पुण्याच्या हिंजवडी परिसरात १२ वर्षीय दोन मुलींवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यातील एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही बाब अत्यंत संतापजनक अशी आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड ते हिंजवडी हा भाग गुन्हेगारी घटनांनी सातत्याने गाजतो आहे. अशातच हा अल्पवयीन शाळकरी मुलींवर झालेला बलात्कार आणि त्यात एकीचा मृत्यू होणे हे अत्यंत भयावह चित्र आहे. पॉक्सोसारखा कायदा असूनही लहान मुलांना कसलेही संरक्षण मिळत नाही आणि त्यांना लैंगिक अत्याचारांना बळी पडावे लागत आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक अशीच आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत असलेल्या हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी हा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार घडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बालिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन अल्पवयीन मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून हा प्रकार घडल्याचे दिसून येते आहे.हिंजवडीतील दोघांनी हा प्रकार केला आहे, त्यामुळे बालिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. बारा वर्षे वयाच्या दोन मुली रविवारी दुपारी एका मंदिरात दर्शनाला गेल्या होत्या. मंदिराजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी गणेश आणि त्याचा मित्र उभे होते. या दोघांनी या दोन अल्पवयीन मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून मंदिरामागील झुडपात नेले. यातील एका मुलीवर दोघांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. ही अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक घटना आहे. एवढेच नाही तर त्यानंतर दुस-या मुलीवर एकाने बलात्कार केला. यानंतर या दोन्ही मुलींना धमकाविण्यात आले. बारा वर्षाच्या मुली म्हणजे अगदी लहान नाहीत, अगदी मोठय़ा नाहीत. चॉकलेटच्या आमिषाने त्या गेल्या म्हणजे हे दोघे पूर्वीपासून परिचित असणार यात शंकाच नाही. तसे कोणी कोणाला चॉकलेटचे आमिष दाखवावे आणि त्या मुलींची फसगत व्हावी हे न पटणारे आहे. परंतु यामध्ये ओळखीचा आणि परिचयाचा फायदा घेण्यात आला असण्याचीच शक्यत आहे.विशेष म्हणजे बलात्कार केल्यानंतर या प्रकाराबाबत कोणाला सांगायचे नाही, सांगितले, तर बघा, अशी धमकी दिली गेली. त्यामुळे बलात्काराच्या वेदना सहन करीत त्या मुली दोन दिवस गप्प बसल्या. अशी मनात भीती राहणे हे किती भयावह आहे. भीतीमुळे पीडित मुली अत्याचार होऊनही शांत होत्या. मात्र बुधवारी यातील एका पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दुस-या मुलीलादेखील त्रास होऊ लागल्याने तिलाही हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, तिने दोघींबाबत घडलेला प्रकार आईला सांगितला आणि हा प्रकार उघडकीस आला. यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला आहे. जर त्या मुलींना त्रास झाला नसता, उपचार करण्याची गरज भासली नसती तर हा प्रकार दडपला गेला असता. वासनांध झालेले हे नराधम सातत्याने गिधाडाप्रमाणे अशा मुलींवर तुटून पडत राहिले असते. यातून त्या मुलींची आयुष्य उद्ध्वस्त झाली असती. आपल्याकडे जे कायदे आहेत ते फक्त कागदोपत्रीच आहेत. निर्भया पथके निर्माण झाली, कायदे केले गेले पण त्याचा कसलाही धाक राहिलेला नाही. २०१२ ला दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर साध्या बलात्काराच्या घटनांपेक्षा सामूहिक बलात्कारांचे पेव फुटल्याचे दिसून येते. ही पशूवृत्ती कशामुळे वाढीस लागत आहे याचा शोध घेतला पाहिजे.बलात्का-यांना कठोर शासन करण्याच्या फक्त बातम्या येतात, घोषण होतात, अशा घटनांनंतर मेणबत्ती मोर्चे निघतात पण पुढे काहीही होत नाही. निर्भया प्रकरणातील आरोपींना शिक्षा झालेली आहे, फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे, परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. अशा गुन्ह्याला माफी नसते हे गुन्हेगारी जगतापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कायद्याच्या रक्षकांची आहे. जलदगती किंवा फास्ट ट्रॅक कोर्टात असे खटले चालवले जावेत असे सांगितले जाते. पण त्याचा फायदा काय झाला? फास्ट ट्रॅक न्यायालयातील निकालानंतर पुढची शिक्षेची कारवाई संथगतीनेच होणार असेल तर गुन्हेगार सहीसलामत राहतात. तुरुंगात आयतं राहायला, खायला मिळते. त्यामुळे बाहेरच्या जगापेक्षा ते सुरक्षित जीवन जगतात. हा कसला न्याय आहे? बलात्काराच्या वाढत्या घटना आणि अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार थांबण्यासाठी कायद्याचा धाक बसला पाहिजे. अशा घटनांमध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा न करता, टाळाटाळ न करता त्याचा तपास प्राधान्याने केला पाहिजे. बलात्काराच्या घटनांमधील आरोपी समोर आहेत, त्यांना पकडले आहे, साक्षीपुरावे असतानाही त्यांच्यावर आरोपपत्र सादर करायला, न्यायालयापुढे तो खटला न्यायला दिरंगाई का केली जाते? बालकांवर होणा-या लैंगिक अत्याचाराला प्रतिबंध घालणारा कायदा या देशात असूनही अशा घटनांमध्ये वाढ होते आहे याचा स्पष्ट अर्थ आहे की, कायद्याची कोणाला भीती वाटत नाही. पोलीस तपास, न्यायालयीन दिरंगाई यात भरपूर कालावधी जातो, त्यामुळे आपल्याला कसलीही चिंता करायचे कारण नाही, अशी भावना गुन्हेगारांमध्ये निर्माण झालेली आहे. ही अत्यंत धोक्याची गोष्ट आहे.फक्त बलात्कार, बाल अत्याचार याबाबत विशेष न्यायालये निर्माण होण्याची गरज असून इथे अत्यंत जलद गतीने निकाल दिला गेला पाहिजे. आरोपींना पीडित मुलींनी ओळखलेले असते, कबुली झालेली असते, सगळे काही स्वच्छपणे समोर असतानाही शिक्षा व्हायला वर्षानुवर्षे का जातात, हे न उलगडणारे कोडे आहे. त्यामुळे बलात्काराच्या घटनेत न्यायदान करायला, ती केस कोर्टापुढे येण्यासाठी कमीत कमी कालावधी असला पाहिजे. तीन महिन्यांत याबाबत निकाल दिला गेला पाहिजे. अशा कृत्यांमुळे तातडीने कठोर शासन होते हे जेव्हा समजेल तेव्हाच अशा प्रकारांना आळा बसेल. आज पुण्याच्या हिंजवडीसारख्या परिसरात घडणारी घटना ही संतापजनक अशीच आहे. हा परिसर आयटी क्षेत्र म्हणून विकसित होत असताना, संपूर्ण देशभरातूनच नाही तर जगभरातून लोक इथे नोकरी-धंद्यासाठी येत असताना हा भाग असा असुरक्षित आहे हा संदेश जाणे हे पुणे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे. म्हणून अशा गुन्हेगारांना धाक बसेल अशी कायद्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
शनिवार, २२ सप्टेंबर, २०१८
कायद्याचा धाक राहिला नाही
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा