अंमलबजावणी महत्त्वाची
- तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी करण्यासाठी एकीकडे तंबाखूवरील कर वाढवण्याच्या मागणीला जोर येत असताना दुसरीकडे सरकारी-पालिकेची हॉस्पिटले तसेच सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा व तंबाखू खाण्यावर राज्याच्या आरोग्य विभागाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू चघळताना आढळल्यास थेट दंड ठोठावला जाणार आहे. राज्यात 1 ऑगस्टपासून ही बंदी लागू होईल. अशाप्रकारे बंदी घालणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य असेल. आरोग्य विभागाचा हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. फक्त याची अंमलबजावणी ही अत्यंत कठोरपणे व्हायला हवी.
- तंबाखू खाणारे, चार चौघात मळणारे आणि ठिकठिकाणी थुंकणारे लोक हे अत्यंत किळसवाणे असतात. गाडी चालवत असताना गाडीतून रस्त्यावर थुंकायचे, रस्त्याने जाताना इकडे तिकडे न बघता कुठेही थुंकायचे यामुळे इतकी अस्वच्छता सगळीकडे असते की चालतानाही पाय कुठे ठेवायचा असा प्रश्न पडतो. सार्वजनिक ठिकाणच्या भिंती, रस्ते, फूटपाथ हे तंबाखू आणि पान खाणार्या लोकांनी अतिशय खराब केलेले असतात. मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये जिन्यांच्या कोपर्यात हे तंबाखू खाणारे थुंकतात तेव्हा प्रचंड चीड येते. आपल्या जिन्यामध्ये थुंकू नका असे लिहावे लागते ही किती शरमेची बाब असते? तंबाखू खाणारी माणसे ही अस्वच्छ गटात मोडणारी असतात. त्यांचा त्रास हा इतरांना फार होत असतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खावून थुंकणार्यांना दंड करण्याची कारवाई ही कठोरपणे होणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्र हे असा निर्णय घेणारे पहिलेच राज्य असले तरी अंमलबजावणी करणारे ते पहिले राज्य ठरले पाहिजे. आज दक्षिणेतील राज्यांमध्ये, गोव्यामध्ये ही स्वच्छता पाळली जाते. गोव्यात सिगारेट सार्वजनिक ठिकाणी ओढण्यास बंदी असलेली अनेक ठिकाणे आहेत. तीथे ते नियम पाळले जातात. पानपट्टीवालाही तशी बंदी घालतो. आपल्याकडे हे कठोर पालन झाले तर निम्मे रोग आणि आजार बंद होतील.
- हॉस्पिटल्स आणि सार्वजनिक ठिकाणांप्रमाणेच बसस्थानक, रेल्वेस्थानकांवरही ही अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. बसमधून आणि रेल्वेमधून, लोकलमध्ये तंबाखू खाणारांची संख्या फार मोठी आहे. धावत्या गाडीतून हे तंबाखू, पान खाणारे थुंकतात तेव्हा सामान्य प्रवाशांना त्याचा त्रास होतोच पण रेल्वे, बसही खराब होतात. मुंबई महाराष्ट्रात पान खाऊन कुठेही थुंकणारांमध्ये उत्तर भारतीय, दक्षिणेतील लोकांचे प्रमाण मोठे आहे. त्याचप्रमाणे लोकलमध्ये बिडी ओढणारे असंख्य दाक्षिणात्य लोक दिसतात. त्यांना विरोध केला तर ते अंगावर धावून येतात इतकी त्यांची दहशत आहे. या लोकांमुळे महाराष्ट्र अस्वच्छ होताना दिसत आहे.
- तंबाखू आणि पान खाऊन थुंकणारांचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यावर कर वाढवण्याचा विचार केला जात होता. तंबाखूजन्य पदार्थांवरील कर वाढवण्याच्या दृष्टीने सलाम बॉम्बे फाऊंडेशनतर्फे सोमवारी परिसंवाद आयोजित केला होता. यामध्ये राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे डॉ. पंकज चतुर्वेदी, डॉ. अर्चना पाटील, हेलीस या स्वयंसेवी संस्थेचे संचालक डॉ. पी. सी. गुप्ता यावेळी उपस्थित होते. या परिसंवादाचा समारोप करताना प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी सार्वजिक ठिकाणी तंबाखू खाण्यावर बंदी घालण्याची घोषणा केली. फक्त ही घोषणा केवळ घोषणा न राहता त्याचे नियमात, कायद्यात आणि कठोर अंमलबजावणीत रूपांतर झाले पाहिजे.
- सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंदी आहे. 2 ऑक्टोबर 2008 पासून ही बंदी आहे. फक्त ती कागदोपत्री आहे. रस्त्याने जाताना चालत सिगारेट ओढणारे असंख्य लोक दिसतात. पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. रस्ता हा सार्वजनिक नाही का? पण बंदी घालताना सार्वजनिक ठिकाणे म्हणजे फक्त हॉल, सभागृह, हॉटेल्स एवढाच उल्लेख केला गेला. प्रत्यक्षात याठिकाणी सिगारेट ओढण्यास कोणतीही मनाई केली जात नाही. हा अनुभव लक्षात घेवून नवी नियम केला जावा ही अपेक्षा आहे.
- तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा, तंबाखू खाण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. त्याबाबतची पत्रे संबंधित खात्याला यापूर्वीच रवाना झाली आहेत. लवकरच त्याबाबतचा जीआर जारी होईल व 1 ऑगस्टपासून ही बंदी अंमलात येईल. या अंमलबजावणीसाठी आता सुजाण नागरिकांनी पुढे आले पाहिजे. विविध संस्थांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तंबाखू खाऊन थुंकणारांवर दंडात्मक आणि कठोर कारवाई झालेली आहे हे स्पष्टपणे पुढे आले पाहिजे म्हणजे कोणी तसे करणार नाही. यासाठी चौकाचौकात मदतकेंद्र असली पाहिजेत. जेणेकरून एखादा माणूस थुंकला तर त्याच्याविरोधात तक्रार करून त्याच्याकडून दंड वसूल करता आला पाहिजे. यासाठी पोलिसांची वाढ करण्यात आली पाहिजे.
- टाटा हॉस्पिटलचे डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी तंबाखूवर कर वाढवण्याची सूचना केली. तंबाखूवरील कर वाढवल्यास त्याचे सेवन कमी होण्यास मदत होईल. तंबाखूवर 65 टक्के कर लावला तर तंबाखूचे सेवन कमी होऊन दरवर्षी सुमारे पंधरा लाख लोकांचे प्राण वाचतील तर 100 टक्क्यांनी कर वाढवला तर तंबाखूच्या दुष्परिणामांमुळे मृत्युमुखी पडणार्या सुमारे 27 लाख लोकांचे प्राण वाचतील, असे डॉ. चतुर्वेदी म्हणाले. एवढे भयानक चित्र असतानाही तंबाखू खाणारांचे प्रमाण प्रचंड आहे. तंबाखू खाणारांचे अनेक परवाने रद्द केले गेले पाहिजेत. दारू पिऊन वाहन चालवणे हा जसा गुन्हा आहे तसाच गुन्हा तंबाखू खाऊन वाहन चालवणे असला पाहिजे. अशा चालकांचे परवाने रद्द केले पाहिजेत. विशेषत: रिक्षा आणि टॅक्सीचालकांमध्ये हे प्रमाण मोठे आहे. तंबाखू खाऊन रिक्षात बसायचे, मागे प्रवासी बसला आहे याचे भान न ठेवता गाडीतून, रिक्षातून तोंड बाहेर काढून थुंकायचे. यामुळे सामान्य माणसांना किती त्रास होतो याचा विचार केला जात नाही.
- तंबाखूचे सेवन कमी होण्यासाठी मध्यंतरी नवी दिल्लीत तंबाखूवर पाप कर नावाने नवीन कर आकारण्याचा प्रस्ताव होता. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात तंबाखूवर पाप कर लावण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागातर्फे राज्य सरकारला पाठवला जाणार असल्याचे या खात्यातील सूत्रांनी सांगितले. पण दिल्लीत जशी याची अंमलबजावणी झाली नाही तशी महाराष्ट्रात परिस्थिती निर्माण होवू नये. हा पाप कर वसूल करायला काहीच हरकत नाही.
- आरोग्य विभागाने प्रस्तावित बंदीची ठिकाणे जी ठरवली आहेत त्यामध्ये बस स्टॉप, विमानतळ, सरकारी हॉस्पिटल, पालिकेची हॉस्पिटल, रेल्वे स्टेशनचा परिसर एवढाच उल्लेख आहे. पण रस्ते, वाचनालये, चौक, नाके, भाजी मंडई यांचा कुठेही उल्लेख नाही. तो होणे आवश्यक आहे.
- सिगारेटपासून राज्याला दरवर्षी मिळणारा महसूल सुमारे 6 हजार कोटी रु. इतका आहे. ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे इंडिया संस्थेने 2009-2010मध्ये केलेल्या पाहाणीनुसार महाराष्ट्रातील 31 टक्के प्रौढ व्यक्ती तंबाखूचे सेवन करतात. प्रत्यक्षात हे प्रमाण अधिक असण्याचीच शक्यता आहे. तंबाखू सेवन करणारांचे प्रमाण जरी 31 टक्के असले तरी त्याचा त्रास होणारांचे प्रमाण हे शंभर टक्के आहे हे लक्षात घेतले पाहिजे. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेसाठी ही बंदी येणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. इथे पोलिस नाही ना, मग खा तंबाखू, थुंका कुठेही, कोण पाहतो आहे या प्रवृत्तीला आळा घातला पाहिजे. तिथे आसपास असणार्या माणसांनी त्या तंबाखू खाणार्याला विरोध केला पाहिजे. त्यासाठी सामान्य माणसाला भयमुक्त वातावरणात वावरता आले पाहिजे. असे धाडस त्याच्या अंगात येण्यासाठी पोलिस आणि व्यवस्थेने सामान्य माणसाला मदत केली पाहिजे. 1 ऑगस्टपासून येणार्या या बंदीचे कडक पालन होणे हे महाराष्ट्राच्या, देशाच्या दृष्टीने अतिशय हिताचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
बुधवार, २ जुलै, २०१४
अंमलबजावणी महत्त्वाची
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा