पूर्वीच्या काळात राजेरजवाडे सुरक्षित राहण्यासाठी आपल्याभोवती गडकोट किल्ले बांधत असत. आत्ताचे राजकीय नेते आणि पक्षही असे किल्ले आपल्याभोवती उभे करतात. त्यातला एक महत्वाचा गड आहे तो म्हणजे वाचाळवीरांचा गड. या वाचाळवीरांच्या गडामुळे सत्ताधिशांच्या कारनाम्याकडे किंवा नाकर्तेपणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते आणि प्रसारमाध्यमांचे हल्ले अशा गडांवर होत राहतात आणि राजे आत सुरक्षित राहतात. असे वाचाळवीर निर्माण करणे आणि त्यांची एक फौज कडेकोट बंदोबस्ताप्रमाणे आपल्याभोवती राखणे हेच आजचे राजकारण झाले आहे. काल काँग्रेस जे करत होती ते आता भाजप करते आहे. पण दोघांनाही आपल्यावरील दुर्लक्ष हटवण्यासाठी अशा वाचाळवीरांचा गड आधारासाठी सुरक्षित वाटत आहे.काँग्रेसची सत्तर वर्ष झाली तरी तीच राजनीती गेल्या साडेचार वर्षात केंद्रात आणि अन्य भाजपशासीत राज्यांमधून भाजप वापरताना दिसते आहे. इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसमध्ये संजय गांधी, विद्याचरण शुकला, बन्सीलाल असे नेते हा गड लढवण्याची ही भूमिका चोख बजावायचे. त्यानंतर राष्टÑपती होण्यापूर्वी झैलसिंग, बुटासिंग, तोहरा, बादल ही मंडळी काही काळ हा गड लढवत होते. २००४ ते २०१४ या काळात या वाचाळवीरांच्या गडाने आपली फळी चांगलीच मजबूत केली होती. त्यामुळे काँग्रेसचे पंतप्रधान असलेले मनमोहनसिंग यांचे मौन लपून रहात होते. किंबहुना डॉ. मनमोहनसिंग हे सरकारचे प्रमुख आहेत याचा विसर पडून विरोधक आणि प्रसारमाध्यमे या वाचाळवीरांच्या गडावर तुटून पडत. यामध्ये दिग्विजयसिंग, मणिशंकर अय्यर, कपिल सिब्बल आणि या सर्वांचे कर्णधार असलेले राहुल गांधी यांनी देशातील राजकारण किती मनोरंजक असते हे त्या काळात दाखवुन दिले होते. म्हणजे दिग्विजयसिंग आणि मणिशंकर अय्यर यांच्या वाचाळकथा म्हणजे वेताळ पंचवीशीपेक्षा सुरस कथा आहेत. यामध्ये काँग्रेसच्या काळातील भ्रष्टाचार, घोटाळे यांच्याकडे डोळेझाक होऊन सगळ्यांचा मोर्चा, हल्ला या वाचाळगडांवर होत असायचा. आत सिंहासनाधिष्ट पंतप्रधान सुरक्षित रहायचे. त्यामुळे वाचाळवीरांची फळी उभारून आपला गड मजबूत करणे हा राजकारणाचा एक भाग बनला आहे.जे केंद्रात घडते तेच राज्यात घडत असते. जे राष्टÑीय पक्षात असते तेच प्रादेशिक पक्ष धोरण अवलंबताना दिसतात. त्यामुळे राज्यातील राष्टÑवादी काँग्रेस या पक्षातही शरद पवारांनी अशीच वाचाळवीरांची भरती केलेली होती. कोणताही मुद्दा आला की अशा वाचाळांचा तोफखाना सोडून आपल्या पक्षाची मानगूट सुरक्षित ठेवायची ही राजनीती पवारांनी अवलंबली होती. त्या वाचाळवीरांच्या फळीचे कॅप्टन होते अजितदादा पवार. सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड अशा वाचाळवीरांनी राष्टÑवादीचे अस्तित्व चर्चेत ठेवलेले दिसते. म्हणजे राज ठाकरे हे मनसेच्या सभांमधून गर्दी खेचतात, छान छान बोलतात. लोक हसतात, टाळ्या घेतात, तशाच हशा टाळ्या आपण मिळवाव्यात असा मोह अजित पवारांना आवरला नाही आणि त्यांनी आपल्या मार्गाने धरण भरण्याचा सिंचनाचा नवा मार्ग मोकळा केला. पण हा वाचाळपणा अजित पवारांच्या चांगलाच अंगलट आला होता. परिणामी त्यांना यशवंतराव चव्हाणांच्या समाधीपाशी बसून आत्मक्लेश करुन घ्यावे लागले होते. राष्टÑवादीचे आणखी एक नेते की जे उत्कृष्ठ वक्ते आहेत ते म्हणजे जयंत पाटील. निवडणुकीच्या दरम्यान केवळ भाजप हा आपला शत्रू आहे यासाठी या जयंतरावांनी सोनिया गांधींची तळी उचलली होती. म्हणजे ज्या सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित करून शरद पवारांनी त्यांना विरोध केला आणि राष्टÑवादी काँग्रेसची स्थापना केली होती, त्यांच्याच पक्षाचे तत्कालीन राज्यातील अर्थमंत्री असलेले जयंत पाटील सोनिया गांधींना राष्टÑवादी ठरवण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांना विदेशी ठरवत होते. जाहीर सभांमधून अडवाणींचा जन्म लाहोरमध्ये झालेला आहे म्हणजे ते विदेशी आहेत असा दावा केला होता. त्यावेळी जयंत पाटलांपुढे मिडीयाने डोकेफोड करून सागितले होते की अडवाणींचा जन्म हा स्वातंत्र्यापूर्वीचा आहे. तेंव्हा तो अखंड भारताचा एक भाग होता. त्यामुळे त्यांना अभारतीय म्हणणे चुकीचे आहे. परंतु वाचाळवीराची भूमिका करत असल्यामुळे काहीही समजून न घेता जयंत पाटील यांनी आपला हेका सुरुच ठेवला आणि अडवाणींची बाजू मांडणाºया प्रसारमाध्यमांना राष्टÑवादी विरोधी ठरवण्यात गर्क झाले. त्यानंतर केवळ आपल्या वक्तृत्वाची छाप पाडण्यासाठी त्यांनी ग्राम विकास मंत्रालयाचा कारभार आपल्या हातात आल्यावर गावोगाव जाऊन शौचालयावर भाषण देण्यास सुरुवात केली. खरं तर त्यांचे हे वक्तव्य मोदी सरकारला सुचले असते तर त्यांनी विद्याबालनला घेण्याऐवजी जहा सोच वहा शौचालय ऐवजी जयंतरावांची स्क्रीफ्ट पक्की केली असती. जयंतराव म्हणत होते की तुमचे तुमच्या बायकोवर प्रेम आहे ना? मग शहाजहान जर त्याच्या बायकोसाठी ताजमहाल बांधू शकतो तर तुम्ही एक साधा संडास नाही का बांधू शकत? लोक हसायचे, पण श्हाजहानने पत्नीच्या मरणोत्तर ताजमहाल बांधला होता, तसा मरणोत्तर संडास बांधून काय उपयोग आहे? पण ग्रामविकास मंत्र्यांना कोण काय सांगणार? त्याच दरम्यान राष्टÑवादीचे उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले काकांचे पुतणे अजित पवारही आर आर पाटील या साध्या माणसावर चिडायचे. आबांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना गहिवरुन आले, हात थरथरु लागले, तेंव्हा अजित पवार चार चौघात आपल्याच उपमुख्यमंत्र्याला म्हणाले की तंबाखू खाणे बंद करा म्हणजे हा थरथराट बंद होईल. काही अडलं होतं का? पण फक्त वाचाळता करून वेळ मारून न्यायची. मोठे पक्ष करतात मग आम्ही का करु नाही?शिवसेनेतही अशा वाचाळवीरांना तोटा नाही. त्यामध्ये बोलून अडचणीत येणारे आणि नंतर सारवासारव करण्यात मनोहरपंत जोशींचा हात कोणी धरणार नाहीच, पण सध्या हे वाचाळवीराचे काम चोखपणे करतात ते रामदास कदम. उद्धव ठाकरे बोलतात त्याच्या विसंगत वक्तव्य करणे ही तर त्यांची खासीयत आहे. म्हणजे राजकीय पक्षांना हा वाचाळगड असल्याशिवाय सुरक्षितता लाभतच नाही असे दिसते.सध्या भाजप सगळीकडे सत्तेत आहे. भाजपकडे तर जशी सोशल मिडीयाची फार मोटी फौज आहे तशीच ही वाचाळवीरांची फौज फार मोठी आहे. गल्ली ते दिल्ली शत प्रतिशत वाचाळवीर निर्माण करून भारतीय जनता पक्षाने आपला गड एकदम पक्का केला आहे.भाजपकडे असलेले वाचाळवीर काही संत, महंत, धर्मांध तर काही आयात केलेले असे आहे. कधी कोणी या देशाला सल्ला देतो की कुणी किती मुलं जन्माला घालावीत. कधी कोणी प्रत्येकाने पाच मुले जन्माला घालावीत, कोणी दहा तर कोणी म्हणतो आपला टक्का वाढेपर्यंत हे धर्मकार्य सुरु राहिले पाहिजे. म्हणजे शरीरधर्मापलिकडे माणसाच्या जीवनात काही आहे हे या भगव्यांना माहितीच नाही का? कोणी आहाराबाबत बोलतो, कोणी कपड्यांबाबत बोलतो. काहीही बोलत असतात. केंद्रात असे संत महंत योगी हे काम करतात तर राज्यात हभप भाजप हे नेते काम करतात. मागच्याच आठवड्यात दहिहंडीच्या वेळी भाजपचे हभप आमदार राम कदम म्हणाले की, मुली पळवून न्यायला मी मदत करतो. काय महाराष्टÑातल्या तरुणांना फक्त मुलींना पळवून नेण्याचेच काम आहे का? पण मग अशा वाचाळवीरांचा गड नेत्यांना, सत्ताधिशांना लागतो तरी कशासाठी?याचे उत्तर एकच आहे, ते म्हणजे सत्ताधिशांची निष्क्रियता झाकली जाते. बाकीचे मुद्दें मागे पडतात. राम कदमांचा मुद्दा गेले आठ दिवस इतके चर्चिले जात आहेत की त्यामुळे राज्यातील खड्डे लोकांच्या विस्मरणात गेले. खड्ड्यांमुळे जे चंद्रकांत पाटील घेरले जात होते त्यांना कदमांचा आधार वाटला. त्यांनी कदमांची पाठराखण केली. त्यामुळे राज्यातील खड्डे बुजले का, गणपती खड्डेमुक्त रस्त्याने येणार का हे प्रश्न बाजुला पडले. वाचाळवीर ही फार मोठी ढाल राजकीय नेत्यांची झालेली आहे. त्यामुळे देशात, राज्यात बेकारी किती आहे, महागाई किती आहे, पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सामान्य होरपळला कसा जात आहे, खाजगी क्षेत्रातील, कंत्राटी कामगार किती असुरक्षित आहे, महिलांचे प्रश्न, विकासकामाचे प्रश्न सगळे बाजूला पडतात. सरकारला कोणीच काही विचारत नाही. कारण देशातले राज्यातले सगळे प्रश्न संपले आणि राम कदम यांनी मुली पळवून नेण्याचाच प्रश्न हा फार गंभीर आहे हे लक्षात घेऊन सगळे त्यावर तुटुन पडतात. हेच सरकारचे फार मोठे संरक्षण कवच असते. अशा संरक्षण कवचात आमचे नेते सुरक्षित राहतात.
रविवार, ९ सप्टेंबर, २०१८
वाचाळवीरांचा गड
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा