सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

पुरोगामी विचारवंत प्रा. पुष्पा भावे

   पुरोगामी विचारवंत म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ओळख असलेल्या पुष्पा भावे यांचे शनिवारी निधन झाले. पुरोगामी महाराष्ट्राची पताका वाहणार्‍या ज्या काही मागच्या पिढीतील दुर्गा होत्या त्यापैकी आणखी एका दुर्गेचा शेवट यानिमित्ताने झालेला आहे. पण त्यांच्या विचारांनी आणि स्पष्टवक्तेपणामुळे त्या महाराष्ट्रात कायम अजरामर राहतील यात शंका नाही.

   मूळच्या माहेरच्या पुष्पा सरकार नावाने जन्माला आलेल्या पुष्पाताई नंतर भावे झाल्या. त्या भावे नावाने त्या ओळखल्या जाउ लागल्या कारण त्यानी भावे झाल्यावर जे भावले ते स्पष्टपणे व्यक्त केले. त्यामुळे ते नावही त्यांना शोभून दिसले.  अत्यंत सुस्पष्ट वैचारिक भूमिका, लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा वसा, प्रभावी वक्तृत्व आणि त्याला सुसंगत प्रत्यक्ष कृतीची जोड असणार्‍या समाजवादी नेत्या आणि मराठीतील एक विचारवंत लेखिका अशीही त्यांची गणती होती. त्या एका विचारवंत लेखिकेला महाराष्ट्र आज मुकला आहे.
   पुष्पाताईंनी मराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजातून एम.ए. ची पदवी प्राप्त केली आणि मुंबईतच सिडनहॅम महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर दयानंद कॉलेज, म.ल. डहाणूकर महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि शेवटी रुईया कॉलेजमधून त्या निवृत्त झाल्या.
   त्या मराठीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक होत्या. मराठी भाषा आणि मराठी नाटक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी नाटकांविषती आणि एकूण नाट्यसृष्टीविषयी भरपूर लेखन केले आहे. अनेक गाजलेल्या नाटकांची त्यांनी केलेली समीक्षणेही गाजली आहेत. विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, विजया मेहता, सतीश आळेकर या दिग्गजांना त्यांच्या नाटकांबद्दल पुष्पाताई काय म्हणतात याविषयी उत्सुकता असे.
पुष्पाताई या विद्यार्थिदशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी निगडीत होत्या. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला होता. स्वातंत्र्योत्तर काळात महागाईविरोधी आंदोलनामध्ये अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासमवेत पुष्पाताई या लाटणे मोर्चात हिरिरीने सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करण्यापासून कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारशी संघर्ष करण्यात पुष्पाताई अग्रभागी होत्या. स्त्रीवादी चळवळीची पाठराखण करणार्‍या पुष्पाताईंनी दलित स्त्रियांच्या संघटनेमध्ये स्वतंत्र वैचारिक भूमिका घेत संघटन केले.
  डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, शाम मानव यांनी सुरू केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या आरंभापासून होत्या. डॉ. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीत हमाल, रिक्षावाले, कागद-काच-पत्रा वेचणारे अशा कष्टकर्‍यांच्या आंदोलनांमध्ये त्या समर्थक राहिल्या. सामाजिक कृतज्ञता निधी या सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देणार्‍या उपक्रमामध्ये पुष्पाताई सतत अग्रभागी असत. त्यामुळे सवार्र्ना समानतेचा धडा देणार्‍या त्या निस्पृह कार्यकर्त्या होत्या. त्या कार्यकर्तीचा अंत शनिवारी झालेला आहे.
   मराठवाडा विद्यापीठ नामांतर, मंडल आयोग अशा प्रश्नांवर झालेल्या चळवळींवर पुष्पाताईंचा वैचारिक ठसा होता. आणीबाणीविरोधात लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या संपूर्ण क्रांती आंदोलनातून जन्माला आलेल्या जनता पक्षाचे पुष्पाताईंनी तडफेने काम केले. त्यामुळे मुंबई महाराष्ट्रात अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे आणि पुष्पा भावे या तिन दुर्गा देवी होत्या. त्यांच्यापुढे काँग्रेसचे तत्कालीन नेते वसंतदादा पाटील आदीही अक्षरश: हैराण होत होते. विरोधकांचा कसा वचक असला पाहिजे हे दुर्गांनी महाराष्ट्राा दाखवले होते.
  साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक निधी, अनुवाद सुविधा केंद्र, भारत-पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अ‍ॅण्ड डेमॉक्रसी, मृणाल गोरे साऊथ एशियन सेंटर, केशव गोरे स्मारक ट्रस्ट, मानवी हक्कांसाठी काम करणारी मेहेर संस्था अशा विविध संस्था-संघटनांमध्ये पुष्पाताई सक्रीय पदाधिकारी होत्या.
    पुष्पाताई अनेकवेळा वादग्रस्त ठरत. अर्थात त्या वादग्रस्त ठरत त्या त्यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे, स्पष्ट विचारांमुळेच. 2013 सालच्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळ ठाकरे यांचे नाव देण्याला भावे यांनी उघडपणे विरोध केला होता. हे अलिकडच्या काळातील फार मोठे धाडस होते. कारण महाराष्ट्रात मुंबईत बाळासाहेबांच्या नावाला विरोध करणे हे सोपे नव्हते. पण त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली होती. त्यांच्या मते, बाळासाहेबांनी साहित्य संमेलनाला ’बैलबाजार’ असा शब्द वापरला होता. पर्यायाने साहित्यिकांना बैल म्हटंले होते. त्यानंतर बाळ ठाकरे यांनी अनेक वेळा पु.ल. देशपांडे यांच्यावरही टीका केली होती. त्यांनी पु.ल.देशपांडे यांना मोडका पुल असे म्हटले होते. साहित्यिकांवर आणि साहित्य संमेलनावर नेहमीच टीका करणार्‍या बाळ ठाकरे यांचे नाव व्यासपीठाला देणे योग्य नाही. त्यामुळे त्यांच्या स्मृती ज्यांना कोणाला जागवायच्या असतील त्यांनी वेगळ्या प्रकारे जागवाव्यात... असे म्हणतं ज्येष्ठ समीक्षिका प्रा. पुष्पा भावे यांनी बाळासाहेबांच्या नावाला थेटपणे विरोध दर्शविला होता.
हे फार मोठे धाडस करणार्‍या त्या मागच्या पिढीतील अखेरच्या नेत्या होत्या. आजकाल असा परखड विचार मांडणारे कोणीही नाहीत हे दुर्दैवाने सांगावे लागेल. म्हणूनच पुष्पाताईंची आठवण महाराष्ट्राला कायम राहील.
     त्यांचे लेखनकार्यही प्रचंड होते. आम्हाला भेटलेले डॉ. श्रीराम लागू, गुड मुस्लीम बॅड मुस्लीम ,रंग नाटकाचे हे त्यांचे  साहित्य विशेष गाजले. त्यांनी विविध मासिके, नियताकालिके यांतून विपुल लेखन केले होते.
 त्यांनी केलेल्या समाजकार्याबद्दल महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्कार, अनंतराव भालेराव स्मृति पुरस्कार
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचा ’राजर्षी शाहू पुरस्कार, मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार
आदी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते.
    महाराष्ट्र एका पुरोगामी  विचारवंत महिलेला मुकला आहे हे यानिमित्ताने अधोरेखीत करावे लागेल. त्यांना भावपूर्ण आदरांजली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: