राज्यातील कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी सरकारने फटाकेमुक्त दिवाळीचे
आवाहन केले. पण त्यामुळे विरोधकांचे चांगलेच पित्त खवळले आणि त्यावर टिका
सुरू झाली. वास्तविक सरकारने फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा असे फक्त आवाहन
केले होते, फटाक्यांवर बंदी घातली नव्हती किंवा फटाके वाजवले म्हणून कोणाला
शिक्षा केली जाणार असल्याचेही जाहीर केले नव्हते. पण फटाक्यांच्या धुराने
जो त्रास होईल तो सहन करण्याची ताकद आमच्यात आहे का याचा कोणीच विचार केला
नाही. काही काही स्थानिक प्रशासनांनी याबाबत ठोस निर्णय घेतले. नाशिकमध्ये
फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प काही जणांनी केला आहे, ही स्वागतार्ह बाब आहे.
मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर बंदी घातली आहे. ही
बाब योग्यच आहे. ती सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवणे हे केवळ कोरोनाच्या
काळातच नाही तर कायमच ती बंदी असली पाहिजे. त्याचप्रमाणे
मुंबईत फुलबाजा
किंवा पाऊस असे मोठा आवाज नसलेले फटाके फोडण्यास फक्त दिवाळीच्या रात्री 8
ते 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. हा योग्य निर्णय आहे. त्याचे
स्वागतच केले पाहिजे. लक्ष्मीपूजनाला फटाके उडवायची प्रथा आहे ना मग करा
त्या दिवशी संध्याकाळी धूर. कसलीही बंदी घातली नाही. वास्तविक दिवाळीचा आणि
फटाक्यांचा संबंध कोणत्याही शास्त्रात, पोथी पुराणात, वेदात, सणांच्या
इतिहासात नाही. तरीही काही जणांना हा हिंदू धर्मावर अन्याय असल्याचे वाटते
आणि चुकीचे वक्तव्य करून उगाच विरोध केला जातो. हा विरोध फक्त विरोधासाठी
विरोध आहे.
एका महाभागांनी वक्तव्य केले की जर बकरी ईदला बकरा मुक्त ईद
साजरी केली तरच आम्ही फटाकेमुक्त दिवाळी करू. याचा काही संबंध आहे का? त्या
सणाचे नावच बकरी ईद आहे. आपल्या सणाचे नाव दीपावली आहे. दिव्याची आरास
आहे. फटाक्यांची रोषणाई नाही. फटाक्यांनी रोषणाई कधीच होत नाही. काही सेकंद
जळून उजेड निर्माण करणारी आपली दिवाळी नाही. फुलबाजी, झाडे किंवा पाऊस,
अन्य फटाके फुटताना उजेड निर्माण करतात पण तो काही सेकंदाचा असतो. पण पणती
तासंतास तेवत असते आणि अंध:कार दूर करते. अशा असंख्य पणत्यांनी, दिपमाळांनी
किंवा विद्युत रोषणाईने हा सण साजरा करता येईल. त्यालाच दिवाळी म्हणतात.
दिवाळीच्या नावातच दिवा आहे, फटाका नाही. फटाक्यांनी साजरी केली तर ती
फटाकडी होईल. पण केवळ विरोधासाठी विरोध करण्याच्या हेतुने बकरी ईदशी तुलना
केली. अन्य कुठल्या सणाला असे आवाहन केले होते का? साधेपणाने करा पण
देवपूजा, कुळाचार, सण साजरे करण्यास परवानगी दिली होती. गणेशोत्सवात
मूर्तींचा आकार मर्यादीत करायला सांगितला पण गणपतीमुक्त गणेशोत्सव करा असे
नाही सांगितले. नवरात्रातही दांडिया, गर्बा यासाठी गर्दी करू नका सांगितले
पण देवी बसवू नका, नंदादीप लावू नका असे सांगितलेले नव्हते. त्यामुळे
कोणत्याही धार्मिक भावना सरकारने दुखावलेल्या नसताना केवळ विरोधासाठी वाटेल
ती वक्तव्ये करणे हा विरोधकांचा पोरकटपणा आहे.
रविवारी
मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी ही गोष्ट स्पष्ट केली होती.
म्हणजे दिल्लीत कोरोनाचा आकडा वाढत आहे, पाश्चिमात्य देशांत पेशंट वाढत
आहेत. दिल्लीत प्रदूषण वाढलंय. त्यामुळे कोरोनाचा विषाणू घातक परिणाम करतो
आणि परिस्थिती हाताबाहेर जाते. त्यामुळे दिवाळीत हे प्रदूषण टाळण्यासाठी
फटाके फोडण्याआधी विचार करा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
नागरिकांना केलं. आवाहन आणि बंदी यात खूप फरक आहे. सावध करण्याचे काम
मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे. पण आगीत हात कोणाला घालायचा असेल तर घालू
देत, पोळल्यावर बसेल गप्प. तसाच हा प्रकार आहे.
मुख्यमंत्र्यांनी अगदी
स्पष्टपणे सांगितले होते की, बंदी घालण्यापेक्षा सामंजस्यानं फटाके
वाजवायचे नाहीत, हे ठरवा. सार्वजनिक ठिकाणी अजिबात फटाके वाजवायचे नाहीत,
असंही त्यांनी आवाहन केले होते. दिवाळीत रोषणाई जरूर करा, दिवे पेटवा, पण
फटाके वाजवू नका. आपल्या परिसरात कुणाला त्रास होणार नसेल तर वाजवू शकता,
असेही स्पष्ट केले होते. तरीही दिवाळीची तुलना बकरी ईदशी करण्याचा पोरकटपणा
केला जातो, हे चुकीचे आहे.
आता हळूहळू थंडीचे प्रमाण वाढते आहे.
दिवाळीनंतरचे 15 दिवस फार कसोटीचे आहेत. कारण पाश्चिमात्य देशांत कोरोनाची
दुसरी लाट आली आहे. इंग्लंडमध्ये तर पुढचे 4 ते 6 आठवडे कडक लॉकडाऊन
लावण्यात आला आहे. थंडीला सुरुवात होत आहे आणि कोरोनाचे रुग्ण वाढत आहे,
त्यामुळे आता ही दुसरी लाट नाही तर त्सुनामी आहे, असं उद्धव ठाकरे यांनी
रविवारी स्पष्ट केले होते. इतके सगळे असूनही विनाकारण हा प्रश्न
प्रतिष्ठेचा, संवेदनशील बनवायचा चाललेला प्रयत्न हाणून पाडला पाहिजे.
फटाक्यांच्या धूराने त्रास हा होतोच. त्यामुळे दिवाळीचा खरा आनंद
घेण्यासाठी दिवाळीपासून अगदी नववर्ष स्वागताच्या रात्रीही फटाके फोडता कामा
नयेत. 2020 ला बायबाय म्हणतानाही आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना
फटाक्यांची आतषबाजी केली जाते त्यावरही बंदी आणण्याची गरज आहे. ती
कायद्याने नाही तर आपण मनाने आणली पाहिजे. विरोधासाठी विरोध करणे सोडून
दिले पाहिजे.
गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०
विरोधासाठी विरोध
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा