सध्या हाथरससारख्या घटनांमुळे महिलांवर होणार्या अत्याचारावर खूप चर्चा राजकारण सुरू आहे. पण आज घराघरात घुसलेल्या विविध वाहिन्यांमधील विविध वाहिन्यांवर महिलांवर होणारे अत्याचाराकडे दुर्लक्ष होत आहे. टिव्हीच्या माध्यमातून ही अत्याचाराची मानसिकता रूजवली जात आहे हे फार भयानक आहे. त्यामुळे आता एकतर जनतेने सर्व वाहिन्यांवर बहिष्कार टाकला पाहिजे आणि दुरदर्शनच्या मालिका पाहाव्यात किंवा अशा वाहिन्यांसाठीही सेन्सॉरबोर्ड नेमले पाहिजे. काही वाहिन्या आपल्याला या मालिकेबाबत काही आक्षेपार्ह असल्यास अमुक इथे कळवा असे सांगतात. पण त्याची दखल कोणीही घेत नाही. त्यामुळे ही अत्याचाराची मानसिकता रोखण्यासाठीही सर्वांनी पुढे आले पाहिजे.
जवळजवळ सर्वच वाहिन्यांवरून अशाच प्रकार महिलांवर अत्याचार करणार्या मालिका प्रसारीत होतात. त्यातील काही नमुन्यादाखल मालिकांचाच इथे उल्लेख केला जाणार आहे. याचा अर्थ ज्यांचा उल्लेख केला नाही त्या मालिका किंवा वाहिन्या शंभर टक्के धुतल्या तांदळाइतक्या स्वच्छपणे कथानके देतात असे नाही.झी मराठीने तर ताळतंत्रच सोडलेले आहे. महिला म्हणजे मूर्ख आहेत, प्रेक्षक त्यापेक्षा बावळट आहेत अशाप्रकारची कथानके घेउन महिलांच्या शोषणाचे समर्थन करताना दिसत आहेत. कथानक म्हणून त्याच्याकडे पाहणेच शक्य नाही असे प्रकार दिसत आहेत. कोणत्याही राजकीय सामाजीक सांस्कृतीक परिस्थितीच्या जवळ या मालिका नेहमी जात असतात. मग त्याकडे कथानक म्हणून कसे काय बघता येईल? म्हणजे गणेशोत्सव आला,कोणताही सण आला की लगेच त्याविषयावरचा एपिसोड घेतात. का? तर मालिकांमध्ये प्रेक्षक रमण्यासाठी, आपल्या जीवनाचा तो अविभाज्य भाग आहे असे दाखवण्यासाठी. त्यामुळे हा जीवनाचा अविभाज्य भाग जेंव्हा विकृतपणे काही विषय मांडून महिलांवरील अत्याचाराची मानसिकता तयार करतो तेंव्हा ते नाकारणे गरजेचे आहे.
अत्याचार म्हणजे शारीरीक शोषण, बलात्कार असाच अर्थ घेेण्याची गरज नाही. झी मराठीवरच्या अग्गबाई सासुबाई या मालिकेत बबड्याकडून आईची होणारी छळवणूक ही पण अत्याचाराची वागणूक आहे. आईच्या सोशिकपणाचा किती अंत पाहिला जातो? निवेदिता जोशींना कोरोना झाल्यामुळे पंधरा दिवस चित्रिकरण झाले नाही. त्यामुळे सेटवरच्या गप्पांचे एपिसोड मागच्या आठवड्यात दाखवले. जुने काही सीन मिक्स करून आठवडा काढला. त्यात एका एपिसोडमध्ये पैज लावली जाते की बबड्या आजपर्यंत कधीतरी चांगला वागला? त्याने एखादी तरी चांगली गोष्ट केली का? त्यावरून त्याचे सगळे सीन दाखवले आणि तो खतरनाक असाच वागताना दाखवला. ही काय अभिमानाची बाब आहे का? जर कोणी त्याचे अनुकरण नकळत केले, एखादा मुलगा आपल्या बायकोशी, आईशी बबड्याप्रमाणे वागू लागला तर ही मानसिकता कोणी तयार केली? त्यामुळे समाजभान नावाचे काही डोक्यात घेण्याची गरज आहे.
माझ्या नवर्याची बायको मध्ये तो गुरूनाथ आता तिसरं लग्न करायला चालला आहे. वास्तवात असे कोणी करायला गेल्यावर लोक त्या माणसाला चपलेने मारल्याशिवाय राहणार नाहीत. पण शिकली सवरलेली, कंपनीची सीईओ असलेली माया त्या गुरूनाथच्या प्रेमात पडते, त्याची प्रवृत्ती माहिती असतानाही ती त्याला साथ देते. यातून महिला इतक्या वाईट असतात हेच दाखवले जात आहे. महिला किती मूर्ख आहेत. असल्या माणसाच्या प्रेमात पडतात की ज्याने आधीच दोन लग्न केलेली आहेत, सगळ्यांना जो फसवतो आहे, जो आईबापाला विचारत नाही, जो बायकोवर आणि सर्वांवर अत्याचार करतो आहे, त्यालाच शिकलेली कमावती श्रीमंत अशी माया साथ देते, असा संदेश कसा काय दिला जातो? यातून अत्याचाराची मानसिकता तयार केली जात आहे. जर एखादा पुरूष खरोखरच गुरूसारखा वागायला लागला तर त्याला वास्तवात कोणी समर्थन देईल काय? पण कोणी तसे वागायला लागला तर काय करणार? किती फालतूगिरी चालली आहे?
स्टार प्रवाहवरची आई कुठे काय करते या मालिकेचा असाच तोल ढळला आहे. खरं तर सुरवातीला ही मालिका सुरू झाली तेंव्हा वाटले होते की ही मालिका सचिनचा 1987 ला आलेल्या आत्मविश्वास या चित्रपटाप्रमाणे असेल. यात नीलकांती पाटेकरला कोणी विचारत नसतो, कारण ती एक गृहीणी असते. त्यामुळे नवरा, मुलगी, सून सगळे तुच्छ लेखत असतात. पण ती आत्मविश्वास परत मिळवून सगळ्यांना धडा शिकवते आणि महिलांच्या सक्षमीकरणाचे उदाहरण घालून देते. पण तसे काही न होता आई कुठे काय करते या मालिकेत मुलगी, बाप आईला इतके हिन लेखतात की आयांना सध्या खूप वाईट दिवस आल्याचे वाटते.
काय ती स्टार प्रवाहवरची रंग माझा वेगळा ही मालिका? इतका वर्णद्वेष कसा काय असू शकतो? एकविसाव्या शतकात काळी की गोरी यावरून मुलीची इतकी निर्भत्सना केली जाते? विशेष म्हणजे या विषयासाठी या वाहिनीला अभिनेत्री काळ्या रंगाची मिळाली नाही म्हणून गोर्या अभिनेत्रीला काळे केल्याचे स्पष्ट दिसते आहे. इतेकी ते बॉडीबिल्डर जसे आपल्या अंगाला रंग लावून चॉकलेटी होतात असेच ही मुलगी रंगवल्याचे दिसते. किती घाणेरडेपणा आहे. एका मालिकेच्या एपिसोडमध्ये तर या मुलीच्या तोंडावर चक्क चहा फेकून मारला जातो? यातून काय दाखवले जाते आहे? इतका तिरस्कार कसा काय केला जातो? ही अत्याचाराची मानसिकता तयार केलेली दिसते. हे फार वाईट आहे. त्यामुळे आता मालिकांवर सेन्सॉर बोर्ड लावण्याची वेळ आलेली आहे असे वाटते.
वातावरणाचा परिणाम होतोच. आपल्या घरात सतत या मालिका चालू असतील तर नकळत त्यातील वाईट भाव, नकारात्मकता घरात येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात शारीरीक बलात्कार झालेले आहेत, दिल्लीतही सामुहीक बलात्कार घडले आहेत, पण त्याहीपेक्षा हे मानसिक बलात्कार आणि महिलांचे हनन करण्याचा प्रकार फार वाईट आहे. त्यातुन अनुकरणाची बुद्धी कोणाला होउ नये असे वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा