सरकार म्हणते टोलनाका कायदेशीर आहे, मग प्रशांत ठाकूर राजीनामा कधी देणार?
न चल चित्तस्य कार्यावाप्ति:।( चंचल मनोवृत्तीच्या माणसाकडून कोणतेही कार्य यशस्वी होत नाही.) - चाणक्य
- खारघर येथे सायन पनवेल मार्गावर नव्यानेच उभा केलेला टोलनाका हा योग्यच आहे असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात सादर केले. हा टोलनाका उभारण्यापूर्वी सर्व परवानग्या घेवूनच पूर्तता केलेली आहे अशी भूमिका राज्य सरकारने मांडलेली आहे. त्यामुळे हा टोलनाका वैध असल्याचे प्रतिज्ञापत्र जरी राज्य सरकारने दिलेले असले तरी भारतीय जनता पक्षाने मतदारांची फसवणूक केलेली आहे हे यातून स्पष्ट झालेले आहे.
- विधानसभा निवडणुकीपूर्वी वारेमाप आश्वासने देवून महाराष्ट्र टोलमुक्त करणार असल्याचे सांगून सामान्यांना आकर्षित केले. परंतु दोन महिन्यांच्या आत खारघरचा टोलनाका सुरू केला. हा टोलनाका न्यायालयाच्या आदेशाने आम्ही सुरू करत आहोत असा कांगावा मागच्या महिन्यात 6 जानेवारीला टोल सुरू केल्यावर भाजप नेत्यांनी केला होता. मग न्यायालयाच्या आदेशाने जर हा टोलनाका सुरू केला होता तर हा वैध आहे असे प्रतिज्ञापत्र शुक्रवारी परत उच्च न्यायालयात सादर करण्याचे कारण काय होते?
- 6 जानेवारीला हा टोलनाका सुरू झाला तेव्हा आम्हाला हा टोलनाका सुरू करायचा नव्हता परंतु न्यायालयाने आदेश दिल्यामुळे सुरू करावा लागला आहे असे सांगून नागरिकांची फसवणूक भाजपने केली आहे. भाजपला हा टोलनाका जर सुरू करायचा नव्हता तर न्यायालयात शुक्रवारी आपले म्हणणे का मांडले आणि या टोलनाक्याचे समर्थन का केले असा प्रश्न निर्माण होतो. पण यातून भारतीय जनता पक्षाचे सरकार जनतेची कशी फसवणूक करत आहे हे यातून दिसत आहे.
- हा टोलनाका सुरू होवू देणार नाही अशी भिष्म प्रतिज्ञा करून पनवेलचे काँग्रेस आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर टोलनाका रद्द केला जाईल म्हणून आपण भाजपत जातो आहे असे सांगितले होते. आता हा टोलनाका रद्द होण्याची कोणतीही चिन्हे नसताना प्रशांत ठाकूर यांना आमदार म्हणवून घेण्याचा अधिकार आहे काय? पनवेलकर आता प्रशांत ठाकूर यांचा राजीनामा मागत आहेत. पनवेलकरांची फसवणूक करून, टोलनाका रद्द करणार असे आमिष दाखवून प्रशांत ठाकूर भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे आता त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही तमाम पनवेलकरांची अपेक्षा आहे. ही हिंमत प्रशांत ठाकूर यांच्यात आहे काय असा सवाल आता उपस्थित होतो आहे.
- या टोलनाक्याचे राजकारण करून, प्रशांत ठाकूर यांनी भावनीक लाट निर्माण केली होती. वास्तविक काँग्रेसमधून निवडून येण्याची शक्यता नसल्याने त्यांना भाजपचा आधार हवा होता. राज्यात कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसची सत्ता येणार नाही, काँग्रेस विरोधी वातावरण निर्माण झाल्यामुळे मोदी लाटेचा लाभ उठवण्याचा स्वार्थीपणा प्रशांत ठाकूर यांनी केला. त्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी फसवले, टोलनाका रद्द करण्याचे वचन दिले होते, ते पाळले नाही म्हणून आपण काँग्रेस सोडतो आहोत असा बहाणा केला. आता भाजपनेही ते आश्वासन पाळलेले नाही. त्यामुळे प्रशांत ठाकूर यांना आमदार म्हणून राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. प्रशांत ठाकूर यांचे टोलप्रेम हे मगरीचे अश्रू होते. त्यांनी फक्त स्वार्थासाठी टोलचे राजकारण केले होते. परंतु त्यामुळे सामान्य पनवेलकरांची घोर फसवणूक झालेली आहे. त्यामुळे भविष्यात पनवेलकरांनी प्रशांत ठाकूर यांना अद्दल घडवली पाहिजे.
- प्रशांत ठाकूर यांना नाही भारतीय जनता पक्षाबद्दल प्रेम आहे, ना त्यांना पनवेलकरांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यांना फक्त स्वार्थ साधायचा आहे. ठेकेदारी करायची आहे. त्यासाठी त्यांनी सत्तेच्या माध्यमाचा वापर केलेला आहे. भविष्यात येणार्या विमानतळाचे ठेके मिळावेत यासाठी भाजपशी जवळीक साधण्याचा त्यांचा स्वार्थी आणि व्यावसायीक हेतु यात आहे. उद्या भारतीय जनता पक्षाची सत्ता गेली आणि अन्य कोणत्या पक्षाची आली तर पुन्हा तिकडे जायलाही ते कमी करणार नाहीत. जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, भाजप करून आता ते मुस्लिम लिग, एमआयएम अशा पक्षातही जाण्यास डगमगणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
- काँग्रेस राजवटीत प्रशांत ठाकूर यांनी केलेली बंडखोरी, टोलचे आंदोलन हे संपूर्ण नाटक होते. त्यामागे एक सूडनाट्य होते. सायन पनवेल मार्गावरील रस्त्याचे काम त्यांच्या ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीला मिळाले नाही म्हणून टोल कंपनीला वाकवण्यासाठी, छळण्यासाठी त्यांनी रस्त्यावर आडवे पडण्याचे नाटक केले. पृथ्वीराज चव्हाण यांनी शब्द पाळला नाही म्हणून भाजपमध्ये गेलो आहोत. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत तसे आश्वासन दिले आहे असा आभास प्रशांत ठाकूर यांनी निर्माण केला. त्यावेळीही प्रशांत ठाकूर यांना आम्ही प्रश्न विचारला होता की त्याचे उत्तर त्यांनी देण्याचे टाळले होते. या रस्त्याचे काम त्यांच्या कंपनीला मिळाले असते तर प्रशांत ठाकूर यांनी टोल विरोधात आवाज उठवला असता काय? यावर त्यांनी कोणतेच उत्तर दिले नव्हते. पण प्रशांत ठाकूर यांनी कशाप्रकारे मतदारांना फसवले आहे हे आता अधिक ठळक झाले आहे.
- टोलला विरोध हा टोलनाका तयार झाल्यावर नसतो करायचा. आपल्या मतदारसंघात हे काम बांधा वापरा हस्तांतरीत करा या तत्वावर केले जाणार आहे याचा अर्थ इथे टोलनाका लागणार हे निश्चितच होते. मग तेव्हा आमदार असताना बीओटीवर काम देवू नका असा विरोध प्रशांत ठाकूर यांनी का केला नाही? याचे कारण हे काम आपल्या कंपनीला मिळेल. हजारो कोटी रूपये आपल्याला मिळतील हा त्यांचा हेतू होता. पण काम मिळाले नाही म्हटल्यावर काम होवू दिले फक्त टोलनाका उभारल्यावर आंदोलनाची भाषा केली. ही शुद्ध फसवणूक होती. त्यामुळे आता अशा व्यक्तिवर भविष्यात कोणीही विश्वास ठेवू शकणार नाही. दहा वेळा तुम्ही जनतेला मूर्ख समजून फसवणूक कराल पण भविष्यात जनता गप्प बसणार नाही. हिंमत असेल तर प्रशांत ठाकूर यांनी आपण टोलनाका रद्द करण्यास असमर्थ ठरलो आहोत हे जाहीर करून भाजप आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा पोटनिवडणुकीत अपक्ष किंवा अन्य कोणत्याही पक्षातून निवडून येवून दाखवावे. अशा निवडणुकीत पनवेलकर फसवणूक करणार्या उमेदवाराचे डिपॉझीट जप्त केल्याशिवाय राहणार नाहीत, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
- भाजप प्रवेशाच्यावेळी नितीन गडकरींनी मतदारांना फसवणूक करण्यासाठी आणि पितापुत्रांचे वजन वाढवण्यासाठी मोठी डायलॉगबाजी केली होती. यामध्ये त्यांनी या टोलच्या खेळाचा सूत्रधार मीच आहे. हा खेळ मीच सुरू केला आहे त्यामुळे तो केव्हा बंद करायचा हेही मला माहित आहे असे सांगून आपण टोलमुक्त महाराष्ट्र करू, खारघरचा टोलनाका रद्द करू असे सांगितले होते. यामुळे नितीन गडकरी यांनी स्वत:चे अवमूल्यन करून घेतले आहे. ठाकूर पितापुत्रांसाठी आपली सगळी प्रतिष्ठा विकण्याचे काम करून संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातून उतरण्याचे काम नितिन गडकरींनी केलेले आहे. म्हणजे गडकरी बोलतात एक आणि करतात दुसरेच असे चित्र आता महाराष्ट्रात निर्माण झालेले आहे. नितीन गडकरी हे वाटेल त्या थराला जावून जनतेची फसवणूक करू शकतात, त्यासाठी आपल्या कंपूत पितापुत्रांसारखे लोक जवळ करतात असे चित्र सध्याचे आहे. आज भारतीय जनता पक्षात गडकरी आणि फडणवीस असे दोन गट आहेत. गडकरींच्या गटात सगळे बाटगे आणि बदमाश लोक आहेत. तर फडणवीसांच्या गटात निष्ठावंत आणि प्रामाणिक लोक आहेत. गडकरींना मुख्यमंत्री व्हायचे होते त्यामुळे फडणवीसांना बदनाम करण्यासाठी आणि आपली ताकद दाखवण्यासाठी गडकरींनी जे राजकारण केले होते त्यामध्ये प्रशांत ठाकूर सहभागी होते. फडणवीसांच्या नावाची घोषणा होण्यापूर्वी भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्यावर गडकरींनी जे शक्ती प्रदर्शन केले होते त्यात प्रशांत ठाकूरही होते. त्यावेळी गडकरी समर्थक म्हणून त्यांनी लाळघोटेपणा केला. पण गडकरींची डाळ शिजली नाही आणि फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्यावरच प्रशांत ठाकूर यांचे भाजपमधील स्थान बेदखल झाले होते. त्यामुळेच रायगडात मुख्यमंत्री पहिल्यांदा आले, पक्षाच्या कामासाठी आले तेव्हाही प्रशांत ठाकूर यांनी त्यांना भेटण्याचा मोठेपणा दाखवला नाही, शिष्ठाचार पाळला नाही. आज निष्ठावान भाजपने या आमदाराला बेदखल केले आहे, अडगळीत टाकले आहे, त्यामुळे अशा आमदाराकडून पनवेलचे कोणतेही प्रश्न मार्गी लागणार नाहीत. पनवेलकरांच्या माथी टोल लादण्याचे पाप हे प्रशांत ठाकूर यांनी केले आहे हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे.
- आर्य चाणक्यांनी सांगितलेल्या सूत्रानुसार चंचल माणसाकडून कोणतेही कार्य यशस्वी होत नाही. आज या पक्षात, उद्या त्या पक्षात असे चंचलपणे अस्थिर असलेल्या प्रशांत ठाकूर यांच्याकडून कोणतेही पनवेलचे काम केले जाणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा