सिध्दांत, नीतीमत्ता याची भाषा करणारी भाजप आता राहिलेली नाही. भाजपची जी शान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात होती ती आता राहिली आहे असे वाटत नाही. याचे कारण असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ म्हणतात तशी अवस्था भाजपची झालेली आहे. सत्ता मिळवण्यासाठी कोणाच्याही शेजेवर जाण्याची आणि कोणालाही शेजेवर घेण्याची जी व्यभिचारी प्रवृत्ती भाजपमध्ये शिरली त्या प्रवृत्तीनेच त्यांना भ्रष्टाचाराचे डोहाळे लागले होते. म्हणजे गेल्या वर्षी नरेंद्र मोदींची लाट आहे असे सर्वांना वाटत होते. पण ती कॉंग्रेस विरोधाची लाट होती, मोदी लाट नव्हती हे आता मान्य करावे लागेल. ज्यांना नाकारण्यासाठी भाजप हा पर्याय समोर आला त्याच भाजपने कॉंग्रेस आणि अन्य पक्षांमधील नेत्यांना केवळ बेरजेसाठी आपल्या पक्षात घेतले. त्यामुळे त्यांचे पाणी आता भाजपला लागले आणि भ्रष्टाचाराचे पीक फोफावले, आरोपांचे थैमान सुरू झाले. भाजपाचे सोवळे आता पुरते सुटले आहे. भाजपाच्या मंत्र्यांच्या भानगडी ज्या प्रकारे एक एक करून बाहेर येत आहेत ते पाहता हे कॉंग्रेसचेच प्रतिरूप आहे असे वाटू लागले आहे. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’, असे सांगून सत्तेत आलेल्या भाजपाचे एक वर्षाच्या आतच पितळ उघडे पडले आहे. कुठेही नीतीमत्ता नाही. डोक्याला कंबरेचे गुंडाळून बसले आहेत. त्यामुळे कमरेखालचे उघडे पडू लागले आहे, ही वस्तुस्थिती आता समोर येते आहे. म्हणजे सरकार बदलले, पण ठेकेदार जुनेच आहेत. वर्षभरापूर्वीपासून ज्यांचे आकर्षण वाटत हेते त्या गोपीनाथ मुंडे कन्या पंकजा मुंडे यांच्यावर तर चक्क आर्थिक घोटाळ्याचा आरोप झाला. उरलेले मंत्रीही रांगेत आहेत. त्यातच पुरोहितांसारखे हितचिंतक आणि पक्षांतर्गत खदखदणारे लोक भाजपला अडचणीत आणत आहेत. हे सगळे भाजप कॉंग्रेसाळल्याचा परिणाम आहे. त्यानंतर आणखी मंत्र्यांचा भ्रष्टाचार विधानसभेत उघडा पाडू, असा बॉम्ब विरोधी नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी फोडला आहे. हा सारा दारुगोळा भाजपामधलेच असंतुष्ट आत्मे विरोधकांना पुरवत आहेत. म्हणजे कॉंग्रेस आघाडी सरकार असताना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे नारायण राणे यांचेसारखे असंतुष्ट जसे नितीन गडकरींना विलासराव, अशोकराव यांच्या भानगडी आणि मुद्दे पुरवत तसेच भाजप पक्षांतर्गत असंतुष्ट आत्मे आता विरोधकांना मसाला देत आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला अजून वेळ आहे. तो पर्यंत मंत्रिमंडळ रिकामे होते की काय, अशी परिस्थिती आहे. विरोधी बाकांवर असताना उठसुठ सरकारचा राजीनामा मागणारे आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र प्रत्येकाला क्लीन चीट देत सुटले आहेत. सरकारमध्ये शिवसेनाही आहे. पण भाजपाच्या मंत्र्यांनाच टार्गेट केले जात आहे, हे विशेष. आधीच्या सरकारमध्येही राष्ट्रवादीचीच लफडी अधिक बाहेर आली होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या रडारवर राष्ट्रवादी होती; पण इथे भाजपा कुणाच्या रडारवर आहे? अंतर्गत कलह भाजपाला खायला निघाला आहे का? काय भानगड आहे? मुंबईचे भाजपाचे आमदार राज पुरोहित यांचे एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन केले. त्यात भाजपाची पोलखोल झाली आहे. ‘पार्टी विथ द डिफरन्स’ म्हणवणार्या भाजपामध्ये सध्या प्रचंड खदखद आहे, असंतोष आहे. आमदार असंतुष्ट आहेत. १९९५मध्ये युती सत्तेत होती. त्या नंतरची १५ वर्षे उपासमारीत गेली. आता सत्ता मिळूनही उपासमार चालूच असल्याने आमदार खवळले आहेत. कधी नवं मिळलं अन गटकन गिळलं अशी अवस्था या पक्षाची झाली आहे. गोपीनाथ मुंडे हयात असते तर आज काय चित्र असते? देवेंद्र फडणवीस यांच्या जागी नितीन गडकरी मुख्यमंत्री असते तर त्यांना ही सर्कस सांभाळणे जमले असते का? मुंडे जिवंत असते तर आज ते मुख्यमंत्री असते. नितीन गडकरी म्हणतात की, भाजपामध्ये गटतट नाहीत, कोटा सिस्टीम नाही; पण अंदर की बात वेगळी आहे. भाजपामध्ये जेवढे गट आहेत तेवढे या देशात पक्षही नाहीत. किंबहुना प्रत्येक भाजपची व्यक्ती हा स्वतंत्र विचार आणि गट आहे. नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांचे आधीही जमत नव्हते आणि आजही जमत नाही. नाईलाज म्हणून गडकरी यांनी जुळवून घेतले आहे. देवेंद्र दिल्लीत लक्ष घालत नाहीत; पण आज ‘वाडया’वर कोण कोण गेले, याकडे त्यांचे बारीक लक्ष असते. गडकरी डोईजड होतील म्हणून मोदींनी देवेंद्र फडणवीस यांना पुढे केले; पण हा पसारा सांभाळताना देवेंद्र यांची दमछाक सुरू आहे. हे फार दिवस चालणार नाही. फडणवीस यांना सरकार पेलवत नाही म्हणून आज ना उद्या मोदींना नितीन गडकरी यांना महाराष्ट्रात पाठवणे भाग पडेल. दिल्लीतील त्यांची डोकेदुखी दूर करणे आणि महाराष्ट्रात स्थिर सरकारसाठी हालचाल करणे यासाठी हा घाट घातला जावू शकतो. देवेंद्र फडणवीस कधी मंत्री नव्हते. साधे एखादे खाते चालवण्याचाही त्यांना अनुभव नाही. तरीही त्यांना मुख्यमंत्री केले गेले. कारण मोदींना सांगकाम्या सीएम हवा होता. मोदी आणि अमित शहा जोडी सांगते तसे फडणवीस वागतात. कॉंग्रेसचे हायकमांड कल्चर आता भाजपामध्येही आले आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे, एकनाथ खडसे..आदी ज्येष्ठ नेते बाहेर फेकले गेले आहेत. त्यामुळे वारंवार फुटीला सामोरा जाणार्या कॉंग्रेसप्रमाणेच भाजपामधील फुट आता कुणी फार काळ थांबवू शकत नाही.
सोमवार, २९ जून, २०१५
कधी नवं ते मिळलं अन गटकन गिळलं
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा