- प्रेमळ व्यक्ति ही नेहमीच सगळ्या आदर्शांची जोपासना करते. प्रेमळ व्यक्ती आदर्शांची जणू पूजाच करतात. त्यामुळे प्रेमाने सगळ्या जगाला जिंकण्याची ताकद त्यांच्यात निर्माण होते. प्रेमामुळे सर्व बाह्य शंकाकुशंका नष्ट होतात.
- प्रत्येक व्यक्तिचा असा एखादा आदर्श असतो. त्या आदर्शाची ती व्यक्ति उपासना करत असते. या बाह्य जगात आपण जे काही समोर पहात असतो ते आपल्या मनातून बाहेर पडलेले असते. शिंपल्याचा किडा असतो. या शिंपल्यामध्ये वाळूचा एखादा कण प्रवेश करतो आणि तो वाळूचा कण त्या शिंपल्याला उत्तेजीत करतो. त्यामुळे त्या किटकाच्या शरीरातून एक प्रकारचा द्रव पदार्थ बाहेर पडतो. तो द्रवपदार्थ त्या वाळूच्या बारीक कणाला आच्छादून टाकतो आणि त्यातून एक छानसा मोती तयार होतो.
- आपणही हेच करत असतो. बाह्य जगातून आपल्याला एक ध्येय मिळते. त्याला आदर्श मानून आपण आपली दिशा ठरवत असतो. दुष्ट लोक या जगाकडे नर्क म्हणून पाहतात तर सज्जन लोक सगळ्या जगाकडे स्वर्ग म्हणून पाहतात. प्रेमी लोक या जगाला प्रेममय जग मानतात तर द्वेष करणारे लोक या जगाकडे द्वेषाने पाहतात. लढणार्या लोकांना लढाईशिवाय काहीच दिसत नाही तर शांतीपूर्ण जीवन जगणार्यांना शांततेशिवाय काहीच दिसत नाही. त्याचप्रमाणे सिद्धपुरूषांना एका ईश्वराशिवाय या जगात काहीच दिसत नाही.
- अशा तर्हेने आपण आपल्या आदर्शालाच सर्वस्व मानत राहतो. त्यावर प्रेम करू लागतो. त्या आदर्शाच्या रूपावरच प्रेम करू लागतो. अशावेळी सगळे वादविवाद शंकाकुशंका नष्ट होतात, लुप्त होतात. अशावेळी कोणालाही गरज वाटत नाही की ईश्वराचे अस्तित्व प्रमाण मानले पाहिजे की नाही? आदर्श कधीच नष्ट होत नाही कारण तो आपलाच एक हिस्सा बनून गेलेला असतो. अशा आदर्शाबाबत आपल्या मनात तेव्हाच शंका येवू शकते जेव्हा स्वत:च्या अस्तित्वाबाबत आपल्याला शंका येईल. आपल्याला कसल्याच शंका रहात नाहीत. अशावेळी ईश्वर हा बाह्य जगात आहे की आपल्या अंतरंगात आहे याचाही आपण विचार करत नाही. अशावेळी आपण कसलाही विचार करत नाही, त्याची आपल्याला गरज वाटत नाही की ईश्वर हा नेमका कुठे आहे? तो एका जागी बसलेला आहे का? आपल्या श्वासाने या जगाचे नियंत्रण तो करतो आहे का? या कसल्याही गोष्टीचा आपण विचार करत नाही. आपण असाही विचार करत नाही की ईश्वर सर्वशक्तीमान आहे तो सर्वसदादयामय होवू शकतो. आपल्याला हेही समजत नाही की ईश्वर दयाळू आहे की दंडदाता आहे. प्रेमळ व्यक्तिला पुरस्कार अथवा दंड, भिती अथवा शंका याबाबत काहीच वाटत नसते. या सगळ्या विचारांच्या पलिकडे तो पोहोचलेला असतो. त्याच्यासाठी फक्त प्रेम हाच आदर्श असतो.
- ही गोष्ट निसर्गाने आपोआप सिद्ध करून दाखवली आहे की, हे संपूर्ण जग ही प्रेमामुळेच निर्माण झालेली निर्मिती आहे. प्रेमाशिवाय या जगात दुसरे काहीही श्रेष्ठ नाही. हे जग अणू अणूला एकत्र करते. परमाणू परमाणूला जवळ आणते. मोठमोठ्या ग्रहांना एकमेकांकडे आकर्षित करण्याची ताकद या निसर्गात आहे. पुरूषाला स्त्रिकडे, स्त्रिला पुरूषाकडे आकर्षित करते. हे प्रेमच एका माणसाला दुसर्या माणसांकडे खेचून आणते. प्राणिमात्र एकजूटीने राहतात ते प्रेमाच्या बळावरच एकत्र असतात. प्रेम हे संपूर्ण जगाला एका विशिष्ठ केंद्राभोवती जमा करते. या शक्तीलाच प्रेम म्हणतात. छोट्यातल्या छोट्या अणूमात्रापासून महाकाय अशा प्राण्यांपर्यंत प्रत्येकाला प्रेम आपल्याकडे खेचून घेते. या प्रेमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला भेदभाव माहित नसतो. मान्य नसतो. सगळ्या भिंती दूर करून प्रेमाने सर्वांना जोडण्याचे काम प्रेमच करत असते.
बुधवार, २ जुलै, २०१४
प्रेमामुळे सर्व बाह्य शंकाकुशंका नष्ट होतात.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा