बिहार विधानसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा पार पडताच कधी एकदा सांगतो असे झालेल्या उतावीळ वाहिन्यांनी आपले अंदाज व्यक्त केले. सर्वांनी बिहारमध्ये सत्तांतर होणार असे अंदाज वर्तवले. अगदी तेजस्वी यादव हा सर्वात तरूण मुख्यमंत्री होणार इथपासून ते शपथविधीची तयारीही सुरू केली होती. पण एकाचाही अंदाज खरा ठरला नाही आणि भाजप संयुक्त जनता दल आघाडीचे सरकारच पुन्हा इथे सत्तेवर येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एक्झीट पोलचे अंदाज चुकल्याचे दिसून आले आहे. एकदाही एक्झीट पोलचे अंदाज या देशात बरोबर आलेले नाहीत, कोणत्याही संस्थेचा अंदाज आजपयर्र्ंत निकालाच्या जवळपास पोहोचलेला दिसत नाही. त्यामुळे आता हे प्रकार बंद झाले पाहिजेत. एक्झीट पोलचीच राजकारणातून आता एक्झीट झाली पाहिजे.
2014, 2019 आणि त्याही आधीच्या अनेक निवडणुकीत अशा प्रकारचे अंदाज वर्तवले होते. 1989 ला हा प्रयोग सर्वात प्रथम आपल्याकडे केला गेला होता. त्यावेळी विनोद दुवांनी यात पुढाकार घेतला होता आणि बर्यापैकी कल त्यांनी दाखवले होते. किंबहुना काँग्रेसचे सरकार जाऊन तिथे जनता दलाचे सरकार येईल असा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे निकाल आलेही. पण त्यानंतर हा एक धंदा बनला. एखाद्या पक्षाला प्रमोट करण्यासाठी, सेट करण्यासाठी एक्झीट पोलच नाही तर निवडणूक पूर्व अंदाज, आज निवडणुका झाल्या तर काय होईल असे अंदाज घेण्याचे प्रकार होऊ लागले. विशेषत: वाहिन्यांकडे दाखवायला काही चटपटीत नसते तेंव्हा असे अंदाज वर्तवून त्यावर चर्चा करायला विश्लेषकांना बोलावले जाते, त्यात वायफळ चर्चा म्हणजे हवेत गोळीबार केलेला दिसून येतो. हे फारच हास्यास्पद होताना दिसते आहे, म्हणून या प्रकारांवर बंदी घातली पाहिजे किंवा अशा संस्थांनी एक्झीट पोल, प्री इलेक्शन पोल यापासून एक्झीट घेतली पाहिजे.
2014 ला मोदी लाट जोरात असतानाही एक्झीट पोलमध्ये भाजपला 200 आणि एनडीएला 230 च्या वर जागा देण्यास कोणी तयार नव्हते. मोदी जादुई आकडा गाठण्यासाठी कोणाची मदत घेणार यावरच चर्चा होती. पण प्रत्यक्षात भाजपला 283 जागा मिळाल्या तर एनडीएला 300 पेक्षा जास्त जागा मिळाल्या. एकटा भाजप बहुमतात होतात. पण कोणाचाही अंदाज खरा ठरला नव्हता.
2019 च्या लोकसभा निवडणुकीतही तेच झाले. यावेळी मोदींची लोकप्रियता घटली आहे, मोदींची जादू आता चालणार नाही असे सांगून 2014 इतके यश भाजपला मिळणार नाही. उत्तर प्रदेशात फटका बसणार असे सांगून भाजपला 190 ते 200 आणि एनडीएला पुन्हा 240 च्या आत आणून ठेवले होते. हाही अंदाज साफ चुकला होता. भाजपने आता स्वबळावर 303 आणि एनडीएने 330 चा आकडा गाठला होता. त्यामुळे सर्व संस्थांचे अंदाज साफ चुकले होते.
या कालावधीत झालेल्या सर्व विधानसभा निवडणुकीतही असेच अंदाज चुकले होते. गुजरातमध्ये मोदी नसल्यामुळे सत्तांतर होणार सांगितले पण भाजपने सत्ता राखली होती. मोदी मुख्यमंत्री नव्हते तरी भाजप सत्तेत आली होती. 2018 ला मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या विधानसभा निवडणुकीत सगळीकडे भाजप सत्ता राखेल असा अंदाज एक्झीट पोलनी वर्तवला होता. पण केंद्रात भाजपची सत्ता असूनही ही तीनही राज्ये भाजपला गमवावी लागली, इथे सत्तांतर झाले होते. त्यामुळे इथेही सर्व अंदाज चुकलेच होते. महाराष्ट्र, पंजाब, हरयाणा, कर्नाटक या सर्व विधानसभा निवडणुकांतही तोच प्रकार पहायला मिळाला होता. अचूक अंदाज वर्तवणारी एकही वाहिनी किंवा संस्था नव्हती. त्यामुळे एक्झीट पोल हे एक्झॅक्ट पोल नसतात तर मॅनेज केलेे जातात हे दिसून आलेले आहे. म्हणून या पोलचीच आता एक्झीट होणे गरजेचे आहे.
एक्झीट पोल हे एक करमणुकीचे आणि अंदाजे चर्चा करण्याचे साधन बनत चालले आहे. म्हणजे असे अंदाज वर्तवायचे आणि त्यावर सर्व पक्षांच्या नेत्यांना चर्चा करायला लावायच्या. मग स्वप्नरंजनात या चर्चा केल्या जातात. ज्याची हार होताना दाखवले जाते त्यांच्यावर सगळे अन्य पक्ष तोंडसुख घेताना दिसतात. जो विजयी झाल्याचे दाखवले जाते, त्याचे कौतुक केले जाते. पण जेंव्हा खरा निकाल येतो आणि एक्झीट पोलच्या विरोधात निकाल लागतो तेंव्हा या सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे असतात. अक्षरश: उचलून आपटणे म्हणतात तसाच तो प्रकार असतो. चुकीचे अंदाज व्यक्त करून एखाद्याला उचलून धरायचे आणि जोरदार आपटायचे असा प्रकार होतो. बिहारमध्ये नेमके तेच झालेले पहायला मिळाले.
तेजस्वी यादवला 7 तारखेच्या शनिवारी सायंकाळी एक्झीट पोलच्या वाहिन्यांनी अक्षरश: हिरो करून टाकले. त्याच्यावरची जास्तीत जास्त माहिती दाखवली जाऊ लागली. त्याला इतके कव्हरेज दिले गेेले की विचारायलाच नको. पण निकाल लागल्यावर नंतर याच वाहिन्यांनी त्याच्याकडे इतकी पाठ फिरवली की मिडीया फक्त नितिशकुमारांभोवती फिरू लागला. हा लोचटपणा चुकीचे अंदाज वर्तवल्याने करावा लागला. म्हणूनच कोणतेही शास्त्रीय तंत्र हातात नसताना 5 कोटी मतदारांपैकी 5 हजार मतदारांची मते जाणून घेऊन अंदाज कसा काय वर्तवला जाऊ शकतो? या चुकीच्या प्रकाराला आता कायद्याने आळा घातला पाहिजे. जनतेची दिशाभूल करण्याचे हे प्रकार आहेत. म्हणूनच आता एक्झीट पोललाच एक्झीट करा म्हणायची वेळ आलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा