येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.
कोणता अजेंडा असणार आता?.गेल्या दोन दिवसांपासून आलेल्या बातम्यांनुसार भाजप सरकारने राज्यात राबवलेले प्रकल्प बंद पडणार, अशी वृत्ते झळकत आहेत. यामध्ये मुंबई मेट्रोसह काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. आता त्यासाठी एवढे खोदकाम झालेले आहे, अर्धे प्रकल्प झालेले आहेत. फार मोठी गुंतवणूक झालेली आहे, पण मेट्रो कारशेडचे कारण देऊन शिवसेना हे प्रकल्प बंद पाडणार, असे बोलले जाते. अशा परिस्थितीत अर्धवट खड्ड्यात आणि कामे सुरू असलेल्या अवस्थेत मुंबईचे चित्र कसे असेल? हा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे महाशिव आघाडीचा नेमका अजेंडा काय असणार आहे? सेना-भाजपचे विषय सारून राष्ट्रवादी आपले विषय पुढे रेटणार का?.किमान समानकार्यक्रमात सेनेला काय?.शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाशिवआघाडी निर्माण होण्याचे निश्चित झालेले असले, तरी शिवसेनेचा अजंेडा यात राबवता येणार नाही याचीच काळजी शरद पवार घेणार यात शंका नाही. त्यामुळे शिवसेनेच्या हाती या किमान समान कार्यक्रमात नेमके काय लागणार हे पहावे लागेल. या कार्यक्रमात शिवसेनेला आपले हिंदुत्व गुंडाळून ठेवावे लागेल. त्याचप्रमाणे राममंदिराचा मुद्दाही हाती घेता येण्याची शक्यता कमी आहे. शिवाय दहा रुपयांत थाळी देण्याचेही वचन पाळता येणार नाही. बाकीचे मुद्दे तर राष्ट्रवादीचे आहेतच. त्यामुळे या कार्यक्रमात सेनेचा जाहीरनामा बासनात गुंडाळला जाईल, हे नक्की..लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला उतरती कळा लागली आहे. मोदींची लाट ओसरती आहे, असा संदेश सर्वत्र गेला होता. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील, असे बोलले गेले. युतीला अठराच्या पुढे जागा मिळणार नाहीत आणि राष्ट्रवादी आपले दशक पूर्ण करेल, असे बोलले जात होते, पण त्याच वेळी फेब्रुवारी महिन्यात पुलवामा हल्ला झाला. भारताने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे एकदम माहोल बदलून गेला. वातावरण देशभक्तीमय झाले. त्याचा परिणाम भक्तांच्या संख्येत वाढ झाली आणि पुन्हा एकदा मोदी लाट उसळून आली. अगदी जोरात. २०१४ पेक्षा जास्त यश भाजपला मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादीचे मनसुबे धुळीला मिळाले. जेमतेम एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके खासदार राष्ट्रवादीला निवडून आणता आले. त्यातही साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांचा काहीच भरवसा नव्हता. त्यामुळे पक्षात एकदम मरगळ आली होती. निवडून आलेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादीची ताकद किती होती, शरद पवारांचे वजन त्यात किती होते याबाबत साशंकता होती. याचे कारण निवडून आलेल्या खासदारांमध्ये एक होते, ते रायगडमधून सुनील तटकरे. सुनील तटकरे यांचा विजय शेतकरी कामगार पक्षाची मते पारड्यात पडल्यामुळे झाला होता, हे निश्चित. रायगडात लाख-दीड लाख मते शेकापची होती. तीच त्यांच्या पाठीशी राहिल्याने हा विजय झाला होता. त्यामुळे तो राष्ट्रवादीचा विजय म्हणता येत नव्हते. दुसरीकडे त्यांचाच नातू पार्थ पवार याला मावळ मतदारसंघातून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. पवार घराण्यातला तो पहिला पराभवाचा मानकरी ठरला होता. बारामती हे घरचे मैदान असले, तरी सुप्रिया सुळेंपुढे भाजपच्या उमेदवाराने चांगलेच आव्हान निर्माण केले होते. शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या शिवाजीराव अढळरावांचा पराभव केला असला, तरी तो मुजरा छत्रपती शिवरायांना होता. तो करिष्मा अमोल कोल्हे यांच्या लोकप्रियतेचा होता, अमोल कोल्हे यांच्या हिंदुत्वाचा होता, दोन आजी-माजी शिवसेना उमेदवारांतला होता. त्यामुळे या यशात राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे वर्चस्व कुठेच दिसत नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादीचे जेवढे खासदार होते, त्यात शरद पवारांची ताकद वाढल्याचे कुठेच दिसत नव्हते. त्यामुळेच काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीही महाराष्ट्रात कमजोर झाली की काय, असे वाटू लागले. कार्यकर्ते अस्वस्थ होऊ लागले. त्यांना पक्ष सोडून दुसरीकडे जाण्याचे वेध लागले होते..लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच पक्षांनी, सेना-भाजपने रथयात्रा काढायला सुरुवात केली. शिवसेनेने जनआशीर्वाद यात्रा काढली, तर भाजपने महाजनादेश यात्रा काढली. त्यामुळे आपणही एखादी यात्रा काढली पाहिजे, असे राष्ट्रवादीला वाटू लागले. त्याप्रमाणे या यात्रेचे आयोजन केले गेले. स्वत:ला साक्षात शिवराय समजत असलेल्या अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज यात्रा असे नाव देऊन ही यात्रा काढण्याचे ठरवले. त्याला राष्ट्रवादीने पाठिंबाही दिला, पण राष्ट्रवादीच्या झेंड्याबरोबर तिथे भगवा आला. तेव्हाच संकेत मिळाला होता की, हा भगवा शिवसेनेचा आहे. अमोल कोल्हे पुढे गेले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या गोटात भगवा पेरला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचा झेंडा आणि भगवा असेच एकत्र येऊ शकतील, पण या रथावर एक असली शिवरायांचे वारसदार आणि नकली शिवराय म्हणजे शिवरायांची भूमिका करणारे अमोल कोल्हे हे दोघे असणार होते. इथेच कोणत्या राजाला मानवंदना मिळणार, हा संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे या रथावरून छत्रपती उदयनराजे पायउतार झाले आणि हा रथ त्यांनी अमोल कोल्हेंसाठी मोकळा सोडला, पण अमोल कोल्हेंना पाहायला आलेल्या लोकांमुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांकडेही दुर्लक्ष झाले. या यात्रेचा फायदा राष्ट्रवादीला मिळणार नाही, तर भगवी लाट निर्माण होईल. अमोल कोल्हे यांचे प्रस्थ वाढेल हे चाणाक्ष शरद पवारांच्या नजरेतून सुटले नाही. त्यामुळे हा रथ अडवून राष्ट्रवादीला खऱ्या अर्थाने ऊर्जा देईल, असे काही तरी घडण्याची संधी ते शोधत होते. ती संधी नेमकी त्यांना मिळाली आणि तेथे पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळ्याचे काम नोहे म्हणत ते मैदानात उतरले..जातीचे म्हणजे जातीने लक्ष घालणारे पक्षात हवे होते. उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांची गरज नव्हती. त्यामुळे ईडीच्या प्रकरणानंतर शरद पवारांनी महाराष्ट्राचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहोत, हे बिंबवले. पावसाला आम्ही घाबरत नाही, हे दाखवून दिले. अमोल कोल्हे यांच्या यात्रेला जमले नाही, ते शरद पवारांनी करून दाखवले. त्यामुळे राष्ट्रवादीने सगळ्याच रथांची घोडदौड थांबवली, किंबहुना आजही आणीबाणीची परिस्थिती असताना. सरकार स्थापन करण्याचे सर्व काही आपल्याच हातात असतानाही शरद पवार नागपूर, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असे दौरे करून शेतकऱ्यांना भेटत आहेत. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यातून झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत आहेत. आधी शेतकऱ्यांना भेटायचे आणि नंतर शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे सरकार आले, हे बिंबवण्यासाठी त्यांनी तयारी केलेली आहे. भगवाबरोबर घ्यायचा असेल, तर आपणच खरे जाणते राजे आहोत, हे दाखवायची संधी शरद पवार कशी काय सोडणार? त्याप्रमाणे ते शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत..
दुसरीकडे सरकार स्थापनेच्या अगोदर शिवसेना नेते उद्धव ठाकरेही ठिकठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यांना धीर देत आहेत. महात्मा गांधी महात्मा होण्यापूर्वी संपूर्ण भारतभर हिंडले होते. ही प्रेरणा त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी दिली होती. गांधीजींचे गुरू असलेल्या गोखलेंनी त्यांना सांगितले होते की, तुम्ही विलायतेतून आलात, आफ्रिकेतून आला आहात, पण स्वदेशीची चळवळ, स्वातंत्र्य चळवळ करायची असेल, तर अगोदर संपूर्ण देश हिंडून या. गांधीजींनी ते केले आणि मग त्यांच्या लक्षात आले की, गरीब किंवा श्रीमंत कोणीही असो, सर्वांना बरोबर घेऊन जाते ते मीठ. हा सर्वसमावेशक विषय आहे. तो हाती घेतला, तर जनआंदोलन मोठे होईल आणि मिठाचा सत्याग्रह उभा राहिला, तसेच नेमके शरद पवारांनी काहीसे केलेले आहे. सरकार स्थापनेपूर्वी शेतकऱ्यांना भेटा. त्यांची दु:खे समजावून घ्या, असा संदेश पवारांनी ठाकरेंना दिला आणि त्यांनी दौरे सुरू केले. आलिशान गाडी आणि एसीत बसून हुकूम सोडणारे आज वावरात जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. जंगलात जाऊन किंवा हेलिकॉप्टरमधून वाघांचे फोटो काढणारे आणि दुरून डोंगर साजरे म्हणणारे उद्धव ठाकरे आज त्या डोंगर-दऱ्या आणि शेतावरचे चढ-उतार पाहात आहेत. जर शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा असेल आणि त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा हवा असेल, तर तो शेतकऱ्यांना आपला वाटला पाहिजे. कारण याच उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवताना ठाकरेंना शेतीतले काही कळते का? भुईमुगाला शेंगा कुठे लागतात सांगता येईल का? असे म्हटले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मातीवर आणून मगच सरकार स्थापन करायचे. त्यासाठी आपण मैदानात उतरले पाहिजे. कर्ता करवता आपण आहोत हे दाखवून नंतर राष्ट्रवादीची ताकद वाढवायची हे धोरण शरद पवारांचे आहे. आपल्याला अजून पाच वर्षांनी पूर्ण राष्ट्रवादीची सत्ता आणायची असेल, तर शिवसेनेला डोक्यावर घेतलं पाहिजे. नंतर त्यांना डोक्यावर घेऊन खाली टाकायला फारसा वेळ लागणार नाही, हे शरद पवारांना चांगलेच माहिती आहे. गणपती विसर्जनापूर्वी नाही तरी आपण डोक्यावर घेतो. माकडीणही पिलाला डोक्यावर घेते आणि नंतर स्वत:चा जीव वाचवायला त्यालाच पायाखाली घालते. तसे करायचे असेल, तर स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही, हे शरद पवारांनी ओळखले आणि त्यादृष्टीने आता पावले टाकली जात आहेत..पक्षाची जबाबदारी दुसऱ्यांवर टाकून पाहिली, पण त्याला फारसे यश येताना दिसत नाही. हेच नेमके राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या लक्षात आले असावे. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे पक्षात थोडी मरगळ आली होती. ही मरगळ झटकण्यासाठी नवखे खासदार अमोल कोल्हे यांच्या हातात राष्ट्रवादीचा रथ पक्षाने सोपवलाही होता. या रथावर छत्रपतींचे वारसदारही बसवले होते, पण तरीही हा रथ रुतूनच बसला होता. त्याचवेळी शरद पवारांनी जाणीव झाली की, तेथे पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळ्याचे काम नोहे. स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही आणि राष्ट्रवादीलाही चैतन्य येणार नाही. त्याप्रमाणे शरद पवार स्वत: मैदानात उतरले आणि खरोखरच राष्ट्रवादीला सोन्याचे दिवस आणले. स्वर्ग मिळवून दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा