शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१९

सत्यं शोधं सुंदरम


साधारण तीस वर्षांपूर्वी म्हणजे १९९० च्या दशकात महाराष्ट्रात जेव्हा एकांकिका स्पर्धा जोरात चालायच्या त्या काळात हेमंत एदलाबादकर यांची एक एकांकिका खूप गाजली होती. त्या एकांकिकेचे नाव होते, ‘सत्यं शोधं सुंदरम’. सत्य शोधायला निघालेल्या दोघांना विविध सत्य सापडतात. त्यात एक असते ते राजकारण सत्य. साखर कारखानदारीच्या राजकारणात अडकलेल्या बाप-लेकाची चर्चा इथे होते. पोरगा बापाला म्हणतो, मला राजकारणात यायचंय. बाप म्हणतो, त्यासाठी खूप काही शिकावं लागतं. पोरगा म्हणतो, मी शिकायला तयार आहे. बाप म्हणतो, त्यासाठी खाली डोकं-वर पाय करता आलं पाहिजे. ते करून दाखव. पोरगा म्हणतो, डोक्यावर उभं राहायचं अवघड आहे. मी पडेन ना. बाप म्हणतो, सराव कर. मी तुला धरतो, तुझे पाय पकडतो म्हणजे पडणार नाहीस. पोरगा तयार होतो आणि खाली डोकं-वर पाय करतो. कोलांटउडी होते आणि पडतो. पकडा, पकडा म्हणत ओरडत कोसळतो. बापाला म्हणतो, तुम्ही सावरणार म्हणून मी डोक्यावर उभा राहिलो. का असं केलंत? तेव्हा बाप म्हणतो, हाच राजकारणातला पहिला धडा आहे, सख्ख्या बापावरही राजकारणात विश्वास ठेवायचा नसतो. पोरगं खूश होतं. आपल्या बापाला गुरू मानून पाया पडतं. बाप खूश होतो आणि म्हणतो, मी दिल्लीला चाललोय. जाताना फक्त तुझ्या आईला सांगून येतो. तोपर्यंत ही बॅग सांभाळ. यात विमानाचं तिकीट आहे. त्यामुळे मुला विधानसभेचं तिकीट मिळणार आहे. ही बॅग सांभाळ. विश्वासानं पोरगं खूश होतं. बाप आत जातो. पोरगं बॅग घेऊन पळत सुटतं. बापाला बाहेरूनच म्हणतं, राजकारणातला दुसरा धडा मी शिकवतो तुम्हाला, पोटच्या पोरावरही विश्वास ठेवायचा नसतो. विमानाचं तिकीट घेऊन पोरगं बापाला ठगवून पळतं. अत्यंत मार्मिकपणे नाट्य होते ते, पण कालपरवाची अजित पवार, शरद पवारांची गोष्ट पाहिल्यावर नेमके तेच स्पष्ट होताना दिसते. राजकारणात सत्य काय आणि असत्य काय हे समजत नाही.टीव्ही मालिका आणि विविध वाहिन्या आपापला टीआरपी वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. तोच प्रकार राज्याच्या राजकारणात होताना दिसतो आहे. निकालानंतरचे पंधरा दिवस शिवसेनेच्या संजय राऊत यांनी टीआरपी आपल्याकडे खेचला होता. शिवसेनेपेक्षा स्वत:चे महत्त्व वाढवून घेतले होते. आता वेळ आली आहे ती अजित पवारांची. त्यांनी केलेली खेळी पवारांचा खरा शिष्य, त्यांच्या तालमीत तयार झालेल्या अजित पवारांनी आता खेळली आहे हे नक्की.महाराष्ट्रात लांबलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्याने गाफील झालेल्या विरोधक व विश्लेषकांना शनिवारी सकाळी दीर्घकाळ शांत बसलेल्या भाजपने मोठाच धक्का दिला. उजाडता उजाडता राजभवनात देवेंद्र फ डणवीस व अजितदादा हजर झाले आणि राज्यपालांनी त्यांचा शपथविधी उरकून घेतला. त्यामुळे गेले काही दिवस मरगळलेल्या भाजपवाल्यांना एकदम संजीवनी मिळाली. आपण मोठीच बाजी मारल्याच्या थाटातली भाषा व वक्तव्ये सुरू झालेली आहेत, पण म्हणून त्यांचा निर्णायक विजय झालेला नाही. जे काही सरकार स्थापन झाले आहे, त्याला आळवावरचे पाणीही म्हणता येईल किंवा गाजराची पुंगी म्हणता येईल. कारण जोपर्यंत विधानसभेत या नव्या सरकारचे बहुमत सिद्ध होत नाही, तोपर्यंत ते यशस्वी झाले, असे म्हणता येणार नाही. अशा अनेक सरकारांचे शपथविधी गुपचुप वा जोशात पार पडलेले आहेत, पण विधानसभेत त्यांचा सगळा डाव कोसळून पडलेला आहे. ही वस्तुस्थिती विसरून कोणी आनंदोत्सव सुरू केला, तर त्याचाही पोपट व्हायला वेळ लागणार नाही. कारण राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे.अजितदादा व त्यांचे जे कोणी सहकारी भाजपसोबत येण्यास तयार झालेत, त्यांचे टिकून राहणे महत्त्वाचे आहे. अन्यथा भाजपचा हा डाव येडियुरप्पा किंवा त्यांच्यानंतर आलेल्या कुमारस्वामी सरकारप्रमाणे अल्पजिवी ठरू शकतो. सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, अजित पवारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला नाही. ते भाजपचे समर्थक आहेत. ते राष्ट्रवादीचेच आमदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे गटनेतेपद सोडलेले नाही. त्यामुळे अजूनही त्यांच्या हातात बरेच काही आहे. त्यामुळेच केवळ त्यांना हटवून, पक्षांतर बंदीची कारवाई केली जाईल, असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. पक्षांतर बंदी आणि शिस्तभंगाची कारवाई अजित पवारांचे ऐकले नाही तर राष्ट्रवादीच्या आमदारांवर होऊ शकेल. म्हणूनच हे जे काय चालले आहे ते तटस्थपणे पाहणेच मनोरंजक आहे.पहिली गोष्ट म्हणजे या शपथविधीची बातमी आल्यावर शरद पवार यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीला हादरा बसलेला आहे, पण त्यांच्यापेक्षाही हादरून गेली, ती उथळ माध्यमे व पत्रकार. कारण कालपर्यंत हे लोक प्रत्येक पक्षाची मंत्रिपदे व खातेवाटप करण्यात गर्क होते, पण राजभवन वा अन्यत्र चाललेल्या हालचालींचा त्यांना थांगपत्ता लागू शकलेला नव्हता. आताही शरद पवार यांच्याकडे किती आमदार परतले वा अजितदादांकडे कोण गयावया करायला गेला, त्याचे गुणगान सुरू आहे, पण मूळचा राजकीय डाव काय किंवा त्यातले खेळाडू कसे खेळतील, त्याचा कोणी विचारसुद्धा करीत नाही. अजितदादांचा गेम संपलेला नाही, तसाच शरद पवार यांचाही डाव संपलेला नाही. पत्ते प्रत्येकाच्या हातात आहेत आणि आपापले पत्ते कोण कसे खेळणार, यावरच खेळाचे भवितव्य अवलंबून आहे. राज्यपालांनी आमदारांची डोकी मोजून हा शपथविधी उरकलेला नाही, तर दोन मोठ्या पक्षांच्या गटनेत्यांनी बहुमताचा केलेला दावा मान्य करून, त्यांना सत्तास्थापनेसाठी संधी दिलेली आहे. त्यामुळे बहुमताचा निकाल विधानसभेतच व्हायचा आहे. बोम्मई खटला निकालानुसार अशा बाबतीत सभागृहाचे आकडे निर्णायक मानले गेले आहेत. राज्यपालांनी शपथविधी उरकला, मग त्यांच्याही हातात काही उरत नाही. पुढली सर्व कारवाई विधानसभेतच होऊ शकते. सहाजिकच बहुमताचा प्रस्ताव सिद्ध करायला दिलेली सात दिवसांची मुदत कमी-अधिक करण्यापलीकडे त्यात कोर्टालाही काही हस्तक्षेप करायची सोय नाही. विधानसभा अस्तित्वात येईल, तेव्हा नव्या सभागृहाला राज्यपालांकडून शपथ घेतलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या पक्षांचे नेते म्हणूनच गृहीत धरले जाणार आहे आणि आपोआप त्यांनाच आपापल्या पक्षाच्या सदस्यांसाठी व्हीप जारी करायचा अधिकार मिळालेला असेल. त्यांचा व्हीप जुमानणार नाही, त्यांच्यावर पक्षशिस्त मोडली म्हणून पक्षांतर कायद्यानुसार गदा येऊ शकते. त्यामुळे आता फक्त वेट अँड वॉच, काय होते हे बघत बसायचे. येत्या काही दिवसांत नको तितका कायद्याचा किस पाडला जाणार आहे. कदाचित न्यायालयातही त्यासाठी धाव घेतली जाणार आहे. तिथे कुणाचे अधिकार कोणते, त्याचाही निवाडा होऊ शकेल, पण त्यासाठी निर्णायक अधिकार सभापतींना असतील आणि इथेच खरी गोम आहे. ती ‘मुख्यमंत्री कोणाचा’ अशी अजिबात नसून ‘सभापती कोणाचा’ अशीच आहे. त्या निवडणुकीत पक्षाचे नेते म्हणून अजितदादा सरकारी उमेदवार सभापतीला मतदान करायचा फतवा काढू शकतात. जे कोणी तो जुमानणार नाहीत, त्यांच्यावर पक्षांतर कायद्याची टांगती तलवार असू शकते.कदाचित नवे आमदार अशा सापळ्यात अडकण्यापेक्षा पक्षादेश म्हणजे दादांचा व्हीप मान्य करून सरकारच्या बाजूने मतदान करू शकतात, पण कदाचित काहीजण पवारांच्या निष्ठेला प्राधान्य देऊन सरकारविरोधात जाऊ शकतात.23/11/2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: