सोमवार, २९ जून, २०१५

साथीच्या रोगजंतुंचा आनंद

 एखादा रोग जसा एकाएकी सगळीकडे फोफावतो आणि आपण त्याला साथ आली म्हणतो तसा प्रकार सध्या राजकारणात चालला आहे. देशात विविध राजकीय नेते, आमदार, मंत्री हे बोगस पदवी प्रकरणामुळे गाजत आहेत. आजकाल अनेक गोष्टी बोगस होत असल्यामुळे पदवीच काय ती बोगस व्हायची राहिली होती, तीही झाली आता काय उरले असा विचार करावा लागेल.   राज्याचे शिक्षणमंत्री, उच्चशिक्षणमंत्री, तंत्रशिक्षणमंत्री आणि मंत्रशिक्षणमंत्री असे राज्याच्या शैक्षणिक खात्याचे मंत्री विनोद तावडे हे महाराष्ट्राला ओरडून सांगत आहेत की, ‘माझी पदवी बोगस नाही हो..’ केवढी विचित्र परिस्थिती आहे ही. साडेसातीच म्हणावी लागेल. एखाद्यावर आरोप झाल्यावर आपले निरपराधीत्व सिद्ध करणे तसे अवघडच. पण सध्या देशाच्या मंत्रिमंडळातील बोगस पदव्यांचे बुरखे फाटू लागलेले आहेत.  दिल्लीत केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील कायदामंत्री तोमर यांची पदवी बोगस असल्याचे सिद्ध झाले आणि त्यांना अटक झाली. त्यानंतर स्मृती इराणी यांची पदवी बोगस असल्याची टीका सुरू झाली. त्यामुळे तावडे यांची पदवी बोगस असल्याचे जाहीर झाल्यावर त्यांचे धाबे दणाणले असतील. पण विरोधकांनाही आक्रमक होण्यासाठी ती चांगली संधी मिळाली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहोत म्हणून बाशिंग बांधून बसलेले विनोद तावडे हे गृहमंत्रीपद मिळतील या आशेवर होते. पण केवळ शिक्षण खाते हातात पडल्यामुळे त्याचीही तुमची पात्रता नाही, हे पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांना दाखवण्यासही संधी मिळाली आहे.    अर्थात आपल्याकडे नोकरीसाठी पात्रता असते तशी मंत्रिपदासाठी नसते. त्यामुळे पदवी नाही म्हणून त्यांचे मंत्रिपद जाण्याची आवश्यकता नाही. चौथी पास असलेले या राज्यात मुख्यमंत्री होवून गेलेले आहेत हा इतिहास आहे. तसेच स्मृती इराणी यांची पदवी बोगस आहे, असे गृहीत धरले तरीही त्या पदवीधर होत्या म्हणून त्यांना मोदींनी मंत्रिमंडळात घेतलेले नाही. त्या पदवीधर असोत, नसोत, त्या निवडून येवोत न येवो त्यांना मंत्री करायचेच होते त्यामुळे पदवीची काही गरज नाही.    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणाची कुठे कधी चर्चा झाली? ते तरी पदवीधर आहेत का?  शिवाय पंतप्रधानांच्या मर्जीतल्या माणसांना पदवीची गरज काय? आता जे केंद्रात तेच राज्यात. त्यामुळे बबनराव लोणीकर यांच्या खोटया पदवीच्या बातम्या आल्या. आता  विनोद तावडे यांची पदवी बोगस असल्याची चर्चा सुरू झाली. विनोद तावडे यांचे सहा महिने ठिक गेले. फडणवीसांएवढी प्रसिद्धी मिळवण्याची व्यवस्था त्यांनी केली. पण खडसे, मुनगंटीवार त्यामानाने प्रसिद्धी मिळवण्यात मागे राहिले.  पण तावडे महाराजांचे भांडे फुटले आणि आता ते ओरडून सांगत आहेत की, माझी पदवी बोगस नाही म्हणून, त्यामुळे विरोधकांपेक्षा अंतर्गत स्पर्धकांना उकळ्या फुटत असतील यात शंकाच नाही.दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाची तीन खाती सांभाळणार्‍या मंत्र्यांनी आणि शिवाय सांस्कृतिक कार्य असे एक सुसंस्कृत खाते ज्यांच्याकडे आहे, ते तावडे आता गयावया करून सांगत आहेत, ‘माझ्या पदवीला बोगस म्हणू नका. माझा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त नसेल, पण पदवी बोगस नाही!’ महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षण संस्थांनी विनोद तावडे यांच्या मुखातून बाहेर पडलेली ही मोलाची अक्षरे जपून ठेवावीत. म्हणजे ज्या शिक्षण संस्थांना सरकारची मान्यता नाही, त्या संस्थांनी प्रत्येक वर्गात तावडे यांचा फोटो आणि हे वाक्य फ्रेम करून लावून ठेवावे. महाराष्ट्रातल्या ज्या ज्या शिक्षण संस्थांना सरकारची मान्यता नाही, त्या त्या विभागातल्या विद्यापीठांची मान्यता नाही, अशा अनधिकृत संस्थांना आता ‘बोगस’ म्हणता येणार नाही आणि त्यांनी दिलेल्या पदव्यांना अजिबात ‘बोगस’ म्हणता येणार नाही. या महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांचा फॉर्म्युला आता सगळीकडे लावावा लागेल. मान्यताप्राप्त नसलेल्या संस्थांना ती संधी मिळेल हे निश्‍चित. ते याची जाहीरात करू शकतील. मान्यताप्राप्त नसलेल्या संस्थेत प्रवेश घ्या आणि राज्यात मंत्री बना. असे केले तर काय चूक होईल? याचे उत्तरही राज्य सरकारनेच दिले पाहिजे.  मान्यता नसलेल्या शिक्षण संस्थेला की जी संस्था कोणत्याही विद्यापीठाशी संलग्न नसेल, त्या संस्थेची पदवी आता महाराष्ट्रात बोगस मानली जाणार नाही. त्यामुळे आता अनधिकृत संस्थांना एका झटक्यात शासनाची मान्यता देऊन टाकली गेली तर नवल वाटायला नको. म्हणजे तावडे अधिकृत पदवीधर होतील. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने हा जो तमाशा सुरू केला आहे, त्यामुळे महाराष्ट्राची किती अप्रतिष्ठा होत आहे, हे सांस्कृतिक खाते सांभाळणार्‍या विनोद तावडे यांच्या बुद्धीच्या पलीकडचा विषय आहे.  महाराष्ट्राची शैक्षणिक अप्रतिष्ठा या शिक्षणमंत्र्याने जेवढी केली, त्याचवेळी सांस्कृतिकमंत्र्याने महाराष्ट्राची सांस्कृतिक अप्रतिष्ठा केलेली आहे. मान्यता नसलेली संस्था पदवी देऊच शकत नाही.  तो फार तर कोर्स असेल. पण ती पदवी असू शकणार नाही. निवडणूक अर्जामध्ये तावडे महाशयांनी पदवीधर असल्याचे लिहिले, म्हणजे फसवणूक केली. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागेल हे निश्‍चित. पण बोगस पदवीचा हा रोग देशभर पसरत आहे हे यातून दिसून आले. या पदव्या राजकीय नेत्यांनी मिळवल्या आहेत हे विशेष. दिल्लीहून स्मृती इराणी यांनीही खास पत्राद्वारे  विनोद तावडे यांना आणि त्यांच्या बोगस पदवीला नैतिक पाठिंबा दिलेला आहे. ‘आप’चे माजी मंत्री तोमर महाराज यांनीही आनंद व्यक्त केला आहे की, ‘बोगस पदवीवाला जगात मी एकटाच नाही. माझ्या जोडीला आता महाराष्ट्राचा एक मंत्री आहे.’ त्यामुळे तुरुंगामध्येही तोमर खुशीत आहेत. साथीचा रोग पसरल्याने रोगजंतूंना काय आनंद होत असेल हे तोमर यांच्या कृतीवरून दिसेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: