शुक्रवार, २७ मे, २०२२

वैयक्तिक प्रश्न


आपल्याकडे चर्चेला आणि टीकेला कोणताही विषय चालतो. काहीही केले तरी टीका ही होतेच. आता सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये सोशल मीडियावर राहुल गांधींवरून वाद सुरू आहे. काँग्रेस पक्ष ज्यांच्याकडे आशेने बघतो आहे, ते युवा नेते राहुल गांधी आपल्या नवनव्या कृतीमुळे सदैव टीकेचे आणि टिंगलटवाळीचे धनी होताना दिसत असतात. तसेच, ते गेले दोन दिवस पुन्हा होताना दिसले. नेपाळमधील एका नाइट क्लबमधील त्यांचा एक व्हिडीओ नुकताच काहींच्या हाती लागला आणि त्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली. खरंतर राहुल गांधी पबमध्ये, डिस्कोमध्ये गेले, नाइट क्लबला गेले, म्हणून इतके वाईट वाटण्यासारखे काहीच कारण नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते त्यांचे खासगी जीवन आहे. मजा मारायला ते गेल्याने काय असा डोंगर कोसळणार आहे? राहुल गांधी हे काही मोठ्या पदावरचे कोणी नाहीत, ज्यामुळे देशाची प्रतिमा खराब होईल. ते काही जबाबदार नेते नाहीत की, त्यांनी असे केल्याने त्यांच्यावर टीका केली पाहिजे. ते देशाचे पंतप्रधान असते, मुख्यमंत्री असते, एखाद्या महत्त्वाच्या पदावर असते, तर ही टीका योग्य ठरली असती; पण त्यांच्या खासगी जीवनात त्यांनी चार क्षण आनंदात घालवले, म्हणून इतके पोटात दुखायचे कारण नाही.


राहुल आपल्या एका मैत्रिणीच्या लग्नासाठी नेपाळला गेले आहेत, तेथील हा व्हिडीओ असल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसने दिले आहे. या स्पष्टीकरणाची काही गरज नव्हती. करावी त्यांनी चैन, ऐश. काय फरक पडतो? विरोधकांच्या मते मात्र, एकूण व्हिडीओतील दृश्ये ही लग्नसोहळ्याची दिसत नाहीत, तर एखाद्या नाइट क्लबची दिसतात आणि एका चिनी चेहरापट्टीच्या महिलेसोबत ते गोंधळलेल्या स्थितीत आजूबाजूला बघताना दिसत आहेत. त्यामुळे आधीच विरोधकांच्या रडारवर असलेल्या राहुल गांधींचा फजितवडा करण्यासाठी या व्हिडीओचा उपयोग त्यांच्या विरोधकांकडून झाला यात नवल नाही. त्यांच्यासोबतची ती महिला कोण याची शोधमोहीम आता सुरू होईल. शिवाय जिच्या लग्नासाठी ते नेपाळला गेले तिचा पती चिनी उद्योगपती आहे. त्यामुळे एकूणच राहुल यांना अडचणीत आणणारा हा व्हिडीओ आहे; पण खासगी आयुष्यात त्यांनी काय ऐषोआराम करावा यात कोणी हस्तक्षेप करू नये. जनतेने, मतदारांनी त्यांना नाकारल्यानंतर त्यांना वैयक्तिक आयुष्यात मजा मारू देत, काही बिघडायचे कारण नाही. मोठ्या पदावरच्या लोकांकडून आदर्शाची अपेक्षा ठेवली जाते. सामान्य माणसांकडून कोणी आदर्शाची अपेक्षा करत नाही. हजारो-लाखो लोक नाइट क्लबमध्ये जातात, धिंगाणा घालतात. त्याची कधी चर्चा होत नाही. तसेच, सामान्य माणसाचे जीवन ते जगत असताना, त्यावर इतकी टीका करण्याचे कारण काय?

राहुल गांधी सीएनएन या दूरचित्रवाणी वाहिनीच्या एकेकाळच्या पत्रकार सुमनिमा उदास यांच्या विवाह सोहळ्यानिमित्ताने नेपाळला गेलेले आहेत, असा खुलासा काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या तीन राष्ट्रांच्या दौ‍ºयावर आहेत. त्यावर देश संकटात असताना साहेब विदेशांत फिरत आहेत, अशी कुत्सित टीका काँग्रेसने नुकतीच केलेली होती. पण, पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची भूमिका मांडण्यासाठी विदेश दौ‍ºयावर आहेत. ते व्यक्तिगत मौजमजा करण्यासाठी गेलेले नाहीत, हा मोठा फरक आहे; पण याची जाणीव काँग्रेसला नाही. त्याला उत्तर देण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी काय करतात हे दाखवायचे काहीच कारण नव्हते. पंतप्रधानांशी त्यांची तुलना कशी काय होऊ शकते?


प्रत्येकाला आपले वैयक्तिक आयुष्य असते. आपण काय करावे, कुठे जावे, कसे वागावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो आणि नेत्यांनाही खासगी आयुष्य आहेच. परंतु, नेते असल्याने समाज त्यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षाही निश्‍िचत करीत असतो. राहुल यांच्या व्हिडीओमध्ये त्यांची नाइट क्लबसदृश्य ठिकाणची उपस्थिती वगळल्यास तसे आक्षेपार्ह काही नाही, परंतु एखादी चोरी पकडावी अशा प्रकारे हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राहुल गांधींनी कोठे जावे, काय करावे हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. परंतु एकीकडे आपला पक्ष संकटात आहे, फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे, तारणहाराची प्रतीक्षा करतो आहे, देशामध्ये महागाईसारखे प्रश्न ऐरणीवर आहेत, दंगे उसळत आहेत. अशा वेळी प्रमुख विरोधी पक्षाचा एक जबाबदार नेता म्हणून सक्रियपणे सरकारविरोधात मांड ठोकून उभे राहून जनतेला स्वत:प्रती आणि स्वत:च्या पक्षाप्रती विश्वास देणे तर दूरच, उलट अशा प्रकारे वैयक्तिक मौजमजेत व्यस्त असल्याचे चित्र निर्माण होणे त्यांच्या आणि पक्षाच्या प्रतिमेसही मारक ठरणारे आहे, हे नाकारता येणार नाही. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा त्यात मारल्या गेलेल्या एनएसजी जवान संदीप उन्नीकृष्णनच्या कुटुंबीयांचे अश्रूही वाळण्याआधी, तेव्हा काँग्रेसच्या सरचिटणीस पदावर असलेले राहुल गांधी आपला मित्र समीर शर्मा यांच्या विवाहाच्या निमित्ताने दिल्लीबाहेरील एका फार्महाऊसमध्ये पहाटे पाच वाजेपर्यंत पार्टी करण्यात दंग होते. तेव्हाही त्यांची अशीच छी-थू झाली होती. पण, तेव्हा ते सत्तेत होते. आता सत्तेत नाहीत. सत्तेतून गेल्यावर खासगी आयुष्यात कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. राहुल गांधींकडून अपेक्षाच कशी काय करता येईल?

राहुल गांधींच्या कामात सातत्य नाही, हे खुद्द शरद पवार यांनीही जाहीरपणे सांगितले आहे. ते राजकारणाकडे, पक्षाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. राजकारण हे असे अर्धवेळ वावरण्याचे क्षेत्र नव्हे. त्यामध्ये झोकून द्यावे लागते. अहोरात्र काम करावे लागते, जनतेचा विश्वास कमवावा लागतो. ते त्यांना नाही जमत. मग त्यांनी नाइट क्लबमध्ये जाऊन नाच केला, तर काय बिघडले? त्यांना जे जमते ते करतात, इतका साधा विचार आहे. त्यावर टीका करण्याची गरज नाही. मुळात राहुल यांना वारसाहक्काने जरी पक्षाचे नेतेपद लाभलेले असले, तरी ते टिकविण्यासाठी शेवटी वैयक्तिक करिष्माच लागेल. आजवर ज्या-ज्या निवडणुका काँग्रेस पक्षाने त्यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या, त्यामध्ये पक्षाला दारूण अपयशच आलेले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर २०१९ मध्ये पक्षाचे अध्यक्षपद सोडून देण्याची पाळी त्यांच्यावर आली होती. पक्षाच्या २३ नेत्यांनी पक्षाध्यक्षांना पत्र लिहून संघटनात्मक बदलांची मागणी केली; पण तरीही त्यावर निर्णय होत नाही. पक्षाचे नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता नाही आणि दुसºया कोणी ते करावे, असे कोणाला वाटत नाही. अशा परिस्थितीत राहुल यांनी आपल्याला काय आवडते ते केले, तर त्यात आश्चर्य वाटायला नको.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: