आमचे मंत्री राजीनामा खिशात घेऊन फिरत आहेत, आम्ही केव्हाही युती तोडू अशी भाषा सातत्याने करणार्य शिवसेनेने आता भारतीय जनता पक्षासोबत असलेली युती तोडावीच, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. कारण भितीचा कोणताही बागुलबुवा दाखवून काही होत नाही, तर प्रत्यक्ष कृतीला महत्व असते.शिवसेनेचे सातत्याने होणारे हे बोलणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा टिंगलीचा विषय होत आहे. शिवसेनेची होणारी ही टिंगल मनाला बरी वाटत नाही. कारण नुसते नावाला वाघ असून काय उपयोग?
आज आमचे मंत्री राजीनामा खिशात घेऊन फिरत आहेत असे शिवसेना नेते उद्धव ठाकरे अनेक वाहिन्यांवर बोलत आहेत. त्यांचे मंत्री आम्ही 19 फेब्रुवारीला हे राजीनामे पक्षप्रमुखांकडे देणार आहोत असे बिनदिक्कतपणे सांगत आहेत. पण हाच टिंगलीचा विषय होत आहे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे राजीनामा दिला तर काहीच अडचण नाही. कारण तो राजीनामा मंजूर करण्याचा अधिकार त्यांना थोडाच आहे? राजीनामा द्यायचाच असेल तर तो सरळ मुख्यमंत्र्यांकडे, राज्यपालांकडे द्यायला पाहिजे. उगाच आग रामेश्वरी अन बंब सोमेश्वरी नेण्यात काय अर्थ आहे? त्यामुळे शिवसेनेच्या या धमक्यांचा परिणाम ना सरकारवर होत आहे ना मतदारांवर. कारण हा प्रकार म्हणजे लांडगा आला रे आला असे घाबरवण्यासारखा आहे. प्रत्यक्षात लांडगा येईल तेंव्हा या शिवसेनेच्या वाघांचे काय होईल? उद्या जर भाजपने आम्हीच शिवसेनेची युती तोडत आहोत, त्यांच्या मंत्र्यांचे राजीनामे मागवतो असे जाहीर केले तर शिवसेनेची इभ्रत राहील काय? त्यामुळे भाजपने सरकारमधून बाहेर पडण्यास मजबूर करण्याअगोदर शिवसेनेनी युती तोडावी आणि आपल्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत हे उत्तम.
मुळात भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन केेले तेंव्हा शिवसेना त्यांचा बरोबर नव्हती. अल्पमतात असूनही सरकार स्थापन केले. भले त्यांना राष्ट्रवादीने त्यावेळी पाठींबा जाहीर केला असेल. पण शिवसेनेशिवाय हे सरकार निर्माण झालेले आहे. त्यामुळे शिवसेनेशिवाय पुढे कसे जायचे याचे पर्याय भाजपकडे असणार हे निश्चित. शिवसेना सरकारमध्ये काही दिवसांनंतर आली आहे. त्यामुळे भाजपने आम्हाला तुमची गरज नाही, तुमची गरज म्हणून तुम्ही आमच्या वळचणीला आला आहात असे दाखवत शिवसेनेला दुय्यम मंत्रिपदे दिलेली आहेत. त्यामुळे या दुय्यम मंत्रिपदांचा टेंभा मिरवत बसण्यापेक्षा शिवसेनेने बाहेर पडावे हेच उत्तम.
मुख्यमंत्रीपद भाजपकडे आहे. उपमुख्यमंत्रीपद असणार नाही असेही जाहीर केले. गृह, अर्थ अशी सगळी महत्वाची खाती भाजपकडेच आहेत. त्यामुळे शिवसेनेला भाजपने दिलेल्या खात्यांवरच लाचारपणे मंत्रिपदे मिळवावी लागली आहेत. साहजीकच त्यांच्या राजीनाम्याची अथवा सरकारमधून बाहेर पडण्याची ना कोणाला खंत वाटेल ना खेद वाटेल. त्यापेक्षा खरोखरच थोडा फार स्वाभीमान शिल्लक असेल तर सरकारमधून बाहेर पडावे आणि पुढच्या निवडणुकांची तयारी करावी हे उत्तम.
आज शिवसेनेला भीती आहे की आपण राजीनामे दिल्याने किंवा सरकारमधून बाहेर पडल्याने जर सरकार कोसळले नाही तर आपली किंमत शून्य ठरेल याची. कारण जर मागच्यासारखं राष्ट्रवादीनं सरकार कोेसळू न देण्याची जबाबदारी घेतली तर शिवसेनेची काहीच किंमत राहणार नाही. त्यामुळे फक्त धमकी देण्याचे काम शिवसेना करते आहे. त्याची सर्वत्र टिंगल होते आहे. ही टिंगल आता शिवसेनेने थांबवावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा