बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२०

 हिंदुस्थानी संगिताचे मास्टर -मास्टर कृष्णराव

काही नावचं अशी असतात की ती ऐकल्यावर,आठवल्यावर कानात आपोआप आठवणीनी ऑर्गनचे, पायपेटीचे किंवा संवादिनीचे सूर उमटतात. कुठेतरी तंबोर्‍याचा आवाज येतो. तबल्याचा ताल घुमू लागतो. अशा नावांमध्ये मास्टर कृष्णराव, गोविंदराव टेंभे, छोटा गंधर्व अशा अनेकांची आठवण होते. या पंकतीतील एक नाव म्हणजेच मास्टर कृष्णराव. आजच्या दिवशी म्हणजे 20 ऑक्टोबरला वृद्धापकाळाने मास्टर कृष्णरावांचे निधन झाले, त्यांचा हा स्मृतीदिन.
   मास्टर कृष्णरावांची संगीत साधना मोठी होती. त्यांचे गुरू म्हणजे पं. भास्करबुवा बखले हे होते. आपल्याकडे संगीत विशेषत: शास्त्रीय संगीताला गुरूशिष्य परंपरेला फार महत्व आहे. त्यामुळे कोणाही गायकाचा उल्लेख हा तो कोणाचा शिश्य आहे असाच करायला हवा. मास्टर कृष्णरावांनी गायन प्रकारात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताला महत्व दिले होते.
संगीत कारकीर्द
   शास्त्रीय गायक, संगीत नट, संगीतकार अशी त्यांची फार मोठी आणि लक्षणीय अशी कारकीर्द घडली. ते पेशाने गयक होते. पुण्यातील भारत गायन समाज ही त्यांची संस्था होती.  त्यांच्या एकुणच कारकीर्दीसाठी त्याचा साहित्य अकादमी रत्न सदस्यत्व, विष्णुदास भावे सुवर्णपदक, बालगंधर्व सुवर्णपदक देउन गौरव करण्यात आला होता. तर शासकीय मानाचा पुरस्कार पद्मभूषण त्यांना मिळाला होता.
    कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर हे त्यांचे खरे नाव होते. पण मास्टर कृष्णराव या नावाने ते लोकप्रिय झाले.
मास्तर कृष्णरावांचा जन्म पुणे जिल्ह्यात आळंदी येथे झाला. त्यांचे कुटुंबीय देशस्थ यजुर्वेदी ब्राम्हण होते व कृष्णरावांचे वडील गणेशपंत हे वेदपठण करणारे ज्ञानी पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत बाल गायकनटाचे काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते ’संत सखू’ नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले. नाटकाच्या फिरत्या दौर्‍याने सवाई गंधर्वांना मास्टर कृष्णरावांना योग्य प्रकारे शास्त्रोक्त गायनाचे धडे देता येत नव्हते. संगीत शारदा नाटकात कृष्णरावांची भूमिका बघून व गायन ऐकून भास्करबुवा फार खूष होते. त्यानंतर 1910 मध्ये मास्टर कृष्णरावांनी पंडित भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले स्वतः सवाईगंधर्वांनी मास्टरांना बुवांकडे सोपवले होते .
   आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्टर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी ’संगीत शारदा’, ’संगीत सौभद्र’, ’एकच प्याला’ यांसारख्या अनेक संगीत नाटकांत काही पुरुष (गायक नट) भूमिका आणि बर्‍याच स्त्री (गायक नट) भूमिकाही केल्या.
   गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मास्टर कृष्णरावांकडे आले. ’सावित्री’, ’मेनका’, ’आशा-निराशा’, ’अमृतसिद्धी’, ’संगीत कान्होपात्रा’ यांसारख्या नाटकांना संगीत देताना मास्टर कृष्णराव त्यातील प्रमुख अभिनेत्यांना संगीत तालीम देत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानायचे.
   नंतरच्या काळात त्यांनी ’नाट्य निकेतन’साठी केलेल्या संगीत रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली ’कुलवधू’, ’एक होता म्हातारा’, ’कोणे एके काळी’ यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व सुमधुरतेसाठी वाखाणली गेली.
  मास्टर कृष्णरावांनी ’धर्मात्मा’, ’वहाँ’, ’गोपाळकृष्ण’, ’माणूस’, ’अमरज्योती’, ’शेजारी’ यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण 19 चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या गाजलेल्या ’वसंतसेना’ चित्रपटाचा समावेश आहे तसेच माणिक चित्रसंस्थेच्या ’कीचकवध’ चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी ’भक्तीचा मळा’ व ’मेरी अमानत’ चित्रपटांत भूमिकाही केल्या होत्या.
  विशेषत: संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्टर कृष्णरावांनी  1922 ते  1952 दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत, भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले ’झिंजोटी’ रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे ’वंदे मातरम’ वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची 78 आर पी एम ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली.
   अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली 19 पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील गायन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे 1940 ते 1971 या काळात लिहिलेले ’रागसंग्रहमाला’ नामक सात खंड त्यात समाविष्ट आहेत. या रागसंग्रहमालेस भारत सरकारची मान्यता लाभलेली आहे. हिंदुस्थानी संगीत टिकवण्यासाठी केेलेला हा प्रयत्न फार महत्वाचा आहे.
  विशेष म्हणजे ’वंदे मातरम’ हे गीत बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरम् अनेकानेक विविध चाली लावून, त्यातल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी पंडित नेहरूंची भेट घेऊन व त्यांच्यासमोर संसदेत प्रात्यक्षिके देऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. नेहरूंनी आधीच ’जन गण मन ’ हे राष्ट्रगीत म्हणून निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली. परंतु ’वंदे मातरम’ ला पूर्णपणे न वगळता भारत सरकारतर्फे राष्ट्रीय गीत म्हणून अधिकृत दर्जा देण्यात आला. या घटनेनंतर मास्टर कृष्णरावांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरम् ची रेकॉर्ड विविध शाळा-महाविद्यालये, अनेक वैयक्तिक व सार्वजनिक संस्था वगैरे ठिकठिकाणी कित्येक वर्षे वाजवली जात असे.
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीवरून मास्टर कृष्णरावांनी संपूर्ण बुद्ध वंदना सांगीतिक मीटरमध्ये बसवली व बाबासाहेबांनी त्याची ध्वनिमुद्रिका काढली. याकरिता मास्तर कृष्णरावांनी पाली भाषेचा अभ्यास केला होता.
पुणे येथे आजच्या दिवशी म्हणजे 20 ऑक्टोबर 1974 ला त्यांचे स्वतःच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांचा वारसा त्यांच्या कन्येने जपला. वीणा चिटको या त्यांच्या कन्येने काही काळ संगीतकार म्हणून कारकीर्द गाजवली. त्या मराठी भावगीत विश्वातील पहिल्या स्त्री संगीतकार म्हणून ओळखल्या जातात.

याहू.....शम्मी कपूर

राजकपूर, देवानंद आणि दिलीपकुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टी व्यापून टाकलेली असताना आपली वेगळी वाट काढून स्वतंत्र प्रतिमा निर्माण करणारा अभिनेता म्हणजे शम्मी कपूर. हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळाचा साक्षीदार असलेला हा अभिनेता आपल्या वेगळेपणामुळे दीर्घकाळ कार्यरत राहिला. हिरो किंवा नायक म्हणून जेवढी कारकीर्द गजवली तेवढीच चरीत्र अभिनेता म्हणून दीर्घकाळ कामगिरी त्यांनी केली. तरीही शम्मी कपूर म्हटले की त्याचा तो याहू.... असा ओरडणारा अभिनेता समोर दिसतो. आज  21 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस.
   शम्मीचा जन्म मुंबईत झाला तेव्हा त्याचे नामकरण शमशेर राज कपूर असे झाले होते. त्याकाळातील नाटक तसेच सिनेमाचे प्रसिद्ध कलावंत पृथ्वीराज कपूर यांच्या तीन मुलांपैकी शम्मी हे दुसरे अपत्य  राज कपूर आणि शशी कपूर ही त्याची भावंडे. तीनही भावंडांनी आपल्या वडिलांप्रमाणेच हिंदी सिनेसृष्टीत अपार यश संपादन केले. यात शम्मी कपूर हा जंपींग जॅक म्हणून गाजला.
  शम्मीने अनेक विनोदी, खेळकर, तसेच रोमांचक प्रेमकथांवर आधारित चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या. 1960 च्या दशकात आपल्या आगळ्या नृत्यशैली, तसेच लकबी आणि दिमाखदार व्यक्तिमत्त्वासाठी शम्मी कपूरला बरेच जण भारताचा एल्विस प्रिसली  असे कौतुकाने म्हणत.
   खरं तर शम्मीने अभिनयाची सुरूवात गंभीर भूमिकांपासूनच केली. पण प्रेक्षकांनी त्याला त्या काळात एवढे गंभीरपणे घेतले नाही. कारण गंभीर, दु:खी भूमिका करण्याचा ठेका दिलीपकुमारकडे सोपवला होता. त्यामुळेच शम्मीला आपली वेगळी वाट निवडावी लागली. फिल्मिस्तानच्या नासिर हुसेन - दिग्दर्शित तुमसा नही देखा (1957 अमितासोबत) आणि दिल देके देखो ( 1959 आशा पारेखसोबत), ह्या चित्रपटांनंतर शम्मीची एका खेळकर प्लेबॉयची प्रतिमा तयार झाली. त्यानंतर जंगली ( 1961) मुळे ही प्रतिमा वृद्धिंगत होत गेली आणि नंतरचे बहुतेक चित्रपट ह्याच धर्तीवर आधारित होते.
    शम्मी कपूर हे आपले पार्श्वगायक म्हणून नेहमी मोहम्मद रफीची निवड करीत. मोहम्मद रफी आणि शम्मी कपूर अतिशय चांगले मित्र होते. आपल्या यशाचे श्रेय मोठ्या प्रमाणात मोहम्मद रफीकडे असल्याचे प्रांजळ मत शम्मी कपूर व्यक्त करत. शम्मीचे बहुतेक चित्रपट हे गाण्यावर विशेषत: रफीच्या गाण्यावर गाजले. पण हे कबूल करण्याचे मोठेपण शम्मी कपूरमध्य होते हे विशेष: विशेषत: जंगली मधील याहू !!! चाहे कोई मुझे जंगली कहे हे सिनेमात शम्मी कपूरच्या धुम-धडाका आणि माकडउड्यांनी तुफान लोकप्रिय झालेले गाणे रफींच्याच आवाजात आहे. मधल्या  काही काळात शम्मीला प्रसिद्ध अभिनेत्रींबरोबर दुय्यम दर्जाच्या भूमिका पत्कराव्या लागल्या (उदा. मधुबालासोबत रेलका डिब्बा). तरी  1960 च्या दशकात निर्माते त्याची जोडी मोठ्या नायिका - विशेषत: आशा पारेख, सायरा बानू आणि शर्मिला टागोर बरोबर बनवीत असत. आपल्या सर्व नायिकांपैकी शर्मिला टागोर, राजश्री आणि आशा पारेख बरोबर सहज काम जमायचे असे ते म्हणत. शम्मी कपूर आणि आशा पारेख ची जोडी चार चित्रपटांमध्ये एकत्र दिसली, त्यापैकी तीसरी मंजिल (1966) हा विजय आनंददिग्दर्शित आणि राहुल देव बर्मन यांचे बहारदार संगीत असलेला थरारक रहस्यपट सर्वात जास्त गाजला.
   पण तीसरी मंजिलच्या चित्रीकरणादरम्यान गीता बाली या शम्मीच्या पहिल्या पत्नीचे ’देवी’च्या आजारामुळे निधन झाले आणि वैयक्तिक जीवनात शम्मीला आणि त्यांच्या दोन मुलांना एका खरोखरच्या शोकांतिकेचा सामना करावा लागला. त्यानंतर शम्मीचा मुमताझ (ब्रम्हचारी 1968) च्या सहनायिका))हिच्याबरोबर संबंध जुळले, पण तेही फार काळ टिकले नाहीत. पुढे 1969 साली शम्मीने ’नीला’ हिच्याबरोबर दुसरे लग्न केले. त्यांची ’रोमँटिक हीरो’ची कारकिर्द  1970 च्या दशकात शरीराच्या वाढत्या स्थूलपणामुळे संपुष्टात आली.   अंदाज (1971) हा शम्मीचा नायक म्हणून शेवटचा गाजलेला चित्रपट ठरला. ’70 च्या दशकात ते यशस्वी चरित्र-अभिनेता म्हणून काम करू लागले. जंगली (1961) आणि ब्लफ मास्टर (1964) मध्ये ज्या सायरा बानू बरोबर नायकाचे काम केले होते तिच्याच जमीर (1975) मध्ये त्यांनी त्याच सायराच्या वडिलांचे काम पत्करले. शम्मीने मनोरंजन (1974)(इंग्रजी इर्मा ल दूस वर आधारित) आणि बंडलबाज़ (1976) चे दिग्दर्शन केले. ’मनोरंजन’मध्ये स्वतः चरित्र अभिनयही केला. पुढे 1980 आणि 1990 च्या दशकांत त्यांनी चरित्र-कलाकार म्हणून काम सुरू ठेवले आणि विधाता (1982)मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला.  1990 आणि 2000 ह्या दशकांमधल्या कालावधीत हळूहळू त्यांनी चित्रपटांमधले काम कमी केले. 2006 सालचा सँडविच हा त्यांचा अखेरचा प्रदर्शित चित्रपट होय.
   शम्मी कपूरचे नाव भारतातील इंटरनेट वापरणार्‍या सुरुवातीच्या व्यक्तींमध्ये गणले जाते. ते इंटरनेट यूझर्स कम्युनिटी ऑफ इंडिया (आययूसीआय) या संस्थेचे संस्थापक-चालक होते आणि एथिकल हॅकर्स असोशिएशन यांसारख्या इंटरनेट संस्थांमध्ये कार्यरत होते.
   मूत्रपिंडांच्या विकारामुळे 7 ऑगस्ट, 2011 रोजी शम्मी कपूरला मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि  14 ऑगस्ट ला निधन झाले.
 पण आपली कारकीर्द त्यांनी हसरी आणि करमणूकप्रधान ठेवली होती.  1962 - फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कारसाठी नामांकन मिळाले होते. 1968 - फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार ब्रम्हचारीसाठी त्याला मिळाला होता. 1982 - फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार विधातासाठी पुरस्कार मिळाला होता. 1995 - फिल्मफेअर लाइफटाइम अचीवमेंट पुरस्काराने गौरवण्यात आले. 2008 लाइफटाइम अचीवमेंट अ‍ॅवॉर्ड - भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या बहुमूल्य योगदानासाठी देण्यात आले.
पण साध्या साध्या कामगिरी करणार्‍या अनेकांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आले होते, तो मान काही या कलाकाराला मिळाला नाही हे विशेष म्हणावे लागेल. कारण त्याचाही एक खास असा प्रेक्षक होता. सुवर्णकाळाचा साक्षीदार आणि त्यात भरपूर योगदान असलेला तो कलाकार होता. अर्थात पुरस्कारावरून कोणाच्या यशाअपयशाचा आलेख कधीच मोजू नये पण शम्मी हा आनंद देणारा कलाकार होता हे नक्की.

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

पुरोगामी विचारवंत प्रा. पुष्पा भावे

   पुरोगामी विचारवंत म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ओळख असलेल्या पुष्पा भावे यांचे शनिवारी निधन झाले. पुरोगामी महाराष्ट्राची पताका वाहणार्‍या ज्या काही मागच्या पिढीतील दुर्गा होत्या त्यापैकी आणखी एका दुर्गेचा शेवट यानिमित्ताने झालेला आहे. पण त्यांच्या विचारांनी आणि स्पष्टवक्तेपणामुळे त्या महाराष्ट्रात कायम अजरामर राहतील यात शंका नाही.

   मूळच्या माहेरच्या पुष्पा सरकार नावाने जन्माला आलेल्या पुष्पाताई नंतर भावे झाल्या. त्या भावे नावाने त्या ओळखल्या जाउ लागल्या कारण त्यानी भावे झाल्यावर जे भावले ते स्पष्टपणे व्यक्त केले. त्यामुळे ते नावही त्यांना शोभून दिसले.  अत्यंत सुस्पष्ट वैचारिक भूमिका, लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा वसा, प्रभावी वक्तृत्व आणि त्याला सुसंगत प्रत्यक्ष कृतीची जोड असणार्‍या समाजवादी नेत्या आणि मराठीतील एक विचारवंत लेखिका अशीही त्यांची गणती होती. त्या एका विचारवंत लेखिकेला महाराष्ट्र आज मुकला आहे.
   पुष्पाताईंनी मराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजातून एम.ए. ची पदवी प्राप्त केली आणि मुंबईतच सिडनहॅम महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर दयानंद कॉलेज, म.ल. डहाणूकर महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि शेवटी रुईया कॉलेजमधून त्या निवृत्त झाल्या.
   त्या मराठीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक होत्या. मराठी भाषा आणि मराठी नाटक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी नाटकांविषती आणि एकूण नाट्यसृष्टीविषयी भरपूर लेखन केले आहे. अनेक गाजलेल्या नाटकांची त्यांनी केलेली समीक्षणेही गाजली आहेत. विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, विजया मेहता, सतीश आळेकर या दिग्गजांना त्यांच्या नाटकांबद्दल पुष्पाताई काय म्हणतात याविषयी उत्सुकता असे.
पुष्पाताई या विद्यार्थिदशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी निगडीत होत्या. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला होता. स्वातंत्र्योत्तर काळात महागाईविरोधी आंदोलनामध्ये अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासमवेत पुष्पाताई या लाटणे मोर्चात हिरिरीने सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करण्यापासून कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारशी संघर्ष करण्यात पुष्पाताई अग्रभागी होत्या. स्त्रीवादी चळवळीची पाठराखण करणार्‍या पुष्पाताईंनी दलित स्त्रियांच्या संघटनेमध्ये स्वतंत्र वैचारिक भूमिका घेत संघटन केले.
  डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, शाम मानव यांनी सुरू केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या आरंभापासून होत्या. डॉ. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीत हमाल, रिक्षावाले, कागद-काच-पत्रा वेचणारे अशा कष्टकर्‍यांच्या आंदोलनांमध्ये त्या समर्थक राहिल्या. सामाजिक कृतज्ञता निधी या सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देणार्‍या उपक्रमामध्ये पुष्पाताई सतत अग्रभागी असत. त्यामुळे सवार्र्ना समानतेचा धडा देणार्‍या त्या निस्पृह कार्यकर्त्या होत्या. त्या कार्यकर्तीचा अंत शनिवारी झालेला आहे.
   मराठवाडा विद्यापीठ नामांतर, मंडल आयोग अशा प्रश्नांवर झालेल्या चळवळींवर पुष्पाताईंचा वैचारिक ठसा होता. आणीबाणीविरोधात लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या संपूर्ण क्रांती आंदोलनातून जन्माला आलेल्या जनता पक्षाचे पुष्पाताईंनी तडफेने काम केले. त्यामुळे मुंबई महाराष्ट्रात अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे आणि पुष्पा भावे या तिन दुर्गा देवी होत्या. त्यांच्यापुढे काँग्रेसचे तत्कालीन नेते वसंतदादा पाटील आदीही अक्षरश: हैराण होत होते. विरोधकांचा कसा वचक असला पाहिजे हे दुर्गांनी महाराष्ट्राा दाखवले होते.
  साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक निधी, अनुवाद सुविधा केंद्र, भारत-पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अ‍ॅण्ड डेमॉक्रसी, मृणाल गोरे साऊथ एशियन सेंटर, केशव गोरे स्मारक ट्रस्ट, मानवी हक्कांसाठी काम करणारी मेहेर संस्था अशा विविध संस्था-संघटनांमध्ये पुष्पाताई सक्रीय पदाधिकारी होत्या.
    पुष्पाताई अनेकवेळा वादग्रस्त ठरत. अर्थात त्या वादग्रस्त ठरत त्या त्यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे, स्पष्ट विचारांमुळेच. 2013 सालच्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळ ठाकरे यांचे नाव देण्याला भावे यांनी उघडपणे विरोध केला होता. हे अलिकडच्या काळातील फार मोठे धाडस होते. कारण महाराष्ट्रात मुंबईत बाळासाहेबांच्या नावाला विरोध करणे हे सोपे नव्हते. पण त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली होती. त्यांच्या मते, बाळासाहेबांनी साहित्य संमेलनाला ’बैलबाजार’ असा शब्द वापरला होता. पर्यायाने साहित्यिकांना बैल म्हटंले होते. त्यानंतर बाळ ठाकरे यांनी अनेक वेळा पु.ल. देशपांडे यांच्यावरही टीका केली होती. त्यांनी पु.ल.देशपांडे यांना मोडका पुल असे म्हटले होते. साहित्यिकांवर आणि साहित्य संमेलनावर नेहमीच टीका करणार्‍या बाळ ठाकरे यांचे नाव व्यासपीठाला देणे योग्य नाही. त्यामुळे त्यांच्या स्मृती ज्यांना कोणाला जागवायच्या असतील त्यांनी वेगळ्या प्रकारे जागवाव्यात... असे म्हणतं ज्येष्ठ समीक्षिका प्रा. पुष्पा भावे यांनी बाळासाहेबांच्या नावाला थेटपणे विरोध दर्शविला होता.
हे फार मोठे धाडस करणार्‍या त्या मागच्या पिढीतील अखेरच्या नेत्या होत्या. आजकाल असा परखड विचार मांडणारे कोणीही नाहीत हे दुर्दैवाने सांगावे लागेल. म्हणूनच पुष्पाताईंची आठवण महाराष्ट्राला कायम राहील.
     त्यांचे लेखनकार्यही प्रचंड होते. आम्हाला भेटलेले डॉ. श्रीराम लागू, गुड मुस्लीम बॅड मुस्लीम ,रंग नाटकाचे हे त्यांचे  साहित्य विशेष गाजले. त्यांनी विविध मासिके, नियताकालिके यांतून विपुल लेखन केले होते.
 त्यांनी केलेल्या समाजकार्याबद्दल महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्कार, अनंतराव भालेराव स्मृति पुरस्कार
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचा ’राजर्षी शाहू पुरस्कार, मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार
आदी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते.
    महाराष्ट्र एका पुरोगामी  विचारवंत महिलेला मुकला आहे हे यानिमित्ताने अधोरेखीत करावे लागेल. त्यांना भावपूर्ण आदरांजली.

एलजीबीटीतून राष्ट्रवादीचे पुरोगामीत्व

     अखेर ती सुद्धा माणसे आहेत, त्यांनाही काही भावना आहेत. त्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. आता खुलेपणाने लोक बोलू लागले आहेत. त्यामुळे काळाची गरज ओळखून आपले पुरोगामीत्व सिद्ध करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसने साधली. ते म्हणजे एलजीबीटी सेल निर्माण करण्याचा राष्ट्रवादीचा निर्धार. आता खुलेपणाने या वेगळ्या लोकांना सामावून घेउन त्यांच्यासाठी राष्ट्रवादीने एलजीबीटी सेल स्थापन केला हे फार मोठे पुरोगामीत्व आहे.

  प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये युवक, युवती, विद्यार्थी, कामगार, महिला, अल्पसंख्य अश्या अनेक संघटना असतात. या संघटना त्या विशिष्ट वर्गासाठी काम करतात. या संघटनांमार्फत राजकीय पक्षांना त्या विशिष्ट वर्गापर्यंत पोहचता येतं. असाच दुर्लक्षित असणारा समुदाय म्हणजे ’एलजीबीटी’ समुदाय. राष्ट्रवादी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकत  या  समुदायासाठी स्वतंत्र सेलची स्थापना केली आहे.
  हा लेसबियन, गे, बायोसेक्सुयल आणि ट्रान्सजेंडर लोकांसाठी ही फार महत्वाची आहे. खरं तर आपण माणूस म्हणून जन्माला येत असतो. एकतर मी मुलगा म्हणून जन्माला यावे किंवा मुलगी म्हणून जन्माला यावे. हे ठरवण्याचा अधिकार कोणालाच नसतो. जे लिंग घेउन आपण जन्माला आलो आहोत ते स्वीकारण्या पलिकडे आपल्या हातात काही नसते. मुलाचा जन्म झाला तर आनंद, मुलीचा झाला तर कमी आनंद. पण या दोन्हींमधला झाला तर? त्या व्यक्तीचे, कुटुंबाचे पाप आहे असे समजून ती एक तिरस्करणीय व्यक्ती ठरते. उपेक्षित म्हणून त्याकडे पाहिले जाते, समाज वाळीत टाकतो, दुर राहतो, त्यांना कोंडून ठेवले जाते किंवा ही मुले घरातून बाहेर पडतात. निसर्गाने दिलेले जीवन जगतात.
गेल्या काही वर्षात अशा लोकांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अनेकांना अशा सहजीवनाचेही आकर्षण वाटू लागले आहे. त्यामुळे समलिंगी आकर्षण असणारी गे किंवा लेसबियन, होमो संस्कृती वाढू लागली. लिंगबदलाचे प्रकार वाढू लागले. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मी तो आहे की ती आहे आणि तो किंवा ती नसून अन्य कोणी आहे हे सांगण्याचे धाडस पूर्वी नव्हते. पण आजकाल आपण समलिंगी आहोत, आपण ट्रान्सजेंडर आहोत, अन्य आहोत हे वास्तव स्विकारले जात आहे. त्यामुळे वाढत्या संख्येमुळे या लोकांना त्यांचे लोकशाहीत प्रतिनिधीत्व मिळणे रास्त आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला ही कौतुकाची बाब आहे.
   एलजीबीटी सेल’ त्यांच्या समुदायातील वंचितांसाठी काम करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. हा सेल नेमकी काय कामं करणार? ’एलजीबीटी’ समुदायाला राजकीय पक्षात सामील करून ते मुख्य प्रवाहात येतील का? हा प्रश्न महत्वाचा आहे. पण काळाची गरज म्हणून हे टाकलेले पाउल फार महत्वाचे आहे. चोरी छुपके कुणीतरी पक्षात असण्यापेक्षा त्यांच्यासाठी खुलेपणाने वेगळा सेल तयार करणे हे धाडसी आणि पुरोगामीपणाचे लक्षण आहे.
      राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मराठ्यांचा पक्ष असा शिक्का काही लोकांनी मारला होता. तो पुसून टाकण्याबरोबरच आमचा पक्ष सर्वसमावेशक आहे हे दाखवण्याची संधी यानिमित्ताने राष्ट्रवादीला मिळाली आहे. समाजातील विविध वर्गापर्यंत, तळागाळातील वंचितांपर्यंत राजकारण पोहोचतं. पण ’एलजीबीट’ समुदाय राजकीयदृष्याही वंचित राहिला आहे. उत्तर प्रदेशात काही तृतियपंथी लोकसभेत गेले असा एखाददुसरा अपवाद वगळता खुल्या मतदारसंघातून तृतियपंथी, हिजडे, समलिंगी अशा लोकांना कोणी संधी देत नाही. त्यामुळेच या समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक स्तरांवर प्रयत्न केले जातात. पण एलजीबीटी सेल स्थापन करून राजकीयदृष्ट्या त्यांना महत्त्व देणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिला राजकीय पक्ष ठरला आहे.
    राष्ट्रवादीने या ’एलजीबीटी’ सेलच्या राज्यप्रमुखपदी प्रिया पाटील यांच्यासह 14 जणांची निवड करण्यात आली आहे.  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे ’वेलफेअर बोर्ड’ स्थापन करण्यात आलं आहे.
   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुरोगामी विचार हे कायम भाषणातून न मांडता कृतीतून दाखवले आहेत. सभागृहात महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाबाबतही शरद पवार हे आघाडीवर होते.  देशात पहिल्यांदा महिला आरक्षण हे महाराष्ट्रात सुरू झालं. पहिल्यांदा युवती काँग्रेस हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालं आणि आता एलजीबीटी सेल हा सुध्दा राष्ट्रवादीने सुरू केला आहे. या सेलमार्फत एलजीबीटी समुदायाचे आर्थिक, सामाजिक प्रश्न सुटावेत हा यामागचा हेतू आहे, असं सुप्रिया सुळे यांनीच यावेळी जाहीर केले. हे पुढचं पाउल आहे.
    देश स्वतंत्र झाल्यापासून समाजातील समानता महत्त्वाची राहिली आहे. एलजीबीटी समाजाला समानतेची वागणूक मिळत नाही. लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा आजही पूर्णपणे बदललेला दिसत नाही. तो बदलण्याची गरज असल्याचं वारंवार बोललं जातं. पण प्रत्यक्षात काही होताना दिसत नाही.
विशेष म्हणजे या सेलसाठी 14 जणांची कमिटी स्थापन करण्यात आली आहे. यांच्या  माध्यमातून  जिल्हा आणि तालुका पातळीवर विविध संघटना तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून आता प्रत्येक शहरातील एलजीबीटींचे प्रश्न सोडवण्याचं काम राष्ट्रवादी करणार आहे. यापूर्वी महापालिका किंवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अनेकदा तृतियपंथी उमेदवार दिसले. पण अद्याप राज्यात कोणी निवडून आलेलं नाही. 2019 विधानसभा निवडणुकीत पिंपरी चिंचवडमधून नताशा लोखंडे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. पण लोकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. कारण या समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन. या लोकांना मुख्य प्रवाहात येऊन अडचणी सोडविण्यासाठी  राजकीय पाठबळाची गरज होती. निवडणुकीत महिला आणि पुरुष असे आरक्षित वॉर्ड असतात. त्या आरक्षणात एलजीबीटी समाजालाही सामावून घेण्याची मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेस या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे करणार आहे. आजकाल हे प्रमाण वाढल्याचे आपण रस्त्याने, रेल्वेने किंवा प्रवासातही पाहतो. निसर्गाने निर्माण केलेला हा जीव समाजाचा एक घटक आहे. तो वाळीत टाकणे, त्यांचा तिरस्कार करणे हे चुकीचे आहे. कोणीही जन्माला येताना मी कोण होणार आहे हे ठरवत नसतो. आपण मुलगा मुलगी की अन्य वर्गात जन्माला येणार आहोत हे कोणालाही ठरवण्याचा अधिकार नसतो. आजवर मुलगा मुलगी असा भेदभाव होता, स्त्रीयांना दुय्यम स्थान होते. आता त्या मुख्य प्रवाहात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून आघाडीवर आहेत. आता तृतियपंथी, हिजडे, छक्के, समलिंगी, लेसबियन, होमो, लिंग परिवर्तन केलेले  सगळे लोक समाजात येतील हे फार महत्वाचे काम राष्ट्रवादीने केलेले आहे. यातून आपले पुरोगामीत्व आणि दुरदर्शीत्व त्यांनी दाखवून दिलेले आहे. आता अशा प्रकारचा जन्म आपण घेतला आहे याबाबत कोणाला वाईट वाटत नाही. खुलेपणाने ते स्वीकारत आहेत. त्यांच्यावर चांगले चित्रपटही निघत आहेत. शुभमंगल जादा सावधान मधून त्यांनी याबाबत चांगली भूमिका घेतली होती. कार्पोरेट जगतात, आयटी क्षेत्रात सर्वाधिक गे कल्चर पहायला मिळते. त्यामुळे वाढती संख्या पाहता या लोकांना राष्ट्रवादीने मुक्त व्यासपीठ देण्याचे धाडस दाखवले आहे, त्याचे कौतुक करावे लागेल.

बुलंदी अभिनेता राज कुमार

   हिंंदी चित्रपटसृष्टीत अनेक स्टार, सुपरस्टार झाले पण केवळ दमदार संवादफेकीच्या शैलीवर प्रेक्षकांचे हृदय जिंकणारे डॉयलॉगचे बेताज बादशहा अभिनेते म्हणजे राजकुमार. या बुलंदी अभिनेत्याचा आज जन्मदिवस.

8 ऑक्टोबर 1926 ला बलुचिस्तानात जन्म झालेले कुलभूषण पंडीत आपले पदवी शिक्षण पूर्ण करून मुंबईच्या माहिम पोलिस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर म्हणून काम करु लागले. एकेदिवशी रात्री गस्त घालत असताना एका शिपायाने त्यांना सांगितले की, तुमचे व्यक्तिमत्व एका हिरोपेक्षा कमी नाही. तुम्ही जर चित्रपटातून हिरो म्हणून काम कराल तर प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य कराल. मग काय कुलभूषण यांनी ही गोष्ट मनावर घेतली. माहीम पोलीस स्टेशनला नेहमीच चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकांचे येणेजाणे सुरु असायचे.
    असेच एकदा निर्माते बलदेव दुबे काही महत्त्वाच्या कामाने पोलीस स्टेशनला आले आणि त्यांना कुलभूषण यांच्या बोलण्याची शैली फारच आवडली. त्यांनी लगेचच त्यांच्या ‘शाहीबाजार’ या चित्रपटात काम करण्यासाठी कुलभूषण यांना विचारले. शिपायाने सांगितलेली गोष्ट मनात घोळत असतानाच संधी चालून आली होती. त्यामुळे आपल्या इन्स्पेक्टरच्या नोकरीचा राजीनामा देवून कुलभूषण यांनी चित्रपटसृष्टीत जाण्याचा निर्णय घेतला. पण शाहीबाजारच्या चित्रीकरणासाठी खूपच वेळ लागत होता.
    त्यादरम्यान मुंबईत राहण्याचा खर्च भागविणे कठीण झाल्याने कुलभूषण यांनी 1952 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगिली’ या चित्रपटात छोटीसी भूमिका स्वीकारली. पण हा चित्रपट कधी चित्रपटगृहात लागला आणि कधी गायब झाला हे लक्षातच आले नाही. त्याचदरम्यान शाहीबाजार पण प्रदर्शित झाला पण तो ही बॉक्सऑफिसवर सपाटून आपटला. या अपयशानंतर कुलभूषण यांना त्यांचे नातेवाईक व मित्रांनी चित्रपटसृष्टी सोडण्यासाठी आग्रह करायला सुरुवात केली. काही लोकांनी तर नायकाऐवजी खलनायक करण्याची सूचनाही कुलभूषण यांना दिली. मात्र जिद्द कायम ठेवून 1952 ते 1957 पर्यंत कुलभूषण चित्रपटसृष्टीत यश मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते. या दरम्यान त्यांनी अनमोल, सहारा, अवसर, घमंड, निलमणी और कृष्ण सुदामा या चित्रपटातून कामे केली, पण यापैकी एकही चित्रपट यशस्वी होवू शकला नाही.
   ंंमहबूब खान यांच्या 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या मदर इंडिया या चित्रपटात राजकुमार गावातील एका छोट्या शेतकर्याच्या भूमिकेत दिसले. पूर्ण चित्रपट नरगिस यांना केंद्रित ठेवून केलेला होता पण आपल्या छोट्याशा भूमिकेतील दमदार अभिनयाने राजकुमार यांना केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनेता म्हणून ख्याती मिळवून दिली. या चित्रपटाच्या यशानंतर एक अभिनेता म्हणून राजकुमार यांची यशस्वी कारकिर्द सुरु झाली.
  1959 मध्ये प्रदर्शित पैगाम या चित्रपटात त्यांच्यासमोर अभिनय सम्राट दिलीपकुमार होते पण राजकुमार यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर दर्शकांची वाहवा मिळविली. त्यानंतर लगेचच आलेल्या दिल अपना प्रित पराई, घराना, गोदान, दिल एक मंदिर, दूज का चांद या चित्रपटांच्या यशाने तर राजकुमार यांना अभिनयसम्राटाच्या पदावर पोहचवले. मदर इंडियातील छोट्याशा भूमिकेने सुरु झालेला हा यशस्वी प्रवास अव्याहतपणे सुरु राहिला.
   1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या काजल या चित्रपटापासून राजकुमार एक सुपरस्टार अभिनेता म्हणून आपल्या अभिनयाचा वेगळा पैलू दाखविण्यात यशस्वी ठरले. याचवर्षी आलेल्या बी.आर.चोपडांच्या वक्त या चित्रपटात आपल्या संवादफेकीने राजकुमार लक्षात राहिले. त्यांचा या चित्रपटातील ‘चिनायसेठ जिनके घर शीशेके बने होते है, वो दुसरों पे पत्थर नही फेका करते’ तसेच ‘चिनायसेठ ये छुपी बच्चों के खेलने की चीज नही. हाथ कट जाये तो खून निकल आता है’ हे संवाद लोकप्रिय होण्यासोबत त्यांना डॉयलॉगकिंग ही पदवी प्रेक्षकांनी बहाल केली.
    या चित्रपटानंतर राजकुमार चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च स्थानी पोहचले. या ठिकाणी पोहचल्यानंतर बहुतेक अभिनेते एका ठराविक इमेजमध्ये बांधले जातात आणि त्याच त्या भूमिका स्वीकारतात. मात्र राजकुमार याला अपवाद होते. यानंतर आलेल्या हमराज (1967), नीलकमल (1968), मेरे हुजूर (1968), हीररांझा (1970), पाकीजा (1971) या चित्रपटांतून त्यांनी त्यांच्या इमेजला साजेशा नसलेल्या भूमिका केल्या. तरीही या प्रयोगात राजकुमार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. पाकिजा हा चित्रपट पूर्णतः मीनाकुमारी यांच्यावर केंद्रित असलेला चित्रपट होता पण आपल्या सशक्त अभिनय आणि संवादफेकीने राजकुमार इथेही सरस ठरले.        ‘आपके पांव देखे बहुत हसीन हैं, इन्हे जमीन पर मत उतारियेगा, मैले हो जायेंगे’ हा संवाद एवढा लोकप्रिय झाला की, बर्याच अभिनेता, कॉमेडियननी त्या संवादशैलीची कॉपी केलेली दिसून येते.
  1978 मध्ये आलेल्या कर्मयोगी चित्रपटातून राजकुमार यांच्या अभिनयातील विविधतेचा एक वेगळा आयाम प्रेक्षकांना पाहायला मिळाला. यात त्यांनी केलेल्या दुहेरी भूमिकांमधून त्यांनी चरित्र भूमिकांकडे जाणारा आपला अभिनयाचा प्रवास विविधतेने नटलेल्या अनोख्या भूमिकांकडे वळवला. तरीही 1980 मध्ये बुलंदी चित्रपटात चरित्र भूमिका करण्याचे धाडस त्यांनी केलेच. यानंतर कुदरत (1981), धर्मकांटा (1982), शरारा (1984), राजतिलक (1984), एक नयी पहेली (1984), मरते दम तक (1987,), सूर्या (1989), जंगबाज (1989), पुलिस पब्लिक (1990) या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटातून राजकुमार यांचे चित्रपटसृष्टीतील राज्य अधिक विस्तारीत केले.
   1991 मध्ये आलेला सौदागर या चित्रपटात राजकुमार यांच्या अभिनयाचा वेगळा आयाम प्रेक्षकांना पाहावयास मिळाला. शोमॅन सुभाष घई निर्मित या चित्रपटात 1959 च्या पैगाम चित्रपटानंतर प्रथमच दिलीपकुमार व राजकुमार हे दोन्ही महारथी एकमेकांसमोर उभे होते. 90 च्या दशकात राजकुमार यांनी चित्रपटातून काम करणे कमी केले. तरीही तिरंगा (1992), पुलिस और मुजरिम, इंसानियत के देवता (1993), बेताज बादशहा (1994), जवाब (1995), गॉड और गन हे त्यांचे चित्रपट प्रदर्शित झाले. एकांतवासात राहणार्या राजकुमार यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती. कायम आपल्या वेगळेपणाने चर्चेत राहिलेल्या राजकुमार यांनी आपला मुलगा पुरु राजकुमारकडे व्यक्त केलेली अखेरची इच्छा होती ‘मौत और जिंदगी इंसान का निजी मामला होता है। मेरी मौत के बारे में मेरे मित्र चेतन आनंद के अलावा और किसी को नही बताना। मेरा अंतिम संस्कार करने के बाद ही फिल्मउद्योग को सूचित करना।’
  त्याप्रमाणे 3 जुलै 1996 ला अलविदा म्हणणारे डॉयलॉगकिंग राजकुमार आजही प्रेक्षकांच्या मनात आपल्या अनोख्या संवादशैलीने जिवंत आहेत. अनेक जाहीरातींसाठी, मिमिक्रीमध्ये राजकुमार यांची नक्कल केल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होत नाही, हेच त्या बुलंदी अभिनेत्याचे वैशिष्ठ्य होते.

डोळस संगिताचे इंजिनीयर रवींद्र जैन

रवींद्र जैन हे वेगळ्या शैलीचे संगीतकार होते. त्यांची आज 9 ऑक्टोबरला पुण्यतिथी. अलीगडच्या औष्णिक ऊर्जा केंद्रात अभियंता असलेले असलेले आयुर्वेदाचार्य पंडित इंद्रमणी जैन आणि किरण जैन, हे रवींद्र जैन यांचे आईवडील होते. अंध म्हणून जन्माला आलेल्या रवींद्र जैन यांना लहानपणापासून संगीताचा एक वेगळाच ’कान’ होता. दृष्टी नसतानाही त्यांनी संगीतातून एकाग ्रहोउन जी सप्तरंगी दुनिया पाहिली ती डोळस लोकांनाही दिसेल की नाही शंका आहे. त्या रंगीत सृष्टीचे ते डोळस अभियंता म्हणजे इंजिनीअर होते. वडिल इंजिनीअर असले तरी अंधपणाने रवींद्र जैन यांनी संगीताच्या सप्तसूरांची जी रचना केली होती ती अद्वितीय आणि अजरामर अशी आहे. त्यामुळे डोळस संगिताचे ते अभियंताच होते.

   जैन मंदिरांमध्ये ते लहानपणी भजन गात असत. त्यांची संगीतातील रुची पाहून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना संगीताचे शिक्षण देण्यासाठी पंडित जनार्दन शर्मा आणि पंडित नथू राम यांच्याकडे पाठवले.
   ऑल इंडिया रेडिओ’साठी रेकॉर्डिंग करत असताना जैन यांची राधेश्याम झुनझुनवाला यांच्याशी ओळख झाली व त्यांनी जैन यांना मुंबईत आणले. मुंबईत आल्यावर जैन यांनी मोठमोठ्या निर्मात्यांसोबत काम करायला सुरुवात केली. 1972 मध्ये जैन यांनी संगीतकार म्हणून आपल्या करिअरला ’काँच और हिरा’ या चित्रपटाद्वारे सुरुवात केली. महंमद रफी यांच्या आवाजात त्यांनी आपले पहिले गाणे संगीतबद्ध केले होते. मात्र, ते गाणे रिलीज झाले नव्हते.
  1970च्या दशकामध्ये रवींद्र जैन यांनी त्यांनी संगीत दिलेले चित्रपट गाजले. विशेषत: राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून त्यांची ओळख होती. राज कपूर यांनी ’राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाद्वारे त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणले. रवींद्र जैन यांनी हिंदीप्रमाणेच गुजराथी, पंजाबी, बंगाली, भोजपुरी, मल्याळी, तेलुगू, राजस्थानी अशा विविध भाषांतील एकूण सुमारे 150 चित्रपटांना संगीत दिले.
   प्रत्येक संगीतकाराला सतत नव्या आवाजाचाही शोध असतो. जैन यांना असा एक आवाज सापडला आणि त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत एक नवी खुमारी अवतरली. येसूदास यांच्यासारख्या दक्षिणी चित्रपटातील लोकप्रिय गायकाला त्यांनी हिंदी चित्रपटाच्या दुनियेत आणले. इतके की त्या काळात स्ट्रेपसिलच्या जाहीरातीसाठी येसुदास यांना संधी मिळाली त्यात रविंद्र जैन यांच्या गाण्याचा वापर केला होता.
रवींद्र जैन यांचे भक्ति संगीताचे काही आल्बम आहेत. मॉर्निंग सन’ हा त्यांचा आल्बम विशेष प्रसिद्ध आहे. पण आत्ता लॉकडाउनच्या काळात नव्या पिढीला त्यांची पुन्हा एकदा ओळख झाली ती रामायण या रामानंद सागर यांच्या मालिकेमुळे. अत्यंत भक्तीभावपूर्ण वातावरणात रविंद्र जैन यांनी रामायणाचे संगीत घराघरात पोहोचवले होते. त्यांचा आवाज लोकांच्या कायम लक्षात राहिला.
  आँखियोंके झरोके से, एक विवाह ऐसा भी था, काँच और हीरा, गीत गाता चल, चितचोर, चोर मचाये शोर, तपस्या,
दुल्हन वही जो पिया मन भाये, दो जासूस, नदियाँ के पार,
पति, पत्नी और वो, फकिरा या 1970 च्या दशकातील हलक्या फुलक्या पण गाजलेल्या चित्रपटातील त्यांची गाणी श्रवणीय अशी होती.
  त्यानंतर 1986 मध्ये राजकपूर यांनी राम तेरी गंगा मैली या चित्रपटासाठी रवींद्र जैन यांना संधी दिली आणि त्या संधीचे सोने त्यांनी करून दाखवले. ग्रेट शोमन राजकपूरने संधी दिल्याने दुसेर शोमन सुभाष घई यांनीही आपल्या चित्रपटातील पुढील काळात त्यांना संधी दिली. विवाह, सौदागर, हीना या सर्वच चित्रपटातील गाणी सुपरहिट ठरली.            1990 च्या दशकात सर्वदूर टिव्ही पोहोचल्यावर वाहिन्यांवरील विविध मालिकांना त्यांनी संगीत दिले. यात रामानंद सागर यांच्या रामायण आणि श्रीकृष्ण या दोन मालिकांचे त्यांचे संगीत चांगलेच गाजले. त्याशिवाय अलीफ लैला, इतिहास की प्रेरम कहानियाँ, जय गंगा मैय्या, राजा हरिश्चंद्र, साई बाबा यातील भजने आणि गीते ही कथानके पुढे सरकरवण्यास अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी करताना दिसतात.
  चित्रपटातील त्यांच्या गाजलेल्या गाण्यांमध्ये अखियोंके झरोके से, आज से पहले आज से जादा, गंगासागर, गीत गाता चल, गोपालकृष्ण याशिवाय गोरी तेरा गाँव बडा प्यारा (चित्रपट -चितचोर), जब दीप जले आना (राग यमन, चित्रपट -चितचोर), ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिये (चित्रपट - पति पत्नी और वो), तू जो मेरे सुरमें (चित्रपट -चितचोर) ही गाणी लोकांच्या कायम ओठांवर येणारी आहेत. तसेच तेरा मेरा साथ रहे (चित्रपट - सौदागर), दिल में तुझे बिठाकर (फकिरा), मेघा ओ रे मेघा (चित्रपट - सुनयना), मैं वही दर्पण वही (चित्रपट - गीत गाता चल), मैं हूँ खुशरंग (चित्रपट - हीना), राम तेरी गंगा मैली (चित्रपट राम तेरी गंगा मैली), ले जायेंगे ले जायेंगे, श्याम तेरी बन्सी पुकारे नाम (चित्रपट - गीत गाता चल), सजना है मुझे सजना के लिये (चित्रपट - सौदागर), सुन साहिबा सुन (चित्रपट - राम तेरी गंगा मैली), हर हर गंगे  ही गाणी कायम मनावर रेंगाळणारी अशीच आहेत.
     रवींद्र जैन यांना 1985 मध्ये ’राम तेरी गंगा मैली’ चित्रपटासाठी जैन यांना सर्वोत्कृष्ट संगीतकारासाठीच्या फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 2003 मध्ये मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्कार देऊन जैन यांचा गौरव केला होता. महाराष्ट्र सरकारनेही जैन यांचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर हा पुरस्कार देऊन यथोचित गौरव केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमीर खुस्रो पुरस्कारानेही जैन यांना गौरवले होते. 2015 सालचा पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाला होता.
  पं. हृदयनाथ मंगेशकर आपल्या भावसरगम या गाण्याच्या कार्यक्रमात निवेदन करताना रवींद्र जैन आणि रेखा यांचा एक विनोदी किस्सा नेहमी सांगत. त्याला रसिकही चांगली खळखळून दाद द्यायचे. अशा या जग न पाहणार्‍या संगीतकाराने आपल्या अंध डोळ्यांनी जे संगीतचे सूर आणि रंग पाहिले होते ते अत्यंत स्वर्गीय होते.
 

चिरतारूण्याचे वरदान लाभलेली रेखा

   काही सौदर्य अशी असतात की ती जसजसे वय झाले तसे अधिकाअधिक सुंदर दिसत जातात. याला चिरतारुण्याचे वरदान लाभलेले सौंदर्य असे म्हटले जाते. असेच वरदान लाभलेली अभिनेत्री म्हणजे रेखा. आजोबा, बाबा आणि मुलगा अशा तिघांनाही वेड लावेल, आकर्षण वाटेल आणि प्रेमात पडायला लावेल असे तिचे वाढत्या वयाबरोबर वाढत जाणारे सौदर्य. या चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यावर तीला कोणी सुंदर आहे असे म्हणण्याचे धाडस करत नव्हते. कारण तो काळ वहिदा, शर्मिला टागोर, हेमा मालिनी अशा असंख्य तारकांनी गाजवलेला होता. या सौंदर्यवतींमधून आपली उत्तम अभिनेत्री, उत्तम तारका, उत्तम सुंदर तारका अशी उत्तरोत्तर प्रगती करत रेखा मोठी झाली. वाढत्या वयाबरोबर वाढता आत्मविश्वास हेच तिच्या सौंदर्याचे बलस्थान होते, आहे.

    रेखा हे चित्रपटसृष्टीतील नाव असले तरी तिचे खरे नाव भानुरेखा जेमिनी गणेशन आहे. आज तिचा जन्मदिवस. भानुरेखा गणेशन ऊर्फ रेखा ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे असे नाही तर आत्मविश्वासाच्या जोरावर सर्व कसे प्राप्त करता येते, उपेक्षितांचे आयुष्य वाट्याला आले तर आपण आकर्षणाचा केंद्रबिंदू कसे रहावे हे तीच्या जीवनरेखेवरून जाणवते.
   रेखाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका केल्या. एक काळ असा होता की रेखा करेल ते सबकुछ. त्यामुळेच 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या ’फटाकडी’ या मराठी चित्रपटामध्ये ’कुठं कुठं जायाचं हनिमुनला..’ या लावणीवर तिने केलेले नृत्य प्रचंड गाजले. तीची दखल सरकारलाही घ्यावी लागली, त्यामुळे राष्ट्रपतींच्या विशेष अधिकाराने मे 2012 मध्ये तिची राज्यसभेवर नेमणूक झाली.
    रेखाचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 साली चेन्नईत झाला. तिचे वडील जेमिनी गणेशन तमिळ अभिनेते होते आणि आई पुष्पावली तेलुगू अभिनेत्री होती. मोहन सैगल यांना त्यांच्या नव्या चित्रपटासाठी नव्या मुलीची जरूर होती. धीरेंद्र महाजनने रेखाचा मोहन सैगल यांच्याशी ओळख करून दिली. त्यांनी विचारले, ’तुला हिंदी बोलता येते?, तुला नाच येतो? ’ अशा प्रकारच्या सर्वच प्रश्नांची उत्तर रेखाने नकाराने दिली. रेखाच्या आईला चिंता वाटू लागली, तिने मोहन सैगलना म्हठले, की ’हिची स्क्रीन टेस्ट घ्या’. ते म्हणाले ’काही गरज नाही, ही मुलगी माझ्या आगामी चित्रपटत काम करेल.’
  ’सच है’च्या सेटवरती तेच झाले, पुण्याच्या फिल्म इन्टिट्यूटमधून अभिनय शिकून आलेला चित्रपटाचा नायक नवीन निश्चल म्हणाला, ’ही काळी मद्रासीण’ कुठून पकडून आणली?’ पण जेव्हा सिनेमा प्रदर्शित झाला, तेव्हा एकच हंगामा झाला. नवीन निश्चल हे जीतेंद्रसारखे उछल-उछल करून नाचण्याचा प्रयत्न करीत असताना या ’काळ्या मद्रासिणी’करिता गीत गात होते. ’कान में झुमका, चाल में ठुमका, लगे पचासी झटके, हो तेरा रंग है नशीला, अंग-अंग है नशीला. सिनेमागृहात प्रेक्षकांनी पडद्यावर नाणी फेकून या ’काळ्या मद्रासिणीचे स्वागत केले. आणि ’सच है’ बॉक्स ऑफीसवर यशस्वी झाला.
  त्यानंतर पुढच्याच वर्षी, 1971 साली, रेखाला तीन चित्रपट मिळाले, विनोद मेहराबरोबरचा ’एलान’, संजय खानबरोबरचा ’हसीनों के देवता’ आणि प्रेमेंद्रबरोबरचा ’साज और सनम’. 1972मध्ये ही संख्या पाच झाली, आणि तीही बड्या अभिनेत्यांबरोबर. गोरा और काला, गाँव हमारा शहर तुम्हारा (दोन्हींचे नायक - राजेंद्रकुमार), एक बेचारा (नायक - जीतेंद्र), रामपुर का लक्ष्मण (नायक - रणधीर कपूर) आणि जमीन आसमान (नायक - सुनील दत्त).
  1973 या वर्षी रेखाचे नऊ चित्रपट प्रदर्शित झाले. बहुतेक यशस्वी ठरले. बड्या हिरोंसह हृषीकेश मुखर्जींसारख्या बड्या दिग्दर्शकांबरोबरही रेखाला कामे मिळू लागली.
  1966 पासून तिने सिनेमात काम करायला सुरावात केली. रंगूला रत्नम नावाच्या तेलुगू सिनेमात तिने बालकलाकाराची भूमिका केली. 1970 मध्ये सावन भादों या चित्रपटापासून तिने मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली. रेखा यांनी हिंदीसोबतच तामिळ, तेलगू आणि कानडी भाषेत 180 हून अधिक सिनेमामंध्ये काम केले आहे. त्यांना चित्रपट क्षेत्रात अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.
  ‘खूबसूरत, खून भरी मांग, खिलाडियों का खिलाडी, उत्सव, मुकद्दर का सिकंदर आणि उमराव जान’ या चित्रपटांमधील रेखाच्या भूमिका विशेष गाजल्या.
  रेखाचे नाव समोर आले की अमिताभ बच्चन यांचे नाव येते. दोघांचे मधुर संबंध होते अशीही चर्चा होती. पण रेखानेे ज्या कोणाबरोबर काम केले त्या प्रत्येकाबरोबर तिने मनापासून काम करून आपले अस्तित्व दाखवून दिले. अमिताभ रेखा पेक्षाही जितेंद्र रेखा ही जोडी रूपेरी पडद्यावर गाजली होती. म्हणजे पद्मालयाचे जितेंद्रपट येण्यापूर्वी श्रीदेवी, जयाप्रदा यांच्याऐवजी रेखा, मोसमी, रिना रॉय असेच समीकरण होत होते. रेखाचे नंतरच्या काळातले चित्रपट हे अक्षरश: रेखापट होते. त्यात हिरो दुय्यम होत होता. खूबसुरत, झूटी, उत्सव, उमराव जान , अ‍ॅग्रीमेंट, कामसूत्र अ टेल ऑफ लव्ह हे खास रेखासाठी तयार केलेले चित्रपट होते.
   रेखाच्या चित्रपटांमध्ये अगर तुम ना होतेे,अनोखी अदा,
आक्रमण, आँचल,आप की खातिर, आलाप, इमान धरम,
एकही भूल, कर्तव्य, कलयुग, कश्मकश, कहानी किस्मत की,
काली घटा, खून पसीना, गंगा की सौगंध, गोरा और काला, घर हे चित्रपट तुफान गाजले होते. रेखा अमिताभ ही पडद्यावरची सुपरहिट जोडी 80 च्या दशकात असली तरी रेखाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. सुपरस्टारबरोबर पिंगा घालणारी अभिनेत्री अशी ओळख पुसून टाकण्यात तिने अखेरच्या टप्प्यात यश मिळवले होते. आपल्या श्वासांचा संवादफेक करताना कसा वापर करायचा याची तीची स्टाईल कायम लक्षात राहणारी अशीच आहे. समोर कोण कलाकार आहे याचा विचार न करता झोकून देउन काम करण्याचे तिने आयुष्यभर तंत्र सांभाळले. त्यामुळेच काम करताना नवा अनुभव आणि आत्मविश्वास याने ती उत्तरोत्तरही अधिक सुंदर होत गेली. म्हणजे पहिल्या चित्रपटात नवीन निश्चलसमोर काळी वाटणारी रेखा उत्तरोत्तर उजळत गेली आणि तीने संपूर्ण रूपेरी पडदाच उजळून टाकला. अगदी भल्याभल्यांना हेवा वाटेल असा चिरतारुण्याचा आशीर्वाद तिला प्राप्त झाला. आज सत्तरीच्या दिशेने प्रवास करणारी रेखाही तितकीच तरूण आहे.

छोरा गंगाकिनारेवाला....ते बंबईका बाबू

    ‘अमिताभ बच्चन’ या सर्व वयाच्या प्रेक्षकांना भुरळ घालणार्‍या  जादुई अक्षरांनी गेली 50 पेक्षा जास्त वर्षे भारतीय चित्रपट रसिकांच्याहृदयावर राज्य केले आहे. काळ पुढे सरकतो आहे तसे दिवसेंदिवस हे भावबंध अधिकच घट्ट होत आहेत.अमिताभ यांचा आज वाढदिवस. अनेक लोक या दिवसाची वाट पहात असतात. शहरी भागात आनंद असतोच पण कोल्हापूर, सोलापूर या भागातही या महानायकाचा वाढदिवस गेली अनेक वर्ष रसिक साजरा करत असतात. तो कशाप्रकारे साजरा केला याबाबत सांगत असतात. अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी मुंबईत गर्दी होते. यावर्षी कोरोनामुळे त्यावर बंधने येतील. पण मुंबई बाहेरच्या लोकांच्या भावनाही त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात असे अनेकांना कायम वाटत असते. याचे कारण आयुष्यातील चढउतारांचा जो आलेख अमिताभ बच्चन यांनी पाहिला आहे आणि आपले नाव मोठे केले आहे ते सर्वच त्याच्या उंचीप्रमाणेच अद्वितिय असे आहे.

   अमिताभ बच्चन म्हणजे भारतीय सिनेमाच्या वैभवशाली इतिहासातील सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक. चार दशकांहून अधिकच्या कारकीर्दीत विविध भाषांतील जवळपास दोनशे चित्रपटात काम करणारा हा महानायक. बॉलिवूडचा शहेनशहा, महानायक, अँग्री यंग मॅन, स्टार ऑफ द मिलेनियम, बिग बी अशी अनेक विशेषणं त्याला जोडली जातात. अभिनयासोबतच पार्श्वगायक, चित्रपटनिर्मिती आणि टीव्हीवरील कार्यक्रमाचे पथदर्शक सूत्रधार.
   आजच्याच दिवशी बच्चन यांचा जन्म अलाहाबादला झाला. छोरा गंगाकिनारेवाला हे नाव तेंव्हाच त्याला चिकटले. त्यांचे वडील डॉ. हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील सुप्रसिद्ध कवी होते. त्यांच्या आई तेजी बच्चन या मूळच्या फैसलाबादमधील शीख होत्या. अमिताभ यांच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी बच्चन या टोपणनावाने ते कविता प्रसिद्ध करायचे. सिनेसृष्टीत प्रवेश करताना अमिताभ यांनीसुद्धा हेच टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली. पुढे संपूर्ण कुटुंबाचेच ‘बच्चन’आडनाव व्यवहारात रूढ झाले.
   ऐन विशीत कोलकात्यातील एका जहाजवाहतूक कंपनीतील एजंटची नोकरी सोडून अमिताभ यांनी अभिनयात कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला. उंचपुरा बांधा आणि दमदार आवाज ही पुढे या सुपरस्टारची वैशिष्ट्ये बनली. परंतु, सुरुवातीला यामुळेच त्यांची हेटाळणी झाली होती.
    के. ए. अब्बास यांच्या ‘सात हिंदुस्तानी’ (1969) या चित्रपटापासून अभिनयाची सुरुवात झाली. सुरुवातीच्या अपयशानंतर ‘जंजीर’पासून यशाची घौडदोड सुरू झाली आणि पुढे यशस्वी चित्रपटांची प्रदीर्घ मालिकाच जन्माला आली. त्यातूनच स्टार, सुपरस्टार आणि स्टार ऑफ द सेंच्युरी अशी विशेषणे लागत गेली.
      1982 चा तो काळ होता. अडतीस वर्ष त्या घटनेला लोटली. तरी आजही ती घटना सर्वांना आठवते. ‘कुली’च्या सेटवर अमिताभ यांना झालेल्या अपघातानंतर ते अक्षरशः जिवावरच्या संकटातून बचावले. त्यावेळी ते बरे व्हावे म्हणून देशभरातीलच नाही तर जगभरातील चाहत्यांनाही प्रार्थना केल्या होत्या. तब्येतीत सुधारणा झाल्यावर अमिताभ यांनी जुहूच्या त्यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या खिडकीतून चाहत्यांना रोज दर्शन देणे सुरू केले. अजूनही ही रीत कायम आहे. अर्थात गेल्या काही वर्षांपासून हे ‘दर्शन’ महिन्यातील एका रविवारपुरते मर्यादित झाले आहे. पण कोरोनामुळे यालाही बंधन आले.
    सत्तरच्याच दशकात सिनेमांसोबतच अमिताभ आणि अभिनेत्री रेखा यांच्या जवळीकीबद्दल खूप चर्चा झाल्या. यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचेही सांगितले गेले. अभिनेत्री परवीन बाबीसोबतच्या त्यांच्या मैत्रीचीही अशीच चर्चा झाली. तशीच चर्चा स्मीता पाटील यांच्या बाबतही झाली होती. कारण ते आजरपट जाये ते हे पावसातील नमक हलाल मधील गाणे. स्मीता पाटील बरोबर खरं तर शक्ती आणि नमक हलाल हे दोनच चित्रपट. पण शराबी चित्रपटात एका गाण्यासाठी तिला आणली आणि या चर्चा सुरू झाल्या. कालांतराने सगळे काही स्थिरस्थावर झाले तरी आजही रेखा आणि अमिताभ एखाद्या कार्यक्रमात एकत्र किंवा समोरासमोर आले तर चर्चा होतात. जया बच्चनच्या चेहर्‍यावरील भाव टिपले जातात. रेखाही अमिताभ बच्चन या विषयावर बोलण्याची संधी सोडत नाही. या सत्यघटनेवरूनच सिलसिला चित्रपटाची निर्मिती झाली अशी आख्ययिका सांगून हा चित्रपट चालवला गेला होता.
   अमिताभ बच्चन कार्पोरेशन लिमिटेड या संस्थेद्वारे आणि स्वतंत्रपणेही त्यांनी चित्रपटांची निर्मिती केली. त्यात तेरे मेरे सपने, मृत्युदंड, उल्लासम, सात रंग के सपने, मेजरसाब, अक्स, विरुद्ध, अंतरमहाल, फॅमिली, पा, विहीर, बुढ्ढा होगा तेरा बाप, सप्तपदी, शमिताभ या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली.

    अमिताभ यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. सन 1984 मध्ये मित्र राजीव गांधी यांना मदत करण्यासाठी त्यांनी राजकारणात पाऊल टाकले. अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून त्यांनी हेमवतीनंदन बहुगुणा यांचा पराभव करून खासदार म्हणून लोकसभेत प्रवेश केला. मात्र, बोफोर्स प्रकरणात त्यांचे नाव समोर आले. त्यानंतर सिनेमेही फ्लॉप होऊ लागले. इतकेच नव्हे तर ‘एबीसीएल’ या त्यांच्या निर्मिती कंपनीला प्रचंड नुकसान झाल्याने गाशा गुंडाळायला लागला होता. एकूणच आर्थिक परिस्थिती खालावत चालली होती. अशावेळी ‘कौन बनेगा करोडपती’च्या रूपात बिग बींनी फिनिक्ससारखी भरारी घेतली. केबीसीच्या पहिल्याच भागापासून प्रेक्षकांची मने जिंकली. हिंदी भाषेवरचे प्रभुत्व, सहभागींशी बोलण्याची शैली, संवाद साधण्याची कला यामुळे ते एकमेवाद्वितीय ठरले. ‘हॉट सीट’च्या माध्यमातून त्यांनी अनेकांना लखोपती-करोडपती बनवले.
  अमिताभ यांची कारकीर्द विविध प्रवृत्तीच्या आणि प्रकृतीच्या दिग्दर्शकांनी, लेखकांनी घडवली. त्यात मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, हृषिकेश मुखर्जी, रमेश सिप्पी, यश चोप्रा, रमेश बहल या दिग्दर्शकांचा तसेच सलीम-जावेद, कादर खान, प्रयाग राज या लेखकांचा यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता.
   अमिताभ बच्चन यांचा उदय होण्याआधी चित्रपटांमध्ये नायकाच्या जोडीला एक विनोदी अभिनेता असे. अमिताभ यांना स्वतःलाच विनोदाची जबरदस्त जाण असल्याने आणि ‘अमर अकबर अँन्थनी’ मध्ये आरशासमोर त्यांनी केलेल्या धमाल प्रसंगानंतर त्यांना वारंवार विनोदी प्रसंग दिले जाऊ लागले व त्यांच्या चित्रपटांमधून विनोदी अभिनेते दिसणे कमी झाले. शशी कपूर, विनोद खन्ना यांच्यासोबत त्यांची जमलेली जोडी व त्यांनी एकत्र केलेले चित्रपट हाही चर्चेचा विषय असे.
  अमिताभने असंख्य डायलॉग अजरामर केले. जाहीरातीच्या माध्यमातून आजही ते वापरले जातात. पण परफेक्ट टायमिंक साधत केलेले एखादे वाक्यही कधीकधी लक्षात राहणारे असते. त्यामध्ये, तुम्हारा नाम क्या है बसंती? (शोले),
्र आगर अपनी माँ का दूध पिया है तो सामने आ (लावारिस), डॉन को पकडना मुश्किलही नही नामुमकिन आहे (डॉन), मुंछे हो तो नथुलाल जैसी, वरना ना हो (शराबी), रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहेनशहा (शहेनशहा) हे लोकांच्या ओठांवरचे डायलॉग आहेत.
्र     मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठता (दीवार) यातून दिसणारी अँग्री यंग मॅनची आग, हम जहाँ खडे हो जाते हैं, लाइन वहीसे शुरू होती हैं (कालिया) यातील पेटलेली मशाल  कधीकधी इतकी सहज होते की मनात राग असूनही ती शांत असते. ते म्हणजे, प्यार ही तो वो जादू है जो उमरभर जवान बनाये रखता है (बागबान) हे त्या अभिनयाचे टोक असते.
्र इन्सान का इमोशन उसका मोशन के साथ जुडा हुआ है (पिकू), नो मीन्स नो (पिंक) हे त्याचे डायलॉग कायम लक्षात राहणारे आहेत.
 सुरवातीला अमिताभवर तत्कालीन माध्यमे आणि दिलीपकुमारच्या शौकीनांती प्रचंड टीका केली होती. लंबूटांग्या म्हणजे उंच पायांचा असल्याने अमिताभ यांना नाचता येत नाही, त्यात एक प्रकारचे अवघडलेपण असते असे सुरुवातीला म्हटले गेले. पुढे अमिताभ यांनी भगवानदादांच्या नृत्यावरून प्रेरित होऊन स्वतःची एक विशिष्ट शैली विकसित केली. कंबर हलवित हातांच्या लयबद्ध हालचालींमधून ती साकारली होती. सुहाग, डॉन, मिस्टर नटवरलाल, नमक हलाल आदी अनेक चित्रपटांमधून ती दिसली.
 अनेक पुरस्काराने सत्मानित बीग बी गेल्याच वर्षी सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित झाले. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ज्ञात अज्ञात आणि ज्यांना आपल्या भावना बीग बींपर्यंत पोहोचवायची इच्छा आहे त्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा

लोहियांच्या मनातील समाजवाद

  काही लोक भूतकाळात रमतात. पूर्वी या देशात सोन्याचा धूर निघत होता असे सांगून त्या परंपरेच्या स्वप्नात जगतात. काही लोक वर्तमानातच जगतात, तर काही लोक काळाच्या पुढचा विचार करत असतात. त्यांना पुढचा काळ दिसत असतो. भविष्याचा विचार करणारे असे लोक फार महत्वाचे असतात. असेच एक व्य्क्तीमत्व म्हणजे राम मनोहर लोहिया.     राम मनोहर लोहियांना जाऊन आज त्रेपन्न वर्षे झाली. त्यावेळी लोहिया म्हणाले होते, की लोक माझे ऐकतील, पण मी निवर्तल्यानंतर. आज कोरोनासारख्या संकटानंतर अर्थव्यवस्थेची घडी विस्कटलेली असताना विषमता वाढताना दिसते आहे. सामाजिक आर्थिक दरी वाढत आहे. अशावेळी राम मनोहर लोहिया यांच्या विचारांनी समाजहिताचे निर्णय घेण्याची गरज आहे असे वाटते.

  लोहिया गेल्यानंतर देशातील लोकांनी त्यांच्या काही गोष्टी नक्कीच ऐकल्या, पण नंतर समाजवादाच्या नावावर जातीयवादाला वळण दिले गेले. राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पार्टी हे लोक आम्ही राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचे आहोत असे भासवत असले तरी ते तितकेसे म्हणजे अजिबातच खरे नाही. आजच्या युवापिढीने या संघर्षमय परिस्थितीत राम मनोहर लोहिया याचे विचार जाणून घेण्याची गरज आहे. आजची युवा पिढी लोहियांच्या विचारांपासून दूर आहे. अर्थात लोहियांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा कोणीच प्रयत्न केला नाही. त्यामुळे फक्त एका वाक्यात राम मनोहर लोहिया हे समाजवादी नेते होते असे कोणी सांगीतले तर आजचे लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव, आबू आझमी या लोकांचा समाजवाद म्हणजे जातीयतेवर आधारीत समाजवाद समोर येतो आणि अशा विचारांचे राम मनोहर लोहिया होते का असा प्रश्न नव्या पिढीला पडतो. म्हणूनच राम मनोहर लोहिया यांना अभिप्रेत असलेला समाजवाद युवापिढीला समजणे आवश्यक आहे. आरक्षणासाठी द्यावा लागणारा झगडा, संघर्ष, कोरोनामुळे निर्माण झालेली वाईट परिस्थिती यात या विचारांची गरज आहे. कारण राहुन राहुन या परिस्थितीत मला वाटते, की आता लोकांनी खरोखरच लोहियांचे ऐकण्याची वेळ आली आहे. युवापिढीने त्यांचे विचार अभ्यासले पाहिजेत.
राम मनोहर लोहिया हे विसाव्या शतकात जन्माला आले व निवर्तले, पण त्यांचे विचार एकविसाव्या शतकातही सुसंगतच आहेत. लोहियांचा खरा वारसा काय होता हे आकलन करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना ज्या चौकटीत आपण जखडले आहे त्यातून बाहेर काढले पाहिजे. यूपी बिहारच्या समाजवाद्यांचे लोहियांशी असलेले नाते म्हणजे काँग्रेसचे महात्मा गांधींशी आहे तसेच तकलादू आहे. म्हणूनच आज लोहिया जिवंत असते, तर समाजवादाच्या नावाखाली चाललेल्या भोंदूगिरीला त्यांनी विरोधच केला असता. त्यांना त्यांच्याच चेल्यांविरोधात धरणे आंदोलन करावे लागले असते.
  असं म्हणतात की, राम मनोहर लोहिया हे गैरकाँग्रेसीवादाचे प्रवर्तक होते. साठच्या दशकात आजच्या भाजपप्रमाणे मजबूत आणि अजेय असलेल्या काँग्रेसला पायउतार करण्यासाठी लोहियांनी विरोधकांच्या एकजुटीची मुहूर्तमेढ रोवली होती. म्हणूनच तशीच परिस्थिती निर्माण होत असेल तर आज लोहियांच्या विचारांची गरज आहे.  काहीजण लोहियांना मंडलवादाचे जनक म्हणून ओळखतात. पण प्रत्यक्षात तसे नव्हते. लोहियांचे समाजकारण, समाजवाद हा जाती आरक्षणाच्या बाहेरचा होता.  लोहिया हे स्वतंत्र भारतातील असे पहिले विचारवंत होते, ज्यांनी समाजातील जातीय विषमतेवर बोट ठेवले. लोहियांनी सार्वजनिक जीवनात प्रत्येक पक्षामध्ये पुढारलेल्या जातींच्या वर्चस्वाला विरोध केला होता व ‘पिछडा पावे सो में साठ’ ही गाजलेली घोषणा दिली; पण लोहियांच्या मतानुसार शूद्रांमध्ये दलित, आदिवासी, मागास जाती, अल्पसंख्याक व प्रत्येक जातीतील महिला यांचा समावेश होता. मागासांच्या आरक्षणाच्या नावाखाली काही जातींनी त्यावर केलेला कब्जा लोहियांना आवडणारा नव्हता. आरक्षणाने मागास जमातींना लाभ मिळाला पाहिजे व प्रत्येक जातीच्या स्त्रियांनाही आरक्षणाचा फायदा मिळावा, असे त्यांचे मत होते.
  त्या काळात ‘इंग्रजी हटाव’ अशी घोषणा लोहियांनी दिली होती. इंग्रजी ही परदेशी भाषा आहे म्हणून लोहियांनी तिचा विरोध केला नाही, या भाषेमुळे काही समाज एकमेकांची बरोबरी करू शकत नाहीत, काही वर्गाची मक्तेदारी वाढते, किंबहुना त्या भाषेचा त्यासाठी हत्यार म्हणून वापर केला जातो, असे लोहियांचे मत होते. हिंदी व इतर भारतीय भाषांचे लोहियांनी समर्थनच केले होते. खरं तर विसाव्या शतकातील प्रत्येक द्वंद्वात लोहियांनी एक तिसरी दिशा समाजाला दाखवली. लोहिया यांनी कुठल्या तरी आयत्या विचारसरणीचा किंवा कथित वादाचा पुरस्कार केला नाही, कुणा महापुरुषाची पूजा केली नाही, कुठल्या पुस्तकाला अंतिम प्रमाण मानले नाही. मार्क्सवाद असो की गांधीवाद पाश्चिमात्य ज्ञान असो की परंपरागत ज्ञान, कल्पित गोष्टी असो की अस्सल विज्ञान, लोहियांनी प्रत्येकातून काही तरी घेतले व प्रत्येकावर टीकाही केली. चांगले तेवढे घ्यावे, सगळे विचार समजून घेणे हा त्यांच्यातील समावादी नेत्याचा गुण होता.
 लोहियांच्या विचारांचा अभ्यास म्हणजे विसाव्या शतकातील दोन विचारसरणींतील सत्त्वग्रहण करण्यासारखे आहे. विसाव्या शतकातील पहिली विचारसरणी समतामूलक चिंतन ही होती. त्यातून साम्यवादी, समाजवादी, स्त्रीवादी व आंबेडकरवादी विचारसरणींना नवा आयाम दिला. दुसरी विचारधारा ही स्वदेशी विचाराची होती, ती गांधीवाद व सवरेदयी विचारातून अभिव्यक्त झाली. विसाव्या शतकात या दोन्ही विचारसरणी कमी-अधिक समांतर चालल्या. लोहियांच्या विचारात या दोन्ही विचारसरणींचा संगम होताना दिसतो. असमानतेविरोधात संघर्षांची त्यांची जिद्द व समाजातील समरसतेचा शोध, राष्ट्रवादाचे प्रबळ आव्हान व त्याच्या जोडीला सखोल आंतरराष्ट्रीयता, अहिंसेचा संकल्प, एकमेकांशी नाते असे अनेक पैलू त्यात आहेत. म्हणजेच सर्वच विचारसरणींच्या चांगल्या गुणांचा विचार त्यांचा होता. कधीही एककल्ली विचार त्यांनी केला नाही.
 आज देशात राष्ट्रवादाच्या नावाखाली उन्मादाचे वातावरण आहे. त्याचा विरोध करणारे देश निरपेक्ष असल्याचे दिसून येते. लोहिया यापेक्षा वेगळे होते, ते एकाच वेळी भारतमाता व धरतीमातेला नमन करतात. एकीकडे चीनच्या कुटिल हेतूंबाबत लोहियांनी नेहरूंना सावध केले, तर दुसरीकडे भारत-पाक महासंघाचे समर्थन केले होते. विश्व संसदेचे स्वप्न ते पाहत होते. अमेरिकेतील इतर वर्णीयांच्या मागे ते ठामपणे उभे राहतात. त्यामुळे अत्यंत व्यापक आणि  विशाल विचारसरणीचे ते नेते होते. लोहियांच्या मते भारतात इंग्रजी बोलणारा जो प्रशासक व शासक वर्ग आहे, तो नकली आहे, आधुनिक नाही. लोहियांनी एका प्रसिद्ध भाषणात देशी आधुनिकतावादावर विचार मांडले होते. ती आधुनिकता अशी होती, जी युरोपलाही साध्य करता आली नाही. म्हणूनच म्हणावे लागेल की ते काळाच्या पुढचा विचार करणारे होते. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनाही त्यांनी सत्य काय आहे हे समोर यावे यासाठी आव्हान दिले होते. दारिद्—यरेषेखालील नेमकी संख्या काय आहे यावरून अंजन घातले होते. त्या काळात काँग्रेसला विरोध करण्याची ताकद कोणाची नसताना त्यांनी हे काम केले होते. कारण ते समानता, समाजवाद यासाठी झटत होते. पण त्यांचे नेमके विचार लोकांपर्यंत जात नाहीत. त्याचे राजकीय विडंबन होताना दिसते. म्हणूनच त्यांचा विचार या विषमतेच्या परिस्थितीत गरजेचे आहेत

अवलीया गायक किशोरकुमार

     काय तो दिवस होता? म्हणजे मोठ्या भावाचा जन्मदिवस, वाढदिवस. ज्यांनी आपल्या आयुष्यातील 65 वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीला दिली त्या दादामुनी अशोककुमार यांचा जन्मदिवस 13 ऑक्टोबर. त्याच दिवशी वाढदिवसाची भेट नाही तर दु:खदायक बातमी येते की आपला धाकटा भाउ किशोरकुमार याचे निधन झाले आहे. किशोर कुमार हा अत्यंत अष्टपैलू कलाकार होता. पार्श्वगायक, गायक, अभिनेता, गीतकार, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथालेखक अशा सगळ्याच भूमिका त्यांनी साकारल्या होत्या. त्यांचा आज स्मृतीदिवस तर दादामुनी अशोककुमार यांचा जन्मदिवस. दोघेही इतके महान की त्यांच्यावर स्वतंत्र लेखन करावे लागेल, पण आज किशोरकुमारबाबतच लिहिणार आहे.
   किशोरकुमारनी हिंदी व्यतिरिक्त, बंगाली, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम, आणि उर्दू यासह अनेक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे.
चलतीका नाम गाडी, पडोसन, दिल्लीका ठग, नई दिल्ली, झुमरू, आशा, हाफ़ टिकट, श्रीमान फ़न्टूश अशा अजरामर चित्रपटांनी त्याचे नाव बनले.
  किशोर कुमार यांचा जन्म मध्य प्रदेशातील खांडवा या गावी झाला. त्यांचे नाव आभास कुमार ठेवण्यात आले. त्यांचे वडील कुंजलाल गांगुली हे वकील होते, आई गौरीदेवी या एका श्रीमंत घराण्यांतील होत्या. किशोर कुमार आपल्या भावंडात सर्वात लहान होते. इतर भावंडे अशोक कुमार, सती देवी आणि अनूप कुमार.
   अशोक कुमार बॉलीवुडमध्ये प्रसिद्ध झाल्यावर, गांगुली परिवारांचे मुंबई दौरे वाढत गेले. आभास कुमार यांनी याच वेळी आपले नाव किशोर कुमार ठेवून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. बॉम्बे टॉकीज मध्ये ते समूहगायक म्हणून काम करीत. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट शिकारी (इ. स. 1946) होता. या चित्रपटात अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका होती. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोर कुमार यांना जिद्दी (इ. स. 1946) या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. हे गाणे होते मरने की दुआऍं क्यों मांगूँ. यानंतर किशोर कुमार यांना गाण्याच्या बर्याच संधी मिळाल्या. इ. स. 1949 साली त्यांनी मुंबईत राहण्याचे निश्चित केले.
   बाँम्बे टॉकीजच्या फणी मजूमदार दिग्दर्शित आंदोलन (इ.स. 1951) या चित्रपटात त्यांनी हीरोचे काम केले. आपल्या भावाच्या मदतीने किशोर कुमार यांना अभिनेता म्हणून बरीच कामे मिळत असली तरी त्यांना एक यशस्वी गायक व्ह्यावयाचे होते. त्यांना अभिनयात विशेष रूची नव्हती पण अशोक कुमार यांना घाबरत असल्यामुळे ते अभिनय करीत राहिले.
   किशोर कुमार संगीत शिकलेले नव्हते. सुरुवातीला ते के.एल्. सैगल यांची नक्कल करीत. सुप्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांना किशोर यांची गायकी खूप आवडे. त्यांच्या सल्ल्यानुसारच किशोर कुमार यांनी नक्कल करण्याचे सोडून आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली.
  अभिनेता म्हणून किशोर कुमार यांनी बर्याच नामांकित दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. बिमल रॉय बरोबर नौकरी (इ. स. 1954) आणि हृषीकेश मुख़र्जींबरोबर मुसाफिर (इ. स. 1957). सलिल चौधरी, नौकरी चे संगीतकार किशोर कुमार यांना त्यांचे संगीतात शिक्षण नाही म्हणून गाण्याची संधी देऊ इच्छीत नव्हते, पण किशोरचे गाणे ऐकून, त्यांनी हेमंत कुमारच्याऐवजी किशोर कुमार यांना छोटा सा घर होगा हे गाणे गावयास दिल.
  किशोर कुमार यांच्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये लडकी (1953), नौकरी (1954), बाप रे बाप (1955), पैसा हाय पैसा (1956), नई दिल्ली (1956), नया अंदाज (1956), भागम भाग (1956), भाई भाई (1956), आशा (1957), चलती का नाम गाडी (1958), दिल्ली का ठग (1958), जलसाझ (1959), बॉम्बे का चोर (1962), चाचा जिंदाबाद (1959), मन-मौजी (1962) , झुमरू (1961), हाफ तिकीट (1962),  मिस्टर एक्स इन बॉमबे  (1964), श्रीमन फंटूश (1965), एक रझ (1963), गंगा की लाह्रेन (1964), हम सब उस्ताद है (1965), हल ई दिल, प्यार की जा (1966) आणि पडोसन (1968) या चित्रपटांचा समावेश होतो. ‘आके सिधी लागी दिल पे’ हे हाप  टिकिट या चित्रपटातील गाणे संगीत दिग्दर्शक सलील चौधरी यांच्या मनामध्ये युगल गीत होते आणि किशोर कुमार आणि लता मंगेशकर हे गाणे गायला हवे होते.तथापि, लता मंगेशकर शहरात नसल्यामुळे आणि सलिल चौधरी यांना  लता मंगेशकर परत येण्यापूर्वी ते गाणे रेकॉर्ड करावयाचे असल्यामुळे , किशोर कुमारन यांनी स्वत: गाण्याचे मेल आणि फिमेल  दोन्ही  आवाज काढून गाणे गाऊन समस्येचे निराकरण केले.हे  युगल खरं तर पडद्यावरील स्त्री वेशातील  प्राण आणि किशोर कुमार यांच्यासाठी होते. मेल आणि फिमेल या  दोन्ही स्वरांमध्ये  किशोर कुमार यांनी प्रशंसनीय गायन केले.कुमार यांची गायकीची कला दाखविण्याचे श्रेय संगीतकार एस. डी. बर्मन यांना जाते. मशाल (1950) बनवताना आर डी बर्मन अशोककुमार यांच्या  घरी गेले होते, तेथे त्याने किशोर कुमारांना के. एल. सैगल यांचे अनुकरण करताना ऐकले. त्यांनी  त्याचे कौतुक केले आणि सांगितले की सैगलची कॉपी करण्याऐवजी स्वतःची शैली विकसित करावी. अखेरीस किशोर कुमारांनी  त्यांची स्वतःची गायकीची शैली विकसित केली, ज्यामध्ये योडेलिंगची वैशिष्ट्य होती, जी त्यांनी  टेक्स मोर्टन आणि जिमी रॉजर्सच्या रेकॉर्डवर ऐकली होती. एस. डी. बर्मन यांच्यासाठी किशोर कुमार यांनी 50 च्या दशकापासून ते 70 च्या दशकाच्या सुरुवाती पर्यन्त  देव आनंदसाठी गायन केले. एस.डी. बर्मनने किशोर कुमार यांना  प्रशिक्षण दिले आणि त्यांना  बरेच प्रोत्साहनहि दिले, विशेषत: 50 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 60च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात, किशोर कुमार भविष्यातील  महान गायक म्हणून विकसित झाला. देव आनंदच्या मुनिमजी (1954), टॅक्सी चालक (1954), हौस नंबर 44 (1955), फंटूश (1956 ), नौ दो  ग्याराह (1957 ), पेइंग गेस्ट (1957), गाईड  (1965),  ज्वेल थीप  (1967), प्रेम पुजारी (1970) आणि तेरे मेरे सपने (1971) या चित्रपटांसाठी एसडी बर्मन यांनी किशोर कुमार यांचा आवाज रेकॉर्ड केला. कुमार यांच्या होम प्रोडक्शन असलेला चित्रपट चलती का नाम गाडी (1958) साठीही त्यांनी संगीत दिले.संगीतकार सी. रामचंद्र यांनीही किशोर  कुमार यांची गायक म्हणून  प्रतिभा ओळखली. त्यांनी आशा  (1 957) या चित्रपटामधील मधील ईना मीना डीका हे गाणे एकत्रित  केले. किशोर कुमार यांच्या गाण्याच्या कामामध्ये  शंकर जयकिशन यांनी लिहिलेले नखरेवाली फ्रॉम न्यू दिल्ली  (1956), रवी यांच्यासोबत दिल्ली का ठग (1958) मधील सी ए टी  कॅट माने बिली आणि हम तो मोहब्बत करेगा आणि  चित्रगुप्त यांच्यासोबत गंगा की लहेरे या चित्रपटातील  छेडो ना मेरी जुल्फिन (1964) यां चित्रपटांचा  समावेश आहे.
    1980 च्या दशकातही किशोर कुमारांनी  अनेक कलाकारांसाठी गाणे सुरू ठेवले. कुमार यांनी 1969 पासून आयकर थकबाकी भरण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी स्टेज शो केले. किशोर यांनी निर्मित ‘ममता की छाव  में’ या चित्रपटात बच्चन यांनी पाहुणे म्हणून येण्यास नकार दिल्यानंतर कुमार यांनी 1981 पासून  अमिताभ बच्चन यांच्यासाठी गाणे बंद केले. किशोरांनी अमिताभसाठी नसीब, कुली, मर्द आणि देश प्रेमीमध्ये आवाज देण्यास नकार दिला.  योगिता बालीने किशोर कुमार यांच्याबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर मिथुन चक्रवर्तीशी लग्न केल्यावर मिथुन चक्रवर्तीसाठीही त्यांनी तात्पुरते गाणे थांबवले. तथापि, नंतर त्यांनी 1970 च्या दशकात मिथुन चक्रवर्तीच्या सुरक्षा आणि 1980  च्या दशकात बॉक्सर, जागीर, फरीब आणि वक्त की आवाज या सारख्या अनेक चित्रपटांत गाणी गायली. 24 जानेवारी 1981 रोजी दुपारी किशोर कुमार यान  कोलकाता येथे त हृदयविकाराचा पहिला झटका आला आणि आणखी चार तासांच्या अंतरावर त्यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आला. राजपूत (1982) या चित्रपट  मधील मेरे संग संग आया आणि गेहरा  जखम मधील मौसम भीगा भीगा दोन्ही हृदयविकाराच्या झटक्यानंतर बरे झाल्यानंतर  त्यांनी गायिलेलं पहिलं एकल गाणं. सप्टेंबर 1987 पर्यंत, संगीत दिग्दर्शकांकडून बनवलेल्या अयोग्य  प्रकारच्या गाण्यामुळे  व सूरांमुळे नाराज असल्यामुळे कुमार यांनी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता आणि जन्मभूमी खंडवा येथे परत जाण्याचा विचार करत होते. 01 ऑक्टोबर 1987 रोजी - त्याचा भाऊ अशोक कुमार यांचा  76 वा वाढदिवस - त्याचे मुंबई येथे हृदयविकाराच्या झटक्याने सायंकाळी 4. 45 वाजता निधन झाले.
                            शिवसेनाप्रमुख आणि किशोरकुमार
 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल किशोरकुमार यांना आपलेपणा होता. याबाबत आमचे मुंबई चौफेरचे नियमीत वाचक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेही सदानंद देउळकर यांनी फोनवरून नुकतीच एक आठवण सांगितली. किशोरकुमार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांसाठी एक़ शो करण्याची इच्छा व्यक्त केली होती. किशोरकुमार यांचा लहरी स्वभाव शिवसेनाप्रमुखांना माहिती होता. हा कार्यक्रमाला येईलच याची त्यांना खात्री नव्हती. पण तरीही किशोरकुमारच्या आग्रहाखातर एका कार्यक्रमाचे आयोजन केेले. हाउसफुल गर्दी, हॉल भरलेला पण किशोरकुमार कुठेच दिसत नव्हते. सगळे टेन्शनमध्यें आले. त्यावेळी फोन मोबाईल नव्हते. त्यामुळे थिएटर व्यवस्थापकांकडे फोन नंबर कुठून मिळेल का याची चौकशी केली, तेंव्हा त्यांनी सांगितले की किशोरकुमार सकाळीच येउन हॉलवर थांबले आहेत. बाळासाहेबांच्या प्रेमापोटी उशीर व्हायला नको म्हणून लवकर येउन झोपले आहेत, कार्यक्रमाची वेळ झाली की उठवा असे मॅनेजरना सांगितले होते.

 

साहित्यातला सूर्य (सुर्वे) नारायण

    सामान्य माणूस, कामगार यांच्यासाठी आपल्या प्रतिभेचा वापर करणारे साहित्यीक फार कमी झाले आहेत. साहित्याचा वापर रंजनासाठी नाही तर दिशा देण्यासाठी केला पाहिजे असा विचार करणारे फार कमी लेखक असतात. बहुतेक लेखक हे भाट असतात, स्तुतीपाठक असतात. भिउन लिहीणारे असतात, पण मनात आले  ते खरेपणाने मांडणारे फार कमी असतात. म्हणूनच अशाच अंध:क़ारमय परिस्थितीत दिशा देणारी कविता करणारा साहित्यातील सुर्य नारायण म्हणजेच नारायण सुर्वे. नारायण सुर्वे यांचा आज जन्मदिवस. त्यांच्यावरती मार्क्सवादी विचाराचा पगडा होता ,आपल्या लेखणीतून त्यांनी समाज परिवर्तनाची कवने लिहिली.

     1926-27 मध्ये मुंबईतील चिंचपोकळीतील एका कापडगिरणीसमोर रस्त्यावरचा एक अनाथ जीव गंगाराम सुर्वे या मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये साचेवाला म्हणून काम करणार्‍या गिरणी कामगाराने उचलून घरात आणला. त्याच गिरणीत बाईंडिंग खात्यात काम करणार्‍या गिरणी कामगार काशीबाई सुर्वे यांनी या बाळगलेल्या पोराला’ स्वत:च्या मुलासारखे प्रेम दिले आणि नारायण गंगाराम सुर्वे’ हे नावही दिले. परळच्या बोगद्याच्या चाळीत ते वाढले. कमालीचे दारिद्र्‍य, अपरंपार काबाडकष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यांतून नारायण सुर्वे यांचे आयुष्य चांगलेच शेकून निघाले.
   घरात अठराविश्वे दारिद्र्‍य असतानाही या नारायणाला चार अक्षरे लिहिता-वाचता यावीत म्हणून दादर, अप्पर माहीम मराठी महापालिका शाळेत घातले. हे दांपत्य मुळचे कोकणातील हेताचीवाडी(भुईबावडा) येथील होते. त्यांनी नारायणास मराठी चौथीपर्यंत शिक्षण दिले. पुढील शिक्षण नारायण सुर्वे यांनी स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केले. नारायण सुर्वे 1936 मध्ये चौथी इयत्ता उत्तीर्ण झाले आणि गंगाराम सुर्वे गिरणीतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर मुंबई सोडून ते कोकणात गावी निघून गेले. गावी जाताना त्यांनी नारायणाच्या हातावर दहा रुपये ठेवले आणि समोर मुंबईचा विशाल सागर.
  मग भाकरीचा चतकोर चंद्र मिळविण्यासाठी नारायण सुर्वे एका सिंधी कुटुंबात घरगडी, हॉटेलात कपबशा विसळणारा पोर्‍या, कुणाचे कुत्रे-कुणाचे मूल सांभाळणारा हरकाम्या, दूध टाकणारा पोरगा, अशी कामे करीत वाढले. गोदरेजच्या एका कारखान्यात त्यांनी पत्रे उचलले, टाटा ऑइल मिलमध्ये हमाली केली. काही काळ गिरणीत धागाही धरला. बॉबीन भरली. मुंबई महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी केली. आणि 1961 मध्ये शिपायाचे शिक्षक झाले. महापालिकेच्या नायगाव नंबर एक शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नोकरी सुरू झाली. ते तेव्हापासून गिरणगावचे सुर्वे मास्तर’ झाले.
    कधी दोन घेत, कधी दोन देत’ आयुष्याची वाटचाल सुरू असतानाच जिंदगीच्या धगीवर शब्द शेकून घेत त्यांनी मराठी काव्यप्रांतात एक नवा सूर घुमवला. त्यांची पहिली कविता 1958 मध्ये नवयुग’ मासिकात प्रसिद्ध झाली. डोंगरी शेत माझं गं....’ हे त्यांचे पहिले गाजलेले गीत. एचएमव्हीने त्याची ध्वनिफीत काढली. .
  गुजराण करण्यासाठी नारायण छोटेमोठे व्यवसाय करत असे. या काळात स्वतःच्या हिंमतीने तो लिहिण्या-वाचण्यास शिकला. 1962 साली त्यांनी लिहिलेल्या कवितांचा पहिला संग्रह - ऐसा गा मी ब्रह्म - प्रकाशित झाला. त्याला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला.
  नारायण सुर्वे वाढले त्या चाळीतील सारेच जण साम्यवादी पक्षात होते. डावी चळवळ जोरात होती. ती चळवळ हा त्यांचा मोठा आधार बनली. सुर्व्यांच्या वैचारिक प्रवासाची ही सुरवात होती. माझ्या पहिल्या संपात मार्क्स मला असा भेटला,’ असे सांगणार्‍या सुर्व्यांची साम्यवादी, डाव्या विचारप्रणालीशी बांधिलकी आहे. कम्युनिस्ट चळवळीत ते रेडगार्ड’ बनले. या चळवळीतील एक कॉम्रेड तळेकर यांच्या भाचीवर त्यांचे प्रेम बसले. आई-बापाविना वाढलेल्या कृष्णा साळुंके हिच्याशी त्यांनी विवाह केला. आयुष्यातील कष्ट संपले नव्हते. खारजवळ एका झोपडपट्टीत त्यांनी संसार थाटला होता. मोठा मुलगा अवघा बावीस दिवसांचा असतानाच हे झोपडे तोडले गेले. आठ दिवस फुटपाथवरच संसार होता. या अनुभवातून आलेल्या कवितेला दैनंदिन जीवनातील कठोर वास्तवाशी, दैनंदिन संघर्षाशी जोडण्याचे क्रांतिकार्य नारायण सुर्वे यांनी केले आहे. जीवनात जे वास्तव अनुभवले, त्यांचे भांडवल करायचे नाही, अशी त्यांची वृत्ती होती. त्यामुळे ते अनेकांना आपले वाटतात.
  पदपथापासून विद्यापीठापर्यंत आणि कामगारांपासून ते बुद्धिनिष्ठ समीक्षकांपर्यंत त्यांच्या कवितांना रसिकमान्यता मिळाली. संत कबीरालाही त्याच्या आईने नदीकाठी सोडले. कबीर दोहे करायला लागला आणि मी कविता करायला...त्यालाही त्याची जात सांगता आली नाही अन् मलाही...असे सुर्वे म्हणत.
 त्यानंतर सुर्वे यांचे कवितासंग्रह एकामागोमाग येत राहिले.  माझे विद्यापीठ’, जाहीरनामा’, पुन्हा एकदा कविता’, सनद’ हे त्यांचे कवितासंग्रह. नालबंदवाला याकूब, चंद्रा नायकीण, दाऊद शिगवाला, हणम्या हे त्यांचे कवितासंग्रह आहेत.
 पोटाची खळगी भरण्यासाठी सह्याद्रीचा कडा उतरून मुंबईत कामधंद्याच्या शोधात आलेल्या व समुद्राच्या तीरावर झुंजत मरण पावलेल्या एका कष्टकरी मुलाचा बाप, आपल्या तारुण्यातील पराक्रम मुलाला ऐकविणारा वृद्ध पिता, गोदीवर काम करणारा आफ्रिकन चाचा, पंडित नेहरूंचे निधन झाले म्हणून धंदा बंद ठेवणारी सुंद्री वेश्या , अशी अनेक व्यक्तिचित्रे त्यांनी अत्यंत समर्पकपणे व रेखीवपणे उभी केली आहेत. सुर्व्यांचे पहिलेवहिले काव्यवाचन झाले ते कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली मडगावच्या साहित्य संमेलनात. त्या वेळेपासून ते प्रत्येक काव्यमैफलीत खड्या सुराने रंग भरत आहेत. मास्तर, तुमचंच नाव लिवा...’, असं पत्रात लिवा’, मर्ढेकर’, सर कर एकेक गड’, मनिऑर्डर’, मुंबईची लावणी’, गिरणीची लावणी’ या त्यांच्या कविता हमखास दाद देणार्‍या होत्या. नारायण सुर्वे यांनी त्यांच्या कवितेतून ईश्वरवाद, प्रारब्ध, उच्च-नीचता किंवा जातीचा कधीही उल्लेख केलेला नाही. त्यांनी मराठी कवितेत कामगारांचे, हातावर पोट असणार्‍यांचे जग शब्दबद्ध करून आणि त्यांच्या संघर्षातून कृतिशील आशावादाकडे झेपावणार्‍या आकांक्षांचे चित्रण, पुरोगामी विचारांच्या मुशीतून निघालेल्या शब्दकळेद्वारे केले आणि मराठी कवितेला सामाजिक बांधिलकीचा विशाल आशय प्राप्त करून दिला. म्हणूनच सामान्यांचे, गरीबांचे, कामगारांचे, हातावर पोट असणार्‍यांचे ते नारायण सूर्य नाही तर प्रकाश देणारे असे सूर्य नारायण होते.

बॉलीवूडची ड्रिम गर्ल हेमा मालिनी

  एक काळ असा होता की सौदर्याचा अंतिम शब्द म्हणजे हेमामालिनी. प्रत्येकाला आपली मुलगी ही हेमामालिनीसारखी  असावी असे वाटायचे. बॉलीवूडच्या गॉसिपिंग आणि नशेत गुंग होणार्‍या अभिनेत्री एकीकडे आणि सभ्यता जपणारी हेमा मालिनी एकीकडे. कधी अंगप्रदर्शन नाही की व्यसनात गुंतल्याचे चित्र नाही. आपली इमेज, आपली सभ्यता जपून अभिनय आणि सौदर्याच्या जोरावर तीने आपले बॉलीवूडमधले ड्रिमगर्ल हे पद मिळवले. आज या ड्रिमगर्लचा वाढदिवस.
   एक भारतीय सिने-अभिनेत्री, दिग्दर्शक, भरतनाट्यम नर्तकी अशा विविध भूमिका करताना राजकारणातही ती आली आणि तिथेही आपली छबी जपली. भारताच्या सोळाव्या व विद्यमान लोकसभेची ती सदस्य आहे.
 1968 सालच्या सपनो का सौदागर ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी हेमा मालिनीने त्यानंतर असंख्य हिट चित्रपट दिले. अंदाज, लाल पत्थर, ड्रीम गर्ल, शोले इत्यादी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या. 1970च्या दशकामध्ये ती बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी व प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. 1972 सालच्या सीता और गीता चित्रपटामधील दुहेरी भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
   1980 साली हेमा मालिनीने सह-अभिनेता धर्मेंद्र सोबत विवाह केला.  2000 मध्ये भारत सरकारने चित्रपटसृष्टीमधील तिच्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार बहाल केला. फेब्रुवारी 2004 मध्ये हेमा मालिनीने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2003 ते 2009 दरम्यान राज्यसभा सदस्य राहिल्यानंतर 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये हेमा मालिनी उत्तर प्रदेशच्या मथुरा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आली.
      हेमामालिनीच्या कारकीर्दीत तिने राजकपूर बरोबर सुरवात केली, देवआनंदबरोबर काम केले. पण तिच्या ज्या ज्या लोकांशी जोड्या जमल्या त्या सगळ्या गाजल्या. हेमा मालिनी राजेशखन्ना, हेमा मालिनी जितेंद्र, हेमा मालिनी अमिताभ बच्चन, हेमामालिनी धर्मेद्र, हेमा मालिनी मनोजकुमार, हेमा मालिनी शशीकपूर या सगळ्या जोड्या गाजल्या आणि त्या प्रत्येक जोडीच्या नावावर सुपरहिट चित्रपट आहेत.
   पण कधीकधी काही जोड्या प्रेक्षक त्या कलाकारांच्या प्रेमापोटी जुळवत राहतात. तर काही कलाकार आपल्या सहकलाकारांबाबत बघत असतात. या दोघांचे खरे लग्न झाले तर मजा येईल असे उगाचच प्रेक्षक विचार करत असतात. यामध्ये राजेशखन्ना या तत्कालीन सुपरस्टारचे डिंपलऐवजी हेमामालिनीबरोबर का लग्न झाले नाही असा अनेकांना प्रश्न पडला होता. तर हेमा मालिनीच्या प्रेमात झुरणार्‍या संजीवकुमारशी तिचा विवाह झाला असता तर बरे झाले असते असेही अनेकांना वाटते. संजीवकुमार हेमामालिनी यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले असले तरी नायक नायिका म्हणून सीता और गीता या जी पी सिप्पी रमेश सिप्पींच्या चित्रपटात दोघे गाजले. अर्थात त्यात सबकुछ हेमामालिनी ह ोती आणि सोबतीला ही मॅन धर्मेंद्र होता. पण वाट्याला आलेल्या भूमिकेतही दोघांनी आनंद मिळवला होता. त्यानंतर जी पी सिप्पी रमेश सिप्पीने शोलेची निर्मिती केली आणि हेच त्रिकूट आपल्या चित्रपटात ठेवले. पण संजीवकुमारला चरीत्रनायकाची भूमिका मिळाली तर हेमा धर्मेद्रची जोडी मात्र इथेच जमली.
पण या ड्रिमगर्लचे लग्न नक्की कोणाशी व्हावे याची प्रेक्षकांना फारच उत्सुकता होती. बॉबीनंतर डिंपल आली आणि राजेशखन्नासोबतची हेमाची जोडी जमवण्याची प्रेक्षकांची संधी हुकली. त्यामुळे प्रेक्षकांनी तिच्यासाठी अनेक वरसंशोधन केले. पण मनोमन या अप्सरेने आपले स्वयंवर आधीच केले होते. ते म्हणजे ही मॅन धर्मेद्रशी लग्न करण्याचा तिचा निर्धार होता.
अर्थात हा प्रेमविवाह होता. खरं तर बॉलिवूडमधील अफेअर्सची चर्चा अक्षरशः न संपणारी आहे. जुळलेली नाती, ब्रेकअप, ब्रेकअप नंतर पुन्हा एकत्र येणारी जोडपी. पण धर्मेद्र हेमामालीनी ही जोडी मात्र अभेद्य अशी आहे. धर्मेंद्रचे आधीच लग्न झालेले असले तरी या जोडीबाबत वाईट बातम्या कोणी पसरवल्या नाहीत. कारण त्या काळात राजेशखन्ना या सुपरस्टारचा विवाह जितक्या जोमात डिंपलबरोबर गाजला तितकाच तो विवाह तुटला, वाद हेही गाजले. रेखा तर तुळशीच्या लग्नाप्रमाणे सतत नवनवे विवाह करत होती. पण धर्मेद्र हेमामालिनीचे अतूट प्रेम होते.
अर्थात बॉलीवूडची प्रेमप्रकरणे प्रेक्षकांच्या आवडीचा विषय असतो. साधारण दोन एक वर्षांपूर्वी सनी देवल-डिम्पल कपाडियाचं जुनं प्रेम पुन्हा डोकं वर काढताना दिसलं. त्यापाठोपाठ  धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्याविषयी एक वेगळी माहिती समोर आली होती.
अर्थात कोणत्याही सेलिब्रेटींचं आयुष्य एखाद्या सिनेमापेक्षा कमी नसतं. हिंदू धर्मात बहुपत्नी मान्य नसल्यामुळे हेमा मालिनीसोबत लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांना इस्लाम धर्माचा स्वीकार करावा लागला होता, हे बहुतेकांना माहित आहेच. हिंदुत्ववादी भाजपला या इस्लामचा फायदा घेणारी ड्रिमगर्ल आणि ही मॅन दोघांनी दोन खासदार दिले होते. असो, धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांनी घटस्फोट देण्यास नकार दिल्यामुळे धर्मेंद्र यांनी ही पळवाट काढली.
हेमामालिनीच्या लग्नापूर्वीच्या आयुष्याबद्दल एक वेगळीच मजेशीर माहिती पण गाजली होती.
राम कमल मुखर्जी यांनी लिहिलेल्या ’हेमा मालिनी : बियाँड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकात म्हटले आहे की, म्हणे हेमा मालिनी जितेंद्रसोबत विवाहबंधनात अडकणार होत्या, मात्र धर्मेंद्र यांनी अक्षरशः त्यांचं लग्न मोडलं.
’हेमा आणि धर्मेंद्र एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. हेमाने पहिल्यांदाच आपल्या आई-वडिलांपासून आपलं रिलेशनशीप लपवलं होतं. जया चक्रवर्ती म्हणजेच हेमाच्या आईला याची कुणकुण लागली. त्यामुळे तिने वेळीच हेमाचं लग्न लावून द्यायचं ठरवलं’ असं पुस्तकात म्हटलं आहे.
हेमा मालिनी आणि जितेंद्र यांचे एकत्र दोन सिनेमे दुल्हन (1974) आणि खुशबू (1975) सुरु होते. साहजिकच दोघांना एकत्र प्रसिद्धी मिळाली. जितेंद्रच्या मनातही हेमा मालिनीबद्दल हळवा कोपरा निर्माण झाला होता, मात्र हेमाने फारसा रस न दाखवल्यामुळे दोघांनी चांगले मित्र राहायचं ठरवलं, असं पुस्तकात म्हटलं आहे.
जया यांनी हेमाला जितेंद्रच्या पालकांची भेट घेण्याची गळ घातली. आईच्या तगाद्याला कंटाळून हेमामालिनीने अखेर त्यांची भेट घेतली. इथे, हेमाला भेटून जितेंद्रचे आई-वडील भलतेच खुश झाले. त्यांना आपल्या मुलाचं हेमाशी लग्न व्हावं असं वाटू लागलं. थोडक्यात, हेमा आणि जितेंद्र या दोघांच्याही आई-वडिलांना मुलांचं लग्न लावण्याची इच्छा होती.
’मला हेमाशी लग्न करायचं नाही. मी तिच्या प्रेमात पडलेलो नाही. ती माझ्या प्रेमात नाही. आमचं लग्न व्हावं, ही फक्त माझ्या कुटुंबाची इच्छा आहे. त्यामुळे मी लग्न करेनही. ती खूप चांगली मुलगी आहे’ असं त्यावेळी जितेंद्रने म्हटल्याचं मित्राने सांगितलं.
 अखेर, हेमा, जितेंद्र आणि त्यांचे कुटुंबीय मद्रास (चेन्नई)ला गेले. लग्नसोहळा तिथेच पार पडणार होता. मात्र आधीच एका सायंदैनिकाला या लग्नाविषयी समजलं आणि  त्यांनी ’बिग स्टोरी’ केली. चित्रपटसृष्टीतील कोणाचाच यावर विश्वास बसत नव्हता, पण महत्त्वाचं म्हणजे धर्मेंद्रला याचा मोठा धक्का बसला. धर्मेंद्र तातडीने शोभा सिप्पीच्या घरी गेला. शोभा म्हणजे जितेंद्रची गर्लफ्रेंड. एअरहॉस्टेस असलेल्या शोभासोबत धर्मेंद्रने तातडीने मद्रास गाठलं.
हेमामालिनीच्या घरी पोहचताच दिसणारं दृश्य धर्मेंद्रला चकित करणारं होतं. धर्मेंद्रला पाहून हेमाच्या वडिलांचा पारा चढला आणि त्यांनी अक्षरशः त्याला धक्के मारुन बाहेर काढलं. ’तू माझ्या मुलीच्या आयुष्यातून का निघून जात नाहीस? तुझं लग्न झालेलं आहे. तू माझ्या लेकीशी लग्न करु शकत नाहीस’ असं ते बडबडत होते.
धर्मेंद्रने गयावया केली. मात्र भावुक झालेल्या धरमने अजिबात नमतं घेतलं नाही. शेवटी, हेमाशी एकांतात बोलण्यास त्यांनी धर्मेंद्रला परवानगी दिली. हेमामालिनीचे आई-वडील, जितेंद्रचे आई-वडील आणि रजिस्ट्रार बाहेर थांबले. रुममध्ये दोघंही आठवणींनी गहिवरले होते.
रुमबाहेर येताच हेमाने हात जोडून दोन्ही कुटुंबीयांना विनंती केली. थरथरत्या आवाजात तिने निर्णयासाठी काही दिवसांची मुदत मागितली. जितेंद्रच्या आई-वडिलांना मात्र साहजिकच हा प्रकार रुचला नाही. लग्न झालं तर आत्ता, नाहीतर कधीच नाही! असा अल्टिमेटम त्यांनी दिला.
हेमाच्या उत्तरासाठी सगळ्यांच्या माना वळल्या होत्या. हेमामालिनीने त्याच क्षणी मान हलवून नकार दर्शवला. जितेंद्रसाठी हा अपमान पुरेसा होता. त्याने आई-वडिलांसोबत तडक मुंबई गाठली. त्यानंतर दोघांमध्ये कोणतेही संबंध उरले नव्हते. पण बॉलीवूडच्या या ड्रिमगर्लचे आकर्षण सवार्र्नाच नेहमी राहिले होते. तिच्या चिरतारुण्याप्रमाणेच हेही कायम राहील असे दिसते.

 

आत्मविश्वासाचे सौदर्य

     सामाजिक मान्यतेनुसार ज्या सौंदर्याच्या कल्पना असतात त्या कल्पनेत बसणारी ती नव्हती. म्हणजे गौरवर्ण, गोल चेहरा वगैरे वगैरे. पण तीच्यामध्ये तेज होते. एकप्रकारची चमक होती. आत्मविश्वास हा गुण तिच्या चेहर्‍यावर प्रथमदर्शनीच दिसायचा. तिचे डोळे बरेच काही सांगून जायचे. त्यामुळे आत्मविश्वासाचे सौंदर्य तिच्या चेहर्‍यावर भरभरून वहायचे. हो, हे वर्णन स्मीता पाटील हिच्याबाबतच आहे. इतक्या आत्मविश्वासाने आणि सहजपणे काम करणारी अभिनेत्री या बॉलीवूडमध्ये आजही नाहीये. तशा फाजील आत्मविश्वासाने बोलणार्‍या कंगनासारख्या अनेक बोलबच्चन असतात, पण कसल्याही गॉसिपींगच्या भानगडीत न पडता आपल्या कामावर निष्ठा असणारा आत्मविश्वास दिसायचा तो स्मीता पाटीलमध्येच.

स्मीता पाटील ही अत्यंत साधीच होती. सावळी, मध्यमवर्गीय घरात शोभेल अशीच होती. पण तिच्या नजरेत विलक्षण तेज होते. डोळे विलक्षण बोलके होते. जे काही सांगायचे ते ती नजरेतून सांगायची. म्हणजे अगदी दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिकेपासून सुरू झालेला तिचा प्रवास भल्याभल्यांना चक्रावून टाकणारा ठरला. अवघ्या 10-12 वर्षांच्या काळात तिने चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर दरारा निर्माण केला, स्वत:ची छाप सोडली होती. अशा या स्मीता पाटीलचा आज जन्मदिवस.
   साधारणपणे 1970 ते 1980च्या दशकात बॉलीवूडमध्ये समांतर चित्रपटांची लाट आली. थेट जगण्याच्या प्रश्नांशी भिडणारे चित्रपट आले. वास्तव सांगणारे हे चित्रपट बघताना अनेक जण हादरून गेले. आणीबाणीपूर्व आणि नंतरचा तो काळ होता. समाजात प्रश्न खूप होते. प्रत्येकाला उत्तरे हवी होती. व्यक्त होण्यासाठी सामाजिक बांधिलकी मानणा-या मोजक्या लेखक, दिग्दर्शकांनी चित्रपट हे माध्यम जवळ केले. समांतर अथवा कलात्मक चित्रपट असे त्यांना समजले जाऊ लागले. अशा या कलात्मक अथवा समांतर चित्रपटांद्वारे स्मिता पाटीलचे सिनेसृष्टीत पदार्पण झाले. बघता बघता कलात्मक चित्रपटातील सुपरस्टार ते व्यावसायिक चित्रपटातील अभिनेत्री असा लौकीक तिने प्राप्त केला होता. या सगळ्यासाठी लागणारा फार मोठा आत्मविश्वास तिच्यात होता.
   दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून काम करणार्‍या स्मिताला श्याम बेनेगल यांनी हेरले आणि चित्रपटात संधी दिली. मराठी शाळेच्या वातावरणात शिकलेल्या स्मिताच्या घरातही मराठीच वातावरण होते. वडील राजकारणात. आई-वडील या दोघांचा संबंध सेवादलाशी. त्यामुळे राष्ट्र सेवादलाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत स्मिताचा सहभाग असायचा. घरातून सामाजिक-सांस्कृतिक चळवळीशी ओळख झालेल्या स्मिताचा स्वभाव तसा जिद्दी, बंडखोर. घेतलेल्या निर्णयावर ती ठाम असायची. चित्रपटात काम करणार असल्याचा निर्णय तिने घरी सांगितला. तिच्या निर्णयावर घरच्यांचा विश्वास असल्यामुळे विरोधाचा प्रश्न नव्हताच. 1974पासून हिंदी चित्रपटात प्रवेश केलेल्या स्मिताने आपल्या प्रारंभीच्या चित्रपटापासूनच सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
    वैशिष्ठ्य म्हणजे स्मिता पाटील ही केवळ काम करायची नाही, तर भूमिका अक्षरश: जगायची. ‘निशांत’, ‘चरणदास चोर’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केलेल्या स्मिताने मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले; पण सर्व चित्रपटांत तिने अस्तित्वाची छाप सोडली. प्रचंड मेहनत आणि आत्मविश्वासाने कामे केली. स्मिताच्या जगण्यात कुठेच खोटेपणा दिसत नव्हता. अभिनेत्री म्हणून वास्तव जीवनातही नाटकीपणाने वागण्याचा गुण कलाकारांमध्ये असतो, तो तिच्यात नव्हता किवा वास्तव जीवनातही  अभिनय नव्हता. मात्र, अभिनयात तिचे जगणे ओतप्रोत भरलेले असायचे. तिला मिळालेल्या अनेक भूमिका पीडित, शोषित स्त्रीच्या असायच्या; पण या भूमिका करताना स्मिताने चाकोरीबाहेरची स्त्री दाखवली.
      ‘करोगे याद तो हर बात याद आयेगी’ ही ‘बाजार’मधील गझल पडद्यावर पाहताना स्मिताची त्या वेळची आर्त नजर अगदी आजही लक्षात राहणारी अशीच आहे. तिचे शरीर, आवाज खूप काही बोलून जायचे. ‘आक्रोश’मधील आदिवासी लहानू भिकूसोबतच्या प्रणयात त्याच्या खांद्यावर जेव्हा ती बोटं रुतवते तेव्हा प्रणयातील जिवंतपणा काय असतो हे स्मिताने दाखवून दिले. ‘चक्र’मधील अम्मा झालेल्या स्मिताचा झोपडपट्टीतील अंघोळीचा सीन खूप गाजला. बोल्ड असलेल्या स्मिताने चित्रपटाची गरज म्हणून तो सीन दिला; पण त्यामध्ये कुठेही वाह्यातपणा नव्हता. हा चित्रपट चालवण्यासाठी व्यावसायीकपणे स्मीताच्या हातातील आंघोळीच्या बादलीची आणि खांद्यावरून पाणी सोडण्याची पोस्टर्स देशभर झळकली. तिच्या आंघोळीची जाहीरात केली. पण यात कुठेही अश्लीलपणा नव्हता. म्हणजे राजकपूरची नायिका मग ती झीनत असो की मंदाकीनी, आंघोळ करताना पाहताना जशा पिटातल्या शिट्टया वाजत होत्या तसो प्रकार इथे झाला नाही. कारण हे आपण रोज बघतो आहोत, एखादी झोपडपट्टीतील महिला ज्या सहजतेने आडोशाला जाते आणि आपले नित्यकर्म उरकते, जे चित्र आपण लोकलमधून जातानाही सहजपणे पाहतो तसेच ते वाटून गेले.
  ‘मिर्च मसाला’मधील तिचा विद्रोह हा समग्र स्त्रियांना आपला वाटला. ‘वारिस’मधील पारोची भूमिका तिने ताकदीने पेलली. ‘अर्थ’ या गाजलेल्या चित्रपटात प्रियकराला दूर करणार्‍या स्त्रीची भूमिका तिने अफलातून केली. ‘उंबरठा’ या मराठी चित्रपटातील सुलभा महाजनची चाकोरीबाहेर जाण्याची धडपड, होणारी घालमेल, ‘मंथन’मधील एका मुलाची आई असताना विवाहित गिरीश कर्नाडवर जीव ओवाळून प्रेम करणारी प्रेयसी अशा कितीतरी भूमिकांचा उल्लेख करता येईल.
तिच्या नजरेत विविध पदर होते. अनेकदा चित्रपटांमध्ये ती भिंतीला टेकून उभी असताना दाखवले गेले. त्या वेळी तिच्या नजरेतील विविध पैलू अत्यंत ठळकपणे दिसून यायचे. वेदनेतही कला असते आणि सौंदर्य असते, हे स्मिताच्या नजरेतून कळायचे. सर्वांना वेड लावावे असे तिच्या चेह-यात काहीतरी खास होते. तिच्या अभिनयाला विचारांची खोली होती. म्हणून तर ‘स्पर्श’मध्ये मुख्य भूमिका सई परांजपेकडून दिली जात नाही, हे तिला कळले, तेव्हा ती सरळ व्यावसायिक चित्रपटांकडे वळाली. ‘शक्ती’, ‘नमकहलाल’, ‘कसम पैदा करनेवालों की’, अमृत यासारखे चित्रपट करताना स्मिताला पाहिले, तेव्हा सर्वांना धक्का बसला. कारण तत्कालीन अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, मिथून चक्रवर्ती यांच्याबरोबर या भूमिका होत्या. मात्र, या चित्रपटांमध्येही तिचा अभिनय लक्षात राहिला. सात वर्षे ती समांतर चित्रपटांशी संलग्न राहिली. व्यावसायिक चित्रपटांकडे ती अपरिहार्यता म्हणून वळली की अन्य काही कारणे आहेत, ते शोधण्यापेक्षाही ग्लॅमर नसताना अभिनयाच्या सामर्थ्यावर ती व्यावसायिक चित्रपटांत यशस्वी झाली होती.
 स्मितामध्ये सामाजिक जाणीवही होती. म्हणूनच तिने 1980मध्ये महिला सबलीकरणावर भर द्यायला प्रारंभ केला होता. मातांच्या मृत्यूचे प्रमाण रोखले जावे यासाठी प्रयत्न केले. ‘उंबरठा’ चित्रपटाच्या खास शोचे उत्पन्न तिने महिलांसााठी कार्य करणा-या संस्थांना दिले. हा उदारपणा, हे दातृत्व तिच्या ठायी भरलेले होते. शोषित स्त्रीच्या वेदना, अत्याचार याबद्दल ती अस्वस्थ असायची. त्यामुळे भूमिका करताना आपल्या भावना, वेदना स्मिता पडद्यावर साकारते, असे प्रत्येकीलाच वाटायचे. वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी तिचे अकाली निधन झाले. तिचे जाणे हे आजही तितकेच अस्वस्थ करणारे आहे. पण आपल्या अल्प काळात तीने ज्या भूमिका केल्या त्या अत्यंत आत्मविश्वासाने केल्या होत्या.