सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

छोरा गंगाकिनारेवाला....ते बंबईका बाबू

    ‘अमिताभ बच्चन’ या सर्व वयाच्या प्रेक्षकांना भुरळ घालणार्‍या  जादुई अक्षरांनी गेली 50 पेक्षा जास्त वर्षे भारतीय चित्रपट रसिकांच्याहृदयावर राज्य केले आहे. काळ पुढे सरकतो आहे तसे दिवसेंदिवस हे भावबंध अधिकच घट्ट होत आहेत.अमिताभ यांचा आज वाढदिवस. अनेक लोक या दिवसाची वाट पहात असतात. शहरी भागात आनंद असतोच पण कोल्हापूर, सोलापूर या भागातही या महानायकाचा वाढदिवस गेली अनेक वर्ष रसिक साजरा करत असतात. तो कशाप्रकारे साजरा केला याबाबत सांगत असतात. अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी मुंबईत गर्दी होते. यावर्षी कोरोनामुळे त्यावर बंधने येतील. पण मुंबई बाहेरच्या लोकांच्या भावनाही त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात असे अनेकांना कायम वाटत असते. याचे कारण आयुष्यातील चढउतारांचा जो आलेख अमिताभ बच्चन यांनी पाहिला आहे आणि आपले नाव मोठे केले आहे ते सर्वच त्याच्या उंचीप्रमाणेच अद्वितिय असे आहे.

   अमिताभ बच्चन म्हणजे भारतीय सिनेमाच्या वैभवशाली इतिहासातील सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक. चार दशकांहून अधिकच्या कारकीर्दीत विविध भाषांतील जवळपास दोनशे चित्रपटात काम करणारा हा महानायक. बॉलिवूडचा शहेनशहा, महानायक, अँग्री यंग मॅन, स्टार ऑफ द मिलेनियम, बिग बी अशी अनेक विशेषणं त्याला जोडली जातात. अभिनयासोबतच पार्श्वगायक, चित्रपटनिर्मिती आणि टीव्हीवरील कार्यक्रमाचे पथदर्शक सूत्रधार.
   आजच्याच दिवशी बच्चन यांचा जन्म अलाहाबादला झाला. छोरा गंगाकिनारेवाला हे नाव तेंव्हाच त्याला चिकटले. त्यांचे वडील डॉ. हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील सुप्रसिद्ध कवी होते. त्यांच्या आई तेजी बच्चन या मूळच्या फैसलाबादमधील शीख होत्या. अमिताभ यांच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी बच्चन या टोपणनावाने ते कविता प्रसिद्ध करायचे. सिनेसृष्टीत प्रवेश करताना अमिताभ यांनीसुद्धा हेच टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली. पुढे संपूर्ण कुटुंबाचेच ‘बच्चन’आडनाव व्यवहारात रूढ झाले.
   ऐन विशीत कोलकात्यातील एका जहाजवाहतूक कंपनीतील एजंटची नोकरी सोडून अमिताभ यांनी अभिनयात कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला. उंचपुरा बांधा आणि दमदार आवाज ही पुढे या सुपरस्टारची वैशिष्ट्ये बनली. परंतु, सुरुवातीला यामुळेच त्यांची हेटाळणी झाली होती.
    के. ए. अब्बास यांच्या ‘सात हिंदुस्तानी’ (1969) या चित्रपटापासून अभिनयाची सुरुवात झाली. सुरुवातीच्या अपयशानंतर ‘जंजीर’पासून यशाची घौडदोड सुरू झाली आणि पुढे यशस्वी चित्रपटांची प्रदीर्घ मालिकाच जन्माला आली. त्यातूनच स्टार, सुपरस्टार आणि स्टार ऑफ द सेंच्युरी अशी विशेषणे लागत गेली.
      1982 चा तो काळ होता. अडतीस वर्ष त्या घटनेला लोटली. तरी आजही ती घटना सर्वांना आठवते. ‘कुली’च्या सेटवर अमिताभ यांना झालेल्या अपघातानंतर ते अक्षरशः जिवावरच्या संकटातून बचावले. त्यावेळी ते बरे व्हावे म्हणून देशभरातीलच नाही तर जगभरातील चाहत्यांनाही प्रार्थना केल्या होत्या. तब्येतीत सुधारणा झाल्यावर अमिताभ यांनी जुहूच्या त्यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या खिडकीतून चाहत्यांना रोज दर्शन देणे सुरू केले. अजूनही ही रीत कायम आहे. अर्थात गेल्या काही वर्षांपासून हे ‘दर्शन’ महिन्यातील एका रविवारपुरते मर्यादित झाले आहे. पण कोरोनामुळे यालाही बंधन आले.
    सत्तरच्याच दशकात सिनेमांसोबतच अमिताभ आणि अभिनेत्री रेखा यांच्या जवळीकीबद्दल खूप चर्चा झाल्या. यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचेही सांगितले गेले. अभिनेत्री परवीन बाबीसोबतच्या त्यांच्या मैत्रीचीही अशीच चर्चा झाली. तशीच चर्चा स्मीता पाटील यांच्या बाबतही झाली होती. कारण ते आजरपट जाये ते हे पावसातील नमक हलाल मधील गाणे. स्मीता पाटील बरोबर खरं तर शक्ती आणि नमक हलाल हे दोनच चित्रपट. पण शराबी चित्रपटात एका गाण्यासाठी तिला आणली आणि या चर्चा सुरू झाल्या. कालांतराने सगळे काही स्थिरस्थावर झाले तरी आजही रेखा आणि अमिताभ एखाद्या कार्यक्रमात एकत्र किंवा समोरासमोर आले तर चर्चा होतात. जया बच्चनच्या चेहर्‍यावरील भाव टिपले जातात. रेखाही अमिताभ बच्चन या विषयावर बोलण्याची संधी सोडत नाही. या सत्यघटनेवरूनच सिलसिला चित्रपटाची निर्मिती झाली अशी आख्ययिका सांगून हा चित्रपट चालवला गेला होता.
   अमिताभ बच्चन कार्पोरेशन लिमिटेड या संस्थेद्वारे आणि स्वतंत्रपणेही त्यांनी चित्रपटांची निर्मिती केली. त्यात तेरे मेरे सपने, मृत्युदंड, उल्लासम, सात रंग के सपने, मेजरसाब, अक्स, विरुद्ध, अंतरमहाल, फॅमिली, पा, विहीर, बुढ्ढा होगा तेरा बाप, सप्तपदी, शमिताभ या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली.

    अमिताभ यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. सन 1984 मध्ये मित्र राजीव गांधी यांना मदत करण्यासाठी त्यांनी राजकारणात पाऊल टाकले. अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून त्यांनी हेमवतीनंदन बहुगुणा यांचा पराभव करून खासदार म्हणून लोकसभेत प्रवेश केला. मात्र, बोफोर्स प्रकरणात त्यांचे नाव समोर आले. त्यानंतर सिनेमेही फ्लॉप होऊ लागले. इतकेच नव्हे तर ‘एबीसीएल’ या त्यांच्या निर्मिती कंपनीला प्रचंड नुकसान झाल्याने गाशा गुंडाळायला लागला होता. एकूणच आर्थिक परिस्थिती खालावत चालली होती. अशावेळी ‘कौन बनेगा करोडपती’च्या रूपात बिग बींनी फिनिक्ससारखी भरारी घेतली. केबीसीच्या पहिल्याच भागापासून प्रेक्षकांची मने जिंकली. हिंदी भाषेवरचे प्रभुत्व, सहभागींशी बोलण्याची शैली, संवाद साधण्याची कला यामुळे ते एकमेवाद्वितीय ठरले. ‘हॉट सीट’च्या माध्यमातून त्यांनी अनेकांना लखोपती-करोडपती बनवले.
  अमिताभ यांची कारकीर्द विविध प्रवृत्तीच्या आणि प्रकृतीच्या दिग्दर्शकांनी, लेखकांनी घडवली. त्यात मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, हृषिकेश मुखर्जी, रमेश सिप्पी, यश चोप्रा, रमेश बहल या दिग्दर्शकांचा तसेच सलीम-जावेद, कादर खान, प्रयाग राज या लेखकांचा यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता.
   अमिताभ बच्चन यांचा उदय होण्याआधी चित्रपटांमध्ये नायकाच्या जोडीला एक विनोदी अभिनेता असे. अमिताभ यांना स्वतःलाच विनोदाची जबरदस्त जाण असल्याने आणि ‘अमर अकबर अँन्थनी’ मध्ये आरशासमोर त्यांनी केलेल्या धमाल प्रसंगानंतर त्यांना वारंवार विनोदी प्रसंग दिले जाऊ लागले व त्यांच्या चित्रपटांमधून विनोदी अभिनेते दिसणे कमी झाले. शशी कपूर, विनोद खन्ना यांच्यासोबत त्यांची जमलेली जोडी व त्यांनी एकत्र केलेले चित्रपट हाही चर्चेचा विषय असे.
  अमिताभने असंख्य डायलॉग अजरामर केले. जाहीरातीच्या माध्यमातून आजही ते वापरले जातात. पण परफेक्ट टायमिंक साधत केलेले एखादे वाक्यही कधीकधी लक्षात राहणारे असते. त्यामध्ये, तुम्हारा नाम क्या है बसंती? (शोले),
्र आगर अपनी माँ का दूध पिया है तो सामने आ (लावारिस), डॉन को पकडना मुश्किलही नही नामुमकिन आहे (डॉन), मुंछे हो तो नथुलाल जैसी, वरना ना हो (शराबी), रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहेनशहा (शहेनशहा) हे लोकांच्या ओठांवरचे डायलॉग आहेत.
्र     मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठता (दीवार) यातून दिसणारी अँग्री यंग मॅनची आग, हम जहाँ खडे हो जाते हैं, लाइन वहीसे शुरू होती हैं (कालिया) यातील पेटलेली मशाल  कधीकधी इतकी सहज होते की मनात राग असूनही ती शांत असते. ते म्हणजे, प्यार ही तो वो जादू है जो उमरभर जवान बनाये रखता है (बागबान) हे त्या अभिनयाचे टोक असते.
्र इन्सान का इमोशन उसका मोशन के साथ जुडा हुआ है (पिकू), नो मीन्स नो (पिंक) हे त्याचे डायलॉग कायम लक्षात राहणारे आहेत.
 सुरवातीला अमिताभवर तत्कालीन माध्यमे आणि दिलीपकुमारच्या शौकीनांती प्रचंड टीका केली होती. लंबूटांग्या म्हणजे उंच पायांचा असल्याने अमिताभ यांना नाचता येत नाही, त्यात एक प्रकारचे अवघडलेपण असते असे सुरुवातीला म्हटले गेले. पुढे अमिताभ यांनी भगवानदादांच्या नृत्यावरून प्रेरित होऊन स्वतःची एक विशिष्ट शैली विकसित केली. कंबर हलवित हातांच्या लयबद्ध हालचालींमधून ती साकारली होती. सुहाग, डॉन, मिस्टर नटवरलाल, नमक हलाल आदी अनेक चित्रपटांमधून ती दिसली.
 अनेक पुरस्काराने सत्मानित बीग बी गेल्याच वर्षी सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित झाले. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ज्ञात अज्ञात आणि ज्यांना आपल्या भावना बीग बींपर्यंत पोहोचवायची इच्छा आहे त्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: