भविष्यातील भारत या तीनदिवसीय व्याख्यानमालेतून सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका स्पष्ट केली. संघ विचारांचा नवा लूक भागवतांनी सादर केला. काँग्रेस आणि डाव्या पक्षांकडून सातत्याने होणारी संघावरची टीका खोडून काढत संघ मुख्य प्रवाहापेक्षा वेगळा नाही हे बिंबवण्याचा ब-यापैकी प्रयत्न किंवा आटापिटा भागवत यांनी केला. आपले वस्त्र सनातनी नाही, तर पुरोगामी आहे हे दाखवण्यासाठी संघ आता दक्ष झाला आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काँग्रेसचे नाते म्हणजे विळा-भोपळय़ाचे सख्य आहे. काँग्रेसने कायम संघाचा तिरस्कार केला. अशा परिस्थितीत आपल्या पारंपरिक विरोधकांचे कौतुक करण्यातही सरसंघचालक मोहन भागवत मागे राहिले नाहीत. यावरून संघाचा मूळचा अजंडा कोणत्याही एका पक्षाची पाठराखण करायची नाही हे दाखवण्यात भागवत यांचे चातुर्य दिसून आले. संघ म्हणजेच जनसंघ, जनसंघ म्हणजेच भारतीय जनता पक्ष हे समीकरण खोडून काढत जे जे उत्तम उदात्त उन्नत आहे ते मधुर मानून स्वीकारायचे धोरण या तीनदिवसीय भागवत पुराणातून दिसून आले. काँग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात मोठी भूमिका बजावली असून या पक्षाने देशाला अनेक महापुरुष दिले, अशा शब्दांत मोहन भागवत यांनी या व्याख्यानात काँग्रेस पक्षावर स्तुतिसुमने उधळली आहेत. हे वक्तव्य म्हणजे तमाम संघ परिवाराला धक्का देणारे होते. पण संघ आता बदलतो आहे की संघाची नेमकी भूमिका सांगण्यासाठी हे बौद्धिक घेतले हे अनाकलनीयच आहे. ‘भविष्य का भारत : आरएसएस दृष्टिकोन’ या विषयावर भागवत यांनी संघाचा नवा चेहरा पेश केला. गेल्या वर्षी गणवेश बदलला, आता मानसिकता बदलली की खरी मानसिकता समोर आणली हे ज्याचे त्याने समजून घेतले पाहिजे. परंतु कालबाह्य आणि त्याज्य गोष्टींचा त्याग करून नव्या प्रवाहात येण्याबाबत संघ दक्ष झालेला दिसून येत आहे.आपल्या भाषणाच्या सुरुवातीला भागवत यांनी डॉ. हेडगेवार यांच्या जीवनावर भाष्य केले. संघाची भूमिका मांडताना भागवत म्हणाले की, आम्ही तिरंग्याचा सन्मान करतो, भारत हिंदू राष्ट्र आहे आणि राहील. आपल्याला आपल्या देशासाठी जगले पाहिजे. हिंदुत्व आपल्या समाजाला एकजूट ठेवते. संघ लोकांना कळत नाही, कारण संघ अनोखा आहे. सत्तेत कोण आहे यामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही. आम्ही फक्त आपले काम करतो, असे भागवत म्हणाले. याचा स्पष्ट अर्थ की संघाची डॉ. हेडगेवार यांची जी भूमिका स्वयंसेवक आणि समाजसेवेची होती ती महत्त्वाची आहे. अखंड हिंदुराष्ट्र हे ध्येय तर ‘ऋषी मुनींनी जिथे वास केला, तिथे धूर तो कांचनांचा निघाला’ या संघाच्या नवरात्री श्लोकातील अर्थ सार्थ करणे ही आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली. यातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दुक्कलीच्या एकाधिकारशाहीवर अप्रत्यक्षपणे वार करून त्यांची ‘छोटी हजेरी’ घेतली. संघात छोटी हजेरीचा अर्थ न्याहरी किंवा नाष्टा असा असतो. त्याप्रमाणे ही छोटी हजेरी उपदेशाचा डोस नाही, तर खुराक देणारी असेल आणि त्यातून २०१९ च्या निवडणुकीचे वातावरण तयार होईल याची दक्षता घेतलेली दिसून येते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सर्वात मोठी लोकशाहीवादी संघटना असल्याचे सांगत, या संघटनेत लोकशाहीचे पालन केले जाते. संघाची कार्यपद्धती वेगळी आहे. लोकांनी आमच्याशी सहमत व्हावे यासाठी त्यांच्यावर कधीही दबाव आणत नाही अशा शब्दांत भागवत यांनी संघाची नीती स्पष्ट केली. त्याचवेळी सरसंघचालक या पदाची निवड कशाप्रकारे होते हे त्यांनी स्पष्ट केले असते, तर बरे झाले असते. त्यामुळे संघातील लोकशाही दृष्टिकोन अधिक स्पष्ट झाला असता. संघाच्या स्थापनेपासून सरसंघचालक पद हे त्या त्या सरसंघचालकाच्या मृत्यूपर्यंत कायम राहिले आहे.डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस. फक्त के. सुदर्शन यांनी आपल्या हयातीत हे पद सोडले आणि तेव्हापासून मोहन भागवत हे लोकशाही पद्धतीने हा कार्यभार सांभाळत आहेत.२०१४ च्या निवडणुकीत प्रसिद्धीचे नवे तंत्र विकसित करूनच मोदी-शाह यांचा भाजप सत्तेवर आला; परंतु त्याला टोला मारत भागवत यांनी संघाचा प्रसिद्धीवर मुळीच विश्वास नसून, संघाची कामाच्या माध्यमातून आपोआप चर्चा होते. संघ अनोखा असल्याने देशातील कोणत्याही इतर संस्थेची तुलना संघाशी होऊ शकणार नाही, अशा शब्दांत भागवत यांनी संघाचा गौरव केला.संघ ही हिंदुत्ववादी संघटना असली तरीही, हिंदू राष्ट्र म्हणजे तेथे मुस्लिमांसाठी जागाच नसेल असे नव्हे. हिंदू राष्ट्र ही सर्व धर्मसमावेशक संकल्पना आहे, असे मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. यात त्यांनी हिंदुत्व ही जीवनशैली आहे हे ठसवण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्वाची खरी व्याख्या स्वामी विवेकानंदांनी केलेली आहे. स्वत:चा मुलगा मृत्यूच्या दाढेत असताना एका पित्याला जे दु:ख होते, तसेच दु:ख अन्य कोणीही मृत्यूच्या दाढेत असताना ज्याला होते तो हिंदू, ही ती व्याख्या. त्यामुळे हिंदुत्व हे स्वाभाविक आहे. असा स्वभाव सर्व धर्मात असला तरी तो हिंदू, हे यातून स्पष्ट होते. यावरच मोहन भागवत यांनी टिप्पणी केलेली दिसून येते.संघ जागतिक बंधुभावाच्या संकल्पनेसाठी कार्यरत आहे आणि या बंधुभावाच्या संकल्पनेत विविधतेतून एकता अभिप्रेत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्त्वज्ञान हे प्रत्येकाला सोबत घेऊन जाते. हिंदू राष्ट्र म्हणजे तेथे मुस्लिमांना स्थानच नाही असे नाही. ज्या दिवशी असे म्हटले जाईल त्या दिवशी हिंदुत्व संपेल. हिंदुत्व वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेबद्दल बोलतो, असे ते म्हणाले. या वक्तव्यातून संघ हा मुस्लीम द्वेष्टा आहे या सातत्याने होणा-या टीकेचा त्यांनी समाचार घेतला. त्यासाठीच हिंदुत्व हे भारतीय सांस्कृतिक मूल्यांचे सार आहे आणि विविध धर्म, विचारांच्या लोकांमध्ये बंधुभाव रुजवणे त्याचे उद्दिष्ट आहे, असे भागवत म्हणाले. संघाचा हा दृष्टिकोन असला तरीही २०१९ च्या दृष्टीने मुस्लीम समाजाला जवळ करण्यासाठी संघ दक्ष झाला आहे का, याचाही विचार केला पाहिजे. त्यासाठी हिंदुत्व ही संकल्पना भारतीयत्वाच्या संकल्पनेशी समानता साधणारी आहे. ती विविधतेतून एकतेचं प्रतीक आहे. संघदेखील याच भारतीयत्वाच्या संकल्पनेत विश्वास ठेवतो, असे ते म्हणाले.संघावर नेहमीच टीका होत राहिली ती गोळवलकर गुरुजींच्या विचारांनी. राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकातील काही विचार आता कालबाह्य झाले आहेत. ते संदर्भ आम्ही काढून टाकलेले आहेत. वर्तमान परिस्थितीत संघ गोळवलकर गुरुजी यांच्या सर्वच विचारांशी सहमत राहू शकत नाही, असे स्पष्ट मत या व्याख्यानमालेतून भागवत यांनी मांडून संघ बदलतो आहे हे दाखवण्याची दक्षता घेतली. ‘बंच ऑफ थॉट्स’ हा गोळवलकर गुरुजींनी त्या त्या वेळी दिलेल्या भाषणांचा संग्रह आहे. तत्कालीन परिस्थितीला अनुसरून त्यांनी काही वक्तव्ये केली होती. ते विचार शाश्वत नाहीत. काळानुसार परिस्थिती बदलली आहे. सोबतच आमचे विचारही बदलले आहेत. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनीच बदलाची परवानगी दिली आहे, असे सांगून मोहन भागवत यांनी कालबाह्य संघविचारांचा त्याग केल्याची कबुली दिली.२०१४ च्या निवडणुकीनंतर काँग्रेसकडून विशेषत: राहुल गांधी आणि त्यांच्या थिंक टँककडून संघावर सातत्याने टीका केली गेली. या टीकेत गांधी हत्येशी संबंध असल्यापासून ते संघात महिलांना प्रवेश का नाही, संघ महिलांकडे दुर्लक्षित करतो अशा प्रकारची बाळबोध टीका केली गेली होती. त्यामुळे अध्यक्ष झाल्यामुळे राहुल गांधी २०१९ च्या निवडणुकीत मोदी-शाह यांच्यावरच्या नाराजीचे खापर संघावर फोडणार, संघाच्या आग्रहामुळे मोदी काही निर्णय घेतात हे बिंबवण्याचा प्रयत्न करणार हे गृहीत धरून मोहन भागवत यांनी काँग्रेसला, मुस्लिमांना कुरवाळले आहे. त्याचप्रमाणे मोदी-शाह यांच्या धोरणालाही चिमटे घेतले आहेत. हे लक्षण २०१९ च्या निवडणुकीसाठी संघ दक्ष असल्याचेच आहे.
मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१८
संघ ‘दक्ष’
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा