बुधवार, २९ ऑक्टोबर, २०१४

पृथ्वीवर राज्य करणार्‍यांना घालवले ते देवांवर राज्य करणार्‍यांना कसे टिकू देतील?

  •    
  •     देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्याचा योग्य निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. लोकसभा प्रचारापासूनच मोदी यांच्या डोळ्यासमोर फडणवीस यांचे नाव होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात नागपूरमध्ये मोदींनी त्यांचे जाहीर कौतुक केले तेव्हाच त्यांच्या मनात काय आहे हे स्पष्ट झाले होते. भ्रष्टाचारमुक्तीचा प्रचार करणार्‍या मोदींना त्या प्रचाराच्या पार्श्वभूमीला शोभेल अशी व्यक्ती निवडणे क्रमप्राप्त होते. मोदींच्या सुदैवाने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मोहरा पक्षाजवळ होता. 
  • गेली पंधरा वर्षे फडणवीस विधानसभेत आहेत. अभ्यासू आमदार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्यातील अनेक गुणांचे वर्णन विविध चित्रवाहिन्यांवरून मंगळवारपासून सुरू आहे. त्याची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही. मात्र या सर्व काळात त्यांच्या हेतूंबद्दल विरोधकांनीही कधी शंका घेतली नाही वा सत्ताधार्‍यांशी साटेलोटे असल्याचा आरोप त्यांच्या पश्चातही कधी त्यांच्यावर झाला नाही, हा गुण सर्वाधिक महत्त्वाचा आहे.
  •     फक्त मुख्यमंत्रीपदी स्वच्छ आणि चारित्र्यसंपन्न चेहरा दिला तशीच काळजी मोदी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी उमेदवारी देताना घेतली असती तर आज अल्पमतातील सरकार स्थापन करण्याची नामुष्की भाजपवर आली नसती. स्वबळावर 150 जागा मिळतील अशी परिस्थिती असताना काँग्रेसमधून आलेल्या प्रशांत ठाकूर यांच्यासारख्या भ्रष्ट आणि निष्क्रिय नेत्यांना उमेदवारी दिल्यामुळे मतदारांनी भाजपला बहुमतापासून रोखले. प्रशांत ठाकूर यांच्यासारख्या नेत्यांच्या समावेशामुळे भाजपचा चेहराच कलंकीत झाला आहे. त्यामुळे या सगळ्या भ्रष्ट लोकांना बरोबर घेवून स्वच्छ प्रशासन देवेंद्र फडणवीस कसे देतात हे पाहणे मनोरंजक ठरेल.
  • महाराष्ट्रातील राजकारणाची अलीकडील स्थिती अशी झाली आहे की विरोधक कोणाला म्हणावे असा प्रश्न पडावा. गेल्या काही वर्षांत विरोधकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कळपात सामील करून घेण्याचा उद्योग सत्ताधार्‍यांनी केला. त्यामध्ये त्यांना इतके यश आले की तोडपाणी केले जाते, अशी तक्रार करण्याची वेळ खुद्द शरद पवार यांच्यावर आली. असल्या चक्रात फडणवीस कधी अडकले नाहीत. पण आपल्या पक्षात असे तोडपाणी करणारे ठेकेदार त्यांनी घेतले त्याची शिक्षा त्यांना अल्पमताचे सरकार स्थापन करण्याची वेळ ही आहे.  सत्ताधार्‍यांशी फडणवीस यांचे कधीच वितुष्ट नाही. त्यांनी कधी बेलगाम आरोप केले नाहीत. सत्ताधार्‍यांशी त्यांचे संबंध सौहार्दाचे राहिले असले तरी त्यामध्ये त्यांनी कधी सलगी येऊ दिली नाही. मात्र सत्ता मिळवण्याच्या जिद्दीत नको त्या लोकांना बरोबर घेण्यामुळे देवेंंद्र फडणवीस यांची उंच प्रतिमा लहान झाली.
  •  लहान वयात तारतम्य बाळगणार्‍या व्यक्तीकडे महाराष्ट्राची सूत्रे जात असतील तर ते शुभलक्षण आहे. सत्तेच्या चौथर्‍यांशी सलगी नसणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला हवा होता. पण फक्त मुख्य माणूस स्वच्छ असून चालत नाही. काँग्रेसचे काय झाले? पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिमा स्वच्छ आणि सभ्य अशीच होती. पण त्यांचे सहकारी असलेले भ्रष्ट होते. त्यापैकीच एक भ्रष्ट असे काँग्रेसचे आमदार प्रशांत ठाकूर होते. नगराध्यक्ष असताना एकाच रस्त्याची वेगवेगळ्या नावाने चार चार वेळा टेंडर काढून पैशाचा अपहार केल्याप्रकरणी नगरविकास खात्यामार्फत प्रशांत ठाकूर यांची चौकशीही सुरू होती. पण सत्तेचा दुरूपयोग करून त्या चौकशीचा अहवाल गुलदस्त्यात ठेवला. आता सत्तापालट झाल्यावर चौकशी लागणार या भितीने प्रशांत ठाकूर यांनी भाजपत उडी मारली. अशा लोकांना बरोबर घेवून देवेंद्र फडणवीस सामान्यांना हवे असे सरकार कसे देवू शकतील? त्यामुळे आमटीत पडलेल्या झुरळासारखे प्रशांत ठाकूर यांच्यासारखे कीटक देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे दूर करतात हे पाहणे आता आपल्या हातात आहे.  भ्रष्टाचार विरहीत कारभार आणि विकास हे मुद्दे भाजपने लोकसभेपासून पुढे केले होते. नरेंद्र मोदींनी त्याचीच लाट निर्माण केली. निवडणुकीतील लाटेचा अर्थ हाच होता. मोदी यांना तो अर्थ नीट उमगला, म्हणून गुडघ्याला बाशिंग लावून बसलेल्यांना थारा न देता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली. पण चेहरा स्वच्छ देताना बाजूचे सहकारी जर भ्रष्ट असतील तर त्यांच्यावर नियंत्रण फडणवीस ठेवणार का हा  खरा प्रश्‍न आहे. कॅगच्या अहवालात ताशेरे ओढले असताना, नियमबाह्य सिडकोचा भूखंड लाटणार्‍या प्रशांत ठाकूर यांच्यावर देवेंद्र फडणवीस कारवाई करतील तर ते खर्‍या अर्थाने छत्रपतींप्रमाणे निस्पृह राजे ठरतील. नगरविकास खात्याने प्रशांत ठाकूर यांच्या भ्रष्टाचाराची केलेल्या चौकशीचा अहवाल निरपेक्षपणे न्यायबुद्धीने देवेेंद्र फडणवीस सादर करणार असतील तर ते खरे महाराष्ट्राचे राजे ठरतील. देवेंद्रपद मिळवण्यासाठी इंद्राला शेकडो यज्ञ करावे लागतात. असे यज्ञ म्हणजे प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचार, अत्याचाराचा नि:पात असतो. तसा देवेंद्र फडणवीस करतील तर त्यांना त्यांचे नावही शोभून दिसेल. नाहीतर भोजनावळी घालणारे पेशवेकालीन नाना फडणवीस म्हणून त्यांच्यावर एखादे घाशिराम कोतवाल सारखे नाटक तयार होईल. देवेंद्र फडणवीण यांनी देवेंद्र झाले पाहिजे, फडणवीस झाले नाही तरी चालेल. बुद्धीमत्तेच्या बाबतीत नाना फडणवीसांप्रमाणेच देवेंद्र चतुरस्त्र आणि चलाख आहेत. फक्त ही चलाखी भ्रष्ट अशा भाजप आमदारांना पाठीशी घालण्यात त्यांनी खर्च करू नये ही अपेक्षा. आज प्रशांत ठाकूर यांच्यासारखे कलंकीत आमदार त्यांच्या बरोबर आहेत. अशा भ्रष्ट आमदारांचे टोळके त्यांनी जवळ ठेवले तर फडणवीसांचा कारभार हा काँग्रेससारखाच भ्रष्ट होईल. फडणवीस यांचीही अवस्था स्वच्छ प्रतिमा असूनही पृथ्वीराज चव्हाणांसारखी होईल. पृथ्वीवर राज्य करणारे ते पृथ्वीराज. स्वच्छ प्रतिमा असूनही महाराष्ट्रात त्यांना राज्य टिकवता आले नाही. कारण बरोबर प्रशांत ठाकूर यांच्यासारखे कलंकीत, भ्रष्ट, निष्क्रीय आमदार होते. आता तर देवांवर म्हणजे स्वर्गावर राज्य करणारे देवेंद्र महाराष्ट्रात आले आहेत. तेही जर ठाकूरांसारख्या आमदारांवर विसंबून राहिले तर  इंद्र ज्याप्रमाणे शापीत भगेंद्र झाला तशी अवस्था देवेंद्राची होईल.
  •    फडणवीस यांची निवड होत असताना पक्षातून उमटलेल्या प्रतिक्रिया भाजपबद्दल प्रतिकूल मत बनवणार्‍या आहेत. गटबाजीच्या मोहात बडे नेतेही अडकले. शक्तिप्रदर्शन करण्याची वेळ गडकरींसारख्या मातब्बर नेत्यावर यावी यातच भाजपचे आतले स्वरूप काय आहे हे कळून येते. खडसे यांनी उघड शक्तिप्रदर्शन केले नसले तरी ताकद दाखवण्याची संधी सोडली नाही. तावडे यांनी दिल्ली गाठली होती. एकूण सर्व प्रकार हे काँग्रेस पक्षाप्रमाणेच होत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांचा ठसा दूर राहिला, मुखवटाही भाजपला दाखवता आला नाही. पक्षातील या दुफळीचा इथे उल्लेख करण्याचे कारण म्हणजे यातून देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरची आव्हाने लक्षात यावीत.  महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची नामावळ जपत, या सर्वांचा आशीर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी वस्तुत: नरेंद्र मोदी व अमित शहा वगळता अन्य कुणाचाही त्यांना आशीर्वाद नाही. त्या दोघांच्या भरवशावर त्यांना मुख्यमंत्रिपदाचा गाडा हाकायचा आहे.
  •  सौजन्यशील स्वभाव इथे उपयोगी नाही. सर्वांना बरोबर घेताना त्यांचा पृथ्वीराज चव्हाण होऊ नये. केवळ समजुतीने नव्हे तर कर्तृत्वाने पक्षातील महत्त्वाकांक्षी नेत्यांना आपल्या बाजूने वळवावे लागेल. शरद पवार हेही लहान वयात मुख्यमंत्री झाले. पण त्यांच्यावर यशवंतरावांचा वरदहस्त होता व तेव्हा महाराष्ट्रावर यशवंतरावांची पकड होती. फडणवीस यांच्यावर मोदींचा वरदहस्त असला तरी मोदींची महाराष्ट्रावर पकड नाही. तशी असती तर गडकरी वाड्यावर आमदारांनी गर्दी केलीच नसती. फडणवीस यांच्याकडून अपेक्षा ठेवताना हा फरक लक्षात ठेवला पाहिजे.
  •       दुसरे आव्हान हे पक्षबांधणी व कार्यक्षम कारभाराचे आहे. नेहमी पहिल्या पाचात येणार्‍या विद्यार्थ्याकडून अधिक अपेक्षा असतात. महाराष्ट्राचे तसेच आहे. हे राज्य सर्वच क्षेत्रांत पुढारलेले असल्याने येथील लोकांच्या अपेक्षाही वाढलेल्या आहेत. लोकांना फक्त कार्यक्षम नव्हे तर गतिमान व भ्रष्टाचारमुक्त कारभार हवा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कामे केली नाहीत असे नव्हे. बरीच चांगली कामे केली. मात्र ही कामे करताना ते स्वत: गब्बर झाले. श्रीमंतीतून मस्ती आली व ती लोकांना आवडली नाही. स्वच्छ व गतिमान कारभार करणे सोपे नाही. महाराष्ट्रातील प्रशासनाचाही लौकिक पहिल्यासारखा राहिलेला नाही. सरकार चालवण्याबरोबर पक्ष बांधून काढावा लागेल. पक्षबांधणी झाली नाही तर काँग्रेसमुक्त भारत होऊ शकत नाही. स्वच्छ पाटी व जनतेबद्दल कळकळ ही फडणवीसांची जमेची बाजू. मात्र पक्षांतर्गत कुरबुरी, भ्रष्ट व सुस्त प्रशासन आणि दुबळी पक्षसंघटना ही तीन आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आमदारांनी पृथ्वीवर राज्य करायला आलेल्यांना टिकू दिले नाही ते देवांवर राज्य करणार्‍या देवेंद्राला सहजासहजी कसे टिकू देतील याचा विचार केला पाहिजे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: