ करत आहे. त्यातून समाज परिवर्तन होईल. त्यासाठी संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र करण्याचा अथक प्रयत्न संघ करत असल्याचा विचार भागवत यांनी मांडला. यावेळी डॉ. हेडगेवार यांच्या विचारप्रक्रियेचा आधार घेत संघाच्या विचारांची भागवत यांनी मांडणी केली. संघात भगव्या ध्वजाला अधिक महत्त्व दिले जाते हा आरोप चुकीचा आहे.तिरंग्याचाही सन्मान केला जातो, असे सांगून भागवतांनी संघावरचा पारंपरिक आरोप फेटाळून लावला. फैजापूरच्या काँग्रेस अधिवेशनात तिरंगा फडकवला गेला. तिथे अडकलेला तिरंगा खांबावर चढून पुन्हा वर फडकवण्याचे काम स्वयंसेवकांनीच केले होते. पंडित नेहरूंनी त्याच्या पाठीवर थाप मारून त्याचे कौतुक केले होते, हा दाखला देऊन सरसंघचालकांनी नेहरू, गांधी, काँग्रेस आणि संघात तेढ नव्हती, तर परस्परांचा आदर करण्याची मनोवृत्ती होती हे दाखवून दिले. हे सांगताना देशाच्या विकासात, जडणघडणीत प्रारंभीच्या काळात तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसच्या भरीव योगदानाचा उल्लेख त्यांनी केला. हा सध्याच्या मोदी-शाह यांच्या राजकारणाला चांगलाच दणका होता. एकीकडे गेल्या ७० वर्षात काँग्रेसने काहीच केले नाही, असा आरोप करणारे मोदी-शाह आणि दुसरीकडे काँग्रेसच्या कार्याची दखल घेणारे मोहन भागवतांचे वक्तव्य हे मोदी-शाह यांच्या डोळ्यांत अंजन घालणारेच होते, असे म्हणावे लागेल. एकूणच संपूर्ण तीन दिवसांचे हे बौद्धिक म्हणजे मोदी-शाह यांच्या भाजपला रुळावर आणण्यासाठी केलेला हा अट्टाहास आहे, असे वाटायला हरकत नाही. पण मोदी-शाह यांच्या एकांगी विचारांना मुरड घालण्यासाठी संघाने पुढाकार घेतला असून काँग्रेस आणि मित्रपक्षांशी जवळीक साधत संघाची ताकद ही कोणा एकाची मक्तेदारी नाही हे बिंबवण्याचा प्रयत्न सरसंघचालकांनी केलेला आहे. एकेकाळी संघ कोणत्याही पक्षाची पाठराखण करत नाही, राजकारणाशी संघाचा संबंध नाही, असे म्हणणारा संघ डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, के. सुदर्शन ते मोहन भागवत या टप्प्यात आता उघडपणे राजकीय भूमिका मांडत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भविष्यातील भारत हा उपक्रम हाती घेतलेला आहे. पण यातून भविष्यातील भारतापेक्षाही भविष्यातील भारताची सत्ता कोणाच्या हाती राहील, याचा संकेत सरसंघचालकांनी दिला आहे, हे निश्चित.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: