शुक्रवार, १८ जुलै, २०१४

हेतुशुद्ध नसलेले आंदोलन

  • केवळ उपोषण आणि मोर्चे, आंदोलन करून कोणी महात्मा गांधी होत नाही. त्यासाठी त्या आंदोलनाचा हेतु शुद्ध असावा लागतो. मनात वाईट हेतुने केलेले आंदोलनाची धार ही बोथटच राहणार. स्वार्थापोटी केलेले काँग्रेस आमदार प्रशांत ठाकूर यांचे असेच हे फसलेले आंदोलन. त्याला जनआंदोलन असे ते संबोधत असले तरी ते काही जणांचे आंदोलन होते.
  •      उपोषण आणि सत्याग्रहाच्या प्रभावी शस्त्राचा वापर करत महात्मा गांधीजींनी बलाढ्य-जुलुमी ब्रिटिश सरकारला जेरीला आणले. दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष आणि क्रांतिकारी नेते नेल्सन मंडेला यांनीही तिथल्या वंशवादी गोर्‍या राजवटीला नमवले. शांततापूर्ण मार्गाने सरकारच्या विरोधात अन्यायाविरुद्ध झुंज द्यायच्या या प्रभावी शस्त्राचा, जगातल्या अनेक नेत्यांनी वापर केला आणि सत्ताधीशांनाही त्यांच्यासमोर झुकावे लागले. महात्मा गांधीजींच्या याच शस्त्राचा वापर करत, लोकनायक जयप्रकाश नारायण, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही अन्यायाविरुद्ध लोकमताची जागृती केली. 
  • पण अण्णांच्या आंदोलनानंतर आणि त्यातील फोलपणानंतर या आंदोलनाच्या शस्त्राची धार कमी झाल्याचे दिसून आलेले आहे. याचे कारण आंदोलनासाठी असलेला हेतु हा शुद्ध असला पाहिजे.
  • हल्लीची आंदोलने ही मॅचफिक्सिंगप्रमाणे असतात. टोलनाका प्रश्‍नावरून काँग्रेस आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेले आंदोलन हा तर हास्यास्पद प्रकार होता. आपली फजीती होते आहे हे लक्षात आल्यावर उगारलेले शस्त्र म्यान करण्याची नामुष्की आली. काँग्रेस आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केले होते की आमदारकीचा राजीनामा देवू. अटक करवून घेवू वगैरे. पण टोलमाफीचा निर्णय झालेला नसतानाही राजीनामा देण्याचे धाडस प्रशांत ठाकूर यांना झाले नाही. काही करून वेळ काढा, मुदत मागा पण बाबा मला वाचवा अशी आर्त हाक मुख्यमंत्र्यांना घालण्याची वेळ प्रशांत ठाकूर यांच्यावर आली. टोलनाका सुरू होण्यास किमान दोन महिने लागतील अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. त्यानंतरचा एक महिना समितीचा अभ्यासात जाणार. या सगळ्याची माहिती असल्याने निवडणूकपूर्व स्टंटबाजी करून आंदोलनाची मॅचफिक्सींग करण्याचे काम प्रशांत ठाकूर यांनी केले. पण त्यांची लबाडी पनवेलकरांच्या लक्षात वेळीच आली. त्यामुळे असल्या आंदोलनाला आता कोणीही भिक घालत नाही.
  • 2011 मध्ये अण्णांनी जनलोकपाल विधेयकासाठी केलेल्या आमरण उपोषणाला देशव्यापी पाठिंबा मिळाला होता. लाखो लोक त्यांच्या मागण्यांना पाठिंबा द्यायसाठी रस्त्यावर उतरले होते. तिसर्‍या स्वातंत्र्याच्या त्या संग्रामात महात्मा गांधीजींचे ते आमरण उपोषणाचे शस्त्र सत्ताधार्‍यांना हादरवणारे ठरले होते  आणि लोकभावनांचा आदरही सरकारला करावा लागतो, याची प्रचिती आली होती. अण्णांच्या जनलोकपाल आंदोलनात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हे आघाडीवर होते. त्यांनीच राजधानी दिल्लीतल्या रामलीला मैदानातल्या त्या आमरण उपोषणाच्या आंदोलनाचे कुशल संघटन केले होते. अण्णांनी तेव्हा केलेल्या 13 दिवसांच्या आमरण उपोषणामुळेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारला अण्णांची मागणी मान्य करावी लागली. संसदेलाही एक मताने अण्णांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती करावी लागली.  परंतु त्यानंतर अण्णा हजारेंची पावले ही विकाऊ आणि स्वार्थीपणाने टाकली जात आहेत हे लक्षात आल्यावर त्यांचे एकेक सहकारीही त्यांना सोडून जावू लागले. त्यामुळे मुंबईतील आझाद मैदानावर पुढच्याच वर्षी त्यांनी केलेल्या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला नाही. आंदोलन गुंडाळावे लागले. अण्णा आजारी पडल्याचे जाहीर करून मुंबईत एकापेक्षा एक चांगली रूग्णालये असतानाही अण्णांना मुंबईतून पुण्यात हालवण्यात आले. हे सगळे सामान्य जनतेच्या लक्षात आले. मॅचफिक्सींग प्रमाणे केली जाणारी आंदोलने ही जनतेची फसवणूक असते.  त्यामुळेच आता अरविंद केजरीवाल यांनाही आंदोलनाबाबत आत्मविश्‍वास वाटेनासा झालेला आहे. अन्यायाच्या विरोधात सत्ताधार्‍यांना ताळ्यावर आणण्यासाठी अत्यंत प्रभावी असलेले आमरण उपोषणाचे हे शस्त्र आता मात्र बोथट झाल्याचा साक्षात्कार केजरीवाल यांना झाला आहे. 
  •         सवंग लोकप्रियता आणि रस्त्यावर उतरून आंदोलने करायची चटक लागलेल्या केजरीवाल, यांनी अण्णांच्या पावलावर पाऊल टाकत, राजधानी दिल्लीत सातत्याने सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलने केली. सत्याग्रह केले. आमरण उपोषणे केली. जनमानसात त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली. त्याच संधीचा लाभ उठवत, केजरीवाल यांनी ‘आम आदमी’ पक्षाची स्थापना केली आणि दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाला पराभवाची धूळ चारत, 70 पैकी 28 जागा जिंकल्या. केजरीवाल यांच्याकडून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षितही पराभूत झाल्या. काँग्रेसच्या पाठिंब्यावर केजरीवाल यांनी दिल्लीची सत्ता मिळवली. धडाकेबाज निर्णय घेतले. अवघ्या 48 दिवसाच्या काळात त्यांच्या सरकारने लोकप्रिय निर्णयांचा तडाखाच लावला होता. अर्थात ते सगळे निर्णय फोल होते हे नंतर सर्वांच्या लक्षात आले. मुख्यमंत्री असतानाही ते आंदोलनच करत राहिले.
  • तसाच प्रकार काँग्रेसचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याबाबत आहे. कसला विचार नाही. कसला अभ्यास नाही. केवळ स्वार्थापोटी जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार प्रशांत ठाकूर यांनी केलेला आहे. आपल्या ठाकूर इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला ठेका मिळाला नाही की आंदोलन करायचे. अशा स्वार्थी हेतुने केलेल्या आंदोलनाला धार ती काय असणार? ठाकूर इन्फ्रास्ट्रक्चरचे तीनशे कामगारांना घेवून केलेले आंदोलन हे काही जनआंदोलन होत नाही. प्रशांत ठाकूर यांनी राजीनामा दिला असता तर त्यांचे कौतुक झाले असते. आपल्या मागण्या मान्य होत नाहीत म्हणून पिंपरी चिंचवडचे आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी हिवाळी अधिवेशनात राजीनामा देण्याचे धाडस केले होते. ती धमक प्रशांत ठाकूर यांच्यात नाही हेच यातून दिसून आले. शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांकडे तशी धमक असते. त्यामुळेच या विश्‍वासाने पनवेल विधानसभा मतदारसंघात शेकापक्षाच्या उमेदवाराने 40 हजारांची आघाडी घेतली होती. काँग्रेसचा खोटारडेपणा लक्षात आल्यामुळेच काँग्रेसला पनवेल विधानसभा मतदारसंघात शेकापक्षाने 40 हजारांनी मागे टाकले. याची भिती बसल्याने प्रशांत ठाकूर बेचैन झाले. काय केले म्हणजे जनता माझ्यावर विश्‍वास ठेवेल? हा हरवलेला जनाधार मी कसा परत मिळवणार? या विचारांनी प्रशांत ठाकूर यांना पुरते झपाटले. त्यावेळी त्यांच्या डोक्यात खारघरच्या टोलनाक्याचा विचार आला. यावरून आंदोलन पेटवू आणि जनता आपल्या मागे येती का ते पाहू. पण इथेही त्यांची फसगत झाली. पनवेलकर प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. कारण आंदोलनाचा हेतु हा शुद्ध नव्हता. हेतु शुद्ध नसल्यानेच हे आंदोलन फसले. अरविंद केजरीवाल यांच्यासारखा ते पोरकटपणा करू लागले. केजरीवाल ज्याप्रमाणे आयटम गर्लप्रमाणे काहीही करू लागले तसा प्रकार प्रशांत ठाकूर यांना करावा लागला. दिल्लीच्या  मुख्यमंत्रिपदावर असतानाही केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. केंद्र सरकारच्या विरोधातच मुख्यमंत्र्याने उपोषण केल्याची अभूतपूर्व घटना घडली आणि गाजली. केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामाही दिला आणि पुढे लोकसभेच्या निवडणुकात मात्र त्यांच्या पक्षाच्या बहुतांश उमेदवारांचा मतदारांनी दणकून पराभव घडवल्याने, आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, ती चूकच झाल्याची कबुली त्यांनी दिली. 
  •  तसाच प्रकार प्रशांत ठाकूर यांच्याबाबत होताना दिसत आहे. राज्यात तुमची सत्ता आहे. तुमचे सरकार आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला तुम्हाला रस्त्यावर उतरावे लागते. हे किती विसंगत आहे. ही जनतेची फसवणूक काँग्रेस आमदारांकडून होते आहे. टोल प्रश्‍नावर आंदोलनाची काही एक गरज नव्हती. कारण हा प्रश्‍न आज नाही चार वर्षांपूर्वी निर्माण झालेला आहे. ज्यावेळी बीओटी तत्त्वावर हे काम देण्याचे निश्‍चित झाले तेेव्हाच टोल निश्‍चित होता. त्यावेळी प्रशांत ठाकूर का गप्प बसले? कारण तेव्हा आपल्या ठेकेदार कंपनीला या रस्त्याचे काम मिळेल असे त्यांना वाटत होते. पण रस्त्याचे काम टीआयपीएलला मिळाले नाही की लगेच आंदोलन सुरू केले. हे सत्य आता पनवेलच्या जनतेच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे आता चाळीस हजारांनी मागे गेलेले प्रशांत ठाकूर आणखी मागे सरकले आहेत. आंदोलनाचा हेतु शुद्ध नसला की ते फसणारच. त्याची धार बोथट होणारच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: