गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०
दिवस राज्य नाटय स्पर्धेचे
दिवाळी झाली की, त्यानंतर येणाºया पहिल्या सोमवारपासून संपूर्ण महाराष्ट्रात राज्य नाट्य स्पर्धा सुरू होतात. संपूर्ण महाराष्ट्रातून प्राथमिक फेरी सुरू झाली की, नाट्यरसिकांना एक पर्वणी असते, पण यावर्षी हा आनंद कलाकार आणि प्रेक्षक या दोघांपासून हिरावून घेतला गेला आहे. खरंतर मराठी माणूस म्हटला की, तो नाटकप्रेमी असतोच. त्यामुळे पंधरा-वीस दिवस ही स्पर्धेतील नाटके पाहणे म्हणजे मोठा उत्साह असतो, पण तो यावर्षी मावळला आहे.
खरंतर राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत अशा प्रकारची स्पर्धा घेणारे महाराष्ट्र हे देशातीलच नव्हे, तर जगातील एकमेव राज्य आहे. कोणत्याही देशात सरकारकडून अशा स्पर्धा घेतल्या जात नाहीत, पण आपल्या महाराष्ट्राचे हे फारमोठे वैशिष्ट्य आहे. ती परंपरा कायम राहण्याची गरज आहे. दिवाळीचा उत्साह संपल्यावर, मस्तपैकी थंडीत स्वेटर घालून, शाली पांघरून ही नाटके पहायला जाण्याचा आनंद वेगळाच असतो.
सरकारने या स्पर्धेत, त्याच्या आयोजनात, नियमात अनेक वेळा बदल केले आहेत. चांगले कलाकार, लेखक, दिग्दर्शक मिळावेत यासाठी सरकारकडून ही स्पर्धा घेतली जाते. जास्तीत जास्त कलाकारांना संधी मिळावी म्हणून या स्पर्धा प्रत्येक जिल्हा पातळीवर आयोजित केल्या जात होत्या. १९८८ पर्यंत या स्पर्धा नागरी आणि अनागरी अशाप्रकारे घेतल्या जात होत्या. नागरी स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत असायची, तर अनागरीची अंतिम फेरी साताºयात असायची, पण १९८८ ला नागरी-अनागरी हा फरक दूर केला गेला आणि एकच स्पर्धा घेतली गेली. त्यामुळे ग्रामीण भागातील कलाकार आणि शहरी भागातील कलाकार यांच्यात चांगली स्पर्धा होऊ लागली.
१९९0 चे दशक हा या स्पर्धांचा सुवर्णकाळ होता. राज्यात २१ केंद्रं होती. प्रत्येक केंद्रातून दोन नाटके अंतिमसाठी जात होती. त्यामुळे महिना-दीड महिना अंतिमची फेरी चालायची. हे नाटकासाठी सुगीचे दिवस होते. यावर्षी या सुगीला दुष्काळ लागला आहे. १९९0 च्या दशकातील उत्तरार्धानंतर या स्पर्धांना थोडी घसरण लागली. याचे कारण दशकानुदशके त्याच त्या संहिता, तीच ती नाटके स्पर्धेत येऊ लागली. त्यामुळे प्रेक्षक कंटाळले. स्पर्धक संघ वेगळे असले तरी प्रेक्षकांना नाटके पाठ होती. परिक्षक दुर्लक्ष करत होते. तोच तो पणाला प्रेक्षक कंटाळले आणि एक वेळ अशी आली की, प्रेक्षक नाटकाला जाणेच थांबले.
प्रेक्षकांनी नाटकाला यावे यासाठी स्पर्धक संघांना जेवढी तिकीट विक्री होईल त्यातील अर्धा भाग स्पर्धक संघाला देण्याची योजना सरकारने आखली. त्यामुळे स्पर्धक संघ आपल्या ओळखीच्या लोकांना तिकिटे विकून प्रेक्षक मिळवू लागले, पण हे ज्या ठिकाणी स्पर्धा आहे, तिथल्या संघांना शक्य होते. बाहेरगावाहून आलेल्या संघांना त्याचा फायदा मिळत नव्हता. कारण ते ऐनवेळी नाटक करायला यायचे. सेट लावायचा की तिकिटे विकायची? फक्त परिक्षकांपुढे नाटक सादर करायचे. असे प्रकार होऊ लागले.
२000 च्या सुमारास या नियमात सरकाने महत्त्वपूर्ण बदल केला. तो खूप चांगला आणि धाडसी होता. तो म्हणजे नवीन नाटकच सादर करायचे, प्रस्थापित नाटक नाही चालणार. त्यासाठी असलेले रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण डीआरएम नंबर हा तीन वर्षांच्या आतला असला पाहिजे. चांगले लेखक तयार होण्यासाठी हा निर्णय घेतला, पण त्यामुळे नाटकाची संहिता मिळेना म्हणून अनेकजण स्पर्धेतून बाहेर पडले. हा नियम चार-पाच वर्ष टिकला, पण शेवटी स्पर्धक संख्या वाढावी म्हणून सरकारने पुन्हा एकदा नियम बदलला आणि जुनी नाटके सादर केली तरी चालतील हा नियम केला.
अनेक चांगले कलाकार यात आले. नवे लेखक या स्पर्धांनी दिले, पण प्रस्थापित नाटकांची जुन्या नाटकांची हौस काही कमी झाली नाही. यात तरुण तुर्क म्हातारे अर्क, काका किशाचा, सविता दामोदर परांजपे, सूर राहू दे, धुम्मस, काळोख देतं हुंकार, मोरूची मावशी, अशी कितीतरी नाटके वर्षानुवर्षे होतात. ती अजूनही होत आहेत, पण ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. यावर्षी त्या परंपरेलाही खिळ बसली आहे. गेल्या साठ वर्षांत पहिल्यांदाच दिवाळीनंतरचा पहिला सोमवार हा राज्य नाट्य स्पर्धेशिवाय जात आहे.
या स्पर्धेसाठी दिवाळीपूर्वी तीन-चार महिने अगोदर हौशी कलाकारांची लगबग सुरू व्हायची. नाटक निवडायचे. कलाकार मिळवायचे. पूर्वीच्या काळात स्त्री कलाकार मिळवणे हे फार मुश्किलीचे असायचे. फॉर्म भरायचा. त्याबरोबर संस्थेची माहिती, पुरावे देणे, लेखकाची परवानगी मिळवणे, त्या फॉर्मची स्कृटीनी या सगळ्या धावपळीत कलाकार, दिग्दर्शक, संयोजक यांना ना घरचा गणपती, नवरात्र कशाचे भान असायचे ना कुठे वेळ दिला जात होता. कित्येक वेळा घरच्यांचा विरोध पत्करून अशी कामे केली जात होती. कामधंदा करा काहीतरी, बास झाली नाटकं, अशा कानपिचक्या घरातून मिळायच्या. त्यातून सगळ्या उचापती करून, वर्गणी काढून नाटकात अभिनय करायचा, प्रयोग चांगला झाला हे एक वाक्य ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील हौशी कलाकार आसुसलेले असायचे.
त्याकाळी या स्पर्धाचे स्थानिक आणि मान्यवर वर्तमानपत्रातून परिक्षणही यायचे. आपल्या नाटकावर काय लिहिले आहे या ओढीपोटी दुसºया दिवशी सकाळी पेपर घेऊन यायचा. त्यात चांगले छापले असेल तर धन्य मानून निवांत झोपायचे, निकालापर्यंत असा कलाकारांचा दिनक्रम होता. यावर्षी हे काही नाही.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा