गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०

मालिकांमधील नैतिकता संपते आहे


 गेले चार वर्ष झी मराठीवर धूमाकूळ घालणारी आणि प्रेक्षकांवर लादलेली मालिका म्हणजे माझ्या नवर्‍याची बायको. वास्तविक त्या मालिकेचे कथानक केव्हाच संपले होते, पण त्यात पाणी घालत वाटेल तसे कथानक फिरवले जाते आहे, त्यात नैतिकता संपुष्टात आल्याचे दिसून येते आहे, त्यामुळे अशा मालिका आता बंद कराव्यात असे वाटते.
   मूळ नाव माझ्या नवर्‍याची बायको. म्हणजे राधिका गुरूनाथच्या आयुष्यात शनाया नावाचे वादळ येते आणि गुरूनाथ राधिकाला सोडून शनायाशी लग्न करतो. राधिका आणि गुरूनाथचा कॉलेजपासून मित्र असलेला सौमित्र प्रकट होतो, गुरूनाथचा मुलगा दहा वषार्र्चा होईपर्यत सौमित्रने लग्नही केलेले नसते, कारण तो राधिकाच्या प्रेमात असतो. मग राधिकाने गुरूनाथला सोडल्यावर ती सौमित्रशी लग्न करते आणि सौमित्र सवत्स धेनु मिळाल्याचा आनंद बाळगतो. मग या मालिकेचे नाव माझ्या बायकोचा नवरा असे होते. गुरूनाथला मग माया मिळते आणि तो शनायाला सोडतो. आता शनाया शहाणी होते राधिकाशी हातमिळवणी करते आणि दोघी मिळून गुरूनाथला धडा शिकवण्याचा विडाच उचलतात. सौमित्रच्या वडिलांचा हजारो कोटींचा बिझनेस आणि राधिकाचा 300 कोटींचा बिझनेस असताना हे उपदव्याप करायला त्यांना वेळ मिळतोच कसा? या बाईंचे मसाले कोण कुटत बसते आणि कोण विकायला जाते असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. कारण ऑफीसमधली सगळीच माणसं ऑफीसचं, राधिका मसालेचं काम करण्याऐवजी कारस्थानं करणे आणि गुरुनाथला धडा देणे यात गुंतलेले आहेत.
म्हणजे झीम्मा खेळ असतो त्यात एकाला सोडून दुसर्‍याला टाळी दिली जाते तसा प्रकार इथे बघायला मिळतो. घटकेत राधिका गुरूनाथला धरते, मग गुरूनाथ गिरकी घेऊन शनायाला टाळी देतो, तेवढ्यात राधिका गिरकी घेते आणि सौमित्रला टाळी देते. मग गुरू पुन्हा गिरकी घेतो आणि मायाला टाळी देतो. त्यामुळे शनाया गिरकी घेऊन सौमित्रला टाळी देते. अक्षरश: ही मालिका आहे की झीम्मा चालला आहे असे वाटत राहते. त्यात आता आणखी एक नवा प्रकार लादला जात आहे. काय तर म्हणे मालिकेत नवा ट्विस्ट आणला आहे.
  म्हणजे माझ्या नवर्‍याची बायको, माझ्या बायकोचा नवरा, माझ्या सवतीची सवत म्हणता म्हणता आता या मालिकेत माझ्या सासूची सवत असा प्रकार चालवला आहे. तो म्हणजे, या मालिकेत शनायाच्या आईची भूमिका किशोरी आंबिये करत आहेत. त्या आता सौमित्रच्या वडिलांच्या प्रेमात पडल्या आहेत. सौमित्रच्या वडिलांशी लग्न करण्याचे स्वप्न ही घोडनवरी पहात आहे. त्यामुळे  शनायाला तुला एखादा भाऊ असता तर किती बरं झालं असतं ना? असे लाजत लाजत विचारते आहे. सौमित्र तुझा भाऊ असेल तर कसे वाटेल असे विचारत ती अप्रत्यक्षरित्या त्याच्या वडिलांशी लग्न करण्याचे स्वप्न पहात आहे. सौमित्रच्या वडिलांना प्रेमात पाडण्याचा तिचा आटापिटा चालला आहे. किती हा आचरटपणा आहे. मराठी कुटुंबात इतका अनाचार आणि अनैतिक संबंधांचा भडिमार कसा काय केला जाऊ शकतो?
खरं तर ही मालिका महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होती. राधिकाप्रमाणे नवर्‍यांनी फसवलेल्या, टाकलेल्या, घटस्फोटीत, विधवा अशा महिलांनी आपल्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असा संदेश सुरवातीला मिळेल असे वाटले होते. पण सतत जोडीदार बदलणे, अनैतिकी संबंध ठेवणे आणि कारस्थानं करत एकमेकांवर कुरघोडी करणे एवढंच चालवलेलं दिसत आहे. यातून लेखक, निर्माते, वाहिनी काय साध्य करत आहेत? एका चांगल्या मालिकेतील कथानकाचा आत्मा संपल्यावर त्यात वाटेल तसे कथानक फिरवून अनैतिकतेचा भरणा करण्याचा प्रकार चालला आहे.
  एक काळ असा होता की झी मराठीवरील मालिका या महिलांचा आदर सन्मान करणार्‍या, नात्यांचा गोडवा जपणारा, आपली नाती जपण्यासाठी पराकाष्ठा करणार्‍या कथानकांची वाहिनी होती. त्यामुळेच त्यांचा उत्सव नात्यांचा हा दरवर्षी दिवाळीच्या सुमारास होणारा कार्यक्रमही चांगला असायचा. पण गेल्या दीड दोन वर्षात या विचारांना कुठेतरी या वाहिनीने तिलांजली दिल्यासारखे वाटते. कोणतीच मालिका ही माणुसकी, नाते जपण्यासाठी आहे असे वाटत नाही. यातून या वाहिनीला काय दाखवायचे आहे? मराठी कुटुंबे अशी असतात का?
त्या अगबाई सासुबाईमध्ये तो बबड्या आईला वाटेल तसा छळतो, बायकोशी वाटेल तसा वागतो. आपल्या मुलाचे लग्न झाल्यानंतर सुनेच्या पुढाकाराने विधवा सासू दुसर्‍याशी लग्न करते. त्यामुळे सगळे घर उद्धवस्त होते. यातून काय संदेश द्यायचा आहे?
   देवमाणूस ही सत्यघटनेवर आधारीत मालिका म्हणून सादर केली जात आहे. या मालिकेमध्ये खूनाची मालिका दाखवली आहे. पण तो डॉक्टर सरळसरळ कुठल्याही महिलेला पटवतो आणि तिचा खून करतो. घरंच्या घरं उद्धवस्त करतो. डिंपलसारख्या मुलीला नादाला लावून लुबाडण्याचा खेळ करतो. त्यासाठी वाटेल तितके खोटे बोलत राहतो. महिला अगदी बावळटासारख्या त्याच्या मागे जातात हे महिलांचे अवमूल्यन आहे. त्यात भरीस भर म्हणून आता राणा अंजलीच्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेत जन्मठेपेची शिक्षा भोगून नंदीता परत येते आहे आणि पुन्हा कारस्थाने सुरू करते आहे. राणा या अडाणी पैलवानाला शिकवून पोलीसात नोकरी लावली इथपयर्र्तच ते कथानक असायला पाहिजे होते. पण चालतयं ना मग चालतंय की प्रेक्षक म्हणतील या अपेक्षेने ही मालिकाही चार वर्षांपेक्षा जास्त काळ चालवली जात आहे.
   या मालिका खरंच बंद करून नव्या मालिका सुरू कराव्यात. या वाहिनीला कलाकार मिळत नाहीत की कथानके सापडत नाहीत? त्यासाठी अनैतिकी संबंधांचा आधार घेऊन मालिका चालवल्या जात आहेत. हे प्रकार थांबवले पाहिजेत. सगळ्या मालिकांच्या बाबतीत थोड्या फार फरकाने असेच काहीसे चाललेले दिसते आहे. तिकडे त्या अलका कुबलने दुसर्‍या वाहिनीवर मालिका चालवली आहे, त्यात कट कारस्थाने कमी म्हणून की काय वास्तवात अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यांच्यातील वाद उफाळून आला आहे. एकमेकींच्या झिंज्याच उपटणे बाकी राहिले आहे. या कुरघोड्या मालिकांमधून आता वास्तवातही येताना दिसत आहेत असे दिसते. त्यामुळे मालिकांबाबत आणि त्याचे प्रसारण, किती भाग जास्तीत जास्त असावेत, कलाकारांनी मध्येच मालिका सोडणे, बदलणे याबाबत सर्वच वाहिन्यांनी एक नियमावली केली पाहिजे. नितीमत्तेच्या कसोटीवर मालिका आणल्या पाहिजेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: