सामान्य माणूस, कामगार यांच्यासाठी आपल्या प्रतिभेचा वापर करणारे साहित्यीक फार कमी झाले आहेत. साहित्याचा वापर रंजनासाठी नाही तर दिशा देण्यासाठी केला पाहिजे असा विचार करणारे फार कमी लेखक असतात. बहुतेक लेखक हे भाट असतात, स्तुतीपाठक असतात. भिउन लिहीणारे असतात, पण मनात आले ते खरेपणाने मांडणारे फार कमी असतात. म्हणूनच अशाच अंध:क़ारमय परिस्थितीत दिशा देणारी कविता करणारा साहित्यातील सुर्य नारायण म्हणजेच नारायण सुर्वे. नारायण सुर्वे यांचा आज जन्मदिवस. त्यांच्यावरती मार्क्सवादी विचाराचा पगडा होता ,आपल्या लेखणीतून त्यांनी समाज परिवर्तनाची कवने लिहिली.
1926-27 मध्ये मुंबईतील चिंचपोकळीतील एका कापडगिरणीसमोर रस्त्यावरचा एक अनाथ जीव गंगाराम सुर्वे या मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये साचेवाला म्हणून काम करणार्या गिरणी कामगाराने उचलून घरात आणला. त्याच गिरणीत बाईंडिंग खात्यात काम करणार्या गिरणी कामगार काशीबाई सुर्वे यांनी या बाळगलेल्या पोराला’ स्वत:च्या मुलासारखे प्रेम दिले आणि नारायण गंगाराम सुर्वे’ हे नावही दिले. परळच्या बोगद्याच्या चाळीत ते वाढले. कमालीचे दारिद्र्य, अपरंपार काबाडकष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यांतून नारायण सुर्वे यांचे आयुष्य चांगलेच शेकून निघाले.घरात अठराविश्वे दारिद्र्य असतानाही या नारायणाला चार अक्षरे लिहिता-वाचता यावीत म्हणून दादर, अप्पर माहीम मराठी महापालिका शाळेत घातले. हे दांपत्य मुळचे कोकणातील हेताचीवाडी(भुईबावडा) येथील होते. त्यांनी नारायणास मराठी चौथीपर्यंत शिक्षण दिले. पुढील शिक्षण नारायण सुर्वे यांनी स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केले. नारायण सुर्वे 1936 मध्ये चौथी इयत्ता उत्तीर्ण झाले आणि गंगाराम सुर्वे गिरणीतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर मुंबई सोडून ते कोकणात गावी निघून गेले. गावी जाताना त्यांनी नारायणाच्या हातावर दहा रुपये ठेवले आणि समोर मुंबईचा विशाल सागर.
मग भाकरीचा चतकोर चंद्र मिळविण्यासाठी नारायण सुर्वे एका सिंधी कुटुंबात घरगडी, हॉटेलात कपबशा विसळणारा पोर्या, कुणाचे कुत्रे-कुणाचे मूल सांभाळणारा हरकाम्या, दूध टाकणारा पोरगा, अशी कामे करीत वाढले. गोदरेजच्या एका कारखान्यात त्यांनी पत्रे उचलले, टाटा ऑइल मिलमध्ये हमाली केली. काही काळ गिरणीत धागाही धरला. बॉबीन भरली. मुंबई महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी केली. आणि 1961 मध्ये शिपायाचे शिक्षक झाले. महापालिकेच्या नायगाव नंबर एक शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नोकरी सुरू झाली. ते तेव्हापासून गिरणगावचे सुर्वे मास्तर’ झाले.
कधी दोन घेत, कधी दोन देत’ आयुष्याची वाटचाल सुरू असतानाच जिंदगीच्या धगीवर शब्द शेकून घेत त्यांनी मराठी काव्यप्रांतात एक नवा सूर घुमवला. त्यांची पहिली कविता 1958 मध्ये नवयुग’ मासिकात प्रसिद्ध झाली. डोंगरी शेत माझं गं....’ हे त्यांचे पहिले गाजलेले गीत. एचएमव्हीने त्याची ध्वनिफीत काढली. .
गुजराण करण्यासाठी नारायण छोटेमोठे व्यवसाय करत असे. या काळात स्वतःच्या हिंमतीने तो लिहिण्या-वाचण्यास शिकला. 1962 साली त्यांनी लिहिलेल्या कवितांचा पहिला संग्रह - ऐसा गा मी ब्रह्म - प्रकाशित झाला. त्याला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला.
नारायण सुर्वे वाढले त्या चाळीतील सारेच जण साम्यवादी पक्षात होते. डावी चळवळ जोरात होती. ती चळवळ हा त्यांचा मोठा आधार बनली. सुर्व्यांच्या वैचारिक प्रवासाची ही सुरवात होती. माझ्या पहिल्या संपात मार्क्स मला असा भेटला,’ असे सांगणार्या सुर्व्यांची साम्यवादी, डाव्या विचारप्रणालीशी बांधिलकी आहे. कम्युनिस्ट चळवळीत ते रेडगार्ड’ बनले. या चळवळीतील एक कॉम्रेड तळेकर यांच्या भाचीवर त्यांचे प्रेम बसले. आई-बापाविना वाढलेल्या कृष्णा साळुंके हिच्याशी त्यांनी विवाह केला. आयुष्यातील कष्ट संपले नव्हते. खारजवळ एका झोपडपट्टीत त्यांनी संसार थाटला होता. मोठा मुलगा अवघा बावीस दिवसांचा असतानाच हे झोपडे तोडले गेले. आठ दिवस फुटपाथवरच संसार होता. या अनुभवातून आलेल्या कवितेला दैनंदिन जीवनातील कठोर वास्तवाशी, दैनंदिन संघर्षाशी जोडण्याचे क्रांतिकार्य नारायण सुर्वे यांनी केले आहे. जीवनात जे वास्तव अनुभवले, त्यांचे भांडवल करायचे नाही, अशी त्यांची वृत्ती होती. त्यामुळे ते अनेकांना आपले वाटतात.
पदपथापासून विद्यापीठापर्यंत आणि कामगारांपासून ते बुद्धिनिष्ठ समीक्षकांपर्यंत त्यांच्या कवितांना रसिकमान्यता मिळाली. संत कबीरालाही त्याच्या आईने नदीकाठी सोडले. कबीर दोहे करायला लागला आणि मी कविता करायला...त्यालाही त्याची जात सांगता आली नाही अन् मलाही...असे सुर्वे म्हणत.
त्यानंतर सुर्वे यांचे कवितासंग्रह एकामागोमाग येत राहिले. माझे विद्यापीठ’, जाहीरनामा’, पुन्हा एकदा कविता’, सनद’ हे त्यांचे कवितासंग्रह. नालबंदवाला याकूब, चंद्रा नायकीण, दाऊद शिगवाला, हणम्या हे त्यांचे कवितासंग्रह आहेत.
पोटाची खळगी भरण्यासाठी सह्याद्रीचा कडा उतरून मुंबईत कामधंद्याच्या शोधात आलेल्या व समुद्राच्या तीरावर झुंजत मरण पावलेल्या एका कष्टकरी मुलाचा बाप, आपल्या तारुण्यातील पराक्रम मुलाला ऐकविणारा वृद्ध पिता, गोदीवर काम करणारा आफ्रिकन चाचा, पंडित नेहरूंचे निधन झाले म्हणून धंदा बंद ठेवणारी सुंद्री वेश्या , अशी अनेक व्यक्तिचित्रे त्यांनी अत्यंत समर्पकपणे व रेखीवपणे उभी केली आहेत. सुर्व्यांचे पहिलेवहिले काव्यवाचन झाले ते कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली मडगावच्या साहित्य संमेलनात. त्या वेळेपासून ते प्रत्येक काव्यमैफलीत खड्या सुराने रंग भरत आहेत. मास्तर, तुमचंच नाव लिवा...’, असं पत्रात लिवा’, मर्ढेकर’, सर कर एकेक गड’, मनिऑर्डर’, मुंबईची लावणी’, गिरणीची लावणी’ या त्यांच्या कविता हमखास दाद देणार्या होत्या. नारायण सुर्वे यांनी त्यांच्या कवितेतून ईश्वरवाद, प्रारब्ध, उच्च-नीचता किंवा जातीचा कधीही उल्लेख केलेला नाही. त्यांनी मराठी कवितेत कामगारांचे, हातावर पोट असणार्यांचे जग शब्दबद्ध करून आणि त्यांच्या संघर्षातून कृतिशील आशावादाकडे झेपावणार्या आकांक्षांचे चित्रण, पुरोगामी विचारांच्या मुशीतून निघालेल्या शब्दकळेद्वारे केले आणि मराठी कवितेला सामाजिक बांधिलकीचा विशाल आशय प्राप्त करून दिला. म्हणूनच सामान्यांचे, गरीबांचे, कामगारांचे, हातावर पोट असणार्यांचे ते नारायण सूर्य नाही तर प्रकाश देणारे असे सूर्य नारायण होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा