शुक्रवार, २७ मे, २०२२

नेत्याने पुढे व्हायचे असते

 


कोणतेही युद्ध, लढाई जिंकायची असेल, तर नेत्याने पुढे व्हायचे असते. आपण नेहमीच छत्रपती शिवरायांचा आदर्श सांगतो. छत्रपतींच्या पराक्रमाचा इतिहास गौरवाने सांगतो; पण छत्रपती मोठे का झाले? तर ते सर्वात पुढे होते. कोणतेही युद्ध लढण्यासाठी, लढाईसाठी, मोहिमेसाठी शिवराय स्वत: बाहेर पडत होते, रस्त्यावर उतरत होते. त्यांच्या मागून मावळे होते. तुम्ही करा असे राजांनी कधी सांगितले नव्हते, तर आपण करू असे ते म्हणत. त्यामुळेच त्यांच्या मोहिमा नेहमीच फत्ते होत असत. राजांसाठी आपला जीव देण्यास प्रत्येक मावळा तयार असायचा. समोर मृत्यू आहे हे माहिती असतानाही मावळा त्यांच्याबरोबर उतरायचा. याचे कारण आपले राजे करून दाखवतात. फक्त आदेश सोडत नाहीत, त्यामुळेच लाख मेले तरी चालतील; पण लाखांचा पोशिंदा मरून चालणार नाही. या न्यायाने आपले प्राण हातावर घेऊन शिवकार्यात सर्व जण जमा होत होते. तानाजी मालुसरेंच्या घरात लग्न कार्य आहे, हे माहिती असल्यामुळे कोंढाण्याच्या मोहिमेची कल्पना राजेंनी त्यांना सांगितली नाही; पण चाणाक्ष तानाजी मालुसरेंना ते समजल्यावर आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे, असे म्हणत कोंढाण्याच्या मोहिमेवर तानाजी मालुसरे गेले आणि आपले प्राण अर्पण करून ती मोहीम फत्ते केली. कोणतीही मोहीम तेव्हाच यशस्वी होते, जेव्हा नेते पुढे येतात.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक संघर्षाच्या आंदोलनात पुढे होते. मग तो महाडच्या चवदार पाण्याचा असो वा काळाराम मंदिराचे आंदोलन असो. आपल्या अनुयायांना करा असे त्यांनी सांगितले नाही, तर आपण अगोदर केले पाहिजे आणि माझ्या मागून या असे सांगून नेतृत्व केले. म्हणून त्यांची आंदोलने यशस्वी झाली.

तुमची आंदोलने कितीही खरी असली, भूमिका योग्य असली, विचार खरा असला, तरी तो आदेश देऊन कधी यशस्वी होत नाही. आंदोलनात स्वत: उतरावे लागते. सध्याच्या भोंग्यांच्या आंदोलनाबाबत नेमके हेच होताना दिसत आहे. राज ठाकरे आदेश सोडत आहेत. हनुमान चालिसा वाचा म्हणून सांगत आहेत. कार्यकर्ते पेटून उठून त्या आदेशाचे पालन करत आहेत आणि पोलीस पकडून नेत आहेत. नेते घरात आहेत; पण जर राज ठाकरे म्हणाले की, आपण हे आंदोलन करूया. मी रस्त्यावर उतरतो, तर अशी आंदोलने चिघळणार नाहीत. कार्यकर्त्यांची धरपकड करावी लागणार नाही. सरकारला, शासनाला, प्रशासनाला त्याचा विचार करावा लागेल. त्यामुळे राज ठाकरे यांनी स्वत: छत्रपतींचा आदर्श घेऊन पुढे आले पाहिजे. एखाद्या मशिदीसमोर येऊन आपल्या कुटुंबीयांसह हनुमान चालिसा म्हणून दाखवली पाहिजे. पोलिसाच्या काठ्या कायकर्ते खात आहेत, त्यांना पोलीस पकडून नेत आहेत. त्यांच्यावर केसेस होत आहेत. नेते घरात आहेत तिथेच आहेत. अशाने आंदोलने यशस्वी होत नाहीत.


२००८ला मराठी पाटीचा विषय हातात घेतला. खळ्ळ खटॅक केले. काही अन्य भाषेतल्या पाट्या फोडल्याही; पण अंमलबजावणी झाली नाही. महाविकास आघाडी सरकारने २०२२ ला मराठी पाटीचा निर्णय घेतला. त्याचे सगळे श्रेय महाविकास आघाडी सरकारला जाते; पण २००८च्या आंदोलनात राज ठाकरे रस्त्यावर उतरले असते, एखादा दगड हातात घेतला असता, तर हा निर्णय तत्कालीन सरकारला २००८ ला घेणे भाग पडले असते. २००८ ला जे सत्तेवर होते तेच आता सत्तेत आहेत. मग अवघड काय होते? पण नेते घरात बसले आहेत आणि कार्यकर्त्यांना मार खायला, पोलिसांच्या तोंडी दिले जात आहे, असा संदेश गेला. प्रत्येक आंदोलनावेळी हाच संदेश जातो आहे. त्यामुळे आपण जर छत्रपती शिवरायांना देव मानतो, तर त्यांचा आदर्श घेऊन स्वत: आंदोलनासाठी उतरले पाहिजे, आंदोलनाचे नेतृत्व केले पाहिजे. मग आपोआप भोंगे खाली उतरतील. जो पुढे येतो तोच जिंकतो हा इथला नियम आहे.

कोणतेही आंदोलन यशस्वी होते, ते जेव्हा नेता आंदोलनात पुढे असतो तेव्हा. एसटी कर्मचाºयांचा संप ५ महिने झाला. पाच महिने आझाद मैदानावर कामगार होते; पण नेतृत्वच नव्हते. त्यामुळे हा संप फसला. आंदोलन यशस्वी झाले नाही. स्वयंघोषित नेते या आंदोलनात आपली पोळी भाजताना दिसू लागली; पण कर्मचाºयांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. जिथे नेता नाही, नेतृत्वाचा पुढाकार नाही तिथे लढाई जिंकता येत नाही.


महाराष्ट्रात अशी अनेक आंदोलने आहेत, जी नेतृत्वामुळे फसली. मुंबईतील गिरणी कामगारांचा संप झाला. अनेक महिने तो झाला. गिरण्या बंद पडल्या. गिरणी कामगार देशोधडीला लागले. नेत्यांचे काहीच नुकसान झाले नाही. कोणतेही आंदोलन, चळवळ ही यशस्वी होण्यासाठी नेतृत्वाने पुढाकार घेणे गरजेचे असते. २०१४ ला सत्तेवर आल्यानंतर २ आॅक्टोबर, २०१४ ला पंतप्रधान मोदींनी स्वच्छता मोहिमेचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे मोदींनी स्वत: हातात झाडू घेतला. त्यामुळे या स्वच्छता मोहिमेला राज्यभरातील नव्हे, तर संपूर्ण देशभरातील नेत्यांनी, विरोधकांनीही हातात झाडू घेतला आणि सफाईला पुढे आले. अगदी ज्येष्ठ नेते शरद पवारांनीही हातात झाडू घेतला होता. मोदींचे विरोधक असलेले अरविंद केजरीवाल यांनीही हातात झाडू घेतला. स्वच्छतेचा एक चांगला संदेश जगभरात गेला आणि आपल्याकडे स्वच्छतेची सवय लागली; पण नेतृत्वाने पुढे आल्यानेच हे यशस्वी झाले, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: