सोमवार, २९ जून, २०१५

डाळीच्या उत्पादनासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहन द्या

सध्या डाळींच्या किमती या प्रचंड वाढल्या आहेत. कोणतीही डाळ शंभर रूपयांच्या आत नाही. सामान्य माणसाला रोज भाजी, चटणी, कोशिंबीर, गोडाचे जेवण नाही निदान डाळ भात, आमटी भात तरी सुखाने खाता आला पाहिजे. पण डाळींचे भाव इतके वाढले आहेत की खरेदी करताना सामान्य माणसाला भाव नाही तर आकार कमी घ्यावा लागत आहे. त्यामुळे घराघरातील आमटी ही पातळ झालेली आहे. या डाळीच्या किमतींवर सरकारने त्वरीत पावले उचलून त्या किमती स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.   सध्या तूर, उडीद, हरभरा, मूग यांसारख्या डाळींच्या भावाबाबत सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती हातबाहेर जाण्याचीच शक्यता अधिक आहे. यंदाच्या वर्षी डाळींचे उत्पादन घटले आहे आणि त्यांच्या तातडीच्या आयातीचे धोरण आखून ते अमलात आणण्यासाठी सरकारी पातळीवर फारसा उत्साह दिसून येत नाही. डाळींचे भाव गगनाला भिडत असल्याने व्यापारीवर्ग सर्वात खूश असला, तरीही सामान्य माणूस मात्र चिंतावला आहे. मार्च एप्रिल महिन्यात साधारणपणे प्रत्येकजण वर्षाचे धान्य भरत असतो. यावर्षी धानबाजारात डाळींचे प्रमाण खूप कमी होते. त्याचवेळी व्यापारीवर्ग डाळी घ्या नंतर खूप किमती वाढतील अशा सूचना देत ग्राहकांना साठवण्याचा आग्रह करत होता. पण प्रत्यक्षात हा साठेबाजार व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात केला होता. त्यामुळे तेव्हा ८० रूपयांना असलेली तूरडाळ आता १२५ ते १४० पर्यंत विकायला ते सोकावले आहेत.  एप्रिलमध्ये ५५ रूपयांपर्यंत असलेली चणाडाळ आता ८० च्या घरात गेलेली आहे. यावर नियंत्रण येणे गरजेचे आहे.  गेल्या काही काळात डाळींच्या भावात सुमारे साठ टक्क्यांची वाढ झाली. एवढी वाढ कुणाही भारतीयाला परवडणारी नाही. अशा स्थितीत डाळींची आयात तातडीने करणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेतला खरा, परंतु त्याच्या निविदा मागवण्याची प्रक्रियाही अद्याप सुरू झालेली नाही. नुसते निर्णय घेवून उपयोग नाही तर त्या निर्णयाची अंमलबजावणी होणे गरजेचे आसते. डाळी हे भारतीय चवीचे खास वैशिष्टय. तूर, मूग, मसूर, हरभरा, उडीद अशा प्रत्येक डाळीचे प्रत्येकाच्या जेवणात विशिष्ठ स्थान आहे. तुरीची नियमीत आमटी, तर हरबरा डाळीची कटाची आमटी, उडीद डाळीचे घुटे तर मुगाचे फोडणीचे वरण, कधीतरी सांबारासाठी मसूराची आमटी हे जेवणातील वैविध्य या देशात आहे. पण सामान्य माणसांच्या तोंडचा घासच पळवण्याचे काम सरकार करत आहे.  भारतीय जीवनातील शाकाहारात डाळींना महत्त्वाचे स्थान मिळाले, ते त्यातील गुणधर्मामुळे. गेल्या काही दिवसांत डाळींच्या भावात भरमसाट वाढ झाल्याने ते स्थान आणखीच महत्त्वाचे आणि खर्चीक होऊन गेले आहे. यंदा डाळींच्या उत्पादनात सुमारे २० लाख मेट्रिक टनांची घट झाली आहे. अपुरा तसेच अवेळी पाऊस हे त्याचे कारण. गेल्या वर्षभरात देशातील महानगरांमध्ये तूर डाळीचा भाव ७२ ते ७५ रुपयांवरून ११६ रुपयांपर्यंत वर गेला. उडीद डाळीचा दरही ७९ ते ८४ रुपयांवरून १२३ रुपयांना पोहोचला. काही ठिकाणी तर तूर डाळीचे दर बाजारातील चिकनच्या भावाशीही स्पर्धा करू लागले.     भारतीय कृषी क्षेत्रात गरजेएवढे डाळींचे उत्पादन कधीच होत नाही. त्यामुळे त्यांची आयात कमी-अधिक प्रमाणात दरवर्षीच करावी लागते. यंदा हे उत्पादन कमालीचे घटल्यानंतर आयात जास्त प्रमाणात करणे अत्यावश्यक ठरले आहे. परंतु दिरंगाईमुळे ती होऊ शकत नाही. बाजारात मालच नसल्याने आहे तो माल चढया भावाने विकण्याची संधी व्यापारी तरी कशासाठी सोडतील? यंदा उत्पादन कमी आहे, हे लक्षात येताच आयातीबाबत हालचाली करणे आवश्यक होते. पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. डाळींच्या कमी उत्पादनामुळे शेतकर्‍यांवर अधिक चांगला परिणाम होण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी त्यांचे लक्ष उसावरून डाळींकडे वळवणे गरजेचे आहे. तुरीच्या उत्पादनाकडे शेतकर्‍यांनी वळण्याची आवश्यकता आहे. उडीद आणि मूग डाळीच्या किमान आधारभूत किमतींत केलेली वाढ ही शेतकर्‍यांसाठी महत्त्वाची आहे.आज कॅनडा, ऑस्ट्रेलिया, म्यानमार, फ्रान्स यांसारख्या डाळींचा पुरवठा करणार्‍या देशांसाठी भारत ही एक फार मोठी बाजारपेठ बनली आहे. हे देश ९५ टक्केपेक्षा अधिक मांसाहार करणारे असल्यामुळे त्यांना डाळीची गरज फारशी वाटत नाही. परंतु भारत हा इतक्या मोठ्या प्रमाणात मांसाहारी देश नाही. किंबहुना मांसाहाराबरोबरच डाळीचे कालवण, आमटी, वरण हेही नियमीत असते. त्यामुळे हे देश आपल्या डाळी विकायला भारतात येतात. त्यांच्यापुढे भारतीय शेतकर्‍यांची डाळ शिजत नाही ही परिस्थिती आहे. अनेक देशांत तेथील गरजेपेक्षा अधिक उत्पादन केवळ निर्यातीच्या हेतूनेच केले जाते. आपल्याकडे मात्र शेती शेतमाल विकण्यापेक्षा पोटापुरता करण्याकडे लक्ष दिले जाते. त्यामुळे डाळींचे उत्पादन वाढवण्याकडे शेतकर्‍यांना आकर्षित करण्यासाठीही अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी सरकारने शेतकर्‍यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: