मराठीत तिने तसे मर्यादीतच चित्रपट केले. पण त्या हाताच्या बोटावर मोजणार्या भूमिकाही तीने शानदार आणि अत्यंत गर्विष्ठपणे केल्या. कुणापुढे नमते घेणारी, सोशीक, रडुबाई तीने कधीच सादर केली नाही. हट्टी, आपल्या मनाप्रमाणे वागणारी, स्पष्टवक्ती, आग्रही अशाच भूमिका तीने केल्या आणि त्या तीला शोभल्याही. त्याही भूमिका प्रेक्षकांना भावल्या, कारण ती होती तेंडुलकरांची प्रिया. दूरदर्शनच्या रजनीने तीला देशभर लोकप्रिय केले. पण अशीच अकाली ती निघूनही गेली. आज प्रिया तेंडुलकरचा जन्मदिवस. अभिनेत्री प्रिया तेंडुलकर तीची ओळख असली तरी मराठी ललितलेखन करणारी ती कलाकार होती. वडिलांचा नावलौकीक आणि मानमरातब मोठा होता. नाटककार विजय तेंडुलकर हे तीचे वडील. पण तीने विजय तेंडुलकरांची कन्या अशी ओळख होणार नाही याची खबरदारी घेत आपली कारकीर्द गाजवली आणि प्रिया तेंडुलकर हे नाव कमावले. प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. ती नोकरी सोडून त्यांनी नाट्यसृष्टीमध्ये प्रवेश केला. त्यांनी गिधाडे, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी या नाटकांमध्ये काम केले होते. भक्ती बर्वेंनी ती फुलराणी नाटक सोडले असताना काही काळ ती भूमिका करण्याचे आव्हान प्रियाने पेलले होते. तसे हे फार मोठे धाडस होते. कारण भक्ती बर्वे अस्तित्वात असतानाच आणि त्यांच्याशी तुलना होण्याची भीती असतानाही प्रिया तेंडुलकरने हे नाटक चांगल्याप्रकारे सादर केले. आधी हिंदी मग मराठी असा तिचा प्रवास झघला. प्रियाचा पहिला चित्रपट 1973 साली आलेला दिग्दर्शक शाम बेनेगल यांचा अंकुर हा हिंदी चित्रपट. यांव्यतिरिक्त त्यांनी गोंधळात गोंधळ, धाकटी जाऊ, देवता, मायबाप आणि तूच माझी राणी यासारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते. प्रिया तेंडुलकर ह्या भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची ’रजनी’ ही मालिका खूपच गाजली. त्यांच्या इतर मालिकांमध्ये प्रिया तेंडुलकर शो, ज़िम्मेदार कौन, किस्से मियाँ बीवी के, हम पांच या हिंदी, तर ’दामिनी’ या मराठी मालिकेचा समावेश होतो. त्या लेखिकाही होत्या. त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या आहेत. त्यांचे ’ज्याचा त्याचा प्रश्न’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मराठीत तिचे आगमन तसे नकारात्मक पद्धतीने झाले. सचिन पिळगांवकर याचा मायबाप हा चित्रपट 1980-81 ला आला होता. म्हणजे सचिन आपले मराठीतील नवयुग सुरू करण्याच्या तयारीत होता. त्या पहिल्याच चित्रपटात प्रिया तेंडुलकर आणि संजय जोग यांची जोडी होती. दया डोंगरे ही प्रिया तेंडुलकरची आई होती. यात संजय जोगला म्हणजे आपल्या नवर्याला मुठीत ठेवून पैशाच्या जोरावर वर्चस्व गाजवणारी नकारात्मक नायिका तिने गाजवली होती. तीचे डोळे, बोलण्याची ढब, ओठांच्या हालचाली यातून ती खलनायिका म्हणून गाजणार हे नक्की झाले होते. या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले होते. एक शहरी चेहरा तीच्या रूपाने मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला होता. तोपर्यंत सर्वच नट्या या ग्रामीण मराठी चित्रपट करत होत्या. मराठी चित्रपट तमाशाप्रधानपटात आणि ग्रामीण चेहर्यात अडकला होता. रंजना, उषा चव्हाण, उषा नाईक, कामिनी भाटीया या धुमाकूळ घालत होत्या. सीमा, जयश्री गडकर या चरित्र भूमिका करू लागल्या होत्या. त्या काळात शहरी चित्रपट निघत नव्हते. त्यावेळी प्रियाचे तेंडुलकरचे आगमन झाले आणि शहरी ग्रामीण भागात चालेल असे दोन्ही प्रकारचे चित्रपट निघू लागले. त्यानंतर व्ही के नाईक यांच्या गोंधळात गोंधळ या चित्रपटातून प्रिया तेंडुलकरचे दर्शन घडले. रविंद्र महाजनी बरोबर तिची जोडी छान जमली. एकीकडे रंजना अशोक सराफ विनोदाचा गोंधळ घालत असताना संशय आणि भांडणातून प्रियाने आपले वेगळेपण दाखवून दिले. हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाला रिपीट ऑडीयन्स मिळाला. आजही कुठल्याही मराठी वाहिनीवर हा चित्रपट लागला तरी प्रेक्षक तो आवडीने पाहतात. अशोक सराफ रंजनाची धमाल असताना, या चित्रपटात आपल्या वेगळेपणाने प्रिया तेंडुलकर लक्षात राहते. त्यानंतर धाकटी जाउमध्ये कसलाही मुलाहीजा न बाळगणारी, आत्मकेंद्रीत अशी धाकट्या जावेची भूमिका प्रियाने केली. आशा काळेचा अत्यंत सहजपणे मानसिक छळ करण्याचे कौशल्य तिने दाखवून दिले. तीचा आवाज, आवाजातील जरब, आक्रमकता, रागीट वाटणारे डोळे, नाकावरची चमकी तीच्यातील तीखटपणा, धारधारपणा दाखवून देत असत. त्यामुळे तीची भूमिका ही कायम लक्षात राहणारी अशी राहिली. रंजना रविंद्र महाजनी या जोडीचा तो सुवर्णकाळ होता. महिलांच्या खास आवडीची ती जोडी होती. दोघांनी जवळपास डझनभर चित्रपट केले होते. अशातच मुंबईचा फौजदार हा चित्रपट आला. या चित्रपटातील मुंबईच्या फौजदाराची भूमिका करणार्या रविंद्र महाजनीची एका मॅगझीनसाठी मुलाखत घेण्याच्या निमित्ताने ती येते. तो तिच्या प्रेमात पडतो आणि आपल्या सहजीवनात ही स्वप्नसुंदरी असावी असे वाटत असतानाच ती स्वप्नच राहते. दोघांचे लग्न होत नाही. वडिलांच्या खाक्यामुळे त्याला रंजनाशी लग्न करावे लागते. या चित्रपटात प्रिया ही स्पेशल किंवा विशेष भूमिकेत होती पण लक्षात राहणारी अशीच होती. दूरदर्शन मात्र 1980 च्या उत्तरार्धात तीने गाजवले. त्यात विशेषत: रजनी ही तीची मालिका फारच गाजली. सर्वांना न्याय मिळवून देणारी, न्यायासाठी झगडणारी रजनी ही लोकांच्या मनातील आदर्श बनली. सामान्यांना लुटणारे दुकानदार, रिक्षा, टॅक्सीचालक, व्यापारी या सगळ्यांना वठणीवर आणणारी रजनी इतकी लोकप्रिय झाली होती, कायदा मोडू न देण्याचा तिचा धाक इतका होता की एका नाटकात रजनी हे नाव आल्यावर लक्ष्मीकांत बेर्डेही रजनी? बापरे सांभाळायला हवं अशी अॅडीशन घेतो तेंव्हा त्यावर टाळ्या पडतात. या टाळ्या लक्षाच्या समयसूचकतेला होत्या तितक्याच रजनीला दाद देणार्या होत्या. लिहीता लिहीता, अभिनय करता करता अत्यत कमी वयात प्रिया तेंडुलकर निघून गेली. पण आपली वेगळी ओळख निर्माण करून ती गेली. |
सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०
तेंडुलकरांची प्रिया
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा