भारत ही संतांची भूमी आहे. या देशातील संत हे सुधारणावादी होते. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यातील चुकीच्या गोष्टींवर अधिकारवाणीने भाष्य करणारे होते. त्यामुळे बहुतेक संतांनी टिका आणि छळ सहन केला आहे. त्यापैकीच एक सुधारणावादी संत म्हणजे संत कबीर. कबिरांची शिकवण ही अत्यंत सहज आणि सोपी होती. भारतात जन्मलेले संत कबीर यांचा धर्म काय होता याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. हे चांगलेच आहे. कारण एका विशिष्ठ धर्मात कोणत्याही संताला बंदीस्त करून ठेवणे हे त्या संतांच्या विचारांवर केलेले अत्याचारच होतील. म्हणूनच अन्य संतांच्या तुलनेत कोणताही धर्म नसलेले कबीर हे भाग्यवान म्हणावे लागेल.कबीर हे मानवजातीचे, मानवतेचे पुजारी होते. कुठल्याही प्रकारचा धर्मभेद, पंथभेद, जातिभेद यापलीकडे कबीर पोहोचले होते. या भारत देशातील यच्चयावत समाज एकमताने चालावा, एकजुटीने वागावा म्हणून ज्या महापुरुषांनी आटोकाट प्रयत्न केले, सर्व सुखी असावेत अशा विचाराने जे आमरण झटले त्यापैकी कबीर हे एक होत. त्यामुळे त्यांना हिंदू, मुसलमान ऐक्याचे प्रतीक समजले जाते.कबीरांनी केलेली राम, कृष्ण, विठ्ठल अशा अनेक हिंदू दैवतांवरील पदे उपलब्ध आहेत. कबीर सर्व धर्मांच्या कुंपणापलीकडे असलेल्या परब्रह्मस्वरूप परमेश्वराला जाणत होते आणि त्याबरोबरच हे सर्व जग चालविणारा जो परमेश्वर आहे, या सर्व जगाच्या निर्मितीमागे, या सर्व जगाच्या व्यवहारामागे ज्याची प्रचंड शक्ती उभी आहे तो ईश्वर, तो परब्रह्मस्वरूप पांडुरंग निर्गुण, निराकार आहे, हा त्यांचा विश्वास होता. त्याच्या म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाला कुठलेच बंधन मर्यादित ठेवू शकत नाही. म्हणूनच कबीरांच्या दृष्टीने सगळे साधुसंत, सगळे देव हे त्या एकाच परब्रह्मस्वरुप पांडुरंगाची लेकरे आहेत. आपण सारे त्या एकाच ईश्वराची लेकरे आहोत असा विचार करणे म्हणजेच बंधुभाव निर्माण करणे. त्यामुळे हा बंधुभाव निर्माण करण्याचे काम कबीरांनी केले. म्हणजे त्यांच्या काळात हिंदू मुसलमान किंवा म्लेंछ, यवन असा भेदभाव होत होता. धर्मांधतेमुळे सारा समाज चांगल्या तत्वज्ञानापासून दुर रहात होता. चाचपडत होता. त्या काळात संत कबीरांच्या वागणुकीतून ऐक्याचे काम केले होते. खर्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आणि निधर्मी समाजरचना करण्याचे काम कबिरांनी केले होते. भारतासारख्या सर्वधर्मसमावेशक देशाला आज कबिरांच्या शिकवणुकीची गरज आहे.कबिरांचे हिंदी साहित्यातील योगदान हे फार मोलाचे आहे. आपल्याकडे हिंदी साहित्यात गोस्वामी तुलसीदासाचे चरित्र आणि साहित्य अनमोल मानले जाते. त्यांच्या इतकेच योगदान हे कबीरांचे होते. कबीरांचे दोहे, रचना या अतिशय अभ्यासपूर्ण होत्या. त्यांच्या दोह्यांमधून फार मोठी शिकवण दिली जात होती. अंधश्रद्ध आणि मठ्ठ समाजाला चिमटे घेण्याची कसब कबिरांच्या दोह्यात होती. अजाण अशा समाजात काही संकट आले, आजारपण आले की लोक देवाचे स्मरण करायचे. देवाला नवस बोलायचे. देवाला साकडे घालायचे. पण सुखात असल्यावर त्याच लोकांना परमेश्वराचे स्मरणही व्हायचे नाही. या प्रवृत्तीवर कबिरांनी म्हटले होते की, दु:ख में करे समिरन, सुख में करे ना कोई|जो करे समिरन सुख में, उसे दु:ख काहे को होये?तुम्ही सुखात असताना जर परमेश्वराचे स्मरण केलेत तर तुम्हाला दु:ख शिवणारही नाही. कारण दु:ख निवारण करणारा सुखातही तुमच्या बरोबर असल्यामुळे तिथपर्यंत दु:खाचा प्रवेशच होणार नाही. हा विचार अतिशय महत्त्वाचा आहे. मानवतेचा संदेश देणारा आहे.कबिरांच्या जन्माबाबत अनेक आख्यायिका सांगण्यात येतात. त्यापैकी एका कथेनुसार स्वामी रामानंदांच्या आशीर्वादाने एका स्त्रीच्या पोटी एक बालक जन्माला आले, त्याचा त्याग त्या स्त्रीने केला. त्याला पुढे एका विणकराने सांभाळले. कबिरपंथींच्या मते त्यांचा जन्म एका कमळात झाला आहे. तर काहींचे म्हणणे कबिर हे भक्त प्रल्हादाचा अवतार आहेत. पण काहीही असले तरी त्यांचे प्रकट होणे हे देशाच्या, समाजाच्या कल्याणासाठी होते हे महत्त्वाचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कबिरांनी हिंदू आणि मुसलमान संतांना एकत्र आणून त्यांच्यात एकत्रित सत्संग घडवून आणला होता. आज या देशात धार्मिक द्वेषाचे वातावरण पसरवले जात असताना, घर वापसी, धर्मांतराच्या चर्चा होत असताना मानवता धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे सांगणार्या कबिरांची शिकवण फार महत्त्वाची आहे. संत कबिर, संत गुरू नानक देव, संत तुकाराम अशा अनेक संतांनी जात, धर्म या पलिकडे समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. संत गुरू नानक देव म्हणायचे न कोई हिंदू है, न कोई मुसलमान है. म्हणूनच मनुष्याला मनुष्य म्हणून जगता आले पाहिजे. आज ज्येष्ठ पौर्णिमा हा कबिरांचा जन्मदिवस. त्यांचा प्रकट दिवस आहे. अशावेळी त्यांचा विचार सर्वांना समजणे गरजेचे आहे. आज आपल्याकडे वट पौर्णिमेची पूजा केली जाते. या वटपौर्णिमेला कबिरांच्या विचारांचा वटवृक्ष या देशात फोफावला तर सर्वत्र शांतीचा संदेश मिळेल हे लक्षात घेण्याची गरज आहे.
मंगळवार, ३० जून, २०१५
संत कबीर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा