शुक्रवार, २७ मे, २०२२

हिंदुस्थानला आपला देश मानणारा सम्राट अकबर



भारतावर किंवा हिदुस्थानवर मोगली आक्रमण झाले, अनेक मुसलमान शासक इथे झाले; पण खºया अर्थाने हिंदुस्थानला आपला देश मानणारा मुसलमान राजा होता तो म्हणजे अकबर. अकबराच्या अनेक गोष्टी आजही आपल्या जीवनाचा एक भाग आहेत. आपल्याकडे ज्या गोष्टींकडे वैभव म्हणून बघितले जाते, त्या ऐतिहासिक बाबतीत नवरत्नांचा दरबार आणि अकबर-बिरबल यांच्या चातुर्य कथा याकडे तर आपल्याकडे एक सांस्कृतिक वैभव म्हणून पाहिले जाते.


अकबर हा भारताचा तिसरा मोगल सम्राट. हिंदुस्थानला आपला देश मानणारा हा पहिला मुसलमान राजा होता. त्याची राजवट चांगली होती. मोगल साम्राज्याचा पाया मजबूत करणाºया या राजाचे व्यक्तिमत्व लहानपणीच अनेक आपत्तींतून तावून सुलाखून निघालेले होते. राज्यारोहणप्रसंगी (१५५६) त्याच्या ताब्यात निश्चित असा कुठलाच प्रदेश नव्हता. विश्वासार्ह असे सैन्यही त्याच्या हुकमतीखाली नव्हते, तरीही त्याने आपला पालक बैरामखान याच्या मदतीने आपला एक जबरदस्त प्रतिस्पर्धी मुहम्मदशाह आदिल सूर याचा दिवाण हेमू याचा पानीपतच्या मैदानावर पतन केला (१५५६). नंतर सिकंदर सूरसारख्या इतर प्रतिस्पर्ध्यांनाही शरणागती पत्करण्यास लावून दिल्लीचे आपले आसन त्याने स्थिर केले.

१५५६ पासून १५६० पर्यंत पालक म्हणून सर्व सत्ता बैरामखानाच्याच हातात होती, परंतु बैरामखानाच्या क्रूर व अन्यायी कारभारामुळे असंतोष पसरला, म्हणून अकबराने युक्तीने त्याच्या हातून सत्ता काढून घेतली. बैरामने बंड केले; पण शेवटी त्यास अकबरास शरण जावे लागले. अकबराने त्यास सन्मानाने वागविले. बैरामखानानंतर अकबराची प्रमुख दाई माहम अनघा हिच्या गटाचे काही दिवस दरबारात वर्चस्व राहिले. माहम अनघाच्या मृत्यूनंतर अकबराने सर्व सत्ता स्वत:च्या हाती घेतली.


राज्यकारभार हाती घेतल्यानंतर पहिल्या सात वर्षांत (१५६० ते १५६७) माहम अनघाचा मुलगा आदमखान, अब्दुल्लाहखान उझबक या बंडखोरांची टोळी, रावळपिंडी जिल्ह्यातील गख्खर लोक व काबूल येथे असलेला त्याचा भाऊ मिर्झा हाकिम यांची बंडे त्याने मोडून काढली. गोंडवन, माळवा, रावळपिंडी जिल्ह्याचा ईशान्य भाग, चुनार, जौनपूर हे प्रदेश जिंकून घेतले. १५६८ मध्ये चितोड, १५६९ मध्ये जोधपूर व १५७० मध्ये बिकानेर, जैसलमीर, कालिंजर हेही प्रदेश त्याने जिंकले. १५७२ पर्यंत राणा प्रताप सोडून बहुतेक राजपूत राजांना त्याने शरण आणले.

१५७३ मध्ये गुजरातमधील मुसलमान राजांना पराजित करून तेथे त्याने आपला अंमल बसविला. १५७६ मध्ये हळदीघाटाच्या लढाईत त्याने राणा प्रतापचा पराभव केला. त्याच साली त्याने बंगालही जिंकला. १५८४ साली काबूलमध्ये राज्य करीत असलेला आपला सावत्र भाऊ मुहम्मद हाकिम वारल्यामुळे तो प्रांत अकबराने आपल्या ताब्यात घेतला. काश्मीरचा राजा युसुफशाह व त्याचा मुलगा याकुब यास त्याने कैदी म्हणून बिहारमध्ये पाठविले व काश्मीरचे राज्य आपल्या राज्यास जोडून घेतले (१५८६-१५८७). या काश्मीरच्या मोहिमेत त्याचा विश्वासू विद्वान मित्र बिरबल कामास आला. १५९१ ते १५९५ च्या दरम्यान अकबराने ओडिशा, सिंध, कंदाहार व बलुचिस्तान जिंकून घेतले. दक्षिण हिंदुस्थान जिंकण्याच्या हेतूने त्याने खान्देशच्या राजास मांडलिकत्व कबूल करावयास लावून अहमदनगरवर स्वारी केली; पण चांदबीबीच्या बहादुरीमुळे त्यास पराभव पत्करावा लागला (१५९५). १६०० मध्ये मात्र त्याने अहमदनगर जिंकण्यात यश मिळविले व त्याच्या पुढल्या वर्षी त्याने असीरगढही जिंकला. अशा तºहेने त्याने आपले राज्य पश्चिमेस काबूलपासून ते पूर्वेस बंगालपर्यंत व उत्तरेस हिमालयाच्या पायथ्यापासून दक्षिणेस नर्मदा नदीच्या खाली अहमदनगरपर्यंत वाढविले.


अकबर एक उत्तम राज्यकर्ताही होता. त्याने आपली शासनव्यवस्था न्याय, सहिष्णुता व गुणवत्ता या तीन तत्वां‍वर आधारलेली होती. अकबराची राज्यपद्धती एक तंत्री होती. त्याचा अधिकार अनियंत्रित होता. शासनाच्या सोयीसाठी महसूल, न्याय, धर्म, लष्कर, गुप्तहेर, टाकसाळ इ. खाती त्याने निर्माण केली होती. संपूर्ण राज्याची विभागणी अठरा सुभ्यांनंतर करण्यात आली होती. सुभ्यानंतर सरकार व सरकारनंतर परगणा अशी प्रांतिक शासनाची उतरण होती. प्रांतिक शासनाचा सुभेदार हा प्रमुख असे व तो दिवाण, सदर, अमील, बितिक्ची, पोतदार, फौजदार, कोतवाल, वाकेनवीस व इतर अधिकाºयांच्या मदतीने प्रांतिक कारभार चालवीत असे.

अकबराने घोड्यावर मुद्रा मारण्याची आणि माणसाचे व घोड्याचे सविस्तर वर्णन हजेरीपटावर लिहिण्याची पद्धत सुरू केली. तोडरमलच्या सहाय्याने त्याने केलेल्या शेतसाºयाच्या पद्धतीतील सुधारणा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जमिनीची पाहणी व मोजणी करून वर्गवारी करण्यात आली व उत्पन्नाच्या एकतृतीयांश हिस्सा शेतसारा ठरविण्यात आला. त्याची चलनपद्धतीही प्रशंसनीय होती. नाण्यांचे प्रकार, त्यांचे वजन, त्यांच्यातील शुद्ध धातू व त्यांचे कलाकृतीपूर्ण आकार अकबराच्या त्या क्षेत्रातील कामगिरीची साक्ष देतात.


हिंदूंसंबंधीचे त्याचे धोरण त्याच्या उदारदृष्टीची व मुत्सद्देगिरीची साक्ष देते. पूर्वीच्या मुसलमान राजांनी हिंदूंवर जुलमाने राज्य केले, म्हणून त्यांना हिंदूंच्या कट्टर विरोधाला तोंड द्यावे लागले. अशी परिस्थिती मोगल वंशावर येऊ नये, म्हणून त्याने मुसलमानेतर लोकांच्या मनात राज्याबद्दल आपुलकी निर्माण करण्याचे ठरविले. त्यांना जाचक व राजकीय दृष्ट्या कमी लेखणारे जझिया कर व यात्राकर रद्द केले. युद्धकैद्यांना गुलाम करणे किंवा त्यांना मुसलमान धर्म स्वीकारावयास लावणे बंद करून हिंदूंचे सामुदायिक धर्मांतरापासून रक्षण केले. हिंदूंमधील तंटे पूर्वी मुसलमान काजी निकालात काढत असत. अकबराने त्याकरिता ब्राह्मणांची नेमणूक केली. हिंदूंना आपल्या दरबारी नोकºया आणि मोठमोठ्या हुद्यांच्या व जबाबदारीच्या जागा दिल्या. इतकेच नव्हे, तर जैसलमीर, मारवाड व बिकानेर यांसारख्या राजपूत राजघराण्यांशी त्याने विवाहसंबंध जोडले. इतर मुसलमान राजांनी आपल्या हिंदू स्त्रियांस कधीच न दिलेले पूजाचार्दींचे धार्मिक स्वातंत्र्य अकबराने दिले. इतकेच नव्हे, तर राजमहालातच त्याने त्यांच्याकरिता मंदिरे बांधली. त्यांच्या दिवाळीसारख्या सणातही तो सहभागी होत असे. परिणामत: राजपूत हे अकबराचे निष्ठावान सेवक व मोगल साम्राज्याचे संरक्षक पाईक बनले.

अकबराने उलेमा व मुल्ला लोकांच्या सत्तेविरुद्ध व धर्मवेडेपणाविरुद्ध जिद्दीने लढा दिला. मुसलमानांत जर धार्मिक किंवा दिवाणी बाबतीत मतभेद निर्माण झाले, तर त्यांच्याबद्दलचा शेवटचा निर्णय देण्याचा अधिकार अकबराला देण्यात आला. मात्र, दिलेला निर्णय कुराणाशी सुसंगत, त्याचप्रमाणे राष्ट्रहिताला पोषक असण्याची गरज असे. अकबराने धर्माचा मूळ पाया मानवता मानून साम्राज्यातील सर्व धर्मांबद्दल सहिष्णुता बाळगली. हिंदू, ख्रिस्ती, जैन व पारशी धर्मगुरूंकडून त्यांच्या धर्मातील चांगल्या बाजू समजावून घेतल्या. सर्व जाती जमातींना एकाच मंदिरात एकाच पद्धतीने ईश्वराची आराधना करता यावी, म्हणून त्याने १५८१ साली दीन-ए-इलाही नावाचा धर्म स्थापन केला. हा धर्म सर्व धर्मातील चांगल्या निवडक तत्वांवर आधारित होता. मुख्य तत्व सर्वांशी सहिष्णुता हे होते. या धर्माचे अनुनायी शक्यतो मांसाहार करीत नसत. त्यागाच्या प्रमाणावर अनुयायांचा दर्जा ठरविण्यात येत असे. अकबर कोणालाही जबरदस्तीने आपल्या नवीन धर्मात आणू इच्छित नव्हता इतकेच नव्हे, तर राजकारणाच्या आड हा धर्म येऊ न देण्याचे व्यवहारी धोरणही त्याने पाळले. अकबराच्या मृत्यूबरोबरच त्याचा नवीन धर्मही संपुष्टात आला.


प्रफुल्ल फडके/संस्कृती

9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: