आपल्याकडे कोणी काही टीका केली, विरोधात बोलले की भावना दुखावतात, मनं दुखावतात. त्यामुळे अशा टीकाकारांना, कडवट बोलणारांना रोखायची भाषा केली जाते. पण त्याहीपेक्षा वाईट प्रकारे वर्तन करणारी माणसं आपल्याला दैनंदिन बघायला मिळतात. त्यांना कोण रोखणार असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. आज संपूर्ण जग हे कोरोनाच्या महामारीने वेढले आहे. स्वच्छता आणि टापटीपपणा याबाबत सातत्याने जनजागृती केली जात आहे. अगदी कोणताही फोन लावला तर आपल्याला स्वच्छतेबाबत काही सेकंद ती रेकॉर्ड ऐकायला लागते आणि मगच रिंग वाजते. पण हे सगळे करूनही काही लोकांना फरक पडत नाही. ते जैसे ते वागताना दिसतात. म्हणूनच यांना कोण रोखणार असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. आपण रस्त्याने जाताना बघतो तर अनेकजण बिनधास्तपणे रस्त्यावर थुंकताना दिसतात. कुठेही थुंकू नका, स्वच्छता राखा असे बोर्ड लावूनही, सतत घोषणा करूनही लोक ते ऐकून न ऐकल्यासारखे करतात. तेंव्हा प्रचंड राग येतो. आता लोकांना मास्क घालून थुंकायचीही सवय लागली आहे. मास्क घातल्यावर थुंंकणाराचे प्रमाण कमी होईल असे वाटले होते. पण बरोबर मास्क बाजूल करून अगदी ऐटीत थुंकणारांचे प्रमाण सर्वत्र दिसते. त्यामुळे या थुंकणारांना आवरण्याची गरज आहे. थुंकून घाण करणारांना दंड आकारला जाईल असे बोलले जाते. पण याची तक्रार कोण आणि कुठे करणार? त्याबाबत कसलीही नियमावली ही नाहीच. किंबहुना ही कारवाई नक्की कोणी करायची? महापालिकेने करायची, रेल्वे प्रशासनाने करायची, राज्य सरकारने करायची, केंद्र सरकारने करायची की पोलिसांनी कारवाई केली पाहिजे? कोणी आपल्याला विचारणार नाही हा भ्रम या थुंकणारांचा असतो. त्यामुळे ते बिनधास्त कुठेही थुंकत असतात. हे फार वाईट आहे. पण यांना सांगणार कोण? साधारणपणे असे थुंकणारे, तंबाखू, पान, गुटखा खाणारे भांडखोर आणि गुंड प्रवृत्तीचे असतात. त्यामुळे त्याना इथे का थुंकला असे कोणी विचारायला जात नाही. जर एखाद्याने विचारलेच तर तो थुंकणारा लगेच आपल्या बापाचा उद्धार करतो. ही जागा काय तुझ्या बापाची आहे का असा दांडगट सवाल करतो. त्यामुळे असल्या घाणेरड्या लोकांशी वाद कोण घालणार? त्यामुळेच अशा लोकांना आवरण्याची गरज आहे. हे खरे साथीचे रोग पसरवणारे लोक आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि आता बहुतेक शहरांमधून ही कबुतरांची समस्या फार मोठी आहे. सकाळच्या वेळात अनेकजण या कबूतरांना खायला घालत असतात. आपले औदार्य दाखवत असतात. पण हे कबुतरांचे थवे इतके भयानक असतात. की संपूर्ण रस्ता फुटपाथ त्यांनी पादाक्रांत केलेला असतो. अनेक दुकानदार आपल्या दुकानच्या दारातच धान्य टाकून कबूतरे जमवून बसतात. आपण त्या रस्त्याने जात असतो आणि एकदम तो थवा उडतो. उंच इमारतीच्या कोपर्याकोपर्यात, तारांवर, झाडांवर ही कबूतरे जातात. मग उडताना तो कबूतरांचा थवा इतकी घाण करतात की आपण आंघोळ करून बाहेर पडलेलो असलो तरी आपल्याला त्या घाणीला सामोरे जावे लागते. अनेक कबूतरांची पिसे पडतात, ते धान्याचे तुकडे, चोथा, विष्ठा काय वाटेल ते पडते. आपल्या कपड्यावर अंगावर घाणीचे डाग पडतात. दररोज शेकडो हजारो लोकांना या कबूतरांचा असा त्रास भोगावा लागतो. त्यांच्या अंगावर पिसवांसारखे बारीक किडे असतात. त्यामुळे त्वचा विकार होतो. तसेच या कबूतरांच्या पंखांचे केस आपल्या नाका तोंडात गेल्याने अस्थमासारखे आजार होतात. अनेक प्रकारचे जंतू, विषाणू पसरवण्याचे काम हे कबूतरांचे थवे करत असतात. नागरी भागात इतक्या मोठ्या प्रमाणात होणारा हा संसर्ग, हा रोगांचा प्रसार आपण दैनंदिन पहात असतो. पण यांना कोण रोखणार? सरकारने काही दिवसांपूर्वी सुट्या सिगारेट विक्रीला बंदी घातली होती. तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई केलेली होती. पण सर्रास सर्व पानपट्ट्यांवर सिगारेटची किरकोळ विक्री करताना दिसते. रस्त्याने जाताना लोक सिगारेट ओढत जात असतात. आजबाजूला महिला आहेत, रहदारी आहे याचेही भान अनेकांना नसते. नाकावर रूमाल धरूनच आपल्याला त्या धुरातून वाट काढावी लागते. आता तर नाकातोंडावर मास्क आहेत. पण तरीही त्या धूराचा त्रास हा होतोच. त्यामुळे या सर्वांवर दंडात्मक कारवाई कोणीच का करत नाही? रस्त्यावर थुंकणारांकडून दंड वसूली केली तर त्यातून सरकारला इतका महसूल मिळेल की सरकारची कोरोनामुळे रिकामी झालेली तिजोरी भरून निघेल. फक्त कारवाई करणारे हवेत. त्यासाठी जागोजागी तसे पोलीस, महापालिका, पालिका, सिडको अशा संस्थांचे आरोग्यदूत असले पाहिजेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे कोणी अस्वच्छ वर्तन करत असेल तर त्याची तक्रार करणारे लोक पुढे आले पाहिजेत.त यांना निर्भयपणे अशा तक्रारी करता आल्या पाहिजेत. यासाठी दंडाची जी काही रक्कम असेल त्यातील 10 ते 25 टक्के रक्कम बक्षिस म्हणून अशा तक्रारकर्त्यांना दिली पाहिजे. जेणेकरून अशा प्रोत्साहनाने अनेक लोक हे काम करायला पुढे येतील. यातून अनेकांना रोजगार मिळू शकतो. आपल्याकडे कायदे चांगले आहेत पण त्याची अंमलबजावणी नसल्याने सगळे वांधे झालेले आहेत. अनेकजण अमेरिकेत असे आहे, इंग्लंड मध्ये तसे आहे, फ्रान्समध्ये स्वच्छता आहे, जपानमध्ये स्वच्छता आहे असे कौतुकाने सांगतात. हे सांगताना हातात सिगारेट धरून त्याचे थोटूक रस्त्यावर टाकतात. मग तुमचा परदेशात जाउन उपयोग तो काय? या देशाच्या मातीवर कचरा, घाण करण्यासाठी तुम्ही इथे आला आहात का? अशा अनेक गोष्टींना आवर घालण्याची गरज आहे. आम्ही फार सहनशील आहोत. आमच्याकडे घाण केली तर चालते. हे मुंबईत यूपी बिहारचे भय्ये येतात ते इतके ठिकाणी पान तंबाखू गुटखा खाउन थुंकत असतात की त्यांना सरळ करण्यासाठी कोणतीही राजकीय संघटना पुढे का येत नाही असा प्रश्न पडतो. पण सरकारकडून, देशाकडून आपल्या हक्कासाठी, अधिकारासाठी भांडणारे, रस्त्यावर उतरणारे लोक अशाप्रकारे घाण करतात तेंव्हा त्यांना याची जाणीव करून देण्याची गरज असते.
|
Displaying 0211-PUN-CFT-03.pdf.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा