चित्रपट, मालिकांमधील मराठीपण हरवते आहे
दरवर्षी 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन आला की मराठीचे प्रेम एक दिवसांसाठी तरी उफाळून येते आणि नंतर ते सोयीप्रमाणे अडगळीत टाकले जाते. तसंच काहीसं आपल्याबाबत झालं असावं असं मला आत्ता तरी वाटतंय. पण तरीही आमचे मराठीपण कुठेतरी हरवत चाललं आहे हे नक्कीच जाणवू लागले आहे. विशेषत: मराठी चित्रपट आणि सध्या विविध वाहिन्यांवरून भडिमार केल्या जाणार्या दैनंदिन मालिकांमधून तर मराठीपण हरवत चाललं आहे याची चांगली जाणिव होउ लागली आहे. यावरून चांगले मराठी लिहीणारे लेखक कमी झाले आहेत की इतर भाषांची आक्रमणे करून घेण्यात मराठी लेखकांना धन्यता वाटते आहे असा प्रश्न निर्माण होतो.
सध्या विविध वाहिन्यांवर आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातही बरेचसे अमराठी लोक वळत आहेत. ही चांगली आणि कौतुकाची बाब असली तरी त्यांच्याकडून मराठी संस्कृतीवर, भाषेवर फार मोठे आक्रमण केले जात आहे. अस्सल मराठीपण हिरावून घेतले जात आहे हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे सहन करतो म्हणून किती सोसायचे असा विचार मराठी मनात येत नाही तोपर्यंत ही आक्रमणे सुरूच राहतील आणि लक्षात येईल तेव्हा मराठी नावालाही शिल्लक राहिलेली नसेल. त्यामुळे या झपाट्याने मराठी चित्रपट, मालिकांमध्ये येणार्या अमराठी लोकांना मराठीपण शिकवण्याची जबाबदारी मराठी माणसाची आहे. परंतु बरेचजण त्यांच्या आहारी जाउन आपले मराठीपण हरवून बसत आहेत हे चिंतेची बाब आहे. या मराठी चित्रपटसृष्टीची निर्मिती दादासाहेब फाळके नामक एका मराठी माणसाने केलेली आहे. व्ही शांताराम यांच्यासारखे श्रेष्ठ निर्माते,दिग्दर्शक याच सृष्टीने दिलेले आहेत. त्यानंतर राजा परांजपेंपासून ते दादा कोंडके, सचिन, महेश कोठारे, सूषमा शिरोमणी अशा दिग्गजांनी मराठीपण टिकवण्याचे चांगले प्रयत्न केले. पण गेल्या काही दिवसात चित्रपट आणि मालिकांमधून असलेले मराठीपण हरवत चालले आहे. मराठी कथा आणि मालिकेच्या नावावर अनेक अमराठी उद्योग लादले जात आहेत. निर्माते दिग्दर्शक म्हणून मराठीकडे वळत असलेल्या लोकांना अस्सल मराठी समजत नाही. त्या कथेचा अर्थ पण समजत नाही. कोणातरी अजाण माणसांकडून त्याचे भाषांतर, रूपांतर करून घेतले जाते आणि अर्थाचा अनर्थ केले जाणारे सुमार दिग्दर्शनाचे, सुमार चित्रपट बनले जातात. भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया ज्या मराठीने घातला आहे त्याच मराठीचे अस्तित्व असे धोक्यात येत असेल तर ते चांगले लक्षण नाही. सध्या ‘माझ्या नवर्याची बायका’े नावाची एक मालिका झी मराठीवर सुरू आहे. त्यात ती शनाया नावाची मुलगी दाखवली आहे, तिचे आडनाव सबनीस दाखवले आहे. म्हणजे शंभर टक्के मराठी असलेले अडनाव घेउन आलेली मुलगी किती कमी कपड्यात दाखवली आहे. तिला मराठीतील पदार्थही माहित नाहीत. चहा कसा करतात हे माहिती नाही. ऑफिसमध्ये मेकअप, फेशीयल असले काहीतरी करत बसते. हे सगळे न पटणारे आहे. लेखकाने बुद्धी गहाण ठेवून हे कथानक रचल्याचे दिसते. त्या शनाया सबनीसला ज्याप्रकारे आखूड कपडे दिले आहेत त्यातून मराठी महिलांची बेइज्जती करण्याचे काम हे अमराठी निर्माते करत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. कोणतीही मराठी मुलगी इतकी मूर्ख असू शकत नाही की जिला चहा कसा करतात ते येत नाही. जी नोकरी करते आहे, शिकलेली आहे तरी कोणतीही मुलगी चहा येत नाही असे होत नाही. पण अमराठी निर्मात्यांच्या आग्रहाखातर मराठी महिलांचे हे अवमूल्यन केले गेले आहे. हे हरवत चाललेले मराठीपण जपले पाहिजे. याच वाहिनीवरची आणखी एक मालिका म्हणजे काहे दिया परदेस?..प्रादेशिक वाद कमी करण्याच्या उद्देशाने ही मालिका असेल असे वाटत असतानाच गेल्या काही दिवसांपासून ही मालिका 95 टक्के हिंदी झाली आहे. हा मराठी मालिकेवर, मराठी वाहिनीवर केलेला अत्याचार म्हणावा लागेल. कथेसाठी एखादे पात्र इतर भाषेतील असणे, विनोद निर्मितीसाठी त्याचा वापर होणे हे ठिक आहे. पण संपूर्ण एपिसोडच्या एपिसोड मराठीशिवाय येणे हे कितपत योग्य आहे? उत्तर प्रदेशातील एका वाराणसीच्या कुटुंबात पुरोगामी महाराष्ट्रातील मुंबईची मुलगी वाटेल ते हाल सहन करत राहते, हे दाखवून काय मिळते? शिव गौरीचे लग्न झाल्यावर ती मालिका संपली होती पण उगाच वाढवत नेली आणि सासू सुनांच्या छळाच्या मालिकेला सुरूवात केली गेली. ही मराठी संस्कृती नाही. त्याचवेळी अस्सल मराठीपण जपलेली तुझ्यात जीव गुंतला ही मालिका मात्र लोक चवीनं पाहतात याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे कमी कपड्यातील आणि बिगर मराठी संवाद टाकूनच मालिका चांगली होते हा गैरसमज या मालिकेने दूर केलेला आहे. मराठीपण जपणार्या नकटीच्या लग्नाला, चूकभूल द्यावी घ्यावी या मालिकाही लोकांना आवडत आहेत. असे असताना अमराठी वातावरणाच्या मालिका दाखवून काय साधले जाते? त्यापेक्षा इतर निर्मात्यांच्या इतर भाषेतील मालिका डब करून दाखवले तर ठिक होईल. तीच अवस्था मराठी चित्रपटांबाबत होत आहे. गदिमा, शंकर पाटील, वसंत सबनीस अशा अस्सल मराठीपण जपणार्या लेखकांचा वारसा जपणारे लेखक सध्या का नाहीत? निर्मात्यांच्या आग्रहाला बळी पडून नसलेली मराठी संस्कृती माथी मारण्यापेक्षा आपल्याकडे काय मराठी संस्कृती आहे हे पटवायला लेखकांनी शिकले पाहिजे. नाहीतर सुमार दर्जाचे मराठी चित्रपट पाहण्याचे नशिबी येईल. त्यामुळे प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाहीत. आयटम साँगच्या नावाखाली घुसडगाणी टाकायची आणि लोकांना खुळ्यासारखं नाचवायचे. हे प्रकार थांबले पाहिजेत. मराठी लावणीही आता चित्रपटातून वेगळ्या प्रकारे सादर केली जाते. लावणीची इज्जत राखण्याचे काम झाले पाहिजे. या आक्रमणामुळे अस्सल मराठीपण असलेले चित्रपट फक्त कुठेतरी पुरस्कारासाठी पाठवले जातात आणि ते प्रदर्शनापासून दूर राहतात. बाजारू मराठी वातावरण नसलेले चित्रपट माथी मारले जातात. यामुळे चित्रपट, मालिकांमधील मराठीपण हरवत चालले आहे. - प्रफुल्ल फडके 8108454555
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा