रात्र संपली, पण उजाडलं कुठं?
रविवारी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सातवा स्मृतिदिन होता. यानिमित्ताने शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही नेते आदरांजली वाहायला आले होते. शिवसेनाप्रमुख म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राने निव्र्याज प्रेम केलेले व्यक्तिमत्त्व. राजकारणात असूनही त्यांच्यावर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी समभावाने प्रेम केलेले उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते ते, पण रविवारी त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्यांमध्ये एकप्रकारची खिजवण्याची प्रवृत्ती दिसत होती. म्हणजे महाराष्ट्रात सत्तापालट होते आहे, भाजपच्या हातून सत्ता काढून घेतली जात आहे. त्यामुळे सत्तेसाठी एकत्र आलेल्यांनी केलेली गर्दी असेच ते चित्र दिसत होते. त्यामुळे हे चित्र महाराष्ट्राला आवडेल का, हा प्रश्न पडतो. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे साहजिक आहे. तो झालाही पाहिजे. विधानभवनावर भगवा फडकला पाहिजेच. त्याबाबत दुमत असण्याचे कारणच नाही, पण ज्याप्रकारे भगवा फडकणे आवश्यक आहे हे शिवसेनाप्रुमखांना वाटत होते तसा हा फडकतो आहे का, हा प्रश्न यातून निर्माण होत आहे. म्हणजे मुख्यमंत्री सेनेचा होईल ही वचनपूर्ती होईल, पण भगवा फडकला असे म्हणता येईल का? रात्र संपली, पण उजाडलं कुठं असाच हा प्रश्न आहे..यानिमित्ताने बालपणीची इसापनितीतल्या प्राण्यांच्या कथा असतात ती कथा आठवल्याशिवाय रहात नाही. दोन बोके एक लोण्याचा गोळा मिळवतात. आता तो वाटून खाण्यावरून दोघे एकमेकांवर गुरकावत राहतात. दोघांनाही समसमान लोण्याचा गोळा हवा असतो. फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला स्पष्ट करताना दोघेही त्या लोण्याच्या गोळ्याकडे बघत बसतात. कोणीच त्याला स्पर्श करत नाही. हे लांबून माकड पहात असते. शेवटी या दोघांना गंडवून हा लोण्याचा गोळा पळवता येईल म्हणून ते हुप हुप करत येते. एका बोक्याला तो हुपल्या पटवतो आणि या गोळ्याचे मी वाटप करून देतो असे सांगतो. त्यासाठी एक तराजू घेऊन येतो. कधी इकडे थोडे तर तिकडे जास्त, कधी तिकडे जास्त तर इकडे थोडे असे करत दोन्ही बोक्यांना वासावर ठेवतो आणि शेवटी आपणच तो लोण्याचा गोळा फस्त करतो. आज राज्याच्या राजकारणाबाबत याहून वेगळी परिस्थिती नाही. एकत्रित निवडणुका लढवून महायुतीने बहुमताचा लोण्याचा गोळा मिळवला, पण सेना आणि भाजप दोन्ही नेत्यांची अवस्था बोक्यासारखी झाली. पंधरा दिवस बघत बसले. शेवटी मध्यस्थीला शरद पवारांना बोलावण्याची वेळ आली. त्यांनी काँग्रेसचा तराजू मोजायला घेतला. आता गोळा इकडला कमी, तिकडला जास्त करत राष्ट्रवादी तो संपूर्ण गोळा खाणार काय, अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे भाजपच्या १०५ च्या गोळ्यातील दहा-बाराजण म्हणे राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसे सांगत तर आहेत. त्यामुळे ते जर राष्ट्रवादीला मिळाले तर राष्ट्रवादीचा आकडा पुन्हा शिवसेनेपेक्षा जास्त होईल. मग मुख्यमंत्रीपदावर राष्ट्रवादीचा हक्क का नाही, असा प्रश्न निर्माण होईल. आघाडीचे सरकार १९९९ ते २०१४ असे पंधरा वर्ष होते. त्यामध्ये २००४ ला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळूनही त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालेले नव्हते. त्यामुळे आता संधी असताना ते टाळणे चुकीचे आहे असा विचार त्यांच्या मनात आला, तर त्यात काहीच चुकीचे नाही. म्हणूनच या दोन बोक्यांच्या भांडणात सत्ता राष्ट्रवादीकडे गेली नाही म्हणजे मिळवले असेच आज महाराष्ट्राला वाटते आहे. आज महाराष्ट्रातील आबालवृद्ध हाच प्रश्न विचारत आहेत.देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी लहानपणी शाळेत ही गोष्ट शिकलेली आहे की नाही? ती माहिती असतानाही त्यांनी हा आत्मघात कसा काय करून घेतला, हा प्रश्न आज महाराष्ट्राला आहे. राष्ट्रवादीने अगदी फसवले नाही. मोठ्या मनाने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले. तरीही शिवसेनेला शिवसेनेचा अजेंडा राबवता येणार आहे का? अशा मार्गाने भगवा फडकला असे म्हणता येईल का? किंबहुना मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल यात तीळमात्र शंका असायचे कारण नाही, पण मुख्यमंत्री झाला तरी विधानभवनावर भगवा फडकवला असे म्हणता येणार नाही. शिवसेनाप्रमुखांना भगवा फडकवायचा होता, म्हणजे रात्र संपली पण उजाडलं कुठं, अशीच अवस्था असणार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तरी त्यांना शिवसेनेचा कार्यक्रम पुढे नेता येत नसेल तर असे पद मिळून काय फायदा असेच वाटल्यावाचून राहवत नाही. आज तिन्ही पक्ष एकत्र आले असले, तरी बैठका घेण्यास, सरकार स्थापनेचा दावा करण्यास विलंब होत आहे याचे कारणच हे आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेवर अंकुश ठेवून सेनेला त्यांचा जाहीरनामा बासनात गुंडाळून ठेवायला लावणार का, असा प्रश्न आहे. शिवसेनेचा मराठीचा बाणा, शिवसेनेचे हिंदुत्व हे दोन्ही काँग्रेस, राष्ट्रवादीला मान्य होणार नाही. महाराष्ट्र आणि मराठी बाण्यावरून काँग्रेसचा विरोध असेल. हिंदुत्ववादावरून काँग्रेसचा विरोध असेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी शिवसेनेने केली होती. तीही सेनेला मागे ठेवावी लागेल. मणिशंकर अय्यर यांच्या मतांना शिवसेनेला सहमती देण्याची वेळ येईल. काँग्रेसचा सावरकर विरोध सेनेला मान्य करावा लागेल. या बदल्यात त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर त्यात भगवा फडकला असे कसे म्हणता येईल? हा प्रकार म्हणजे सरळ सरळ काँग्रेस राष्ट्रवादीचा अजेंडा राबवण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री केला असेच ते चित्र असेल. एरव्ही कधीही न झळकणारे काँग्रेसचे नेते रविवारी शिवतीर्थावर राबत होते, वावरत होते, त्यातून हेच जाणवत होते..शिवसेनेची अवस्था आज युद्धात हरले आणि तहातही हरले, अशी झालेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या तहातल्या अटींनी ते मेटाकुटीला आल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे गोड बोलून छत्रपती शिवरायांना आग्य्राला नेले. औरंगजेबापुढे उभे केले आणि तिथे औरंगजेबाने महाराजांचा अपमान केला म्हणून ते तिथून आपला बाणेदारपणा दाखवून निघून गेले, पण तरीही त्यांना बादशहाने कैदेतच ठेवले. त्यासाठी पेटाऱ्यांतून पळून जाण्याची किमया राजेंना करावी लागली. आज राष्ट्रवादीच्या मिर्झाराजेंनी दिल्लीच्या बादशहाची भेट शिवसेना नेत्यांना घडवली, तरी त्यातून पळून यावे असे वाटल्याशिवाय शिवसेनेला राहणार नाही. त्याच क्षणाची महाराष्ट्र वाट पाहतो आहे. शिवसेनेचा बाणा हा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बासनात गुंडाळण्यासाठी नाही. ते आदरणीय शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेतही नाही. त्यामुळे खरोखरच त्यांना असा मुख्यमंत्री झालेला आवडेल का, हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही..
राममंदिराचे काय?.लोकसभा निवडणुकीपूर्वी गेल्या वर्षी शिवसेनेने पहले मंदिर, फिर सरकार अशी घोषणा दिली होती. ही घोषणा दिली तेव्हा भाजप या मुद्यापासून लांब गेला आहे असे भासवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. स्वबळावर भाषा केली जात होती. लोकसभेला कोणत्याही परिस्थितीत युती होणार नाही असेच बोलले जात होते. कारण आम्ही रामराज्य आणणार आहोत. राममंदिर बांधणार आहोत, अशी भूमिका गेल्या नोव्हेंबरमध्ये सेनेने घेतली होती. परंतु युती झाली आणि या विषयाला सेनेने कुलूप लावले. पहले मंदिर, फिर सरकारचे बॅनर खाली आले आणि त्याजागी लागले आता निभावू युतीधर्म, असे बॅनर लागले. युतीधर्म निभावला जात आहे का, याचे उत्तर कोण देणार? पण आता राममंदिराचा मुद्दा निकाली निघत असताना शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार? काँग्रेस, राष्ट्रवादीच्या हातात रिमोट असल्यामुळे अयोध्येचा विषयही लांब राहणार का, असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा