आपल्याकडे जेव्हा जेव्हा बिगरकॉंग्रेस सरकार केंद्रात सत्तेवर आलेले आहे तेव्हा त्यांना एकदाही कार्यकाल पूर्ण करता आलेला नाही. वाजपेयी सहा वर्ष पंतप्रधान होते. त्यामध्ये १३ दिवस, तेरा महिने करता करता पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करण्याची संधी असतानाही फिल गूडची नशा चढली आणि सहा महिने अगोदर निवडणुका घेतल्या. त्यामुळे सत्ता गमावलीच आणि पाच वर्षांचा कार्यकालही पूर्ण केला नाही. त्यामुळेच सध्या मोदी तरी हा पायंडा मोडणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. अर्थात यापैकी जनता पक्ष वगळता कोणत्याच बिगर कॉंग्रेस सरकारला स्पष्ट बहुमत नव्हते. तशी परिस्थिती मोदींबाबत नाही. त्यामुळे तशी चिंता करण्याची गरज नाही. पण कोणाला काही दुर्बद्धी सुचली तरच असे काही घडू शकते. जनता पक्षाचे १९७७ सालचे सरकार अडीच वर्षे टिकले होते. पाच वर्षाकरिता लोकांनी निवडून दिलेले ते सरकार अडीच वर्षात कोसळले आणि त्याचे मुख्य कारण विविध राजकीय पक्षांचे गाठोडे बांधून ते सरकार बनलेले होते. आज केंद्रातल्या मोदींचे सरकार हे पूर्ण बहुमताचे सरकार आहे. लोकांना स्वच्छ कारभार देण्याच्या आणाभाका घेऊन सत्तेवर बसलेले सरकार आहे. जनता पक्षाच्या सरकारने शह-काटशह केला होता. पण भ्रष्टाचार केला नव्हता. तरी ते सरकार अडीच वर्षात कोसळले. मोदी सरकारने अवघ्या एका वर्षात आचके द्यायला सुरुवात झालेली आहे. १९७७ च्या सरकारचे नाव ‘जनता पक्ष’ असले तरी त्या जनता पक्षात जनसंघ, समाजवादी, भारतीय क्रांती दल असे पक्ष सामील झालेले होते. ते एका पक्षाचे सरकार नव्हते. त्या सरकारात जे उपपक्ष होते ते एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत होते. पंतप्रधानपदी मोरारजी देसाई होते आणि गृहमंत्रीपदी एच. एम. पटेल होते. ते मोरारजींचेच प्रतिनिधी होते. त्यामुळे एका अर्थाने गृहमंत्री मोरारजीच होते. पाच वर्षाकरिता लोकांनी निवडून दिलेले ते सरकार अडीच वर्षात कोसळले याचे कारण परस्परविरोधी मतांचे लोक एकत्र आले होते. आज केंद्रातल्या मोदींचे सरकार हे पूर्ण बहुमताचे सरकार आहे. एका पक्षाचे सरकार आहे. लोकांना स्वच्छ कारभार देण्याच्या आणाभाका घेऊन सत्तेवर बसलेले सरकार आहे. महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर बसलेले सरकार आहे. मोदींचे सरकार एकसंध असताना यापैकी कोणतीही गोष्ट ते करू शकले नाहीत. त्यामुळे मोदींची लोकप्रियता ओसरू लागली आहे.एवढेच नव्हे तर स्वच्छ वस्त्रे पांघरून सत्तेवर बसलेल्यांचे बुरखे फाटू लागलेले आहेत. स्मृती इराणींना कोर्टात खेचले गेले आहे. त्यांची पदवी बोगस असल्याचा आरोप झालेला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिली, असा त्यांच्यावर आरोप झालेला आहे. नितीन गडकरींनी सरकारचे कोटयवधी रुपये बुडवले असा ‘कॅग’ने गडकरींवर ठपका ठेवलेला आहे.स्वच्छ कारभाराच्या बाता मारून सत्तेवर जे बसले होते त्यांच्या भ्रष्टाचाराची लक्तरे आता निघू लागलेली आहेत. त्याचवेळी पक्षातील ज्येष्ठ नेते अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, यशवंत सिन्हा हे सगळे मोदींना घेरण्याच्या पवित्र्यात आहेत. अडवाणींनंतर यशवंत सिन्हा यांनीही थेट मोदींवर हल्ला चढवलेला आहे आणि आता ही गोष्ट स्पष्ट होत चालली आहे की, सत्तेच्या बाहेर असलेलेच नव्हे तर सत्तेत बसलेल्यांपैकीही सुषमा स्वराज, वसुंधराराजे शिंदे, राजनाथ सिंह ही सगळी मंडळी बंडाच्या पवित्र्यात आहेत. मोदींच्या शपथविधी समारंभाला वसुंधराराजे आलेल्याच नव्हत्या. आता त्यांनाही अडचणीत आणण्यात आले.सुषमा स्वराज यांनी भ्रष्ट ललित मोदींना कशी मदत केली, हेही उघड झाले. हीच मंडळी दोन वर्षापूर्वी कॉंग्रेसवर आरोप करताना तुटून पडत होती. आता या प्रत्येकाच्या तोंडाला शेण लागलेले आहे. मोदी सरकारने अवघ्या एका वर्षात जनतेच्या मनातून उतरू लागले आहे. याच भाजपाचे माजी महासचिव संजय जोशी हे संघातले बडे प्रस्थ होते. या जोशीबुवांनी दिल्लीच्या रस्त्यावर अमित शहा यांच्या घराच्याबाहेर त्यांच्या नावानेच फलक लावलेला आहे. हा फलक मोदींना सरकारात एक वर्ष झाले म्हणून अभिनंदनाचा फलक नाही तर मोदींवर टीका करणारा फलक आहे. या फलकावर संजय जोशींनी लिहिले आहे, की, ‘ना संवाद, ना मन की बात, ना सब का साथ, ना सब का विकास, फिर क्यों करे जनता आप पर विश्वास’ हे कोण म्हणत आहे. कॉंग्रेसवाले म्हणत नाहीत. खरे तर हे फलक कॉंग्रेसवाल्यांनी लावायला पाहिजे होते.वसुंधरा, सुषमा स्वराज, स्मृती इराणी यांच्याविरुद्ध कॉंग्रेसच्या महिलांनी थाळया वाजवायला पाहिजे होत्या. पण कॉंग्रेस अजून पराभवातून बाहेर आलेली नाही. अवघ्या एक वर्षात मोदी सरकारचे धिंडवडे निघत असताना कॉंग्रेसला केवढी मोठी संधी आहे. पण कॉंग्रेसचे काम आता भाजपामधले असंतुष्ट आत्मे अतिशय जोरात करीत आहेत. त्यामुळे हे सरकार पाडायला, गाडायला कॉंग्रेसची नाही तर भाजपचीच असंतुष्ट ताकद कामी येईल हे निश्चित.
सोमवार, २९ जून, २०१५
असंतुष्ट आत्मे मोदींच्या मानगुटावर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा