भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू
यांची आज जयंती. हा दिवस बालदिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांना लहान
मुले खूप आवडत म्हणून हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो, असे आपण फार
पूर्वीपासून शिकत आहोत. पण, त्याही पलीकडे पंडित नेहरू होते, हेही लक्षात
घेतले पाहिजे. केवळ काँग्रेसचे नेते होते म्हणून त्यांचा दुस्वास करण्याची
प्रथा अलीकडे आहे. पण, त्या व्यक्तिमत्त्वातील गुणही पडताळून पाहण्याची गरज
आहे. आज कितीही विकास झाला आहे, असा गाजावाजा केला जात असला, तरी
त्यांच्या काळातही काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले होते, याकडे डोळेझाक
करून चालणार नाही. यासाठीच नव्या पिढीने त्यांच्या कार्यावरून नजर मारणे
गरजेचे आहे.
बालदिनानिमित्ताने किंवा नेहरूंबद्दल बोलताना, निबंध
लिहितीना, जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय
स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे
लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू व चाचा नेहरू या नावांनीही ओळखले
जातात. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे काश्मिरी पंडितांच्या घरी
झाला, या पलिकडे जाऊन कोणी काही वेगळे लिहिण्याचा, अभ्यास करण्याचा प्रयत्न
करत नाही. परिवारवाद, नेहरु गांधी घराणे यावर टीका करणे खूप सोपे आहे, पण
त्यांचा विचारही आज कुठेतरी समजून घेतला पाहिजे हेही लक्षात घेतले पाहिजे.
आज मुंबई महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात अनेक संस्था, योजना या
नेहरूंच्या नावाने आहेत, पण ते फक्त नावापुरते असणे योग्य नाही, तर त्यांचे
थोडेतरी कार्य आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. नामांतराने किंवा नावे
देऊन आणि नावे ठेवून कोणी लहान-मोठा होत नसतो, तर प्रत्येकजण मोठा होतो तो
त्याच्या कार्याने. त्याच्या कार्याचा गौरव म्हणून ही नावे दिली जातात.
आपल्याकडे जेवढे मोठे, महान नेते किंवा व्यक्तिमत्त्व आहेत, त्यापैकी
प्रत्येकजण गरिबीतून वर आलेला आहे. त्यांच्या संघर्षातून डोळयातून पाणी
येते. अगदी कोणी चायवाला असतो, कोणी हमाली करत असतो, कोणी वार लावून जेवत
असतो, पण नेहरूंच्या बाबतीत तसे नव्हते. ते चांदीचा चमचाच तोंडात घेऊन आले
होते. पण, तरीही त्यांना सामान्यांची जाण होती. ते कायम जमिनीवर होते.
जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खासगी शिकवण्यांद्वारे झाले.
वयाच्या 15 व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे
शिक्षणाकरिता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान या
विषयात पदवी घेतली. ते 1912 साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले.
विद्यार्थीदशेत असतानासुद्धा त्यांना पारतंत्र्यातील विविध देशांच्या
स्वातंत्र्यसंग्रामात रुची होती. आर्यलडमधील सिन फेन मुव्हमेंटमध्ये
त्यांनी विशेष रस घेतला.त्यामुळे भारतात परतल्यावर ते आपसूकच स्वातंत्र्य
चळवळीत खेचले गेले. हे सर्व शिक्षणामुळे, अभ्यासामुळे झाले होते.
1912 मध्ये झालेल्या बंकीपूर काँग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. 1919
मध्ये ते होमरूल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. 1916 मध्ये ते प्रथमच
महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले. 1920
साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा
काढला. 1920-22 दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा
लागला. सप्टेंबर 1923 मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे
सचिव बनले. 1926 मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंडलड, इंग्लंड, बेल्जियम,
जर्मनी आणि रशिया आदी देशांचा दौरा केला.
विकासासाठी परदेश दौरे करणे
क्रमप्राप्त आहे, हे तेव्हापासून आहे. त्यामुळे सध्याच्या पंतप्रधान
मोदींवर टीका करणा-यांनीही नेहरू, राजीव गांधीही परदेश दौरे करत होते, हे
विसरून चालणार नाही. 1928 मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरू केली.
1929 साली पंडित नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे
अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय निश्चित केले गेले. 1930
ते 1935 दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि अशाच अन्य सत्याग्रहांमुळे नेहरूंना
अनेकदा कारावास भोगावा लागला. 14 फेब्रुवारी 1935 रोजी त्यांनी अल्मोडा
जेलमध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. सुटकेनंतर ते स्वित्झर्लंडलड,
इंग्लड, स्पेन आणि चीन येथे जाऊन आले. 7 ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय
काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतिकारी
घोषणा केली. पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना
अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले. ही त्यांची कैद ही सर्वात दीर्घकाळी पण,
शेवटची ठरली. एकंदर पं. नेहरूंनी 9 वेळा कारावास भोगला. 1945 मध्ये त्यांची
सुटका करण्यात आली. 1946 मध्ये ते दक्षिण पूर्व आशियाला जाऊन आले.
त्यानंतर 6 जुलै, 1946 रोजी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात
आले. 1954 पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.
पंतप्रधानपदाची पहिली माळ
गळयात पडल्यानंतर पंडित नेहरूंनी सर्वात प्रथम देशाच्या विकासासाठी नेमके
कसे धोरण असावे, याचा विचार केला होता. त्या काळात भांडवलशाही आणि डावी
विचारसरणी, अशा दोन टोकाच्या भूमिका सर्व जगभर होत्या. एकीकडे अमेरिकन
भांडवलशाही, तर दुसरीकडे रशियन साम्यवादी विचारसरणी. बाकी सगळे देश या दोन
देशांचे अनुकरण करत असतानाच भारताने मात्र, मिश्र अर्थव्यवस्थेचे धोरण आखून
दोन्हींचा समतोल साधत दोन्ही विचारसरणीचे फायदे मिळवण्याचा प्रयत्न केला.
हे नेहरूंच्या विचारसरणीचे महत्त्व आहे. त्यामुळेच जेव्हा भाकरा नांगल
धरणाचे उद्घाटन त्यांनी केले, तेव्हा त्यांनी स्पष्ट केले होते की, आता
विकासकामातून आपल्याला प्रगती साधायची आहे. आता देवधर्म, तीर्थयात्रा यात
वेळ घालवण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. अशी धरणे हीच
या देशाची तीर्थस्थाने आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. आराम हराम
आहे, ही घोषणा देऊन त्यांनी कृषी विकासावर भर देण्याचा संकल्प केला होता.
महात्मा गांधींनी खेडयांकडे चला, असे सांगितले असताना नेहरूंनी
ग्रामविकासाठी कृषी विकासाला प्रोत्साहन दिले होते, हे लक्षात घेतले
पाहिजे. त्यासाठी त्यांनी आराम हराम ़है ही घोषणा दिली होती.
गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०
आराम हराम है।
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा