महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बिगर काँग्रेस मुख्यमंत्री स्बवळावर पहिल्यांदाच होत असल्याबद्दल सर्वात प्रथम देवेंद्र फडणवीस यांची मन:पूर्वक अभिनंदन करायला पाहिजे. महाराष्ट्राच्या 18 व्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र गंगाधर फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाने एकमताने निवड केल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातली, ‘दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’, ही घोषणा प्रत्यक्षात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 288 पैकी 122 म्हणजे सर्वाधिक जागा मिळाल्याचा निकाल जाहीर झाला, तेव्हापासूनच मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांचे नाव आघाडीवर होते. मुख्यमंत्रिपदाच्या नावाच्या चर्चेत माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा, केंद्रीय नगरविकास मंत्री नितीन गडकरी, एकनाथ खडसे यांच्या नावांची प्रसार माध्यमातून चर्चा सुरू असतानाही, फडणवीस मात्र अत्यंत शांत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या पाठबळावर आपणच मुख्यमंत्री होणार, असा आत्मविश्वास देवेंद्र फडणवीस यांना असल्यामुळेच या चर्चेच्या गदारोळात त्यांनी कोणत्याही प्रतिक्रिया व्यक्त केल्या नव्हत्या. निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात, शिवसेनेने भाजपवर जहरी टीका केल्यावरही, अत्यंत संयमाने आपल्या पक्षाचा झंझावती प्रचार करणार्या प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांच्या नेतृत्वावरच राज्यातल्या जनतेनेही विश्वास दाखवला आणि या पक्षाला विधानसभेत प्रथम क्रमांकाचे स्थानही मिळवून दिले. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ नेता निवडीच्या बैठकीच्या आधी एकनाथ खडसे यांचा रुसवा-फुगवा वगळता, फडणवीस यांची नेतेपदी योग्य प्रक्रियेने निवड झाली आहे. गेली पंधरा वर्षे काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचार, घोटाळे आणि अंदाधुंदीच्या कारभाराने वैतागलेल्या राज्यातल्या जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करायचे मोठे आव्हान फडणवीस यांच्यासमोर आहे. त्याचबरोबर काँग्रेसमधील भ्रष्ट नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्यामुळे त्यांचा उपद्रव सहन करीत फडणवीस यांना राज्य करायचे आहे.देवेंद्र फडणवीस यांना वयाच्या अवघ्या 44 व्या वर्षी मुख्यमंत्रिपदावर विराजमान होण्याचा सन्मान मिळाला आहे. फडणवीस यांचा अभ्यासू आणि संयमी नेते असा लौकिक आहे. एलएलबी आणि एमबीए या पदव्या मिळवल्यावर अत्यंत तरुण वयात आधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि नंतर भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय राजकारणात उतरलेल्या या नेत्याला 25 वर्षांचा राजकारणाचा अनुभव आहे. त्यांचे वडील गंगाधरपंत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. भाजपचे क्रियाशील कार्यकर्ते होते. विधान परिषदेचे सदस्यही होते. बालपणीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेल्या फडणवीस, यांनी आणीबाणीच्या काळात वडिलांना तुरुंगात डांबले जाताच, ते शिकत असलेल्या इंग्रजी शाळेच्या नावात इंदिरा असा शब्द असल्याने, ती शाळा सोडली आणि मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतले. बालपणापासूनच अफाट मित्रसंग्रह असलेल्या या युवकाने लहान वयातच नागपूर महापालिकेची निवडणूकही लढवली. ती जिंकली आणि वयाच्या 27 व्या वर्षी नागपूरचे महापौर व्हायचा मानही मिळवला. सलग चार वेळा नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले फडणवीस हे स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते आहेत आणि आता नियतीनेच महाराष्ट्राचे अखंडत्व कायम ठेवायची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. स्वच्छ आणि निष्कलंक राजकारणी, अजातशत्रू नेता, असा लौकिक असलेल्या फडणवीस यांनी विरोधी पक्षात असताना, सरकारच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले. मंत्र्यांच्या गैरव्यवहाराचा पंचनामा केला. पण राजकारणात असताना, त्यांनी कधीही, कुणाशी व्यक्तिगत वैर केलेले नाही. त्यामुळेच सर्व पक्षातल्या नेत्यांशी त्यांचे मैत्रिपूर्ण संबंध असले, तरी ताठ बाण्याच्या या स्वाभिमानी नेत्यावर विकाऊपणाचा शिक्का मारायचे धाडस त्यांच्या विरोधकांनाही झालेले नाही. सत्तेसाठी नको त्या लोकांना आपल्या पक्षात घेतल्याचा आणि त्यांना उमेदवारी दिल्याचा कलंक फक्त त्यांना असला तरी व्यक्तिश: देवेंद्र फडणवीस हा मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेता आहे. चांगला नेता असेल तर काँग्रेसमधून आलेल्या फडतूस लोकांनाही कसे दाबायचे हे त्यांना समजेल यात शंका नाही. राज्याच्या हितासाठी अशा काँग्रेसमधून आलेल्यांची खोगीरभरती हीच लायकी असल्याचे ते दाखवून देतील. शेकापक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेल्यावर राम ठाकूर यांना ज्याप्रमाणे काँग्रेसने अडगळीत टाकले, लोकसभेची उमेदवारी दिली नाही त्याचप्रमाणे प्रशांत ठाकूर यांची लायकीही भाजप नेते दाखवून देतील. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे कसब पणाला लागेल. अत्यंत अभ्यासू आणि सामाजिक प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्या समस्या विधानसभेच्या व्यासपीठावर धाडसाने मांडणार्या फडणवीस यांना महाराष्ट्रातल्या जनतेच्या सामाजिक प्रश्नांची जाण आहे. विदर्भातल्या शेतकर्यांच्या आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकारने दिलेल्या मदतीतला घोटाळा, आदर्श घोटाळा, समाज कल्याण विभागातला घोटाळा, यासह अनेक घोटाळ्यांवर त्यांची तोफ सरकारवर आग ओकत राहिली. 70 हजार कोटी रुपयांच्या जलसिंचन घोटाळ्याची चिरफाड आणि पंचनामा त्यांच्यामुळेच झाला. आमदारकी मिळाल्यावरही त्यांचे जमिनीवरचे पाय कधीच सुटलेले नसल्यानेच, शेतकरी, कामगार आणि सामान्य जनतेशी त्यांचा संपर्क सतत असतोच. आपल्या मतदारसंघातल्या मतदारांनाही ते वारंवार भेटत राहतात. महाराष्ट्राच्या मूलभूत समस्यांची सोडवणूक करतानाच, मागासलेल्या भागांना झुकते माप दिले गेले पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. स्वीकारलेल्या भूमिकेपासून त्यांनी कधीही माघार घेतलेली नाही. तोड पाण्याच्या राजकारणात ते कधीही अडकलेले नाहीत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, वसंतदादा पाटील या माजी मुख्यमंत्र्यांप्रमाणेच सामान्य आणि कष्टकरी जनता हेच फडणवीस यांचे आराध्यदैवत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या जमीनदार कुटुंबात जन्मलेल्या फडणवीस यांची नाळ मात्र बालपणापासूनच सामान्य जनतेशी जोडली गेली. त्यांच्या लोकप्रियतेचे आणि नेतृत्वाचे यश ते हेच आहे. प्रशंसेने ते कधी हुरळले नाहीत आणि पराभवाने कधी खचले नाहीत. अंधारातून प्रकाशाच्या दिशेने सतत पुढे जाणे, हाच त्यांचा निग्रही स्वभाव राहिलेला आहे. सलग पंधरा वर्षे त्यांचा पक्ष विरोधात होता. त्यामुळे सत्तेची महत्त्वाकांक्षा त्यांना नव्हतीच. आमदार झाल्यावरही त्यांच्या नेहमीच्या स्वभावात आणि वागण्यात काहीही बदल झाला नाही. आपण सामान्य जनतेचे सेवक आहोत आणि सार्वभौम जनता हीच आपली मालक आहे, अशा ध्येयवादानेच ते राजकारण करत राहिले. आता मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यावर अडचणींचे डोंगर ओलांडून त्यांना जावे लागेल. अनेक समस्यांवर मात करतानाच, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि उर्वरित महाराष्ट्राला समान सामाजिक-आर्थिक न्याय द्यावा लागेल. मुख्यमंत्रिपदाचा त्यांच्या डोक्यावरचा सोनेरी मुकूट पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या गलथान आणि उधळपट्टीच्या कारभाराने मलीन झालेला आहे. तो स्वच्छ करावा लागेल. राज्याच्या तिजोरीवर तीन लाख कोटी रुपयांचे प्रचंड कर्ज जुन्या सरकारने केलेले असल्याने, व्याज, कर्जफेड करत विकासासाठी नवा निधी उपलब्ध करावा लागेल. टोलधाडीतून सामान्य जनतेची मुक्तता करावी लागेल. महिलांच्या सुरक्षिततेची समस्याही महत्त्वाची आहेच. राज्याच्या सर्व भागातील अपुर्या राहिलेल्या धरणे आणि कालव्यांच्या बांधकामांच्या पूर्ततेसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करावा लागेल. त्यांच्यासमोरची आव्हाने बिकट आहेत. पण त्यावर त्यांना मात करून जनतेच्या आकांक्षा पूर्ण कराव्या लागतील. महाराष्ट्राच्या या तरूण मुख्यमंत्र्याला त्यांच्या तडफदार आणि जनताभिमुख कारभारासाठी शुभेच्छा.
गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०१४
देवेंद्राचा राज्याभिषेक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा