कृष्णजन्माष्ठमी अर्थात गोकुळ अष्टमी निमित्ताने दहिकाला आणि दहिहंडी उत्सवाला आपल्याकडे मोठा उत्साह असतो. परंतु हा उत्साह दाखवताना आणि दहिहंडीचा उत्सव करताना या आनंदावर कुठे विरजण पडणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल. कारण दहिहंडी या साहस प्रकारात दरवर्षी कितीतरी गोविंदा जखमी होतात, मृत्यूमुखी पडतात. त्यांच्या कुटुंबाची नंतर अक्षरश: वाताहात लागते. म्हणूनच आनंद देणारा हा उत्सव आनंद मिळेपर्यत साजरा करून सर्वांना त्याचे समाधान लाभले पाहिजे. गेली अनेक वर्ष दहीहंडी उत्सवाबाबत काही नियम असावेत असा विचार सातत्याने पुढे येत होता. त्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी काही महत्त्वाचे निर्णय दिले होते. परंतु त्याला गोविंदा पथकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अर्थात त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. तेंव्हापासून दहीहंडी उत्सवात न्यायालयाच्या नियमांचे पालन करावे लागत आहे. अर्थात त्यामध्ये पळवाटा काढणारेही आहेतच. परंतु न्यायालयाने घातलेली बंधने ही सुरक्षेसाठी आहेत, कोणाच्याही जिवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. दहिहंडी हा श्रीकृष्णाच्या जन्मदिवसाच्या दुसरे दिवशी हा खेळ साजरा केला जातो. तो कृष्णाच्या पराक्रमाची जाणिव ठेवण्यासाठी खेळला जातो. त्याचा प्रत्यक्षात अर्थ काय आहे हे लक्षात न घेता आठ थर, दहा थर लावून जिवाशी खेळण्याचा प्रकार गेल्या काही वर्षात ठाणे, मुंबईत रुजू झाला होता. काही राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिष्ठेचा हा खेळ करुन त्यासाठी गोविंदाची जान की बाजी लावली होती. म्हणजे ज्या निर्दयपणे डब्ल्यू डब्ल्यू एफचे क्रूर खेळ पाहिले जातात तसे हे दहिहंडीचे थरार गर्दी करून पाहिले जात होते. पण हा जर अध्यात्मिक, धार्मिक खेळ आहे तर कृष्णाने कधी एवढी मोठी दहिहंडी केली होती का असा प्रश्न विचारला पाहिजे. कृष्णाने कधीही एक थरापेक्षा मोठी दहीहंडी केली नव्हती हे वास्तव आहे. घरातील शिंकाळ्यापर्यंत लहान मुलांचा हात पुरत नाही पण मोठ्या लोकांचा पोहोचतो. अशा उंचीवर दह्याची बांधलेली मडकी कृष्णाने घरात जाऊन आपल्या सवंगड्यांना बरोबर घेऊन फोडली. त्यामुळे त्या एकथरापेक्षा मोठ्या कधीच नव्हत्या. सामान्य उंचीच्या गवळणीच्या हाताइतकी ती उंच असायची. असे असताना सणाच्या नावाखाली चाललेल्या या जिवघेण्या खेळावर निर्बंध लादले गेले हे एकप्रकारे योग्य झाले. उत्सव म्हटला की तो सर्व समाजाने एकत्र येऊन साजरा करावा, त्यातून सामाजिक समता, बंधूता वाढीस लागावी हा उद्देश असतो. मुख्यत्वे उत्सव हे समाजाला काही तरी देणारे, त्यांचा निखळ आनंद घेण्यासारखे असायला हवेत. परंतु बदलत्या काळात उत्सवांचे स्वरूप बदलू लागले आहे. त्यात काही चांगले बदल समोर येत असले तरी त्याचवेळी काही नव्या समस्याही विचार करायला लावत आहेत. दहीहंडीसारखा उत्सवही याला अपवाद नाही. वास्तविक दहीहंडी हा आपला पारंपरिक उत्सव. वषार्नुवर्षे हा उत्सव ठिकठिकाणी मोठया उत्साहात साजरा होत आहे. या उत्सवासंदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत. धार्मिकदृष्टयाही या उत्सवाला वेगळे असे महत्त्व आहे. उंच टांगलेली दहीहंडी, ती फोडण्यासाठी उभे राहिलेले गोविंदांचे थर, त्यांच्यावर होणारा रंगीत पाण्याचा वर्षाव आणि जोडीला भगवान श्रीकृष्णाच्या लिला वर्णन करणारी गीते, ‘गोविंदा आला रे’ चा जल्लोष असे भारलेले वातावरण डोळ्यासमोर उभे राहते. परंतु सध्याच्या व्यावसायिक युगात दहीहंडीचे निखळ खेळाचे स्वरूप लोप पावले आहे. मोठमोठया रकमांच्या बक्षिसांची रेलचेल आणि त्यासाठी कसून तसेच प्रसंगी जीवावर उदार होऊन प्रयत्न करणारे गोविंदा हेच या उत्सवाचे स्वरूप दिसून येत आहे. या निमित्ताने ध्वनीप्रदूषण, गोविंदांची सुरक्षितता, लहान वयाच्या मुलांना गोविंदा पथकात वाव असे प्रश्न समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर दहीहंडीबाबत काही नियम निश्चित करण्याची मागणी वेळोवेळी पुढे येत आहे. त्याप्रकरणी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावण्यात आले. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने ४ वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ मध्ये एका आदेशाद्वारे १८ वर्षांखालील गोविंदांवर बंदींचा निर्णय जाहीर केला होता. एवढेंच नाही तर, २० फुटांपेक्षा अधिक उंचीचे मानवी मनोरे उभे करण्यावरही बंदी घातली होती. गोविंदा पथकांनी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर न्यायालयाने १२ वर्षांखालील मुलांचा गोविंदा पथकात समावेश करण्यास परवागनी दिली होती. परंतु अंतिम निर्णय मात्र दिला नव्हता. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आणणारी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या परिस्थितीत दहीहंडी उत्सव साजरा करण्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. ती दूर करण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या संदर्भात उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आणि राजकीय दहिहंडी उत्सवाला थोडा पायबंद बसला. २०१६ पासून दहीहंडी उत्सवात न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन करावे लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयामुळे दहीहंडीची उंची २० फुटांपेक्षा अधिक ठेवता येणार नाही तसेच १८ वर्षांखालील मुलांना गोविंदा पथकात सहभागी होता येणार नाही. आता या आदेशाची कितपत प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. दहिहंडी २० फुटाखाली बांधून थर त्यापेक्षा उंच करण्याची शक्कलही गेल्यावर्षी लढवली गेली होती. आपल्याकडे विविध उत्सवांच्या काळात होणारे आवाजाचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने तत्पूर्वी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. त्यानुसार उत्सवकाळात अमर्याद आवाजापासून नागरिक सुरक्षित रहावेत आणि त्यांना चांगल्या वातावरणात जगता यावं यासाठी सर्व शहरांमधील आवाज मर्यादा राखावी आणि हे काम स्थानिक नियोजन प्राधिकरणांनी करावे असा आदेश देण्यात आला आहे. त्याचे पालन करताना कसलेही राजकारण आड येवू नये. नागरिकांची आणि गोविंदा पथकांची सुरक्षितता फार महत्वाची आहे, कोणाची अडचण होणार नाही हे पाहून हा उत्सव साजरा व्हावा.
सोमवार, ३ सप्टेंबर, २०१८
सुरक्षेला प्राधान्य
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा