सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

लोहियांच्या मनातील समाजवाद

  काही लोक भूतकाळात रमतात. पूर्वी या देशात सोन्याचा धूर निघत होता असे सांगून त्या परंपरेच्या स्वप्नात जगतात. काही लोक वर्तमानातच जगतात, तर काही लोक काळाच्या पुढचा विचार करत असतात. त्यांना पुढचा काळ दिसत असतो. भविष्याचा विचार करणारे असे लोक फार महत्वाचे असतात. असेच एक व्य्क्तीमत्व म्हणजे राम मनोहर लोहिया.     राम मनोहर लोहियांना जाऊन आज त्रेपन्न वर्षे झाली. त्यावेळी लोहिया म्हणाले होते, की लोक माझे ऐकतील, पण मी निवर्तल्यानंतर. आज कोरोनासारख्या संकटानंतर अर्थव्यवस्थेची घडी विस्कटलेली असताना विषमता वाढताना दिसते आहे. सामाजिक आर्थिक दरी वाढत आहे. अशावेळी राम मनोहर लोहिया यांच्या विचारांनी समाजहिताचे निर्णय घेण्याची गरज आहे असे वाटते.

  लोहिया गेल्यानंतर देशातील लोकांनी त्यांच्या काही गोष्टी नक्कीच ऐकल्या, पण नंतर समाजवादाच्या नावावर जातीयवादाला वळण दिले गेले. राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी हे लोक आम्ही राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचे आहोत असे भासवत असले तरी ते तितकेसे म्हणजे अजिबातच खरे नाही. आजच्या युवापिढीने या संघर्षमय परिस्थितीत राम मनोहर लोहिया याचे विचार जाणून घेण्याची गरज आहे. आजची युवा पिढी लोहियांच्या विचारांपासून दूर आहे. अर्थात लोहियांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा कोणीच प्रयत्न केला नाही. त्यामुळे फक्त एका वाक्यात राम मनोहर लोहिया हे समाजवादी नेते होते असे कोणी सांगीतले तर आजचे लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव, आबू आझमी या लोकांचा समाजवाद म्हणजे जातीयतेवर आधारीत समाजवाद समोर येतो आणि अशा विचारांचे राम मनोहर लोहिया होते का असा प्रश्न नव्या पिढीला पडतो. म्हणूनच राम मनोहर लोहिया यांना अभिप्रेत असलेला समाजवाद युवापिढीला समजणे आवश्यक आहे. आरक्षणासाठी द्यावा लागणारा झगडा, संघर्ष, कोरोनामुळे निर्माण झालेली वाईट परिस्थिती यात या विचारांची गरज आहे. कारण राहुन राहुन या परिस्थितीत मला वाटते, की आता लोकांनी खरोखरच लोहियांचे ऐकण्याची वेळ आली आहे. युवापिढीने त्यांचे विचार अभ्यासले पाहिजेत.
राम मनोहर लोहिया हे विसाव्या शतकात जन्माला आले व निवर्तले, पण त्यांचे विचार एकविसाव्या शतकातही सुसंगतच आहेत. लोहियांचा खरा वारसा काय होता हे आकलन करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना ज्या चौकटीत आपण जखडले आहे त्यातून बाहेर काढले पाहिजे. यूपी बिहारच्या समाजवाद्यांचे लोहियांशी असलेले नाते म्हणजे काँग्रेसचे महात्मा गांधींशी आहे तसेच तकलादू आहे. म्हणूनच आज लोहिया जिवंत असते, तर समाजवादाच्या नावाखाली चाललेल्या भोंदूगिरीला त्यांनी विरोधच केला असता. त्यांना त्यांच्याच चेल्यांविरोधात धरणे आंदोलन करावे लागले असते.
  असं म्हणतात की, राम मनोहर लोहिया हे गैरकाँग्रेसीवादाचे प्रवर्तक होते. साठच्या दशकात आजच्या भाजपप्रमाणे मजबूत आणि अजेय असलेल्या काँग्रेसला पायउतार करण्यासाठी लोहियांनी विरोधकांच्या एकजुटीची मुहूर्तमेढ रोवली होती. म्हणूनच तशीच परिस्थिती निर्माण होत असेल तर आज लोहियांच्या विचारांची गरज आहे.  काहीजण लोहियांना मंडलवादाचे जनक म्हणून ओळखतात. पण प्रत्यक्षात तसे नव्हते. लोहियांचे समाजकारण, समाजवाद हा जाती आरक्षणाच्या बाहेरचा होता.  लोहिया हे स्वतंत्र भारतातील असे पहिले विचारवंत होते, ज्यांनी समाजातील जातीय विषमतेवर बोट ठेवले. लोहियांनी सार्वजनिक जीवनात प्रत्येक पक्षामध्ये पुढारलेल्या जातींच्या वर्चस्वाला विरोध केला होता व ‘पिछडा पावे सो में साठ’ ही गाजलेली घोषणा दिली; पण लोहियांच्या मतानुसार शूद्रांमध्ये दलित, आदिवासी, मागास जाती, अल्पसंख्याक व प्रत्येक जातीतील महिला यांचा समावेश होता. मागासांच्या आरक्षणाच्या नावाखाली काही जातींनी त्यावर केलेला कब्जा लोहियांना आवडणारा नव्हता. आरक्षणाने मागास जमातींना लाभ मिळाला पाहिजे व प्रत्येक जातीच्या स्त्रियांनाही आरक्षणाचा फायदा मिळावा, असे त्यांचे मत होते.
  त्या काळात ‘इंग्रजी हटाव’ अशी घोषणा लोहियांनी दिली होती. इंग्रजी ही परदेशी भाषा आहे म्हणून लोहियांनी तिचा विरोध केला नाही, या भाषेमुळे काही समाज एकमेकांची बरोबरी करू शकत नाहीत, काही वर्गाची मक्तेदारी वाढते, किंबहुना त्या भाषेचा त्यासाठी हत्यार म्हणून वापर केला जातो, असे लोहियांचे मत होते. हिंदी व इतर भारतीय भाषांचे लोहियांनी समर्थनच केले होते. खरं तर विसाव्या शतकातील प्रत्येक द्वंद्वात लोहियांनी एक तिसरी दिशा समाजाला दाखवली. लोहिया यांनी कुठल्या तरी आयत्या विचारसरणीचा किंवा कथित वादाचा पुरस्कार केला नाही, कुणा महापुरुषाची पूजा केली नाही, कुठल्या पुस्तकाला अंतिम प्रमाण मानले नाही. मार्क्सवाद असो की गांधीवाद पाश्चिमात्य ज्ञान असो की परंपरागत ज्ञान, कल्पित गोष्टी असो की अस्सल विज्ञान, लोहियांनी प्रत्येकातून काही तरी घेतले व प्रत्येकावर टीकाही केली. चांगले तेवढे घ्यावे, सगळे विचार समजून घेणे हा त्यांच्यातील समावादी नेत्याचा गुण होता.
 लोहियांच्या विचारांचा अभ्यास म्हणजे विसाव्या शतकातील दोन विचारसरणींतील सत्त्वग्रहण करण्यासारखे आहे. विसाव्या शतकातील पहिली विचारसरणी समतामूलक चिंतन ही होती. त्यातून साम्यवादी, समाजवादी, स्त्रीवादी व आंबेडकरवादी विचारसरणींना नवा आयाम दिला. दुसरी विचारधारा ही स्वदेशी विचाराची होती, ती गांधीवाद व सवरेदयी विचारातून अभिव्यक्त झाली. विसाव्या शतकात या दोन्ही विचारसरणी कमी-अधिक समांतर चालल्या. लोहियांच्या विचारात या दोन्ही विचारसरणींचा संगम होताना दिसतो. असमानतेविरोधात संघर्षांची त्यांची जिद्द व समाजातील समरसतेचा शोध, राष्ट्रवादाचे प्रबळ आव्हान व त्याच्या जोडीला सखोल आंतरराष्ट्रीयता, अहिंसेचा संकल्प, एकमेकांशी नाते असे अनेक पैलू त्यात आहेत. म्हणजेच सर्वच विचारसरणींच्या चांगल्या गुणांचा विचार त्यांचा होता. कधीही एककल्ली विचार त्यांनी केला नाही.
 आज देशात राष्ट्रवादाच्या नावाखाली उन्मादाचे वातावरण आहे. त्याचा विरोध करणारे देश निरपेक्ष असल्याचे दिसून येते. लोहिया यापेक्षा वेगळे होते, ते एकाच वेळी भारतमाता व धरतीमातेला नमन करतात. एकीकडे चीनच्या कुटिल हेतूंबाबत लोहियांनी नेहरूंना सावध केले, तर दुसरीकडे भारत-पाक महासंघाचे समर्थन केले होते. विश्व संसदेचे स्वप्न ते पाहत होते. अमेरिकेतील इतर वर्णीयांच्या मागे ते ठामपणे उभे राहतात. त्यामुळे अत्यंत व्यापक आणि  विशाल विचारसरणीचे ते नेते होते. लोहियांच्या मते भारतात इंग्रजी बोलणारा जो प्रशासक व शासक वर्ग आहे, तो नकली आहे, आधुनिक नाही. लोहियांनी एका प्रसिद्ध भाषणात देशी आधुनिकतावादावर विचार मांडले होते. ती आधुनिकता अशी होती, जी युरोपलाही साध्य करता आली नाही. म्हणूनच म्हणावे लागेल की ते काळाच्या पुढचा विचार करणारे होते. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनाही त्यांनी सत्य काय आहे हे समोर यावे यासाठी आव्हान दिले होते. दारिद्—यरेषेखालील नेमकी संख्या काय आहे यावरून अंजन घातले होते. त्या काळात काँग्रेसला विरोध करण्याची ताकद कोणाची नसताना त्यांनी हे काम केले होते. कारण ते समानता, समाजवाद यासाठी झटत होते. पण त्यांचे नेमके विचार लोकांपर्यंत जात नाहीत. त्याचे राजकीय विडंबन होताना दिसते. म्हणूनच त्यांचा विचार या विषमतेच्या परिस्थितीत गरजेचे आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: