कोणत्याही राजकीय पक्षाची जाहीर सभा म्हटल्यावर प्रमुख वक्ता कोण आहे ही उत्सुकता असते. अमुक एक प्रमुख वक्ते आहेत, म्हणून प्रेक्षक ते काय बोलणार आहेत हे ऐकायला आवर्जून जात होते. राजकीय सभांना नागरिकांनी गर्दी करणे ही एक संस्कृती होती, त्याचप्रमाणे सभा नावाचे एक शास्त्र होते. सभा मग ती जाहीर असो वा संस्थेची अंतर्गत ती त्या प्रथेप्रमाणेच चालवली जायची. या सभेला उपस्थित असणाºया प्रत्येकाची दखल घेण्याची प्रथा होती. पण सभा या प्रकाराला एक प्रतिष्ठा होती. सभा म्हणजे फक्त कोणा एका वक्त्याने तासभर बोलणे आणि गर्दी जमवणे असा प्रकार नव्हता.
किंबहुना बीकॉम, बीएच्या अभ्यासक्रमातही एसपी किंवा सेक्रेटेरियल प्रॅक्टिस या विषयांत किंवा चिटणीसाचा व्यवसाय या विषयात सभाशास्त्रावर भरपूर प्रकरणे होती. कोणती सभा कशाप्रकारे घेतली जाते याची नियमावली होती. सभेची सूचना, कार्यक्रमपत्रिका वगैरे विषय अत्यंत महत्त्वाचे होते. याची पद्धती सभेच्या स्वरुपाप्रमाणे बदलत असली, तरी त्याची एक शास्त्रीय बैठक आणि संस्कृती होती. ती आजकाल बघायला मिळत नाही. याचे कारण मुख्य वक्त्यांनी आयत्यावेळी व्यासपीठावर येण्याची प्रथा सुरू झाली आणि सभेचे सांस्कृतिक स्वरूप नष्ट झाले.
पूर्वीच्या काळात अगदी १९७०च्या आणि आणीबाणीनंतरच्या काळातही अनेक मोठ्या वक्त्यांच्या जाहीर सभा झाल्या. हजारोंच्या संख्येने श्रोते या सभांना येत असत. त्याकाळी कॅमेरे, टीव्ही वाहिन्या नव्हत्या. त्यामुळे त्या विराट सभांचे चित्रीकरण नसेलही. पण त्या सभा सुसंस्कृत आणि सभाशास्त्राप्रमाणे होत असत. हे आजकाल बघायला मिळत नाही. त्यामुळे त्या सभेचे पावित्र्य राहत नाही. फक्त गोंधळ आणि घोषणा. म्हणजे एखाद्या गृहिणीने तासन्तास राबून सुग्रास स्वयंपाक बनवला असेल, तर तिची अपेक्षा असते की, तो ताटात व्यवस्थित सजवून, डावीकडचे उजवीकडचे क्रमाने वाढून ताट सजवून, त्याभोवती रांगोळी घालून सर्वांनी बसून जेवावे. पण अचानक कोणीतरी हात घालतो आणि बुफे असल्याप्रमाणे हात घालून खायला लागतो. त्यावेळी जसे त्या अन्नाचे पावित्र्य जाते तसेच आजकाल सभांचे होताना दिसते आहे.
हजारोंच्या गर्दीपुढे पूर्वी यशवंतराव चव्हाण, चरणसिंग, एस. एम. जोशी अशा कितीतरी एकसेएक वक्त्यांच्या सभा पाहिल्या आहेत. पण ते नेते कितीही मोठे असले, तरी शास्त्रशुद्ध पद्धतीनेच सभा साजºया केल्या जात होत्या. यामध्ये पाहुण्यांचे स्वागत, पाहुण्यांचा परिचय, सभेचा अध्यक्ष, प्रमुख वक्ता, आभार प्रदर्शन हे सर्व प्रकार असायचे. पाहुणा कितीही मोठा असला, तरी त्या पाहुण्यांचा परिचय करून देण्याची प्रथा होती. सभेला जो अध्यक्ष असायचा त्याचे नाव पुकारणे, त्याला अनुमोदन देणे, त्याच्या अध्यक्षतेखाली ही जाहीर सभा होत असताना प्रमुख वक्त्याने सर्वांची दखल घेणे, त्यानंतर अध्यक्षांचे सर्वात शेवटी भाषण होणे आणि मग आभार प्रदर्शन. अगदी सतरंज्या गुंडाळणाºयांपासून ते मंडपवाले, लाऊडस्पिकरवाले सर्वांचे आभार मानले जायचे. अध्यक्ष, पाहुणे, प्रमुख वक्ते हे वेळेवर हजर होत असत. उशीर झाला तरी सर्वजण आल्याशिवाय सभा सुरू केली जात नव्हती. ही सगळी संस्कृती आजकाल मोडीस निघालेली दिसते. त्यामुळे सभांचे पावित्र्यही राहिलेले दिसत नाही.
दीप प्रज्ज्वलन करायला कोणी वेगळाच, प्रतिमांना हार घालणारे वेगळेच, प्रमुख वक्ता येईपर्यंत प्रेक्षकांना थोपवून ठेवण्यासाठी तळातल्या नेत्यांनी भाषणे करायची आणि वेळ मारून न्यायची असल्या प्रकारांनी संपूर्ण जाहीर सभांचे शास्त्र आणि संस्कृती धुळीस मिळवली आहे. पूर्वी कितीही मोठा नेता असला, तरी आयोजक समोर उपस्थित प्रेक्षकांसमोर त्याचा परिचय करून द्यायचे, स्वागत केले जायचे आणि अध्यक्षांच्या संमतीने त्याला बोलायला लावले जायचे. आजकाल जाहीर सभांना अध्यक्ष हा प्रकारच नसतो. पूर्वी राष्ट्रगीताने सभेचा समारोप व्हायचा आणि सर्व दिग्गज नेतेही शेवटपर्यंत थांबायचे. पण आजकाल ही सभ्यता कुठे दिसत नाही. स्टेजवर बोलणाºया प्रत्येकाचे बोलणे ऐकून घेतले जात होते.
आजकाल सभा ही इव्हेंट झालेली आहे. त्याची मॅनेजमेंट ठेकेदारांना, इव्हेंट मॅनेज करणाºया संस्थांना दिली जाते. त्यामुळे स्टेज उभे करण्यापासून ते खुर्च्या मांडणे यापैकी कार्यकर्त्यांना काहीच करावे लागत नाही. सगळ्या गोष्टी पैसे टाकून केल्या जातात, त्यामुळे कार्यकर्ते फक्त छान छान कपडे घालून घोषणा देण्यापुरते दिसतात. यातून सभेची सभ्यता त्यांना समजत नाही, हे गेल्या काही वर्षांत अधोरेखित झालेले दिसते. अमूक एका नेत्याची सभा आहे हे जाहीर केले जाते आणि सायंकाळी सहाची सभा असली, तर नेता ८ ला येणार. सहा ते आठ तळातल्या लोकांनी खिंड लढवत आपली भाषणे ठोकायची. म्हणजे पूर्वी महाराष्ट्रातल्या जत्रांमधून कुस्तीचे फड भरायचे. त्यात हिंद केसरी वगैरे पेहेलवानांच्या कुस्तीची जाहिरातबाजी व्हायची. दादू चौगुले आणि सतपाल यांची कुस्ती अशी जाहिरात केली जायची. ती पाहायला फडावर गर्दी जमायची. ती कुस्ती सुरू होण्यापूर्वी छोट्या मुलांच्या कुस्त्या लावल्या जायच्या. वीस-पंचवीस अशा छोट्या कुस्त्या झाल्यावर मग निकाली कुस्ती लावली जायची. तसा प्रकार आता सभांबाबत होतो. त्यामुळे सभा झाल्यावर नंतर राजकीय कुस्त्या होताना दिसतात. विचार संपला, संस्कृती संपली आणि सभेचे शास्त्र संपले. सभेला इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले आणि माणसे माणसांपासून दूर गेली. सभा माणसांना एकत्रित करण्यासाठी, समाजाला जोडण्यासाठी घेतल्या जात होत्या. आजकाल त्या समाजात फूट पाडण्यासाठी घेतल्या जात आहेत असे वाटते. त्यामुळे सभेतून विचारांपेक्षा करमणुकीला जास्त महत्त्व आलेले दिसते.
- प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाइन्स
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा