एक भारतीय सिने-अभिनेत्री, दिग्दर्शक, भरतनाट्यम नर्तकी अशा विविध भूमिका करताना राजकारणातही ती आली आणि तिथेही आपली छबी जपली. भारताच्या सोळाव्या व विद्यमान लोकसभेची ती सदस्य आहे.
1968 सालच्या सपनो का सौदागर ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी हेमा मालिनीने त्यानंतर असंख्य हिट चित्रपट दिले. अंदाज, लाल पत्थर, ड्रीम गर्ल, शोले इत्यादी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या. 1970च्या दशकामध्ये ती बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी व प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. 1972 सालच्या सीता और गीता चित्रपटामधील दुहेरी भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
1980 साली हेमा मालिनीने सह-अभिनेता धर्मेंद्र सोबत विवाह केला. 2000 मध्ये भारत सरकारने चित्रपटसृष्टीमधील तिच्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार बहाल केला. फेब्रुवारी 2004 मध्ये हेमा मालिनीने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2003 ते 2009 दरम्यान राज्यसभा सदस्य राहिल्यानंतर 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये हेमा मालिनी उत्तर प्रदेशच्या मथुरा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आली.
हेमामालिनीच्या कारकीर्दीत तिने राजकपूर बरोबर सुरवात केली, देवआनंदबरोबर काम केले. पण तिच्या ज्या ज्या लोकांशी जोड्या जमल्या त्या सगळ्या गाजल्या. हेमा मालिनी राजेशखन्ना, हेमा मालिनी जितेंद्र, हेमा मालिनी अमिताभ बच्चन, हेमामालिनी धर्मेद्र, हेमा मालिनी मनोजकुमार, हेमा मालिनी शशीकपूर या सगळ्या जोड्या गाजल्या आणि त्या प्रत्येक जोडीच्या नावावर सुपरहिट चित्रपट आहेत.
पण कधीकधी काही जोड्या प्रेक्षक त्या कलाकारांच्या प्रेमापोटी जुळवत राहतात. तर काही कलाकार आपल्या सहकलाकारांबाबत बघत असतात. या दोघांचे खरे लग्न झाले तर मजा येईल असे उगाचच प्रेक्षक विचार करत असतात. यामध्ये राजेशखन्ना या तत्कालीन सुपरस्टारचे डिंपलऐवजी हेमामालिनीबरोबर का लग्न झाले नाही असा अनेकांना प्रश्न पडला होता. तर हेमा मालिनीच्या प्रेमात झुरणार्या संजीवकुमारशी तिचा विवाह झाला असता तर बरे झाले असते असेही अनेकांना वाटते. संजीवकुमार हेमामालिनी यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले असले तरी नायक नायिका म्हणून सीता और गीता या जी पी सिप्पी रमेश सिप्पींच्या चित्रपटात दोघे गाजले. अर्थात त्यात सबकुछ हेमामालिनी ह ोती आणि सोबतीला ही मॅन धर्मेंद्र होता. पण वाट्याला आलेल्या भूमिकेतही दोघांनी आनंद मिळवला होता. त्यानंतर जी पी सिप्पी रमेश सिप्पीने शोलेची निर्मिती केली आणि हेच त्रिकूट आपल्या चित्रपटात ठेवले. पण संजीवकुमारला चरीत्रनायकाची भूमिका मिळाली तर हेमा धर्मेद्रची जोडी मात्र इथेच जमली.
पण या ड्रिमगर्लचे लग्न नक्की कोणाशी व्हावे याची प्रेक्षकांना फारच उत्सुकता होती. बॉबीनंतर डिंपल आली आणि राजेशखन्नासोबतची हेमाची जोडी जमवण्याची प्रेक्षकांची संधी हुकली. त्यामुळे प्रेक्षकांनी तिच्यासाठी अनेक वरसंशोधन केले. पण मनोमन या अप्सरेने आपले स्वयंवर आधीच केले होते. ते म्हणजे ही मॅन धर्मेद्रशी लग्न करण्याचा तिचा निर्धार होता.
अर्थात हा प्रेमविवाह होता. खरं तर बॉलिवूडमधील अफेअर्सची चर्चा अक्षरशः न संपणारी आहे. जुळलेली नाती, ब्रेकअप, ब्रेकअप नंतर पुन्हा एकत्र येणारी जोडपी. पण धर्मेद्र हेमामालीनी ही जोडी मात्र अभेद्य अशी आहे. धर्मेंद्रचे आधीच लग्न झालेले असले तरी या जोडीबाबत वाईट बातम्या कोणी पसरवल्या नाहीत. कारण त्या काळात राजेशखन्ना या सुपरस्टारचा विवाह जितक्या जोमात डिंपलबरोबर गाजला तितकाच तो विवाह तुटला, वाद हेही गाजले. रेखा तर तुळशीच्या लग्नाप्रमाणे सतत नवनवे विवाह करत होती. पण धर्मेद्र हेमामालिनीचे अतूट प्रेम होते.
अर्थात बॉलीवूडची प्रेमप्रकरणे प्रेक्षकांच्या आवडीचा विषय असतो. साधारण दोन एक वर्षांपूर्वी सनी देवल-डिम्पल कपाडियाचं जुनं प्रेम पुन्हा डोकं वर काढताना दिसलं. त्यापाठोपाठ धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्याविषयी एक वेगळी माहिती समोर आली होती.
अर्थात कोणत्याही सेलिब्रेटींचं आयुष्य एखाद्या सिनेमापेक्षा कमी नसतं. हिंदू धर्मात बहुपत्नी मान्य नसल्यामुळे हेमा मालिनीसोबत लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांना इस्लाम धर्माचा स्वीकार करावा लागला होता, हे बहुतेकांना माहित आहेच. हिंदुत्ववादी भाजपला या इस्लामचा फायदा घेणारी ड्रिमगर्ल आणि ही मॅन दोघांनी दोन खासदार दिले होते. असो, धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांनी घटस्फोट देण्यास नकार दिल्यामुळे धर्मेंद्र यांनी ही पळवाट काढली.
हेमामालिनीच्या लग्नापूर्वीच्या आयुष्याबद्दल एक वेगळीच मजेशीर माहिती पण गाजली होती.
राम कमल मुखर्जी यांनी लिहिलेल्या ’हेमा मालिनी : बियाँड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकात म्हटले आहे की, म्हणे हेमा मालिनी जितेंद्रसोबत विवाहबंधनात अडकणार होत्या, मात्र धर्मेंद्र यांनी अक्षरशः त्यांचं लग्न मोडलं.
’हेमा आणि धर्मेंद्र एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. हेमाने पहिल्यांदाच आपल्या आई-वडिलांपासून आपलं रिलेशनशीप लपवलं होतं. जया चक्रवर्ती म्हणजेच हेमाच्या आईला याची कुणकुण लागली. त्यामुळे तिने वेळीच हेमाचं लग्न लावून द्यायचं ठरवलं’ असं पुस्तकात म्हटलं आहे.
हेमा मालिनी आणि जितेंद्र यांचे एकत्र दोन सिनेमे दुल्हन (1974) आणि खुशबू (1975) सुरु होते. साहजिकच दोघांना एकत्र प्रसिद्धी मिळाली. जितेंद्रच्या मनातही हेमा मालिनीबद्दल हळवा कोपरा निर्माण झाला होता, मात्र हेमाने फारसा रस न दाखवल्यामुळे दोघांनी चांगले मित्र राहायचं ठरवलं, असं पुस्तकात म्हटलं आहे.
जया यांनी हेमाला जितेंद्रच्या पालकांची भेट घेण्याची गळ घातली. आईच्या तगाद्याला कंटाळून हेमामालिनीने अखेर त्यांची भेट घेतली. इथे, हेमाला भेटून जितेंद्रचे आई-वडील भलतेच खुश झाले. त्यांना आपल्या मुलाचं हेमाशी लग्न व्हावं असं वाटू लागलं. थोडक्यात, हेमा आणि जितेंद्र या दोघांच्याही आई-वडिलांना मुलांचं लग्न लावण्याची इच्छा होती.
’मला हेमाशी लग्न करायचं नाही. मी तिच्या प्रेमात पडलेलो नाही. ती माझ्या प्रेमात नाही. आमचं लग्न व्हावं, ही फक्त माझ्या कुटुंबाची इच्छा आहे. त्यामुळे मी लग्न करेनही. ती खूप चांगली मुलगी आहे’ असं त्यावेळी जितेंद्रने म्हटल्याचं मित्राने सांगितलं.
अखेर, हेमा, जितेंद्र आणि त्यांचे कुटुंबीय मद्रास (चेन्नई)ला गेले. लग्नसोहळा तिथेच पार पडणार होता. मात्र आधीच एका सायंदैनिकाला या लग्नाविषयी समजलं आणि त्यांनी ’बिग स्टोरी’ केली. चित्रपटसृष्टीतील कोणाचाच यावर विश्वास बसत नव्हता, पण महत्त्वाचं म्हणजे धर्मेंद्रला याचा मोठा धक्का बसला. धर्मेंद्र तातडीने शोभा सिप्पीच्या घरी गेला. शोभा म्हणजे जितेंद्रची गर्लफ्रेंड. एअरहॉस्टेस असलेल्या शोभासोबत धर्मेंद्रने तातडीने मद्रास गाठलं.
हेमामालिनीच्या घरी पोहचताच दिसणारं दृश्य धर्मेंद्रला चकित करणारं होतं. धर्मेंद्रला पाहून हेमाच्या वडिलांचा पारा चढला आणि त्यांनी अक्षरशः त्याला धक्के मारुन बाहेर काढलं. ’तू माझ्या मुलीच्या आयुष्यातून का निघून जात नाहीस? तुझं लग्न झालेलं आहे. तू माझ्या लेकीशी लग्न करु शकत नाहीस’ असं ते बडबडत होते.
धर्मेंद्रने गयावया केली. मात्र भावुक झालेल्या धरमने अजिबात नमतं घेतलं नाही. शेवटी, हेमाशी एकांतात बोलण्यास त्यांनी धर्मेंद्रला परवानगी दिली. हेमामालिनीचे आई-वडील, जितेंद्रचे आई-वडील आणि रजिस्ट्रार बाहेर थांबले. रुममध्ये दोघंही आठवणींनी गहिवरले होते.
रुमबाहेर येताच हेमाने हात जोडून दोन्ही कुटुंबीयांना विनंती केली. थरथरत्या आवाजात तिने निर्णयासाठी काही दिवसांची मुदत मागितली. जितेंद्रच्या आई-वडिलांना मात्र साहजिकच हा प्रकार रुचला नाही. लग्न झालं तर आत्ता, नाहीतर कधीच नाही! असा अल्टिमेटम त्यांनी दिला.
हेमाच्या उत्तरासाठी सगळ्यांच्या माना वळल्या होत्या. हेमामालिनीने त्याच क्षणी मान हलवून नकार दर्शवला. जितेंद्रसाठी हा अपमान पुरेसा होता. त्याने आई-वडिलांसोबत तडक मुंबई गाठली. त्यानंतर दोघांमध्ये कोणतेही संबंध उरले नव्हते. पण बॉलीवूडच्या या ड्रिमगर्लचे आकर्षण सवार्र्नाच नेहमी राहिले होते. तिच्या चिरतारुण्याप्रमाणेच हेही कायम राहील असे दिसते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा