गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजपच्या धोरणावर भाष्य करावे लागत आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मिडीयातील काही पंडितांप्रमाणे आम्हाला मोदी विरोधाचा रोग लागला आहे असे अनेकांना वाटणे स्वाभाविक आहे. परंतु पत्रकारीता करीत असताना खरं ते खरंच लिहायचे, कोणाचे लांगुलचालन करायचे नाही ही आमची वृत्ती असल्यामुळे असल्या वाटण्याचे आम्हाला काही वाटत नाही. आपल्याकडील नीतीशास्त्रांप्रमाणे कोणत्याही राजाचा मंत्री हा जर स्तुतीपाठक असेल तर तो राजाचा घात करत असतो. कटूवचन बोलणारा मंत्री हा राजाला योग्य सल्ला देत असतो. आज पत्रकारांनी ते करणे गरजेचे आहे. गोड बोलण्यापेक्षा कटूसत्य दाखवून देणे महत्त्वाचे असतेे म्हणून पुन्हा पुन्हा सरकार आणि मोदी यांचेवर लिहीणे भाग पडते आहे. गतवर्षी निवडणुकीपूर्वी आणि सत्ता मिळाल्यानंतरही सत्ता राबवताना तीन गुण प्रगट होतील, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिले होते. कणखर प्रशासन, वेगवान निर्णय, कोणाचाही मुलाहिजा न ठेवणारे कठोर नेतृत्व हे ते तीन गुण. वर्षभर चाललेल्या मोदींच्या कारभारावर जनता फार खुश नसली तरी वर उल्लेख केलेले हे तीन गुण मोदींकडे आहेत, असा विश्वास जनतेला अजूनही वाटतो. मात्र, गेल्या दोन आठवड्यांतील घडामोडींनंतर जनतेचे हे मत हळूहळू बदलण्याची शक्यता आहे. अपेक्षा होती तितका हा माणूस कणखर नाही असा संदेश आज सर्वत्र गेलेला आहे. तसेच प्रशासनावर त्यांची हुकूमत नाही आणि तत्त्वासाठी किंमत चुकवण्याचे धाडस मोदींमध्ये नसावे, अशा शंका जनतेच्या मनात येऊ लागल्या आहेत. सूषमा स्वराज, वसुंधराराजे, ललित मोदी प्रकरण नरेंद्र मोदी आणि त्यांचे सल्लागार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ज्या प्रकारे हाताळत आहेत, त्यातून या शंका निर्माण होत आहेत. लोकसभेच्या प्रचारात नरेंद्र मोदींचे नेतृत्वगुण जगाला थक्क करून गेले होते. त्या प्रचारात जो सुसंघटितपणा मोदींनी दाखवून दिला त्याचा पुरता अभाव ललित मोदी घोटाळ्याला तोंड देताना दिसला. राजकारणातील आपत्ती व्यवस्थापन भाजपला जमलेले नाही हे यावरून दिसते आहे. सुषमा स्वराज जेव्हा या घोटाळ्यात अडकल्या तेव्हाच खरे तर शहा व मोदी यांनी सावध होऊन हे प्रकरण कॉंग्रेसवर शेकवायला हवे होते. पण त्यांनी तसे केले नाही. का केले नाही हे त्यांचे त्यांना माहित. पण ललित मोदी यांच्याबद्दल बरे बोलण्यासारखे काही नसले तरी त्यांच्या विरोधात ठोस पुरावाही नाही. चिदंबरम यांनी फक्त नोटिसा काढल्या, साधा एफआयआरही दाखल केला नाही. इंटरपोलला कसलीच माहिती दिली गेली नाही, हे इंटरपोलचे प्रमुख रोनाल्ड नोबेल यांनी स्पष्ट केले आहे. त्याबाबत भाजप सरकार, नेते, प्रवक्ते कोणीच बोलत नाही. आपल्या मुलाखतीत नोबेल यांनी भारतीय तपास यंत्रणा व मीडिया यांचे वाभाडे काढले आहेत. ललित मोदींना पकडण्यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस निघालेली नाही, असे सांगून, अटक वॉरंट निघाले असेल तर ते प्रसिद्ध करा, असे जाहीर आव्हान जेटलींच्या अंमलबजावणी संचालनालयाला दिले आहे. म्हणजे अन्य देशांमध्ये ललित मोदींना ‘भगोडा’ समजत नाहीत. ललित मोदी यांनी शशी थरूर यांना अडचणीत आणून गांधी घराण्याला आव्हान दिले नसते तर आजही ते भारतात सुखाने राहिले असते. ही वस्तुस्थिती कोणासमोर आलीच नाही. म्हणजे केवळ चिखलफेक करून भाजप नेत्यांबाबत साप सोडला तरी हे डगमगतात असा संदेश यातून गेला आहे. ही झालेली चिखलफेक धुण्यासाठी कोणतेही प्रयत्न भाजप न करता सूषमा स्वराज यांना एकाकी पाडण्याचा अधमपणा केला काय असा संशय प्रत्येकाच्या मनात आहे. आयपीएलची नशा ललित मोदींच्या डोक्यात गेली आणि आपली पायरी विसरून शशी थरूर प्रकरणात त्यांनी अप्रत्यक्षपणे गांधी घराण्याला आव्हान दिले. त्याची फळे ते आता भोगत आहेत. ही वस्तुस्थिती विविध मार्गांनी जनतेसमोर आणून वातावरण बदलण्याची करामत भाजपला अजूनही करता आलेली नाही. हा भाजपचा राजकीय अपरिपक्वपणा म्हणायचा की मोदींचा अपरिपक्वपणा याचे उत्तर कोणीतरी देणे गरजेचे आहे. भाजपने ललित मोदींची बाजू घेतली म्हणून जनाधार कमी झाला नसता. पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी ललित मोदींना मदत केली असली तरी त्याला भारतात येण्याचा आग्रह धरला, असे सुषमा स्वराज म्हणू शकल्या असत्या. ही कोणतीही सारवासारव करण्यास भाजप आणि त्यांचे सरकारमधील घटक कमी पडले. यातून अजूनही परिपक्वता भाजपमध्ये आलेली नाही, हे सरकार कणखर आहे हे छातीठोकपणे सांगता येत नाही. शरद पवार यांनी याबाबत तसाच बचाव केला आणि या वादातून स्वत:ला हुशारीने सोडवून घेतले. उलट भाजप मात्र अडकत गेला. हे प्रकरण इतके तापेल, हेच स्वत:च्या हुशारीवर खुश असणार्या नरेंद्र मोदी व शहा यांच्या लक्षात आले नाही. नरेंद्र मोदी इकडे सावध नव्हते; पण तिकडे ललित मोदी सावध झाले आणि आपल्या सुरक्षेसाठी त्यांनी वसुंधराराजे शिंदे यांचेही नाव घेतले. पाठोपाठ प्रथम सही नसलेली व नंतर सहीची कागदपत्रे बाहेर काढून वसुंधराराजेंना पुरते गोत्यात आणले. ब्रिटिश न्यायालयाच्या अखत्यारीतील कागदपत्रांना अचानक पाय कसे काय फुटले? अशी आणखी कागदपत्रे निघतील, असा इशारा ललित मोदी देत आहेत. मुळात ललित मोदींबद्दल सरकारची निश्चित भूमिका काय, ते चोर आहेत की बळीचा बकरा आहेत, हे अमित शहा व नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या बैठकीत स्पष्ट करायला हवे होते. एकीकडे सुषमा स्वराज ललित मोदींचा पाठराखण करीत होत्या, तर दुसरीकडे अरुण जेटलींचे खाते त्यांना चोरटा ठरवत होते. ही अंतर्गत विसंगती भाजपला अडचणीची ठरेल यात शंकाच नाही.
मंगळवार, ३० जून, २०१५
पक्षांतर्गत विसंगती
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा