आपण रूपेरी पडद्यावरचे जे तारे तारका पाहतो त्यांचा कधी ना कधी स्टेजशी, रंगभूमीशी संबंध आलेला असतोच. किंबहुना रंगभूमीची पार्श्वभूमी असलेला कलाकार हा कसलेला कलाकार असतो हे दिसून आले आहे. अनेकजण अपघाताने आपल्या चेहरापट्टी, सौंदर्याच्या जोरावर थेड रूपेरी पडद्यावर पदार्पण करतात. पण त्यांची चेहर्यावरची जादू संपली की ते कलाकार ठोकळे सरकवल्याप्रमाणे बाजूला पडतात. पण रंगभूमीवर काम केलेला कलाकार काही ना काहीतरी प्रयोगशील कामगिरी करत दीर्घकाळ आपली कारकीर्द गाजवतो. अशीच दीर्घकाळ लक्षात राहणारी कारकीर्द गाजवली ती सोहराब मोदी का कलाकाराने. नव्या पिढीला हे नाव कदाचित माहिती नसेल. कारण सध्या आपल्याला फक्त एकच मोदी माहिती आहेत. पण काही दशकांपूर्वीही रंगभूमी आणि रूपेरी पडद्यावर असेच दीर्घकाळ राज्य करणारे मोदी होउन गेले आहेत, त्यांचे नाव सोहराब मोदी.
सोहराब मोदी हे एक भारतीय स्टेज अॅक्टर आणि चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांच्या चित्रपटांमध्ये शेक्सपिअरच्या हॅमलेट, सिकंदर, पुकार, पृथ्वी वल्लभ, झांसी की राणी, मिर्झा गालिब, जेलर आणि नौशरवान-ए-आदिल यांचा समावेश होता. त्यांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच सामाजिक आणि राष्ट्रीय समस्यांविषयी संदेश दिला जात होता. अर्थात ही किमया होती ती रंगभूमीवर दिलेल्या योगदानाची. साधारणपणे आपल्याकडे रंगभूमीवर काम केलेले लोक अशाप्रकारे सामाजिक बांधीलकी जपणारे आणि संदेश देणारे काम करत असतात.सोहराब मेरवानजी मोदी यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1897 मध्ये मुंबई येथे झाला. शालेय शिक्षण झाल्यानंतर ते आपला भाऊ केकी मोदी यांच्यासमवेत ग्वाल्हेरमध्ये ट्रॅव्हल एक्झिबिटर म्हणून काम करू लागले. त्या काळात त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी ग्वाल्हेरच्या टाऊन हॉलमध्ये प्रोजेक्ट चित्रपटांचा वापर केला होता. त्यानंतर त्यांनी आर्य सुबोध थिएटर कंपनी स्थापन केली.
विशेष म्हणजे दादासाहेब फाळकेंनी नुकतीच चित्रपटाची मूहूर्तमेढ रोवली होती, त्या काळात हे तंत्रज्ञान सोहराब मोदींनी आत्मसात केले होते. त्या काळात मूक चित्रपटांचा काही अनुभव घेऊन पारसी थिएटर अभिनेता म्हणून सोहराबची सुरुवात झाली. त्यानी आपल्या भावाच्या नाट्यसंस्थेसमवेत संपूर्ण भारतभर प्रवास केला आणि प्रत्येक वेळी पडदा पडल्यावर प्रेक्षकांनी त्यांचे कौतुक केले.
मूकपट होते तेंव्हा रंगभूमीवरील नाटके जोरात चालत होती. पण जसे बोलपट किवा दृकश्राव्य चित्रपट आले तशी रंगभूमीची पडझड झाली. त्याचा फटका स्टेश शो करणार्या सोहराब मोदींना बसला. त्यामुळे त्यांनी लगेच काळाची पावले ओळखत तत्कालीन परिस्थितीत आपला मोर्चा रंगभूमीकडून पडद्याकडे वळवला.
बोलपटाच्या आगमनाने थिएटरमध्ये घसरण होत होती. पण सोहराब मोदींचे सर्वात प्रथम प्रेम हे रंगभूमी होते. त्यामुळे या मरणपंथाला पडलेल्या रंगभूमीला बचाव करण्यासाठी मोदींनी स्टेज फिल्म कंपनीची स्थापना केली. याची कल्पना अशी होती की रंगभूमीवरची गाजलेली नाटके चित्रपटांच्या स्वरूपात लोकांना पहायला मिळावीत. म्हणजे आपल्याकडे गेल्या पाच सात वर्षात अनेक मराठी नाटकांवर जसे च्या तसे चित्रपट बनवले गेले. कट्यार काळजात घुसली, नटसम्राट, सविता दामोदर परांजपे अशी कितीतरी नाटके पडद्यावर आली. पण तो प्रयोग साधारण 1935 च्या दरम्यान म्हणजे 80 वर्षांपूर्वी सोहराब मोदींनी केला होता. त्यामुळे त्यांचे पहिले दोन चित्रपट नाटकांच्या चित्रीकरणाच्या चित्रीकरणावर होते. खुशी का खुन हे हेमलेटचे रूपांतर होते आणि नसीम बानो यांच्या अभिनयाची ओळख होती. दुसरा, सैद-ए-हवास शेक्सपियरच्या किंग जॉनवर आधारित होता. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. कारण लोकांना नाटक असे बंदीस्त कॅमेर्यात बघणे पचनी पडले नाही. त्यात जीवंतपणा दिसला नाही. भरपूर मेहनत घेऊन केलेले हे चित्रपट प्लॉप झाले पण त्यातून सोहराब मोदीसारखा हिरा मात्र रूपेरी पडद्याला मिळाला होता, हीच एक जमेची बाजू होती.
आजच्या दिवशी म्हणजे 2 नोव्हेंबरला 1897 मध्ये सोहराब मोदींचा जन्म पारशी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भारतीय शासकीय सेवेत होते. त्यांचे बालपण उत्तर प्रदेशातील रामपूर येथे गेले आणि तेथे त्यांना हिंदी आणि उर्दू भाषेची आवड निर्माण झाली. सोहराब मोदी यांचे लग्न मेहताब मोदीशी झाले होते. गुजरातमधील प्रतिष्ठीत अशा कुलीन मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या अभिनेत्री, ज्याने आपल्या पारख या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली, त्यांच्याशी सोहराब मोदींनी लग्न केले होते.
त्यानंतर 1936 मध्ये सोहराब मोदींनी मिनव्हार्र् मोव्हिएटोन लाँच केले. मिनेर्व्हा येथील त्यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये मीठा झेहर मधील मद्यपान आणि महिलांना घटस्फोट घेण्याचा हक्क यासारख्या समकालीन सामाजिक मुद्द्यांशी संबंधित होते. त्या काळात दारूबंदी आणि महिलांच्या हक्कावर चित्रपट काढणे खूप धाडसाचे होते. ते काम सोहराब मोदींनी केले होते. हे चित्रपट चांगले चालले होते. पण मोदींना मात्र ऐतिहासिक भूमिका करण्याचेच कायम आकर्षण होते. त्यांची ती एक शैली बनली होती. त्यामुळे ऐतिहासिक पोषाखी चित्रपटातील कलाकार म्हणून सोहराब मोदींची ओळख झाली. मीनर्वा मोविटोन हे ऐतिहासिक ऐतिहासिक पोषाखी चित्रपटांसाठी म्हणूनच ओळखले जाऊ लागले. यामध्ये पुकार, सिकंदर आणि पृथ्वी वल्लभ या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. हे चित्रपट तत्कालीन तंत्र आणि उपलब्धता पाहता खूपच भव्यदीव्य असे होते. संगणक युग नसताना केलेली ही कामगिरी फार भव्य अशी होती. यातील पुकार हा हा मुघल सम्राट जहांगीरच्या जीवनावर आधारीत पण काल्पनिक असा होता. जहांगिराची न्यायव्यवस्था, त्याची दरबारी यंत्रणा यातून दाखवली होती. तसेच जहांगीरच्या न्यायाच्या न्याय्य भावनेवर प्रकाश टाकला. मुघल काळातील भव्य दरबार आणि वाड्यांमध्ये अनेक मुख्य देखावे लोकेशनवर चित्रीत करण्यात आले होते, ज्यामुळे चित्रपटाला एकप्रकारचे वास्तवादी चित्र दाखवता आले. स्टुडीओतील सेटचा वापर न करता अनेक खर्या राजवाड्यांचा वापर करून भव्य चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटाला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. मोदींचा सर्वात मोठा चित्रपट म्हणजे सिकंदर होता. यात पृथ्वीराज कपूर यांना मुख्य भूमिकेत घेतले ती भूमिका पृथ्वीराज कपूर यांनी अजरामर केली होती. हा महाकाव्य चित्रपट इसवी सन पूर्व काळातील वातावरण दाखवणारा होता. जेव्हा अलेक्झांडर द ग्रेट, पारस आणि काबूल खोरे जिंकून घेतल्यावर झेलम येथे भारतीय सीमेवर उतरला आणि पोरस (मोदी) याच्याशी सामना करण्यासाठी येतो त्या कथानकावरचा हा चित्रपट होता. यात पौरसाची भूमिका सोहराब मोदींनी केली होती. अतिशय भव्यदीव्य अशी ही कलाकृती होती. या चित्रपटाचे ब्रिटीशांनी खूपच कौतुक केले होते. या दिग्गज कलाकाराला 1980 साली दादासाहेब फाळके या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा