रिट्रीट, जयपूर आणि सिल्व्हर ओक
राज्यात सत्ता स्थापनेचा पुरता गोंधळ उडाला आहे. आम्ही जनतेचे हित पाहतो, शेतकऱ्यांचे हित पाहतो असे सगळेच नेते सांगत आहेत, पण खरोखरच हे शक्य आहे का? सरकार स्थापन करण्यात कोणालाचा रस नसल्याने आणि राज्यापुढचे प्रश्न सोडवण्याची क्षमता नसल्याने ही दिरंगाई प्रत्येक पक्षाने केली आहे का? मालाडचे हॉटेल रिट्रीट असो किंवा जयपूरमधील काँग्रेसच्या बैठका होणारा पॅलेस असो. या जागांचा वापर हेच नेते जनहितासाठी करू शकतील का? हाच प्रश्न आज पडलेला आहे. प्रत्येकाला सत्ता स्थापनेपेक्षा विरोधात बसण्याची इच्छा आहे आणि मुख्यमंत्री फक्त शिवसेनेलाच व्हायचा आहे. त्यांना मुख्यमंत्री बनवायचा आहे, सरकार नाही, असेच जणू चित्र दिसते, पण या सर्व खलबतांसाठी निवडलेल्या जागा या इतक्या अलिशान आहेत की, अशा जागांचा वापर जितका स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी केला जात आहे, तितका तो जनहितासाठी केला जाईल का?.मालाडच्या रिट्रीट या अलिशान हॉटेलमध्ये जवळपास आठवडाभर शिवसेनेचे आमदार आहेत. सेनेचा मुख्यमंत्री होणार म्हणून इथेच महोत्सव साजरा केला गेला. पुरणाच्या पोळ्या वाटून आनंद व्यक्त केला गेला, पण हे सगळे सत्ता स्थापनेसाठी होते. अशा आलिशान जागांचा वापर आमच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कधी केला जाईल का? आज राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न पडले आहेत. आत्महत्या आहेत. कर्जमाफी आहे. शिवसेना म्हणते तशी कर्जमुक्ती आहे. त्यांना म्हणे सातबाराही कोरा करायचा आहे. मग याबाबतचे निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मीटिंग घेण्यासाठी हॉटेल रिट्रीटसारख्या जागेवर चर्चा करण्याचे धाडस सेना करेल का? शेतकरी गरीब असतो. त्यामुळे त्याच्या मागण्यांच्या फक्त घोषणाच करायच्या आणि आम्ही कर्जमाफी देऊ, कर्जमुक्ती करू, सातबारा कोरा करू एवढे बोलले की, प्रश्न संपले असे नेत्यांना वाटते? सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारणी लागू कराव्यात म्हणून केंद्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी एखादी बैठक घेण्यासाठी हे शेतकरी प्रिय नेते हॉटेल रिट्रीटवर मेळावा घेतील का? शेतकऱ्यांचा महाराष्ट्रात आणि नंतर देशव्यापीही संप गेल्या दोन वर्षात झाला होता. हमीभावासाठी आणि अनेक प्रश्नांसाठी शेतकरी विधान भवनावर चालत आला होता. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हेच नेते अशा आलिशान जागांचा वापर करतील का? महत्त्वाचे निर्णय अशाच जागी होतात, असा समज जर त्यांचा असेल, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रिट्रीटवर चर्चा होईल का?.काँग्रेसनेही महाराष्ट्रातील पेचप्रसंग सोडवण्यासाठी जयपूरच्या पॅलेसमध्ये आलिशान ठिकाणी आपली बैठक घेतली. चार दिवस जयपुरात हे सगळे आमदार, नेते बडदास्तीत होते. प्रश्न महाराष्ट्राचा असताना जयपूरमध्ये जाऊन तमाशा करायचे कारण काय होते? महाराष्ट्रात त्यांना एकही जागा गुप्त बैठकीसाठी मिळत नव्हती का? महाराष्ट्रातील सगळ्या जागा, सगळे हॉल, सगळी हॉटेल्स बुक झाली होती, म्हणून जयपूरला काँग्रेस गेली का? प्रश्न महाराष्ट्राचा होता, तर महाबळेश्वर होते, मुंबई होते, नागपूरला जाऊ शकला असता. पुण्यात, नाशिकला, औरंगाबादला कुठेही काँग्रेसची बैठक होऊ शकली असती. जयपूर हे ठिकाण का निवडले? तिथे निर्णय नक्की होईल, असे जर काँग्रेस नेत्यांना वाटते, तर आमच्या शेतकरी हितासाठी काँग्रेस जयपूरच्या भव्य पॅलेसवर, आलिशान हॉटेलमध्ये शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी एखादी बैठक आयोजित करेल का? कोणतेही संकट आले की, बांधावर जायचं, शेतावर जाऊन मुलाखती द्यायच्या, शेतकऱ्यांना भेटायचे ही नौटंकी नेहमीच होत असते. समोर असलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांसमोर झापले जाते. हे प्रकार होत असतातच, पण स्वार्थासाठी, सत्तेसाठी जर जयपूर आणि पॅलेसमध्ये निर्णय घेतले जात असतील, तर सर्वांचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा जागा निवडून ठोस निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल का?.
महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचे केंद्रस्थान शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस बनला होता. त्यांचे सिल्व्हर ओक आणि वाय. बी. चव्हाण सेंटर गेल्या चार दिवसांपासून चर्चाकेंद्र बनले होते. शेतकरी हितासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस एकत्र येत आहेत, ही अत्यंत चांगली आणि समाधानाची बाब आहे. मग शेतकरी हितासाठी अशाच सिल्व्हर ओक किंवा वाय. बी. सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेस बैठक घेईल का? दबाव तंत्र निर्माण करणारी ही सर्व ठिकाणे आहेत. चांगल्या व्यूहरचना करण्यासाठी, आपल्यातील एकजूट दाखवण्यासाठी हॉटेल रिट्रीट, जयपूर, सिल्व्हर ओक या जागांचा वापर केला जात आहे. तिथे काथ्याकूट करून ठोस उपाय निघत असेल, तर आमच्या शेतकऱ्यांचे आणि जनहिताचे निर्णय घेण्यासाठीही अशा जागेचा वापर करायला काहीच हरकत नाही. अशा जागी चर्चा करून सरकारवर किंवा अन्य मित्रांवर दबाव निर्माण करता येत असेल, तर केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी व्यापक निर्णय घेण्यासाठी सज्ज व्हावे यासाठी दबाव निर्माण करावा, म्हणून अशा जागांचा वापर केला जाईल का?.आज जनतेचे असंख्य प्रश्न असताना ते काथ्याकूट करून चर्चेतून सोडवणे आवश्यक आहे, पण ते सोडवण्यासाठी कोणालाही वेळ नाही. हे प्रश्न मार्गी लागले, तर आम्हाला कोण विचारेल का? असे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत आहे. त्यामुळेच ते प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात, म्हणून अशा जागी चर्चा करून ते प्रश्न सोडवले जातील का?.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा