शनिवार, १६ ऑक्टोबर, २०२१

शिक्षणाचा उत्साह वाढवा

राज्य सरकारने ४ आॅक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू होणार आहेत ही अत्यंत सकारात्मक आणि आनंदाची बातमी आहे. शाळा सुरू झाल्यानंतरचे वातावरण तयार करणे, विद्यार्थ्यांना परत अभ्यासाची गोडी लावणे हे फार मोठे आव्हान आता इथूनपुढे पेलावे लागणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या मनातील भीती घालवावी लागणार आहे. या भीतीमुळे संशयाचे वातावरण तयार होताना दिसते आहे. आता थंडीचे दिवस सुरू होतील. त्यामुळे निसर्गनियमाप्रमाणे सर्दी, खोकला हे होणारच, पण सामान्य मुले सहज जरी खोकली, शिंकली तरी ती शिंक कोरोनाची नाही ना अशी भीती निर्माण होण्याचे प्रकार होतील. म्हणूनच हे संशयाचे वातावरण कमी करणे, प्रतिकारशक्ती वाढवणे आणि पालकांनी अनावश्यक काळजी करणे सोडले, तर आपण यावर मात करू शकू. शिक्षणाबाबत आलेली मरगळ दूर करून आता शिक्षणाचा उत्साह वाढवण्याचे काम विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सर्वांना करावे लागणार आहे.


गेल्यावर्षी दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्याचे योग्य नियोजन राज्य सरकारने केले होते, पण पुण्यातील काही पालक संघटनांच्या आगावपणामुळे या परीक्षा घेण्याचे रद्द केले गेले. त्याचा परिणाम संपूर्ण राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांवर झाला. अजूनही मूल्यांकनाचे खरे स्वरूप विश्वासार्ह वाटत नाही. त्यामुळे प्रवेशाचाही प्रश्न अनेक ठिकाणी सुटलेला नाही. म्हणूनच शाळा सुरू झाल्यावर पालकांनी सहकार्याची भूमिका घेणे आवश्यक आहे.

आता राज्यातील कोरोनाची स्थिती सध्या तरी मोठ्या प्रमाणात होणा‍ºया चाचण्यांच्या तुलनेत आटोक्यात दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने ग्रामीण आणि शहरी भागांतील शाळा सुरू करण्याचे ठरवले आहे. दीड वर्ष घरी कोंडल्या गेलेल्या राज्यातील लाखो शालेय विद्यार्थ्यांचा विचार करण्याचे भान सरकारने ठेवले हे महत्त्वाचे आहे. कारण जरी आॅनलाइन शिक्षण सुरू झाले होते, तरी ते शिक्षण घेत आहेत असे वाटत नव्हते. तिसरी लाट लहान मुलांना आपल्या कवेत घेईल, अशी भीती निर्माण केल्यामुळे जून, जुलैमध्ये शाळा सुरू झाल्या नाहीत. आता दिवाळी आणि थंडीच्या मोसमात त्या सुरू होणार असल्यामुळे काळजी तर घ्यावी लागणार आहेच. सध्या बहुतेक शाळा स्वच्छतेची तयारी करताना दिसत आहेत. ही स्वच्छता मुलांमधील अंतर, सोशल डिस्टन्सिंग पाळताना मुंबईसारख्या ठिकाणी एक दिवसाआड विद्यार्थ्यांना बोलावणे असे काहीसे नियोजन बहुतेक शाळांनी, महापालिकांनी केलेले आहे. त्यामुळे एक दिवसाआड शाळा म्हणजे अभ्यासक्रम अर्धा होणार हे नक्की. त्यामुळे नवी पिढी अर्धी शहाणी, अर्धवट शिक्षण घेणारी होणार का? असा प्रश्न निर्माण होतो आहे. म्हणूनच आॅनलाइन आणि आॅफलाइन शिक्षण देताना अभ्यासक्रमात किती काटछाट केली जाणार आहे?, मुलांनी थोड्या फार दिवसांत जे काही केले आहे, त्यावर त्यांचे मूल्यांकन होणार असेल तर शिक्षणाचा, विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक, क्षमता यानुसार अंदाज लागणार नाही हे तर नक्की आहेच.


सध्या होत असलेल्या चाचण्यांच्या तुलनेत नव्या बाधितांचे प्रमाण जरी कमी दिसत असले, तरीही सक्रिय रुग्णांचा आकडा हा कमी जास्त होताना दिसतो आहे. बहुतेक पालकांचे आणि शिक्षकांचे लसीकरण झालेले असले, तरी विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही. म्हणूनच शाळेत पाठवताना पालकवर्ग थोडा साशंक आहे, पण घरात बसून मुलांना ऐतगोळे करण्यापेक्षा त्यांना थोडे लढायला शिकवण्याची प्रेरणा देण्याची गरज आहे. हा रोग बरा होणारा आहे हे तर आता आपल्याला समजले आहे. तो इथून कायमचा जाणार नाही हे पण आपण मान्य केलेले आहे. त्यामुळे कोरोनाबरोबरच लढत जगण्यासाठी आता शाळांमध्ये न घाबरता प्रवेश करणे आवश्यक आहे. कोरोनापासून काळजी घेतली पाहिजे हे नक्की असले, तरी त्याची भीती घेऊन शिक्षण पूर्ण होणार नाही. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी शिक्षकांचा आणि शिक्षणसंस्थांचा उत्साह वाढवण्याचे काम केले पाहिजे हे नक्की.

सध्या राज्यात निवडणुकीचे वारे आहेत. मुंबईसह राज्यातील डझनभर महापालिकांच्या निवडणुका, नगरपालिकांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांत होणार आहेत. निवडणुकांसाठी शाळांचा आणि शिक्षकांचा वापर हा अनिवार्य असतो. मतदान केंद्रे म्हणजे बहुतेक शाळाच असतात. अशावेळी होणारी गर्दी शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव करणार नाही ना याचाही विचार करावा लागेल. महापालिकांबरोबर जवळपास दीडशे नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न संपूर्ण राज्यात असणार आहे. एकीकडे शाळा सुरू असणार आणि दुसरीकडे प्रचाराची गर्दी ही कुठे प्रसाराची वर्दी ठरणार नाही ना याकडेही लक्ष द्यावे लागेल. राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव सर्वदूर किती झालेला आहे हे अजून उघडकीस यायचे आहे. गेल्यावर्षी राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्यानंतर दुसरी लाट आली होती. म्हणूनच या निवडणुकांचे कोरोना संकटाबाबत विश्लेषण अजून झालेले नाही. त्यामुळे या चिंताजनक परिस्थितीमध्ये शालेय वर्ग सुरू करताना अत्यंत काळजीपूर्वक आणि पुरेशा खबरदारीनिशीच तो निर्णय सरकारला घ्यावा लागेल. सरकारने तो घेतला आहे. परंतु आता मानसिकदृष्ट्या भक्कम होऊन विद्यार्थ्यांनी लढण्यासाठी म्हणून शिक्षणासाठी बाहेर पडले पाहिजे.


टास्कफोर्स असो किंवा तज्ज्ञ समितीचे शिफारस करायला काही जात नाही, परंतु त्या शिफारशींची योग्य प्रकारे व पूर्णांशाने अंमलबजावणी केली जाते आहे हे कोणी पाहायचे? ४ तारखेपासून शाळा, ७ तारखेपासून मंदिरे, २२ तारखेपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरू होणार आहेत. हे सगळे बंद असल्यामुळे दीड वर्ष ज्याचा आनंद घेता आला नाही. त्याकडे मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे, तसेच दिवाळीनंतर महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्यामुळे काळजी घ्यावी लागेल, पण लढण्यासाठी म्हणून मैदानात उतरायची तयारी विद्यार्थी पालकांची असली पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: