राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे सर्वांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे असल्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले. त्याचप्रमाणे आरोग्यमंत्र्यांनीही रविवारी मास्कसक्ती होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सरकारने सक्ती करण्यापूर्वीच स्वत:ची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सगळ्या गोष्टी सरकारने करणे आवश्यक नाही. आपणच निग्रहाने मास्क वापरायला सुरुवात केली पाहिजे.
गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे चौथ्या लाटेला जर रोखायचे असेल, तर पुन्हा एकदा आपण स्वत:हून मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि कोविड प्रतिबंधक लस प्राधान्याने घेण्याची गरज असल्याचे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. सांगलीत महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस दलाच्या परेड ग्राऊंडवर आयोजित केलेल्या सोहळ्यात जयंत पाटील बोलत होते. कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले, तरीही राजकीय कार्यक्रम सर्वच पक्षांकडून गर्दीने केले जात आहेत. राजकीय नेत्यांचे निरीक्षक असतात, त्यांच्या अंतर्गत तपास यंत्रणा असतात. त्यांना अगोदरच याची कुणकूण लागलेली असते. फक्त निर्णय उशिरा घेतले जातात, सोयीने घेतले जातात. असे होता कामा नये. यासाठी सरकारने काही करण्यापूर्वीच नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
खरंतर कोरोनाच्या तीन लाटांचा यशस्वीपणे सामना करून आपण धैर्याने उभे आहोत; पण आता चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. या चौथ्या लाटेला उबंरठ्यावरच रोखायचे असेल, तर पुन्हा एकदा आपण स्वत:हून मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि कोविड प्रतिबंधक लस प्राधान्याने घेणे आवश्यक आहे. कोविडच्या चौथ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सज्ज करण्याचे निर्देश सरकारने दिलेले आहेत. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांबरोबर बैठक घेतली होती आणि परिस्थितीचा आढावा घेतला होता. ही सगळी लक्षणे पुढची लाट येण्याची शक्यता दाखवत आहेत. असे असताना नागरिकांनी अगोदरच सज्ज असले पाहिजे. खरंतर आज एक महिना होईल निर्बंध शिथिल करून. मास्कबंदी उठवली नव्हती, तर मास्क ऐच्छिक ठेवला होता. त्यामुळे आपण गेल्या दोन वर्षांपासून लागलेली मास्कची सवय कशाला बंद करायची हा प्रश्न आहे. पुन्हा आपल्याला बंधने नको असतील, तर आपण स्वयंशिस्त पाळणे अनिवार्य आहे.
महाराष्ट्राने समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. कृषी, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, संशोधन, साहित्य, नाटक, चित्रपट, कला, संस्कृती अशा सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्राने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. देशातील प्रगतशील आणि पुरोगामी राज्य म्हणून आज महाराष्ट्राचा लौकिक आहे. असे असताना आपण प्रत्येक गोष्ट सरकारने करावी असा आग्रह धरणे चुकीचे राहील. ही चौथी लाट येण्यापूर्वीच आपण सज्ज राहिलो आणि ती थोपवली, तर त्यातून आपला फायदा होणार आहे. सतत बंद करून उद्योग, व्यवसाय, शाळा बंद ठेवून कोणाचे भले होणार आहे? आता बंद न करता कोरोना बरोबर जगायची सवय लावायची असेल, तर ही बंधने, मास्क वापरणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने सक्ती करावी आणि फतवा काढावा याची वाट पाहण्याची गरज नाही. गेल्या महिनाभरात लोकलमधून अनेक जण विनामास्क हिंडताना दिसतात. गर्दीच्या ठिकाणी मास्क हा कायमच वापरला पाहिजे. त्यासाठी कोरोना आहे की, गेला याचा विचार न करता कोणत्याही आजारापासून, संसर्गापासून रोखण्याचा तो उपाय आहे. आपल्या सुरक्षेसाठी त्याची गरज आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
गेल्या आठवड्यात दररोज रुग्णांचा आकडा वाढताना दिसत होता. मागच्या महिन्यात दररोज हजारच्या आत रुग्णसंख्या आलेली असताना, पुन्हा एकदा साडेतीन हजारांच्या पुढे हा आकडा गेला. कोरोनामुळे मृत्यू पावणाºयांच्या संख्येतही वाढ होताना दिसली. संपूर्ण देशात ही परिस्थिती नसली, तरी काही विशिष्ट राज्यांत हा आकडा वाढताना दिसला आहे; पण ही जी राज्ये आहेत त्यातून अन्य राज्यात प्रवास करणाºयांची संख्या मोठी आहे. आपण राज्य बंदी करू शकत नाही. कोणाला येण्यापासून रोखू शकत नाही. त्यामुळे आपल्यालाच काळजी घेणे आवश्यक आहे. सगळे अहवाल येईपर्यंत, सरकारी नियंत्रणे लावेपर्यंत खूप वेळ जातो. तोपर्यंत हा प्रसार वेगाने वाढण्याची भीती असते. यासाठी आपण सावध राहणे आवश्यक आहे. शक्य तिथे आणि शक्य तितके अंतर राखून राहणे आणि मास्क वापरणे याला आज तरी कोणताही पर्याय नाही. विनाकारण वाद घालण्यात, विरोध करण्यात काहीही अर्थ नाही. संकट आल्यावर त्याच्याशी मुकाबला करायला जाण्यापेक्षा संकट येऊच नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणजे मास्क वापरणे हा आहे. सरकारच्या सक्तीची वाट न पाहता आपण मास्क वापरला पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा